आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
जपानमधील शूर योद्ध्यांच्या एका जमातीला सामुराई म्हटले जाते. हे सामुराई आपल्या ताकदीसाठी आणि शौर्यासाठी प्रसिद्ध असत. जपानच्या इतिहासात अनेक महान सामुराई होऊन गेले ज्यांनी आपल्या शौर्य आणि पराक्रमाने इतिहास रचला. आज आपण अशाच एका सामुराईचा परिचय करून घेणार आहोत. ज्याने आपल्या तलवारीच्या जोरावर अनेक वीर योद्ध्यांना चीत केले. तलवारबाजीतील नवे तंत्र शोधले. तलवारबाजीतील अनेक तंत्रांविषयी पुस्तकेही लिहिली. फक्त पराक्रम गाजवलाच नाही तर तो वारसा पुढेही जपला जावा यासाठी तलवार बाजीतील नवनवे तंत्र शिकवण्यासाठी एका विद्यालयाचीही स्थापना केली.
कोण होता हा महान सामुराई?
निष्णात तलवारबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या महान सामुराईचे नाव होते मियामोटो मुसाशी. मियामोटोला कधीच कुणी हरवू शकले नाही. त्याच्याशी गाठ म्हणजे मरणाशी गाठ हे तर पक्के होते. अनेकांना मियामोटोने आपल्या तलवारीचे पाणी पाजले होते.
मियामोटो मुसाशीचा जन्म इस. १५९४ मधे जपानच्या मियामोटो येथे झाला. त्याचे कुटुंब एक सामुराई कुटुंब होते. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्याला युद्धाचे प्रशिक्षण मिळाले. त्याचे वडील लहानपणापासून त्याला तलवार बाजीचे धडे देत होते. पण, त्याला जास्त काळ आपल्या आई-वडिलांची साथ मिळाली नाही. तो सहा वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. त्याच्या वडिलांना हा धक्का सहन न झाल्याने काही काळाने त्यांचेही देहावसान झाले.
मियामोटोला त्याचा काका डोरीम्बोने सांभाळले. त्याला कशाचीही कमतरता जाणवू दिली नाही. त्याला बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. मियामोटोचे शिक्षण सुरू झाले पण त्याचे लक्ष तर सगळे तलवारबाजीकडेच लागून राहिलेले. अभ्यासासोबत त्याने तलवारबाजीचाही सराव चालूच ठेवला.
तो तेरा वर्षांचा असताना ‘अरिमा किहेई’ने त्याला आव्हान दिले. मियामोटोही कधीपासून तयारच होता. त्याला आपले तलवारबाजीतील नैपुण्य सिद्ध करण्याची संधी हवीच होती आणि आता त्याच्यासाठी ही संधी चालून आली होती. युद्ध सुरू होताच मियामोटोने आपले डावपेच सुरू केले.
जोपर्यंत कोणत्याही एका प्रतिस्पर्ध्याचा जीव जात नाही तोपर्यंत हा खेळ थांबत नाही असा याचा नियम होता. अरिमा जमिनीवर कोसळला तरी मियामोटोने त्याच्यावर वार करणे थांबवले नाही. अरिमाचा श्वास थांबल्यावरच मियामोटोची तलवार थांबली.
तेराव्या वर्षात त्याला मिळालेल्या या विजयाने त्याचा आत्मविश्वास वाढला. युद्धाचे आव्हान स्वीकारत तो अनेक प्रांतातून फिरत होता. त्याकाळी जपानमधे अकीयामा या सामुराईची तलवार युद्धात प्रचंड ख्याती होती. मियामोटोबद्दल त्याने ऐकले आणि त्याने मियामोटोला आव्हान दिले. मियामोटोने हे आव्हान स्वीकारले. काही क्षणातच त्याने अकीयामाला जमिनीवर लोळवले.
खरे तर त्याकाळातील सगळेच प्रतिस्पर्धी कसलेले असत. कुणालाही कमी लेखण्यात अर्थ नव्हता. तसेही या युद्धाचा नियमच असा होता की, जोपर्यंत कुणा एका प्रतिस्पर्ध्याचा अंत होत नाही तोपर्यंत हे युद्ध संपले असे जाहीर होत नाही, त्यामुळे यात जोखीम होती. जीवावर उदार होऊनच सहभाग घ्यावा लागत असे. पण मियामोटोला कसलीच भीती वाटत नव्हती. त्याने अनेकदा अशा द्वंद्वयुद्धात सहभाग घेतला आणि प्रतिस्पर्ध्यांना मात दिली होती.
सासाकी कोजीरो हा त्याकाळचा एक निष्णात तलवारबाज! तो “निदाची” या तलवार कलेचा वापर कारण्यात पारंगत होता. जपानमधे त्याच्या तोडीचा कुणीच प्रतिस्पर्धी होणार नाही अशी त्याची ख्याती होती. सासाकीने अनेक योद्ध्यांना मात दिली होती. मियामोटोला तर तो क:पदार्थ समजत होता. समुद्र किनाऱ्यावर हे युद्ध लढले जाणार होते. युद्धाची वेळ होत आली तरी मियामोटोचा पत्ता नव्हता. सासाकी त्याची वाट पाहून वैतागला होता. प्रतिस्पर्ध्याने वेळेत हजर न राहणे हा त्याच्यासाठी अपमान होता. त्याचा उत्साह मावळला होता. काही वेळाने मियामोटो एका जहाजातून लाकडी तलवार घेऊन येताना सर्वांनी पहिला.
मियामोटो आला तरी सासाकीचा पारा उतरला नव्हता. याचाच फायदा घेत मियामोटोने त्याच्यावर एकदम जोशात येऊन वार केले. सासाकीला मियामोटोला प्रत्युत्तर देता आले नाही. अवघ्या काही क्षणातच मियामोटोने सासाकी कोजीरोला संपवून टाकले.
या विजयाने तर त्याची ख्याती आणखी द्विगुणीत झाली. मियामोटोला कोणीही मात देऊ शकत नाही हे आणखी एकदा सिद्ध झाले.
मियामोटोने आपल्या संपूर्ण आयुष्यात अशी साठ युद्धे जिंकली होती.
मियामोटो हा नुसताच आक्रमक योद्धा नव्हता तर तो सृजनशीलही होता. एकदा एका कार्यक्रमात त्याने दोन हातांनी ड्रम वाजवणारा कलाकार पहिला. तेव्हा त्याच्या डोक्यात कल्पना आली की आपणही अशा प्रकारे दोन हातांनी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने दोन्ही हातांनी तलवार चालवण्याचा सराव केला आणि नितेन इची रेयू या नव्या कलेचा अविष्कार झाला. मियामोटोला अधिकृत प्रशिक्षण मिळाले नव्हते तर त्याने एकलव्याप्रमाणे एकट्यानेच साधना करून हे ज्ञान प्राप्त केले होते. त्याने या कलेत आणखी एका नव्या कलेची भर घातली होती.
नितेन इची रेयू या कलेमधे योद्ध्याच्या दोन्ही हातात तलवार असते आणि एकाच वेळी तो दोन्ही हातातील तलवारींचा वापर करून हे युद्ध खेळत असतो. मियामोटोने स्वतःच शोधलेल्या या कलेचे इतरांनाही शिक्षण मिळावे म्हणून एका विद्यालयाची स्थापना केली. या मठातून त्याने नव्या योद्ध्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. या विद्यालयाचे नावही त्याने नितेन इची रेयू असेच ठेवले.
त्याने तलवारबाजीच्या वेगवेगळ्या कलांची माहिती देणारे ‘द बुक ऑफ फाईव्ह रिंग्ज’ आणि ‘डोकोडो’ ही पुस्तकेही लिहिली.
पण, इतक्या शूर योद्ध्याला न्युरेल्जीया नावाच्या एका गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्याने तलवारबाजीतून निवृत्ती घोषित केली. या आजारामुळे मियामोटो आता थकला होता. असे असूनही हातात तलवार घेऊन सामुराई सारखाच मृत्यू आपल्याला यावा अशी त्याची इच्छा होती. पण तो इतका थकला होता की अंथरुणातून उठण्याचेही त्राण त्याच्यात राहिले नव्हते. मृत्यू जवळ येत असल्याची त्याला खात्री झाली होती. त्याने बौद्ध मठातील काही संताना बोलावून घेतले आणि त्याला उभे करण्याची विनंती केली. त्या संतानी त्याला आपल्या आधाराने उभे केले. त्याला सामुराईचा पोशाख चढवला होता. त्याच्या एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात तलवार देण्यात आली होती.
तो आधाराने उभा राहिला आणि मृत्यूने त्याला तेव्हाच गाठले. हा निव्वळ योगायोग होता की मियामोटोला मृत्यूची अचूक चाहूल लागली होती, हे एक कोडेच आहे. पण, आयुष्यभर योध्याच्या वेषात जगलेल्या मियामोटोला योद्ध्याच्या वेषातच मृत्यू आला.
कोणत्याही परिस्थिती स्वतःला कमी न लेखात पुढे जात राहणे आणि येईल त्या आव्हानांना सामोरे जाणे हाच मियामोटोच्या आयुष्याने दिलेला धडा आहे. आपल्या आयुष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी त्याची ही कणखर मानसिकता आपल्याला प्रेरणा देत राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.