आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आजमितीस जगात ४३०० धर्म आहेत आणि सर्वांत मोठे २० धर्म असून त्यामध्ये सनातन वैदिक धर्म (हिंदू धर्म) सोडला तर उर्वरित तीन “अब्राहमीक धर्मसंस्था” मोठ्या प्रमाणात आहेत. या अब्राहमीक धर्मसंस्थांमध्ये ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू धर्म येतात. ‘अब्राहमिक धर्म’ या शब्दाचा अर्थ प्रेषित ‘अब्राहम’चे अनुसरण करणाऱ्या प्राचीन एकेश्वरवादी इस्रायली लोकांचा धर्म. ज्यू आणि ख्रिश्चन धर्माचे मूळ अब्राहमचा दुसरा मुलगा, इसहाक यांच्याशी जोडले जाते, तर इस्लाम धर्माचे मूळ अब्राहमचा पहिला मुलगा इस्माईल यांच्याशी जोडले जाते.
पण या धर्मांच्या अनुयायांची परिस्थिती सांस्कृतिकदृष्ट्या चांगली नव्हती. या धर्मांचे मूळ आणि भौगोलिक स्थान एक असतानाही इतिहासात अनेकदा त्यांच्यात संघर्ष दिसून आला आहे. प्रत्येक धर्माच्या अनुयायांना आपलीच विचारधारा श्रेष्ठ वाटते आणि यामुळेच या तीनही धर्मांमध्ये अनेक युद्ध होत राहिली आहेत. मक्का आणि जेरुसलेम सारख्या पवित्र शहरांमध्ये अगणित निरपराध लोकांनी धर्माच्याच मुद्द्यावर आपले प्राण गमावले आहेत.
या संघर्षाला आधुनिक काळात ‘९\११”च्या निमित्ताने मोठे आणि वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. संघर्षाप्रमाणेच अनेकदा इतिहासात या धर्माच्या अनुयायांनी विवेकबुद्धीही दाखवली. या सर्व धर्मांचे मुख्य उपदेश काही प्रमाणात समान आहेत. ते एकाच देवावर विश्वास ठेवतात. इब्न कथिर या अत्यंत प्रभावशाली मुस्लिम इतिहासकार आणि अभ्यासकांनी वर्णन केल्याप्रमाणे काबाचे रक्षण करणाऱ्या दोन रब्बींची कथा याच ऐतिहासिक संबंधातून आली आहे. ‘रब्बी’ म्हणजे ज्यू धर्मातील आध्यात्मिक नेता किंवा धार्मिक गुरु. याच सांस्कृतिक महत्व लाभलेल्या कथेबद्दल आजचा हा विशेष लेख.
इसवी सन दुसऱ्या शतकाच्या दरम्यान, बहुतेक जग युद्धाच्या धुमश्चक्रीत होते. जगण्याच्या या संघर्षात मानवाने ज्ञान आणि विवेकाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. यामुळेच जगात, विशेषतः अरबस्तानात अराजकता, निरक्षरता आणि अज्ञान यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसू लागला. हा काळ इस्लामिक परंपरेत अनेकदा “जाहिल्याह”चा (अज्ञानाचा) काळ म्हणून ओळखला जातो.
हिम्यार हे आधुनिक काळातील येमेनच्या क्षेत्रात असलेले एक मोठे मूर्तिपूजक राज्य होते. याच दुसऱ्या शतकात त्यांनी सभोवतालच्या प्रदेशांवर विजय मिळवायला सुरुवात केली. जेव्हा एखादे राज्य दुसऱ्या राज्यावर विजय मिळवते तेव्हा ते राज्य तो भूप्रदेशच काबीज करीत नाही तर तिथल्या संस्कृती आणि लोकांवरही त्यांचा प्रभाव पडतो.
आपापल्या मानसिकतेप्रमाणे आक्रमणकारी राज्य आक्रमित राज्यावर सांस्कृतिक प्रभाव पाडते. ज्याप्रमाणे खैबर खिंडीतून भारतावर झालेल्या अनेक इस्लामी आक्रमणांनी येथील विद्यापीठे आणि मंदिरे उध्वस्त केली पण, हूण आक्रमकांनी असा सांस्कृतिक विध्वंस टाळला. त्याचप्रमाणे या हिम्यार राज्याने विविध संस्कृतींना सामावून घेण्यास सुरुवात केली.
अशा अनेकविध संस्कृतींचा स्वीकार करताना त्यांनी ‘जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे । जनी वंद्य ते सर्व भावे करावे ।।’ हे सूत्र वापरले. त्यांनी लोकांमध्ये एकता आणण्यासाठी यहुदी धर्माचा स्वीकार केला. यामुळे उर्वरित अरबस्तानात, विशेषत: हिजाजच्या प्रदेशात ज्यूंना त्यांचा सांस्कृतिक गड मिळाला. हा हिजाज प्रदेश सध्याच्या सौदी अरेबियाच्या पश्चिम भागात आहे. त्यांनी मक्केजवळ एक शहर वसवले आणि त्याचे नाव ‘यथ्रिब’ किंवा “ज्यूंचे शहर” असे ठेवले गेले.
या सर्व घटना प्रेषित मोहम्मद आणि इस्लामच्या आगमनापूर्वी घडल्या होत्या. इब्न कथिर हे सर्वात प्रसिद्ध इस्लामिक विद्वानांपैकी एक आहेत आणि मुस्लिम समाजात त्यांना कुराणचा सर्वश्रेष्ठ विवेचक (तफसीर) म्हणून मोठ्या प्रमाणावर मान्यता आहे. ते कुराणातील ४४:३७ या आयतीद्वारे रब्बींची कथा सांगतात, “ते चांगले आहेत की तुब्बाचे लोक आणि त्यांच्या आधीचे लोक? आम्ही त्यांचा नाश केला, कारण खरंच ते गुन्हेगार होते. ” तुब्बा हा शब्द सबा आणि हिम्यारच्या लोकांसाठी वापरण्यात आला आहे.
तुब्बाचा राजा हिजाजच्या प्रदेशातून एका युद्धावरून परतत होता. त्याने यथ्रीब शहरावर हल्ला केला आणि ते शहर जिंकण्याचा प्रयत्न केला. तो कधीही या शहरावर वर्चस्व गाजवू शकणार नाही कारण त्याच्या भाग्यात काही वेगळेच लिहिले आहे असा सल्ला त्याच्याबरोबर आलेल्या दोन ज्यू रब्बींनी त्याला दिला. याच वेळी ऐन युद्धाच्या तोंडावर असतानाही यथ्रीब शहरातील लोकांनी त्याला अन्नपुरवठा केला. रब्बींचा सल्ला आणि यथ्रीब मधील ज्यू लोकांचा दयाळूपणा पाहून त्याने पुन्हा परतण्याचा निर्णय केला. परत जाताना, त्याने मक्का शहर आणि काबा पार केले.
बहुदैववादी काळात मक्काच्या काबामध्ये अनेक मुर्त्या ठेवण्याची परंपरा होती. देवांची कृपा व्हावी यासाठी लोक या मूर्त्यांना सजवण्यासाठी अनेक गोष्टी अर्पण करीत असत. यामध्ये सोने आणि इतर महागडे साहित्यसुद्धा होते. तुब्बाच्या राजाला परतत असताना काबा लुटण्याची आणि काबाची इमारत जाळून उध्वस्त करण्याची इच्छा झाली.
जेव्हा त्याने आपला हा निर्णय दोन ज्यू रब्बींना सांगितला तेव्हा त्यांनी हे कृत्य करण्यास साफ नकार दिला. काळाच्या शेवटपर्यंत मानवतेची सेवा करणाऱ्या धर्माची स्थापना याच शहरात एका प्रेषिताकडून होणार आहे असे धर्म-शास्त्रात सांगितले असल्याचा रब्बींना विश्वास होता. या निर्णयातही राजाने रब्बींचा आदर केला आणि काबाला हात न लावता त्याने आपला प्रवास शहरातून पुढे सुरु ठेवला.
शतकांपूर्वी विचारही केला गेला नसावा अशा यशाच्या शिखरावर आज मानवता पोहोचली आहे. आपण जागतिक इतिहासात जितके मागे वळून पाहू तितकाच आपल्याला अधिक अंधार दिसतो. औद्योगिक क्रांतीने जगात सभ्यता आणली. प्रबोधनाने जगात ज्ञान आणि सौंदर्य आणले. तरीही आज जगातील अनेक लोक “जाहिल्याह”च्या काळातील लोकांपेक्षा अधिक वाईट आणि बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे वर्तुणूक करताना आपल्याला दिसतात.
एकमेकांना धमकावण्याच्या आणि विध्वंसाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर विनाशाची शस्त्रे तयार करण्यासाठी जगाने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. धर्म आणि परंपरेतील कालबाह्य आणि अमानवीय गोष्टी सोडून एका जागतिक सभ्यतेमधील मानवासारखी वर्तुणूक केली जावी आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातूनच संबंध विश्वाचे कल्याण व्हावे हा प्रगत मानवाचा हेतू असायला हवा.
तरीही धर्माच्या नावाखाली हिंसाचार आणि अपमानास्पद वागणूक सुरूच आहे. जे लोक आज धर्माच्या नावावर हत्या करतात त्यांना त्यांच्या कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे कारण ते त्यांच्या पूर्वजांच्या परंपरेच्या विरोधात जात आहेत. दोन ज्यू रब्बींनी काबाचे संरक्षण कसे केले याची कथा ज्यू आणि इस्लाम यांच्यातील सतत घडत असलेल्या संघर्षाला एक सकारात्मक दृष्टीकोन देते.
ज्यूंसाठी थेट महत्त्व नसलेल्या काबाचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे दूरदृष्टी आणि दयाळूपणा होता. वेगवेगळ्या धर्म आणि पंथांचे पालन करणाऱ्या प्रत्येकाला ठार मारण्याऐवजी इतिहासात एका वेळी, मुस्लिम, यहूदी आणि ख्रिश्चन यांनी एकाच शहरात, त्यांच्या स्वतंत्र उपासनागृहांमध्ये प्रार्थना केली, हे कोणीही विसरू नये. जर आपण इतिहासातून काही शिकू शकत नाही, तर आपण स्वतःला सुसंस्कृत कसे म्हणू शकतो?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.