आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सैन्य दलात भरती होऊन देशासाठी शहीद झालेल्या अनेक वीर जवानांच्या बहादुरीचे किस्से आपण वाचलेत, ऐकलेत! आज सैन्य दलात भरती होणाऱ्यांमध्ये मुलीही मागे नाहीत. पण, एक काळ असा होता की सैन्य दल हे मुलींचे किंवा स्त्रियांचे क्षेत्र नव्हे असा प्रचलित समज होता.
कालांतराने अनेक महिलांनी लष्करातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून दाखवला आणि या वदंतेला साफ खोटे पाडले. भारतीय सैन्यात असो किंवा आणखी कुठले क्षेत्र असो स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत वेगळे करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना अशाच एका महिलेचे कर्तृत्व आज प्रेरणादायी ठरणारे आहे. ही स्त्री म्हणजे सैन्य दलात भरती होणारी पहिली महिला सैनिक शांती टीग्गा.
इच्छाशक्ती, दृढनिश्चय, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर आपण आपले ध्येय कशाप्रकारे साध्य करू शकतो, याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून शांती टीग्गा यांच्या जीवन प्रवासाकडे पाहता येईल. अर्थात, कमी कालावधीच्या आयुष्यातही त्यांनी दाखवलेले धैर्य आणि साहस यामुळेच त्यांचे नाव आजही अभिमानाने घेतले जाते.
शांती टीग्गा या भारतीय सैन्यात भारती होणाऱ्या पहिल्या महिला सैनिक होत्या. वयाच्या ३५शीत त्यांनी हे सिद्ध करून दाखवले की फक्त इच्छाशक्तीच्या बळावर आपण आपल्यातील कर्तृत्व सिद्ध करू शकतो. अर्थात, सैन्यातील त्यांचा प्रवास फारच कमी कालावधीचा होता. पण, तरीही त्यांनी जे साहस दाखवले त्यासाठी आजही त्यांचे स्मरण केले जाते. खडतर आयुष्यावर मात करून मिळवलेले यशही अंतिम क्षणी त्यांना हुलकावणी देऊन गेले. आज या लेखातून त्यांच्या या जिद्दीचा प्रवास आणि त्यांचा दुर्द्वैवी अंत जाणून घेऊया.
शांती टीग्गा यांच्या जन्म पश्चिम बंगाल मधील जलपाईगुडी जिल्ह्यातील एका आदिवासी जमातीत झाला. अर्थातच घरची आर्थिक परिस्थिती अगदीच हलाखीची असल्याने त्यांना पुरेसे शिक्षण घेणे शक्य झाले नाही.
रूढीवादी समाजात तसेही मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात नाहीच. नंतर अल्पवयातच त्यांचा विवाह झाला. वयाच्या विशीतच शांती यांना दोन अपत्ये झाली. पण, शांतीचे पती रेल्वेमध्ये नोकरीला असल्याने सासरी तशी पैशाची चणचण फारशी भासत नसे. पती आणि दोन मुले असा संसाराचा गाडा अगदी सुखनैव सुरु होता.
परंतु, कदाचित शांतीच्या नशिबी आलेले हे सुख नियतीला मंजूर नव्हते. शांती तीस वर्षाची असतानाच तिच्या पतीचा मृत्यू झाला. ऐन तारुण्यात शांतीच्या नशिबी वैधव्य आले. मुले बापाविना पोरकी झाली. मुलांची जबाबदारी आणि संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी एकट्या शांतीवरच येऊन पडली.
पती रेल्वेमध्ये सेवेला असल्याने त्यांच्या जागी शांतीलाही रेल्वेमध्येच नोकरी मिळाली. रेल्वेमध्ये तिला पॉइंट्समनची नोकरी मिळाली. जिथे पुरुषांनी देखील हे काम अगदी जोखमीचे वाटते तिथे शांतीने ही नोकरी स्वीकारली.
दोन लहान मुलांसह रेल्वेतील बारा बारा तासांची नोकरी करणे म्हणजे शांतीसाठी एक दिव्यच होते. पण जबाबदारीपुढे हार पत्करणे शक्य नव्हते. इथे नोकरी करता करता तिच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच शांतीला टेरिटोरीयल सैन्याबाबत ऐकायला मिळाले. शांतीचे अनेक पाहुणे देखील यातच नोकरीला होते.
काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या जिद्दीने त्यांनी टेरिटोरीयल आर्मीमध्ये भरती होण्याचा निश्चय केला. रेल्वेतील नोकरी करत करतच आर्मीत भरती होण्याचीही तयारी सुरु केली. एकतर शांतीचे शिक्षण कमी होते. म्हणून २००८ मध्ये तिने दहावी पूर्ण केली. रेल्वेची ड्युटी, घराची जबाबदारी, अभ्यास या सोबतच भरतीसाठीची तयारी अशी सगळी तारेवरची कसरत सुरु झाली.
पण, शांतीने निश्चय सोडला नाही. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत व्हॉलीबॉल, फुटबॉल असे खेळ खेळून रात्री उशिरा झोपून पुन्हा सकळी उठणे हा तिचा नित्य दिनक्रम होता. टेरिटोरीयल आर्मीमध्ये भरती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व लेखी परीक्षेत शांती उत्तीर्ण झाली.
आता वेळ होती शारीरिक क्षमता सिद्ध करण्याची. शारीरिक चाचणीच्या दिवशी जेंव्हा शांती मैदानात उतरली तेंव्हा तिच्या सोबतचे सगळे प्रतिस्पर्धी पुरुष होते. पण, सर्वच स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळवला.
दीड किलोमीटर पळण्याच्या शर्यतीत तिने सर्व पुरुषांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. फक्त १२ सेकंदाच्या कालावधीत तिने ५० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण केली. तिच्या सोबतचे सगळे पुरुष प्रतिस्पर्ध्यांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली. बंदूक चालवण्याचे तिचे कौशल्य पाहून तिचे प्रशिक्षक देखील थक्क झाले. इंसास रायफल मधून तिने झाडलेल्या गोळीने अचून वेध घेतला होता.
ट्रेनिंगच्या दरम्यानची तिची कामगिरी पाहून तिला सर्वोच्च ट्रेनिंग कॅडेटचा पुरस्कार देखील देण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी तिला पुरस्कार देताना, “मला तुझा सार्थ अभिमान वाटतो,” असे उद्गार काढले.
खडतर प्रयत्नानंतर आर्मीमध्ये भरती होण्याचे शांतीचे स्वप्न पूर्ण झाले असले. तरी तिची सत्वपरीक्षा इथेच संपली नाही. तिच्या आयुष्यातील हे सुख फारकाळ टिकू शकले नाही. नोकरी लागून फक्त दीड-दोन वर्षेच झाली असतील. पण, तिच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. शांती इतरांना नोकरी लावण्याच्या आमिषाने इतरांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला. तिच्या शिफारशीमुळे पदे भरली जातात, असेही आरोप सुरु झाले.
एकीकडे तिच्या धैर्याचे आणि साहसाचे जगभर कौतुक सुरु असतानाच तिच्यावर लावल्या गेलेल्या या आरोपांमुळे तिच्यावर शिंतोडे उडवले जाऊ लागले. अशा आरोपांपुढे शांती हतबल ठरत होती. त्यातच तिच्यावर हिंसक हल्ले होण्याचे प्रकारही घडू लागले.
९ मे २०१३ रोजी काही अज्ञात लोकांनी शांतीचे अपहरण केले. तिच्या कंपनीत जेंव्हा तिचे अपहरण झाल्याचे समजले तेंव्हा ताबडतोब तिचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. रात्रभर तिचा शोध घेऊनही शांतीचा काहीच पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शांती रेल्वेरुळावर पडलेली आढळून आली.
अज्ञातांनी तिचे हातपाय रेल्वेरूळाशी घट्ट बांधले होते. तिच्या डोळ्यांवरही पट्टी बांधलेली होती. तिला तत्काळ दवाखान्यात भरती करण्यात आले. शुद्धीवर आल्यावर शांतीने सांगितले की, तिचे अपहरण करणाऱ्या लोकांनी तिला कोणतीही शारीरिक इजा पोहोचवलेली नाही. पण, तिच्या सुरक्षेसाठी दवाखान्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले. कारण, तिच्या जीवाला धोका असल्याचे या प्रकारातून पुरेसे स्पष्ट झाले होते.
दवाखान्यात शांती सोबत तिचा मुलगा होता. एकेदिवशी पोलिसांना शांतीच्या रूममधून तिचा मुलगा जोरजोरात ओरडत असल्याचे ऐकले. पोलीस तिच्या रूममध्ये गेले तेंव्हा मुलाने सांगितले की, आई बराच वेळ झाला बाथरूममधून बाहेर आली नाही आणि तिचा आवाजही येत नाही. पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. तेंव्हा शांतीचा गळफास घेतलेला मृतदेह मिळाला.
तिच्यावरील आरोप सहन न झाल्याने शांतीने आत्महत्या केल्याचे सांगून पोलिसांनी हा तपास संपवून टाकला. पण, शांतीच्या कुटुंबियांच्या मते, शांतीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाल्याचा शक्यता आहे.
अर्थात, हे सत्य अद्यापही गुलदस्त्यातच आहे. शांतीचे अपहरण कुणी केले आणि तिच्या आत्महत्येला कोण जबाबदार हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. मुलांचे भविष्य घडवणे आणि त्यांना चांगले शिक्षण देणे हेच शांतीच्या आयुष्याचे अंतिम ध्येय होते. त्यासाठी तिने अपरिमित कष्ट घेण्याची तयारी ठेवली होती. पण, तिच्या दुर्दैवा पुढे तिची एवढी मोठी जिद्दही तोकडी ठरली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.