आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शांततेचे दूत म्हणून जगभरात ओळख असलेल्या महात्मा गांधींना अजूनही नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं नाही. असं का आहे ? महात्मा गांधींच्या हत्येला आज ७२ वर्ष झाली, ह्या ७२ वर्षात अनेकवेळा हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. पण असं का आहे याचं उत्तर देण्याचा प्रयत्न झाला नाही.
द प्रिंट या नियतकालिकेत ह्या प्रश्नाचे उत्तर देणारा लेख आशिष मेहता यांनी लिहला असून त्या लेखात त्यांनी गांधी आणि नोबेलच्या हुलकावणीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
नॉर्वेयन नोबेल कमिटीच्या अर्काइव्ह विभागात असलेल्या नोंदीनुसार महात्मा गांधी यांना पाच वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालं असून तीन वेळा त्यांची नाव निश्चिती देखील करण्यात आली होती.
परंतु एकदा त्यांच्याविषयी छापण्यात आलेल्या चुकीच्या बातमीत त्यांनी पाकिस्तान विरोधात युद्ध छेडण्याची भाषा केल्यामुळे त्यांना नोबेल नाकारण्यात आला त दुसऱ्या वेळी ते ओस्लोला जाऊन नोबेलचा स्वीकार करणार त्याच्या आतच त्यांची नथुराम गोडसेने गोळी मारून हत्या केली.
गांधी सर्मथकांनी १९३७, १९३८, १९३९, १९४७ आणि १९४८ साली गांधींना नोबेल मिळावा यासाठी नामांकन अर्ज भरला होता, पण नोबेल कमिटीने प्रत्येकवेळी दुसऱ्या व्यक्तीची निवड केली होती.
गेल्या अनेक वर्षात कमी प्रसिद्ध असलेले अनेक लोक ह्या किताबाचे मानकरी ठरले होते, पण ह्या किताबाला स्वीकारल्या नंतर त्यांनी त्या किताबाची गरिमा किती राखली हा देखील वादाचा मुद्दा आहे.
बऱ्याचदा ते लोक त्या पुरस्काराच्या प्रतिष्ठेला जपतात की नाही याची चिंता नोबेल कमिटीला जास्त असते.
गांधी हत्येनंतर अनेक दशकं नोबेल कमिटी गांधींना नोबेल न देण्याची आपली चूक सुधारण्यासाठी का होईना मार्टिन ल्युथर किंग ज्यू., नेल्सन मंडेला, अंग सॅन स्युकी आणि कैलास सत्यार्थी या गांधीवादी लोकांना नोबेल पारितोषिक वाटप करत राहिली आहे.
१९८९ साली दलाई लामा यांना नोबेल पारितोषिक देताना देखील त्यांनी म्हटले आहे की ही महात्मा गांधींना वाहिलेली श्रद्धांजली आहे.
गांधींना नोबेल का देण्यात येत नव्हते ?
अनेक टीकाकारांनी टीका करताना म्हटले आहे की नोबेल कमिटीची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा युरोपवादी होता, त्यामुळे त्यांनी गांधींना नोबेल दिला नव्हता. यासाठी ग्रेट ब्रिटनची तळी उचलणे आणि त्यांची नामुष्की ओढवून घ्यायची इच्छा नसणे हे देखील एक कारण होते.
नोबेल कमिटीने हा आरोप कधीच स्वीकारला नाही. पण नंतर प्रसिद्ध करण्यात नोबेल आर्काइव्हचा अभ्यास केल्यावर त्यांची भूमिका तशी होती असं दिसून येतं आहे.
फ्रेंड्स ऑफ इंडिया नावाच्या संघटनेचे सदस्य असलेले लेबर पार्टीचे नेते ओले कोलंबोर्जन्सने १९३७ साली पहिल्यांदा गांधींच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन दिले होते.
१९३८ आणि १९३९ साली पुन्हा एकदा हा अर्ज कऱण्यात आला होता. गांधींचे नाव विचारात देखील घेण्यात आले होते.
जॅकब वर्म मिलर ह्या इतिहासकाराचा सल्ला ह्या साठी नोबेल कमिटीने घेतला, त्यावर मिलर ह्यांनी ओले यांचा सल्ला लक्षात घेऊन एक निरीक्षण नोंदवलं, ज्यात त्यांनी म्हटलं की गांधी हे चांगले सहृदय आणि प्रभावी मनुष्य आहेत व त्यांच्यावर असंख्य भारतीयांचे प्रेम आहे, पण त्यांच्यात बरेच बदल घडत असतात.
कधी गांधी हे एकदम संत भासतात तर कधी अगदी सामान्य राजकीय नेते, कधी ते स्वातंत्र्यता सेनानी भासतात तर कधी ते एक आदर्शवादी देशभक्त दिसतात, त्यांच्या भूमिका या सतत बदलत आहेत.
त्या संदिग्ध वाटतात आणि कोणी असं देखील म्हणायला वाव आहे की गांधींचा दक्षिण आफ्रिकेतील लढा हा फक्त तिथल्या भारतीय लोकांसाठी होता त्यांचा लढा तिथल्या कृष्णवर्णीयांसाठी नव्हता, जे अत्यंत वाईट परिस्थितीत जगत होते.
स्वातंत्र्यानंतर काय झालं ?
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि महात्मा गांधींना नोबेल पारितोषिक देण्याची मागणी पुन्हा समोर आली. यावेळी तीन भारतीय नेत्यांनी गांधींच्या शांततामय लढ्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात यावे अशी मागणी केली.
यात एक होते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, दुसरे उत्तर प्रांताचे जी. बी. पंत आणि तिसरे राष्ट्रीय आमसभेचे अध्यक्ष जी.व्ही. मालवणकर होय.
मग कमिटीने अजून एका इतिहासकाराकडे विचारणा केली, त्याचं नाव होतं जेन्स अरुप सेइप. त्यांच्या रिपोर्ट्सनुसार त्यांनी गांधींना नोबेल शांतता पुरस्कार देण्यासाठी केलेला प्रतिवाद हा मिलर यांच्यापेक्षा बरा असल्याचे मत टोनेसन ह्यांनी व्यक्त केलं होतं.
तरी सेईप यांनी गांधींच्या भारताच्या फाळणीवेळीच्या भूमिकेला ग्राह्य धरताना म्हटलं होतं की त्यांच्या भूमिकांमुळे मोठा रक्तपात झाला होता.
त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते पण ते फसले असं त्यांचं मत पडलं. पण तरीसुद्धा अनेक नागरिकांनी आणि कमिटीतल्या सदस्यांनी गांधींच्या नावाला दुजोरा दिला देखील होता.
ख्रिश्चन ऑतेदल आणि स्मिथ इंगरब्रेस्टन यांनी गांधींच्या नावाला समर्थन दिलं होतं. अनेक नॉर्वेजियन मंत्री गांधींच्या बाजूने होते. पण फाळणीच्या संघर्षामुळे त्यांची चलबिचल अवस्था झाली होती.
पण तरी देखील गांधी यांचे नाव या पुरस्कारासाठी योग्य असल्याचे म्हटले होते.
पुढे रेऊटर्स नावाच्या संकेतस्थळावर एक लेख प्रकाशित झाला ज्यात खोटी माहिती छापण्यात आली होती, ज्यात असा उल्लेख होता की गांधींनी पाकिस्तानच्या विरोधात युद्ध करण्याचे आदेश दिले असे म्हणण्यात आले होते, ज्याचा परिणाम असा झाला कि गांधींना नोबेल देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला.
खरंतर गांधींनी म्हटलं होतं की ‘जर पाकिस्तानांतून येणाऱ्या हिंदूंचा रक्तपात असाच सुरु राहिला तर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल’ असं काही गांधी म्हणाले होते.
त्याचा अर्थ युद्ध पुकारू असा घेतला गेला आणि त्यामुळे वेगळा संदेश जगभरात गेला. त्यामुळे ह्यावेळी देखील गांधीं यांचे नाव मागे पडले.
शेवटचा प्रयत्न
१९४८ साली गांधींच्या नावावरचा मळभ दूर झाला होता आणि त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात यावे अशी मागणी करणारे अनेक पत्र नोबेल समितीला मिळाले होते, ज्यात २ भूतपूर्व नोबेल शांतता पुरस्कार विजेते, कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक, अनेक लेखक, न्यायाधीश आणि नॉर्वेचे राजकारणी यांचा समावेश होता.
इतक्या शिफारसी नंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब देखील झाला होता. पण गांधी हत्येनंतर पारितोषिक कोणाला द्यायचे हा प्रश्न होता, ना गांधी यांच्याकडे स्वतःची काही प्रॉपर्टी होती, ना कुठला व्यवसाय होता.
मग हा पुरस्कार कोणाला द्यायचा हाच प्रश्न होता, यामुळे हा पुरस्कार त्यावर्षी गांधींना प्रदान करण्यात आला नाही पण त्याबरोबरच त्यांच्या योग्यतेचा माणूस सापडला नाही म्हणून हा पुरस्कार कोणालाच प्रदान करण्यात आला नाही.
खरंतर गांधीना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात काहीच अडचण नव्हती. पण हा पुरस्कार देण्यासाठी गांधींच्या पाठी काहीच नसल्यामुळे त्यांनी हा पुरस्कार दिला नव्हता.
पुढे १९७४ साली हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार नाही, असा नियम तयार करण्यात आला होता.
तर अशा या कारणामुळे भूतलावर धर्म संस्थापकांप्रमाणे ज्या व्यक्तिला त्याच्या शांततावादी भूमिकेसाठी गौरविण्यात आले, त्याला जगातला जगातील सर्वात मोठा शांततेचा पुरस्कार मिळाला नव्हता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.