आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपण शाळेत पहिल्यांदा फुटबॉल खेळतो तेव्हा कदाचित आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच उद्भवत असेल, तो म्हणजे भारतात फुटबॉलला क्रिकेटसारखे महत्त्व का नाही? अलीकडे ‘इंडियन सुपर लीग’ या नावाने फुटबॉलच्या स्पर्धा सुरु झाल्याने कदाचित सध्याच्या मुलांना तसा प्रश्न पडत नसेलही, पण नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांना असा प्रश्न पडला असेलच. वरवर जरी आपल्याला भारतात फुटबॉलला महत्त्व नसल्याचे दिसून येत असले, तरी ते पूर्ण सत्य नाही. भारतीय फुटबॉलला मोठा इतिहास आहे.
भारतीय फुटबॉलच्या इतिहासात ‘भारतीय फुटबॉल महासंघ’ अर्थात ‘इंडिया फुटबॉल असोसिएशन’ स्थापना महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. ‘इंडिया फुटबॉल असोसिएशन’ची स्थापना १८९३ साली बंगालमध्ये झाली. स्वातंत्र्यापर्यंत या संस्थेवर ब्रिटीशांचे वर्चस्व होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ही देशातील सर्वात शक्तिशाली फुटबॉल संस्था होती. आज हीच संस्था ‘ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशन’ म्हणून ओळखली जाते.
भारतीय फुटबॉलचा इतिहास चाचपताना आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येते किंवा अनेकांकडून आपण तसे ऐकलेलेही असते, ती म्हणजे FIFA वर्ल्ड कपसाठी भारताची फुटबॉल टीम क्वालिफाय झाली असूनही फक्त अनवाणी खेळता येणार नाही या कारणाने भारताला वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास परवानगी नाकारण्यात आली. पण हे कितपत खरं आहे आणि नेमकं हे प्रकरण काय आहे हे या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
१९४०-५०च्या दशकात नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताची फुटबॉल टीम संपूर्ण आशिया खंडात सर्वोत्तम टीम मानली जात असे. ही फुटबॉल टीम अतिशय नियमितपणे ऑलिम्पिक सामन्यांमध्ये आपला सहभाग नोंदवून कित्येकदा विजयी देखील होत असत. एवढी मोठी टीम असल्यावर वर्ल्डकपसाठी प्रयत्न करणं आलंच. १९३० साली सुरु झालेला FIFA वर्ल्ड कप दर चार वर्षांनी होत असतो. पण युरोपमध्ये झालेल्या महायु*द्धांमुळे १९३८, १९४२ आणि १९४६ चे वर्ल्ड कप होऊ शकले नाहीत. १९५० साली मात्र ब्राझीलमध्ये वर्ल्ड कप सामने खेळले जाणार होते.
या सामन्यांसाठी तत्कालीन बर्मा (मलेशिया), इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशांना मागे टाकत भारताने आपले स्थान वर्ल्डकपसाठी निश्चित केले होते. पण तिकडे फुटबॉल असोसिएशनमध्ये आश्चर्याचं आणि चिंतेचं वातावरण होतं. FIFA वर्ल्ड कपचा यजमान (होस्ट) असलेल्या ब्राझीलचे अंतर भारतापासून सुमारे १५ हजार किलोमीटर आहे आणि या प्रचंड प्रवासासाठी खूप मोठ्या रकमेची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन भारतातील सर्व राज्यांमधील फ़ुटबॉल संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी वर्ल्ड कपसाठी देणग्यांमधून पैसा जमा करण्याचे आश्वासन ‘इंडिया फुटबॉल असोसिएशन’ला दिलं. पण होणारा खर्च ही खरी समस्या नव्हतीच..
खरंतर दोन वर्षांनंतर, १९५२ साली ‘हेलसिन्की फिनलंड 1952’ हे ऑलिम्पिक्सचे सामने होणार होते. तेव्हा ऑलिम्पिक्सच्या सामन्यांवर पैसे खर्च करायचे की वर्ल्ड कपसाठी पैसे आणि प्रयत्न खर्च करायचे असा प्रश्न असोसिएशनसमोर होता. असोसिएशनने निर्णय घेतला आणि १९५० साली होणाऱ्या FIFA वर्ल्ड कपचे सामने सुरु व्हायच्या अवघ्या १० दिवसांआधीच त्यांनी FIFAला पत्र पाठवले, ज्यात “भारत वर्ल्ड कपसाठी येत नसल्याचे आणि १९५२ साली होणाऱ्या ऑलिम्पिक्ससाठी खेळण्याचा निर्णय घेतल्याचे” सांगितले होते.
चुकीच्या पद्धतीने घेतलेला हा निर्णय आजही भारतीय फुटबॉलमधील सर्वात मोठी चूक म्हणून ओळखली जाते. याशिवाय संघात कोण कोण असेल आणि सरावासाठी अपुरा वेळ या कारणांमुळेही भारताने FIFA वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणे नाकारले असे म्हटले जाते किंवा कदाचित फेडरेशनला वर्ल्ड कपपेक्षा ऑलिम्पिक्सचे सामने जास्त महत्त्वाचे वाटले असावेत असाही एक अंदाज बांधला जातो, कारण काहीही असो पण या निर्णयामुळे भारतीय फुटबॉलचे मोठे नुकसान झाले आहे हे निश्चित!
संदर्भ: https://www.kreedon.com/india-at-fifa-history/
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.