आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
90च्या दशकातील बालपण म्हणजे धमाल असायची. कबड्डी, खो-खो,विटी-दांडू,सायकल वरच्या रेसेस मध्ये दिवस निघून जायचे. आत्ताच्या पिढीप्रमाणे रिकाम्या वेळात टीव्ही आणि मोबाईलचे खोकडे धरून कोणी जास्त बसत नव्हते.
लहान मुले आपल्या आवडीची मासिके घेऊन त्यातील गोष्टी वाचणे पसंत करत. त्याकाळात दर महिन्याला निघणाऱ्या नियतकालिकांचे खूप मोठे प्रस्थ होते. वाचन करणारी लोक संख्येने खूप मोठी असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पाक्षिके आणि मासिके दरमहा निघत असत. त्यांचा खपही मोठ्या प्रमाणावर होत असे.
त्यातलंच एक जिव्हाळ्याचे नाव म्हणजे चांदोबा!
90च्या दशकातील पिढीला चांदोबा हे नाव काही नवीन नाही. जेव्हा इनडोअर गेम्सचे वेड कमी होते आणि वाचन संस्कृती खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेली होती तेव्हाच्या या शाळकरी पिढीमध्ये प्रसिद्ध असणारे एक नाव म्हणजे चांदोबा. चांदोबा हे लहान मुलांसाठीचे निघणारे एक मासिक होते.
दर महिन्याला चांदोबाच्या नवीन अंकाची अनेक शाळकरी मुले उत्सुकतेने वाट बघत असायची. बहुसंख्य मुलांनी त्यांचा वाचनाचा श्रीगणेशा चांदोबापासून सुरू केलेला आहे.
चांदोबाचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे होते. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा म्हणजेच 1947 सालापासून चेन्नईवरून बी. नागी रेड्डी आणि चक्रपाणी या दोन चित्रपट निर्मात्यांनी चांदोबाची निर्मिती केली होती. सुरुवातीला चांदोबा हे तमिळ भाषेतून प्रकाशित व्हायचे, “चंदामामा” या नावाने.
या मासिकात भारतीय पौराणिक कथा, भारतीय इतिहास, लोक कथा, देव संस्कृती, याचे दर्शन घडविणाऱ्या कथा असायच्या. चांदोबा हे खऱ्या अर्थाने अस्सल देशी मासिक होते. यातील कथानकाचा ढाचा बहुतांशी नीती कथेचा असायचा म्हणजेच लहान मुलांना नीतिमत्ता शिकविणार्या गोष्टींचे धडे यातून दिले जायचे.
सुरुवातीला फक्त चेन्नई आणि तामिळनाडू पुरते मर्यादित असलेले हे मासिक नंतर इतर प्रादेशिक भाषांमधून देखील प्रसिद्ध होऊ लागले. तमिळ वगळता बाकीच्या एकूण 14 भाषांमधून नंतर चांदोबाचे अंक निघत होते. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, मल्याळी, तेलुगु, कन्नड, असामी या भाषांचा समावेश होता.
प्रादेशिक भाषांमधून निघायला लागल्यावर त्याचा खप वाढला. सर्व स्तरातील लोकांचे ते आवडते मासिक बनले.
साठच्या दशकात एकट्या चांदोबाच्या भारतभर जवळजवळ पन्नास लाख प्रती दरमहा विकल्या जात असत. यावरूनच चांदोबाच्या लोकप्रियतेची कल्पना येते. बरं फक्त लहान मुलेच या मासिकाचे फॅन होते असे नाही तर, कॉलेजला जाणारी मुले आणि अनेक प्रौढ माणसे देखील आतुरतेने चांदोबाची वाट बघत असत.
चांदोबाची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एखादी इतिहासातील प्रसिद्ध गोष्ट घेऊन दरमहा तुकड्या-तुकड्याने ती सांगितली जायची. यामध्ये रामायण-महाभारत तर आलेच. याव्यतिरिक्त चांदोबाने सम्राट अशोकाचा इतिहास, त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्यचा इतिहास, विक्रमादित्य राजाचा इतिहास, भारतात जी मोठमोठी साम्राज्ये होऊन गेली त्या साम्राज्यांचा इतिहास कथारूपाने दर महिन्याला क्रमशः मुलांसमोर ठेवला.
आपण जी कथा वाचतो आहे त्यामध्ये पुढे काय झाले ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असल्यामुळे याचा उपयोग चांदोबाचा खप वाढण्यासाठी निश्चितपणे होत असे. उदा. सम्राट अशोकाचा इतिहास आहे तो चांदोबाच्या पुस्तकातून जवळपास दोन – तीन वर्षे चालत होता. अशाच इतर कथा देखील चांदोबा प्रकाशित करत असे.
तसेच चांदोबामध्ये विक्रम-वेताळ नावाचे एक सदर देखील चालत असे. हे सदर लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. वेताळ पंचविशी म्हणून ज्या 25 आख्यायिका भारतभर विक्रम आणि वेताळच्या प्रसिद्ध आहेत त्या चांदोबाने सलग पंचवीस भागांमध्ये आपल्या मासिकामधून मांडल्या. त्यानंतर त्यांनी ही मालिका संपली असे जाहीर केले. त्यावर अनेक वाचकांचे नापसंतीचे पत्र चांदोबाच्या कार्यालयामध्ये पोहोचले.
लोकांना वेताळ आणि विक्रमच्या आणखीन कथा हव्या होत्या. त्यामुळे संपादकांनी पुन्हा ही सीरिज सुरु केली आणि त्यामध्ये विक्रम आणि वेताळाच्या काल्पनिकच पण नवीन आख्यायिका मांडण्यात आल्या. त्यासुद्धा बाळगोपाळांना भरपूर पसंत पडल्या.
चांदोबामध्ये संपूर्णपणे देशी कथा असत. प्रत्येक कथेला पूरक अशी रंगीत चित्रे देखील त्यामध्ये काढण्यात येत असत. शिवाय या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कथेच्या शेवटी काहीतरी बोध असे. प्रत्येक कथा मानवी मूल्यांचा, सद्गुणांचा कुठलातरी एक उपदेश साध्या सोप्या भाषेमध्ये करत असे. यामुळे देखील पालकांमध्ये चांदोबाचे मोठे नाव होते.
बी. नागी रेड्डी नंतर 1975 साली त्यांचा मुलगा विश्वनाथ हा या मासिकाचा संपादक बनला. विश्वनाथने अनेक वर्षे चांदोबाची धुरा आपल्या खांद्यावर उत्तम प्रकारे सांभाळली. त्याच्या काळामध्ये चांदोबा तामिळनाडूच्या सीमा ओलांडून भारतभर पोहोचला.
नंतर नंतर चांदोबामध्ये परदेशी ऐतिहासिक कथा देखील येत राहिल्या. परंतु या कथा मांडणीमध्ये देखील एक वेगळे वैशिष्ट्य होते. या कथा संपूर्णपणे देशी अवतारात प्रसिद्ध होत असत.
उदाहरणार्थ जसे आपले महाभारताचे युद्ध प्रसिद्ध आहे तसेच ग्रीस देशामधले ट्रॉयचे युद्ध सुद्धा जगप्रसिद्ध आहे. हे युद्ध चांदोबाने आपल्या प्रतीमध्ये दर महिन्याला क्रमशः रुपधरच्या यात्रा या नावाने प्रसिद्ध केले.
यामध्ये त्यांनी मूळ कथानकामधल्या सगळ्या पात्रांना भारतीय नावे दिली. त्यांचे अवतार देखील भारतीय बनवले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बसेल अशा तऱ्हेने त्याचे स्वैर रूपांतर केले.
चांदोबाची लोकप्रियता नंतर उतरणीला सुद्धा लागली. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या क्रांतीमुळे सगळ्याच मॅगझिन्सना हळूहळू फटका बसत होता.
पुस्तकांचा खप मंदावलेला होता. नवीन पिढी आपला जास्तीचा वेळ आता टीव्हीसमोर घालवू लागलेली होती. 1947 पासून अव्याहतपणे सुरू असलेल्या चांदोबावर 1998 साली संपूर्णपणे बंद पडण्याची वेळ आली होती.
नागी रेड्डी यांच्या स्टुडिओमधील कामगारांनी संप पुकारला आणि संपूर्ण स्टुडिओ बंद पडला. याची परिणिती चांदोबावरसुद्धा झाली. हे मासिक प्रकाशित व्हायचे बंद झाले. त्यानंतर 1999 साली चांदोबा नवीन अवतारात पुन्हा त्यांच्या वाचकांच्या भेटीला आले. परंतु ही सर्व्हायवलची लढाई फार काळ चालू शकली नाही.
2006 साली चांदोबा पैशाअभावी पुन्हा एकदा बंद पडले.
चांदोबा पुन्हा एकदा चालावे म्हणून जिओडेसिक नावाच्या एका सॉफ्टवेअर कंपनीने या मासिकाचे डिजिट हक्क विकत घेतले. स्वतःच्या वेबसाईटवर त्यांनी जुन्या अंकाचे प्रकाशन देखील सुरू केले. परंतु दुर्दैवाने ही कंपनीदेखील दिवाळखोरीमध्ये निघाली.
आजही जिओडेसिकच्या ऑफिसमध्ये सहा हजाराहून जास्त चांदोबाच्या प्रति प्रकाशनासाठी तिष्ठत पडलेल्या आहेत.
भारतातील चांदोबाचा फॅन बेस मजबूत आहे. आज याच लोकांनी चांदोबाच्या वेगवेगळ्या प्रति गोळा करून त्याचे इत्यादी प्रकाशन सुरू केले आहे.
त्यामुळे जर तुम्ही इंटरनेटवर गेलात आणि चांदोबा पीडीएफ असे सर्च केले तर तुम्हाला चांदोबाची जुनी पुस्तके आज देखील डिजिटल स्वरूपात वेगवेगळ्या लिंकवर वाचायला मिळू शकतात.
तरीही चांदोबाची एकच ऑफिशिअल वेबसाईट यावी आणि त्याचे आजच्या काळातही इथून पुढे नवीन प्रकाशन सुरू राहावे ही समस्त चांदोबा प्रेमींची इच्छा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.