आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
वर्तमानकाळाची मुहुर्तमेढ भुतकाळात रोवली गेलेली असतात असे म्हटले जाते. आज आपल्याला मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी भूतकाळातील आपल्या कष्टांची फळे असतात. कधीकधी आपल्या पूर्वजांनी लावलेल्या झाडांची फळे त्यांना न भेटता आपल्याला मिळतात. इतिहासातील काही घडामोडी आपला आज घडवत असतात.
असाच इतिहास आहे भारतातील सगळ्यात वेगवान रस्त्यांपैकी एक समजला जाणारा मुंबई-पुणे दृतगती महामार्गाचा.
मुंबई-पुणे हा रस्ता आत्ता जेवढा निसर्गरम्य आणि आल्हाददायक वाटतो तसाच तो पुर्वी नव्हता. मुंबई-पुणे हे अंतर कापण्यासाठी आज आपल्याला अवघे काही तास लागत असले तरी अशी मात्र ही परिस्थिती नव्हती. आज एकाच वेळी ४-४ वाहने धावू शकतील एवढा रुंद असणारा हा रस्ता एके काळी फक्त एक व्यक्ती चालत जाऊ शकेल एवढा अरुंद होता असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.
या गोष्टीची सुरुवात झाली १७७८ मध्ये. मध्य भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इंग्रजांना फक्त मुंबई जिंकून ते शक्य होणार नाही हे लक्षात आले होते. मुंबईकडे येणाऱ्या मार्गांवरही वर्चस्व निर्माण करण्याची गरज आहे हे इंग्रजांना कळाले होते. मुंबई फक्त जिंकून फायदा नाही तर ती फ्रेंच आणि मराठ्यांसारख्या बलाढ्य शत्रूंपासुन सुरक्षितही ठेवली पाहीजे हेही इंग्रज चांगलेच ओळखून होते.
त्यातील मुंबईच्या आसपास असणारे पुणे (त्यावेळचे पुना) ही पेशव्यांची राजधानी. पेशव्यांची त्यावेळी असणारी ताकद बघुन मुंबईला सगळ्यात मोठा धोका पेशव्यांचाच आहे हे इंग्रज जाणुन होते. म्हणून पुणे जिंकणे इंग्रजांसाठी गरजेचे झाले.
त्यात पेशवाईमध्ये एकजूट नव्हती. गादीवरून त्यांच्यामध्ये सतत अंतर्गत लढाया होत होत्या. पेशवाईतील मंत्री नाना फडणीस गादी मिळवण्यासाठी फ्रेंचांशी हातमिळवणी करत होते तर पेशवा रघुनाथराव इंग्रजांची मदत घेत होते.
अशा परिस्थितीत इंग्रजांनी पुणे जिंकण्याचा निर्धार केला. रघुनाथरावांच्या मदतीने पुणे जिंकण्याचे स्वप्न इंग्रज बघु लागले. पुण्याच्या भौगोलिक प्रदेशाचा अभ्यास नसताना हे स्वप्न भंग पावण्याची शक्यता जास्तच होती.
इंग्रजांनी मुंबईमार्गे येऊन खंडाळा गावातून ह*ल्ला चालु केला खरा परंतु फडणीसांनी त्यांचे सैन्य तळेगाव, वडगाव, खोपोली, पिंपरी-चिंचवड या भागात तैनात करुन ठेवले होते. गनिमी काव्याचा वापर करुन सैन्याने इंग्रज सेनेला सळो की पळो करुन सोडले. यु*ध्दात इंग्रजांना दारुण पराभव पत्करावा लागला. मुंबई, भरोच आणि सुरत ही तीन शहरं मराठ्यांना सोपवावी लागली. तसेच रघुनाथरावांनाही मराठ्यांच्या हवाली करावे लागले.
या यु*ध्दात सगळ्यात महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे मराठ्यांनी बोर घाटाचा केलेला वापर. गनिमी कावा करण्यासाठी बोर घाटात दबा धरून बसलेले मराठा सैन्य इंग्रजांच्या सैन्यावर तुटून पडले. पायदळी असणाऱ्या मराठा सेनेसाठी हा रस्ता सोयीस्कर होता. तेच मोठी वाहने आणि हत्यारे घेऊन चालणाऱ्या इंग्रज सैन्यासाठी हा रस्ता चालणेही अवघड होते, मग लढाई तर दूरच. अशा वेळी इंग्रज न लढताच हे यु*ध्द हरले असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
या यु*ध्दात हार का झाली याचे मुख्य कारण लक्षात आले तेव्हाच आपल्याला मुंबई-पुणे रस्त्याचं काम करावं लागेल हे इंग्रजांनी जाणले.
१८०२ पर्यंत मराठा साम्राज्य आणि पर्यायाने पेशव्यांना थांबवू शकेल अशी एकही सत्ता भारतात नव्हती. त्यांनी आपले साम्राज्य उत्तरेला ग्वाल्हेर तर दक्षिणेला विजापुरापर्यंत पसरवले होते. या सगळ्याचा शेवट झाला तो दुसरा बाजीराव पेशवा म्हणजेच रघुनाथराव पेशव्याच्या मुलाचा इंदोरच्या होळकरांनी केलेल्या पराभवात. अनेक वर्षांपासुन मराठ्यांच्या राज्यात हस्तक्षेप करण्याची आयती संधी इंग्रजांकडे चालून आली.
या पराभवानंतर दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला. त्यांनी इंग्रजांशी केलेल्या तहानंतर मराठा साम्राज्यास अवकळा लागण्यास सुरुवात झाली असे म्हणतात.
इंग्रजांनी मागच्या पराभवातुन आपला धडा घेतला होता. याच धड्यातुन शिकवण घेऊन इंग्रजांनी यावेळी सगळ्या विरोधकांचा पराभव केला. इंदोर आणि ग्वाल्हेरचे मराठे, मध्य भारत आणि फ्रेंच शक्तींचाही त्यांनी पराभव केला. यावेळी इंग्रज सेनेचे नेतृत्व केले ते एक दुरदर्शी सेनापती सर आर्थर वेलस्ली याने.
ही मोहीम यशस्वी ठरल्यावर इंग्रजांनी सध्याचा असलेला संपूर्ण महाराष्ट्र आपल्या ताब्यात मिळवला. दुसऱ्या बाजीरावास हातातले बाहुले बनवून त्यांनी महाराष्ट्रावर आपले राज्य प्रस्थापित केले. या विजयाने वेलस्लीने ठरवलेल्या मुंबई-पुणे जोडरस्त्याची कल्पना अजून जोर धरु लागली. यातुनच आधुनिक रस्त्याची कल्पना उदयास आली.
पुन्हा इंग्रज आणि मराठे एकमेकांसमोर उभे ठाकले ते तिसऱ्या आणि शेवटच्या इंग्रज-मराठा यु*ध्दात. मराठ्यांना या यु*ध्दात दारुण पराभव पत्करावा लागला. मराठी साम्राज्याचा अस्त या यु*ध्दाने झाला. या यु*ध्दानंतर मुंबई-पुणे रस्त्याचे महत्त्व अधिकच वाढले.
काही वर्षांनंतर तळेगावला मुंबई-पुणे रस्त्याशी जोडणारा रस्ता तयार करण्यात आला. अजुनही हा रस्ता मुंबई-पुणे दृतमार्गावरून बाहेर पडण्यासाठी वापरला जातो. जुना मुंबई-पुणे रस्ता अजुनही वेलस्लीने बनवलेल्या योजनेनुसारच आहे.
पहिल्या टप्प्यात या मार्गाचे काम पायी रस्त्याचे रुपांतर घोडागाडी साठी योग्य असणारया रस्त्यात करने हा होता. त्यामुळे आधी काही आठवडे लागणारा हा प्रवास काही दिवसांवर आला. या प्रवासात राहण्याची सोय म्हणून डाक कार्यालयाने खोल्या पुरवण्यास सुरुवात केली. या खोल्यांनाच डाक बंगला म्हणून ओळखले जाऊ लागले.
१८३० मध्ये घोडागाडी जाऊ शकेल एवढा रस्ता तयार झाला. या रस्त्याचे उद्घाटन बॉंबे स्टेटचे गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी केले.
१८६३ मध्ये ‘ग्रेट इंडियन पेनीन्सूलर रेल्वे’ने मुंबई-पुणे दरम्यान रेल्वेमार्ग बनवला. या मार्गाने हा काही दिवसांचा प्रवास काही तासांवर येऊन थांबला. मुंबई-मद्रास मार्ग बनवण्याच्या योजनेचाच हा एक हिस्सा होता. २५ बोगदे आणि २२ पूल असणारा हा रस्ता बोर घाटातील एका दिशाबदली स्थानकाने जोडला गेला होता.
आता ४ पदरी वाहतूक असलेला हा मार्ग जो दर दिवशी ९०,००० चारचाकी वाहनांचा भार सांभाळतो तो इंग्रजांनी स्वत:च्या सोयीसाठी, ह*त्यारांची देवाणघेवाण जलद होण्यासाठी बांधला होता हे ऐकून आज आश्चर्य वाटते. ब्रिटिशांनी केलेल्या काही रचनात्मक कार्यांमध्ये या मार्गाचाही समावेश होतो एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.