आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी अतुलनीय शौर्य दाखवत बलिदान दिले. हे सर्व लोक आपापली विचारसरणी घेऊन फक्त एका ध्येयासाठी लढले, ते म्हणजे देशाचं स्वातंत्र्य. यापैकी अनेक लोकांचा आज इतिहास विसरला गेला आहे, यातील अनेक नावे तर आपल्याला माहीतही नसतील. असाच एक स्वधर्म आणि स्वदेशासाठी लढलेला क्रांतिकारक म्हणजे दक्षिण भारतातील वंचिनाथन अय्यर.
वंचिनाथनने विशीत असतानाच मोठं क्रांतिकारी काम केलं. तिरुनेलवलीच्या ब्रिटिश टॅक्स कलेक्टरचा वध करून या देशभक्ताने ब्रिटिशांच्या हाती सापडू नये म्हणून आत्महत्या केली. हे कृत्य त्याने पाचव्या जॉर्जच्या भारतात होणाऱ्या राज्याभिषेकाच्या निषेधार्थ केलं.
तिरुनेलवलीचा टॅक्स कलेक्टर असलेला रॉबर्ट अशे हा सहकुटुंब रेल्वेतून कोडाईकनालला जाण्यासाठी मानियाची रेल्वे स्थानकावरील तिरुनवेली-मनियाची मेल या रेल्वेगाडीत इंडो-सेलन बोट मेल या मद्रासला (साध्याच चेन्नई) जाणाऱ्या रेल्वेच्या प्रतीक्षेत थांबला होता.
त्याच रेल्वेत असलेले दोन भारतीय तरुण सेकण्ड क्लास कम्पार्टमेन्टमधून फर्स्ट क्लास कम्पार्टमेन्टमध्ये आले, इथेच रॉबर्ट आणि त्याचं कुटुंब पुढच्या रेल्वेची प्रतीक्षा करीत थांबले होते. त्या दोन तरुणांपैकी एकजण दारातच थांबला आणि दुसरा आतमध्ये गेला. काहीतरी चुकीचं घडतंय असा विचार करून रॉबर्टने आपली हॅट त्या आत आलेल्या तरुणाच्या दिशेने फेकली, पण ते निरुपयोगी ठरलं. दुसऱ्याच क्षणी त्या तरुणाने आपली पिस्तूल काढून रॉबर्टच्या छातीवर गोळ्या झाडल्या. आणि वंचिनाथनने प्लॅटफॉर्मवर उडी घेतली आणि प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाकडे आपल्या साथीदारासह पळत सुटला.
खादरबाशा या रॉबर्टच्या चपराशाने वंचिनाथनवर उडी घेतली आणि ते दोघे एकमेकांना भिडले, खादरबाशाला प्लॅटफॉर्मवरून खाली ढकलून वंचिनाथन स्थानकावरील स्वच्छतागृहात शिरला, तोपर्यंत त्याच्या साथीदाराने रेल्वे स्थानकाजवळील शेतातून पळ काढला होता.
पोलिसांनी स्वच्छतागृहाला चारी बाजूनी घेरलं होतं आणि त्यातीलच एक हत्यारबंद पोलीस स्वच्छतागृहात शिरला, पण तो पर्यंत वंचिनाथनने आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात एक पत्रं सापडलं, त्या पात्राच्या शेवटी उल्लेख होता: “सेंगोट्टाइ येथून वंची अय्यर”.
आणि त्या पत्राचा मजकूर होता:
“इंग्लडच्या म्लेच्छांनी आपल्या देशावर सत्ता मिळवली आहे, ते हिंदूंच्या सनातन धर्माला चिरडून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करताहेत. प्रत्येक भारतीय इंग्रजांना आपल्या देशातून बाहेर काढून स्वराज्य आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना करतोय. या धरतीवर राम, छत्रपती शिवाजी, गुरु गोविन्द, अर्जुन यांनी राज्य करून सर्व धर्मांची रक्षा केली, पण याच भूमीत ते (ब्रिटिश) म्लेंछ आणि गोमांस खाणाऱ्या पाचव्या जॉर्जला राजा बनवू इच्छितात.
ज्या क्षणी पाचवा जॉर्ज या भूमीवर उतरेल त्या क्षणी त्याचा वध करण्याची शपथ तीन हजार मद्रासी जनतेने घेतली आहे. मी त्यांच्यातलाच एक असून, आमचा हेतू सगळ्यांसमोर स्पष्ट होण्यासाठी आज मी हे केलंय, प्रत्येक हिंदुस्थानीने याला आपलं कर्तव्य मानावं.
गोमांस खाणाऱ्या पाचव्या जॉर्जचा राज्याभिषेक साजरा करण्यासाठी अनेक महान सम्राटांनी राज्य केलेल्या या वैभवशाली भूमीत येत असलेल्या ऍशेला मी जीवे मारणार. या पवित्र भूमीला गुलाम करणाऱ्या लोकांचं नशीब काय आहे हे दाखवून देण्यासाठी मी हे करतोय.
मी, त्यांच्यापैकीच एक असून, ऍशेला, जॉर्जला इशारा देऊ इच्छतो.
वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम!”
कदाचित या पत्रातील मजकुरावर आजच्या काही तथाकथित बुद्धीजीवी लोकांचा आक्षेप असावा, विचारसरणी कोणतीही असली तरी “स्व”त्वाचं रक्षण हाच त्या मागचा हेतू आहे, मग ते स्वदेश असो, स्वभाषा असो, अथवा स्वधर्म असो यांच्या रक्षणार्थ भारत सहस्त्रकापेक्षाही जास्त कालावधीपासून लढतोय आणि अखेर जिंकतोय तो ही “भारतच”!
यानंतर पोलिसांनी त्या क्रांतिकारी चळवळीचा भाग असलेल्या वंचीच्या कुटुंबाचा आणि मित्रपरिवाराचा मागमूस काढला. जमवलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी १३ जणांवर आरोपपत्र दाखल केले, त्यापैकी एक होते नीळकंट ब्रम्हचारी, पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे चळवळीचं नेतृत्व होतं.
खरंतर या घटनेची पाळंमुळं स्वदेशी चळवळीसोबत येऊन मिळतात. १९०० च्या दशकात तिरुनेवली भाग स्वातंत्र्यसंग्रामाचा केंद्रबिंदू म्हणून उदयास आला. सुब्रमण्यम भारती, व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई, सुब्रमण्य सिवा हे स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करीत होते.
व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांनी स्वतःची स्वदेशी जहाज संबंधी उपकरण तयार करण्याची कंपनी सुरु केली होती, त्याच प्रमाणे ते अनेक स्वदेशी कापड गिरण्या आणि संस्थांचे मालक होते.
त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध कामगार चळवळही चालवली. यामुळे भडकलेल्या ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर अनेक कारवायांचा बडगा उगारला. याच वेळी ऍशेकडे ट्युटीकोरिनचं कलेक्टरपद होतं, स्वदेशी चळवळ बंद पाडण्यात त्याचा हात होता, त्याने व्ही. ओ. चिदम्बरमसाठी मोठ्या अडचणी निर्माण करून ठेवल्या, इतकंच काय तर त्याने “सरकारविरोधी” कामं करतात या आरोपाखाली त्यांना कैदेतसुद्धा टाकलं होतं. आणि जेव्हा लोकांनी या नेत्यांच्या अटकेविरोधात आंदोलनं करायला सुरुवात केली तेव्हा मात्र ऍशेने निष्पाप आणि शांततेत आंदोलन करणाऱ्या जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता, पण त्याच्या निशाण्यावर मात्र चिदम्बरम यांची कंपनी होती.
एके दिवशी ऍशे कंपनी बंद होण्याच्या वेळी तेथे गेला आणि काही कागदपत्रांची मागणी केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कागदपत्रं दाखवता येणार नाहीत असं कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर त्याने कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि कम्पनी बंद पडेल अशीही धमकी तो देऊन गेला.
शेवटी त्याच्या प्रचंड दबावामुळे आणि चिदम्बरम कैदेत असल्याने ती कम्पनी बंद पडली, चिदम्बरम यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ऍशे हा त्यांच्या कंपनी बंद पडण्याला कारणीभूत असल्याचं सांगितलं आहे.
या अटकेच्या घटनांमुळे आणि स्वदेशी चळवळ बंद पडण्याच्या प्रयत्नामुळे तरुण भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या भावना उद्विग्न झाल्या, १९१० मध्ये निळकंट ब्रम्हचारी यांनी टेंकासी येथे भेट दिली, निळकंट ब्रम्हचारी यांचा पुद्दुचेरीमधील स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा मोठा सहभाग होता. मदूकाराई चिदंबरम पिल्लई यांच्याकडे ते वास्तव्यास होते, तर संकरकृष्ण अय्यर, (वंची अय्यर यांचे साथीदार) यांचेही ते मित्र होते.
या दोघांद्वारे भारत माता संगम या क्रांतिकारी संघटनेसाठी त्यांना अनेक लोक मिळाले. त्यानंतर या सगळ्यांच्या अनेक भेटी झाल्या, आणि त्यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची शपथ घेतली. तिरुनेवली याठिकाणी चळवळीत सामील झालेल्या लोकांडून अनेक पत्रं, लहान पुस्तिका (पॅम्फ्लेटस), असं साहित्य पोलिसांनी हस्तगत केलं आणि त्यातील अनेक लोकांना अटकही केली.
या वेळी धर्मराज अय्यर आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी पोलिसांच्या हाती येऊ नये म्हणून आत्महत्या केली. त्यांच्यापैकीच एक, मदस्वामी पिल्लई याने पुद्दुचेरीला पलायन केलं, आणि भारतीदासन यांनी त्याला मलेशियाला जाण्यासाठी जहाज मिळवण्यात मदत केली, त्यावेळीही नीळकंट ब्रम्हचारी यांच्यासह बाकी सदस्यांना अटक करण्यात आली होती.
या सर्व अटकेच्या घटनांचा आणि चिदंबरम यांच्या छळाचा बदला घेण्यासाठी ऍशेची हत्या करण्यात आली असा कबुलीजबाब अन्वेषणादरम्यान सोमसुंदरम पिल्लईने दिला (त्याच्याकडून काढून घेतला गेला). याच जबाबाच्या आधारे न्यायालयाने भारत माता संगम या संघटनेला ऍशेच्या हत्येसाठी दोषी ठरवलं. खरंतर, ऍशेचा मृत्यू ही काही देशातील एका कोपऱ्यात घडलेली सामान्य घटना नव्हती आणि त्या कबुलीजबाबाप्रमाणे फक्त सूडाच्या भावनेने केलेली तर अजिबातच नव्हती, त्याचे धागेदोरे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीशी जाऊन मिळतात.
चळवळीचे नेते या नात्याने नीळकंट ब्रम्हचारी यांना सात वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय संकरकृष्ण अय्यर ज्यांनी वंची अय्यर यांची साथ दिली, तसेच हरिहर अय्यर आणि मदाथुकदाइ चिदम्बरम पिल्लई यांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. बाकी सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली.
सन १९०४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत संस्थेची स्थापना करून शस्त्रबळाने स्वातंत्र्य चळवळ चालवली. वर्हानेरी वेंकटेश सुब्रमण्यम अय्यर यांनी सन १९०७ मध्ये या संघटनेचं सदस्यत्व घेतलं आणि ते याचे उपाध्यक्ष बनले.
जेव्हा १९१० साली सावरकरांना लंडनमधून अटक झाली तेव्हा व्ही. व्ही. एस. अय्यर यांनी लंडनमधून पलायन करून पुद्दुचेरी गाठले, तिथूनच ते आपलं काम पाहत होते आणि ते सतत क्रांतिकारकांच्या संपर्कात राहत. पॅरिस इंडियन सोसायटी, मादाम कामा यांच्या बरोबरीनेही ते काम करत. पुस्तकांच्या आतमध्ये रिव्हॉल्वर आणि बंदुकी लपवून आणून त्या भारतीय क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवणे अशी अनेक साहसी कामं ही संघटना करत असे.
पाचव्या जॉर्जच्या भारतामध्ये होणाऱ्या राज्याभिषेकाच्या घटनेने या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या भावना ब्रिटिश सरकारविरुद्ध तीव्र होत्या. या वेळी मादाम कामा यांनी अनेक भारतीय युवकांना या विरुद्ध आंदोलन करण्याचे आवाहन केले.
याच काळात वंची नीळकंट ब्रम्हचारी यांना भेटायला पुद्दुचेरी मध्ये आला होता, दरम्यान ते बाहेरगावी गेल्याने व्ही. व्ही. एस. अय्यर यांनी त्याला आसरा दिला. वंची साहसी असल्याने त्याला अय्यर यांनी नेमबाजीचे प्रशिक्षण दिले, आणि मादाम कामा यांनी पाठवलेली एक पिस्तूल त्याला देऊ केली. त्याला या ब्रिटिश अधिकाऱ्याला मारण्यासाठी उद्धृक्त केले.
वंचीला आधीच या ब्रिटिश अधिकाऱ्यांबद्दल राग असल्याने त्याने हि सुवर्णसंधी स्वीकारली.
यामुळे पाचव्या जॉर्जचा होणार राज्याभिषेक एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
याशिवाय, मादाम कामा यांनीही ऍशच्या वधाचं कौतुक केलेलं आपल्याला दिसतं, त्या म्हणतात, “ज्या वेळी या देशांतील गुलाम इंग्लडच्या राजासमोर पायघड्या पसरत आहेत, त्याचवेळी मानियाची आणि मायमेनसिंग येथील २ तरुणांनी आपलं शौर्य दाखवून दिलं”
ऍशेच्या हत्येचा सरळसरळ राष्ट्रीय चळवळीशी संबंध असल्याचंच या सर्व गोष्टी सिद्ध करतात. या सगळ्या इतिहासाला डावलून आजही देशातील आणि तामिळनाडू राज्यातील काही गट या हत्येला धार्मिक आणि जातीय रंग देण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे स्वतःचं सर्वस्व अर्पण करीत होते त्या वंचिनाथन यांनी असा विचारही केला नसेल, की त्याच स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आज त्याच आपल्यात फूट पडणाऱ्या आणि सुमारे २०० वर्ष गुलामीत ठेवणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्मारकासमोर वीर वनक्क्म सारखे प्रकार करतील.
काही लोकांना वंचीच्या पत्रातील “पंचम” या शब्दावर आक्षेप आहे, पण पंचम हा शब्द त्यांनी जॉर्ज “पाच”च्या संदर्भाने वापरला.
फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी देशातील काही संघटना आणि काही व्यक्ती असे घाणेरडे “गुन्हे” करताहेत, मग त्यांना ब्रिटिश राजसत्ताच प्रिय होती कि काय? असा प्रश्न पडतो, आणि असं असेल तर त्यांना या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा, किंबहुना या देशाचं नागरिकत्व घेण्याचा काय अधिकार?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.