आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“जर का गांधी मेला तर चांगलंच आहे, आपल्या साम्राज्याचा एक मोठा शत्रू कमी होईल आणि सगळ्यांना कळेल की सध्या आपलंच राज्य चालू आहे.”
हे मी म्हणत नाही आहे. हे उद्गार आहेत एका अशा साम्राज्याच्या पंतप्रधानाचे ज्याने जवळजवळ संपूर्ण जगाला आपलं गुलाम बनवलं होतं, भारतासारख्या अनेक देशांवर ब्रिटिशांनी राज्य करुन त्या देशांना सगळ्या बाजूंनी दुर्बल करुन सोडलं.
अशा ह्या भारतावर “आतोनात प्रेम” करणाऱ्या पंतप्रधानाचे नाव होते, विन्स्टन चर्चिल.
जेव्हा सगळं जग दुसऱ्या महायु*द्धात अडकलं होतं त्यावेळी चर्चिल ब्रिटनचं नेतृत्व करत होता. २०व्या शतकात साम्राज्यवादाच्या नावाखाली रक्ताचे पाट वाहण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विन्स्टन चर्चिलबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर चर्चिलचा जन्म ३० नोव्हेंबर १८७४ रोजी इंग्लंड येथे झाला. चर्चिल इंग्लंडच्या फार प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक होता. राजकारणात तर तो माहीर होताच पण याशिवाय तो उत्तम कलाकार, इतिहासकार देखील होता. राजकारणात येण्यापूर्वी त्याने ब्रिटीश सैन्यामध्ये अधिकारी म्हणून नोकरी केली होती. सन १९०० साली तो ब्रिटिश संसदेचा कंजरव्हेटिव्ह सदस्य बनला.
त्यानंतर त्याला पहिल्या महायु*द्धाच्या दरम्यान लॉर्ड ऑफ एडमिरल्टी (ब्रिटिश नौदलाचा राजकीय प्रमुख) बनवण्यात आले. तर मे १९४० मध्ये त्याने ब्रिटनच्या पंतप्रधान तसेच रक्षामंत्री पदाची शपथ घेतली. त्याचवेळी जगात दुसरे महायु*द्ध छेडले गेले होते आणि ब्रिटेनने जर्मनीवर चर्चिलच्या राजकीय कौशल्याने विजय मिळवला होता.
दुसरं महायु*द्ध संपल्यानंतर ब्रिटनला कळून चुकले की आता फार काळ भारताला गुलाम म्हणून ठेवणे शक्य नाही. आणि म्हणूनच त्यांनी भारताचे तुकडे करण्यासाठी मुस्लीम लीगच्या नेत्यांना भडकवायला सुरुवात केली. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याचे निश्चित झाले त्यावेळी भारतीय नेत्यांना विभाजनासाठी तयार करणे हेही एक फार मोठे आव्हान होते.
चर्चिल भारताला स्वातंत्र्य देण्याच्या साफ विरोधात होता. लॉर्ड माउंटबॅटन जेव्हा गवर्नर म्हणून भारतात यायला निघाला त्याआधी चर्चिल त्याला म्हणाला होता, “ब्रिटीश साम्राज्य तोडायला तुम्ही जाताय आणि ह्यात मी तुम्हाला कधीच साथ देऊ शकत नाही.”, असं म्हणतात की यानंतरच चर्चिलने माउंटबॅटनशी बोलणे टाकले.
त्याचा महात्मा गांधींवर विशेष राग होता. त्याने गांधीजींचा जमेल तसा जमेल तेव्हा अपमान केला होता. त्यांना चर्चिलने राजद्रोही आणि अर्धनग्न अशा उपाध्या दिल्या होत्या.
१९४२ मध्ये चले जाव चळवळीच्या वेळेस जेव्हा गांधीजी उपोषणाला बसले तेव्हा त्यांना “मरू द्यावं” असा निर्णय चर्चिलच्या कॅबिनेटने घेतला. आणि चर्चिल केवळ इथेच थांबला नाही तर “गांधीजी वारंवार ग्लुकोजचे पाणी पितायत आणि म्हणूनच त्यांना काही होत नाही” असे आरोप करत राहिला.
त्याने अनेक देशांना ना*झी जर्मनीच्या तावडीतून सुटका करुन दिली. त्यामुळेच डेन्मार्क वगैरे देश विन्स्टन चर्चिलला दुसऱ्या महायु*द्धाचे वीर मानतात. याच महायु*द्धादरम्यान भारतातील बंगाल प्रांतात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. लोकांची खाण्यापिण्याची आबाळ होत होती. अशा परिस्थितीतही त्याने दुष्काळग्रस्त भागात धान्य पुरवठा करण्याऐवजी ब्रिटीश सैन्याला ते धान्य पाठवले. परिणामी जवळजवळ पन्नास लाख भारतीयांनी जीव गमावला. हि*टल*र एवढेच निर्दोष जनतेचे रक्त चर्चिलच्या हातावरसुद्धा आहे.
भलेही ब्रिटनने दुसरे महायु*द्ध जिंकले असेल पण त्याची किंमत त्यांना अनेक गुलाम बनवून ठेवलेल्या देशांना मुक्त करुन द्यावी लागली. आणि चर्चिल केवळ ब्रिटनमधेच हिरो म्हणून ओळखला जाऊ शकतो. बाकी सगळ्यांसाठी तो फक्त साम्राज्यवादाच्या नावाखाली निर्दोष लोकांचा बळी देणारा अघोषित क्रू*रकर्मा हुकुमशहा आहे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.