आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
महाराष्ट्राचे साहित्य सम्राट नरसिंह चिंतामणराव केळकर उपाख्य तात्यासाहेब यांचा जन्म मोडनिंब येथे झाला.
तात्यासाहेबांचे घराणे रत्नागिरीच्या धोकमाळे गावात झाला. तात्यासाहेबांचे वडील हे मिरजेच्या संस्थानिकांकडे कारकून व मामलेदार म्हणून कार्यात होते. न. चिं. केळकरांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील मिरजेत तर माध्यमिक शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम विद्यालयात झाले. पुढे त्यांनी पुण्याच्या डेक्कन महविद्यालयात प्रवेश घेतला.
तिथेच त्यांना नाटकांची व साहित्याची गोडी लागली. त्यांनी महाविद्यालयीन नाटकात सहभाग घेतला व त्यांचा रंगभूमीवर पहिला प्रवेश झाला.
पुढे उदार्निवाहासाठी ते कारकून म्हणून काम करू लागले. पैसेही मिळत होते पण साहित्यात असलेली आवड आणि कलेत असलेली रुची यांमुळे त्यांना हे काम कंटाळवाणे वाटू लागले. अखेर त्यांनी त्या नोकरीवर पाणी सोडले. पुन्हा नोकरीचा शोध सुरु झाला. नोकरी मिळणार नाही असे नव्हते पण आवडीच्या क्षेत्रात मिळाली तर त्याचा अधिक फायदा होईल असा त्यांचा विचार होता.
एके दिवशी एका सद्गृहस्थांच्या माध्यमातून त्यांचा भारतीय स्वातंत्र्य समरातील अग्रणी, प्रखर वक्ते, असणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांशी संपर्क झाला. तात्यासाहेब लोकमान्यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले.
वाचनाची आवड, शब्दांची जोड हे तात्यासाहेबांतील गुण टिळकांनी हेरले. त्यानंतर ते पुढे लोकमान्य टिळक चालवत असलेल्या लॉ कॉलेजात शिकवू लागले. याबरोबर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या टिळकांच्या मराठा या दैनिकात सहाय्यक संपादक म्हणून काम चालू ठेवले.
टिळकांचे विश्वासू असणारे तात्यासाहेब साहित्य क्षेत्रातही आपली चुणूक दाखवू लागले होते. टिळकांच्या अटकेनंतर केळकरांवरील जबाबदारी अधिक वाढली.
ते केसरीचे संपादक बनले व त्यांनी केसरीचे काम अखंडपणे सुरु ठेवले.
साहित्य, वाचन याची त्यांना एवढी गोडी लागली की पुढे ते महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट बनले. आजही साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात तात्यासाहेबांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
टिळकांचे सहकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक लोक चळवळीत सहभाग दिला. १९३५ ते १९४७ या काळात ते सह्याद्री या मासिकाचेही संपादक होते.
टिळकांच्या सहवासात काम केल्यामुळे तात्यासाहेबांतील अनेक गुण विकसित झाले. टिळकांच्या मृत्युनंतर त्यांच्या राजकरणाच्या सर्व जबाबदाऱ्या पर्यायाने तात्यासाहेब केळकर यांच्यावर आल्या. तात्यासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक सामाजिक कार्य केले. ते टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी-मराठा संस्थेचेचे विश्वस्थ होते.
महाराष्ट्रातील, प्रामुख्याने पुण्यातील राजकारणात तात्यासाहेबांचे वजन वाढले. त्यांनी पुण्यातील मध्यवर्ती भागातून निवडणूक लढवली व १९१८ मध्ये ते पुणे नगर परिषदेचे अध्यक्ष बनले.
पुढे पुण्यातून निवडून येऊन ते कायदे मंडळाचे सदस्य बनले.
कायदे मंडळातील त्यांचे काम पाहून १९२५ लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ही मिळाली होती.
तात्यासाहेबांचे आयुष्य बहुढंगी होते. ते कुशाग्र पंडित होते. त्यामुळे संपादक म्हणून काम करताना व कायदे मंडळात भूमिका बजावताना कधी बोलणे-वागणे बोजड झाले नाही. साहित्यात लेखन करताना ‘हास्य विनोद मिमांसा’ हा त्यांचा ललित संग्रह गाजला. तोतयाचे बंड, वीर विडंबने अशी एक ना अनेक नाटके त्यांनी लिहिली.
त्यांच्या प्रकाशित पृष्ठांची संख्या ही १५ हजाराहून अधिक आहे. यात प्रामुख्याने लोकमान्य टिळकांचे चरित्र, मराठे-इंग्रज, बलिदान, भारतीय तत्वज्ञान अशा अनेक कादंबऱ्यांचा समावेश आहे.
टिळक व तात्यासाहेबांच्या बाबतीतील एक प्रसंग मुद्दामहून सांगावासा वाटतो.
१९१८ ची मुंबई येथील युद्धपरिषदेत स्वराजवाद्यांच्या निष्ठेबद्दल लॉर्ड विलिंग्डन यांनी शंका व्यक्त केली. लोकमान्य टिळक आणि न. चिं. केळकर यांना तिथे बोलू देण्यात आले नाही. विलिंग्डनचा तो निरोप समारंभ होता. विलिंग्डनने ‘होमरूल लीग’ चा थेट उल्लेख करून सर्वांवर ताशेरे झोडले.
‘स्वराज्य आणि स्वदेशीरक्षण’ यांना परस्परांपासून दूर करता येणार नाही’,
असे टिळकांनी ठणकावून सांगताच, विलिंग्डन यांनी ‘ही वाद-विवाद करायची जागा नाही’ असे सांगून टिळकांचे भाषण थांबविले. यानंतर टिळक आणि केळकर दोघेही सभेतून निघून गेले.
आपण करत असलेले कार्यावरील आपली निष्ठा व देशप्रेम या छोट्या घटनेतून टिळक-केळकरांच्या जोडीने दाखवून दिले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.