आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
चाकाच्या शोधाला मानवी उत्क्रांतीमधील सर्वात क्रांतिकारक शोध मानला जातो. साधारण ५ हजार ५०० वर्षांपूर्वी ‘मेसोपोटेमिया’ या भागात पहिल्यांदा चाक वापरल्याचे पुरावे अभ्यासकांना सापडले आहेत. दळणवळण सुरू झाले. त्यामुळं ज्ञानाची आणि विचारांची देवाण-घेवाण करता आली. चाकाच्या शोधामुळेच मानवी जीवनाला गती मिळाली, असं म्हणावं लागेल. प्राचीन काळी युद्धात प्राण्यांचा किंवा प्राण्यांचा वापर करून तयार केलेल्या रथांचा वापर केला जाई. काळाच्या ओघात मानवानं अत्याधुनिक वाहनांची निर्मिती केली. आधुनिक काळात युद्धांमध्ये देखील वाहनांचा वापर होऊ लागला. वाहनांच्या वापरांमुळे युद्ध करणं सोपं झालं. अनेक युद्धांमध्ये केवळ वाहनांच्या वापरामुळं अनपेक्षित निकाल हाती आलेला आहे. मात्र, एखाद्या वाहनाच्या नावावरूनच युद्ध ओळखलं जाऊ शकतं, याची कल्पनाही कुणी केली नसेल.
इतिहासाच्या पटलावर एक युद्ध असं आहे जे त्यात वापरलेल्या वाहनाच्या नावावरून ओळखलं जातं. १९८७ला लिबिया आणि चाड या आफ्रिकन देशांदरम्यान झालेलं युद्ध ‘टोयोटा वॉर’ म्हणून जगाला ज्ञात आहे.
‘द ग्रेट टोयोटा वॉर’ हे कमी वजनाचे टोयोटा हिलक्स आणि लँड क्रूझर व्हेरियंट वापराचे जन्मस्थान होतं. अविकसित देशांमध्ये सैन्याच्या वाहतुकीसाठी आणि लढाईसाठी अशा वाहनांचा वापर होतो. टोयोटा ही इलेक्ट्रिक हायब्रिड वाहनांच्या विक्रीत जगातील बाजारपेठ अव्वल असणारी वाहन निर्मिती कंपनी आहे.
जपानच्या या कंपनीनं जगभरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात हायब्रिड वाहने घेण्यास उद्युक्त केलं आहे. अशा वाहनांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि विक्री करणारी पहिली कंपनी आहे.
१९८७मध्ये लिबिया आणि चाड या देशांदरम्यान झालेल्या युद्धामध्ये पहिल्यांदा ‘टोयोटा हिलक्स आणि लँड क्रूझर’ वाहनांचा वापर करण्यात आला होता.
‘ग्रेट टोयोटा वॉर’ हा चाडियन-लिबियन संघर्षाचा शेवटचा टप्पा होता. १९८७ मध्ये चाड आणि लिबियाच्या सीमेवर युद्ध घडलं होतं. चाडियन सैन्यानं लिबियाविरूद्ध तांत्रिक सहाय्य म्हणून टोयोटा पिकअप ट्रक, टोयोटा हिलक्स आणि टोयोटा लँड क्रूझर यांचा वापर केला. या युद्धात लिबियाला जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे ७ हजार ५०० सैनिक मारले गेले आणि १.५ अमेरिकन डॉलर्स किंमतीची शस्त्रास्त्रे नष्ट झाली होती. एका अमेरिकन अहवालानुसार लिबियानं आपल्या सैन्याचा दहावा भाग गमावला होता, तर चाडच्या केवळ एक हजार सैनिकांचा मृत्यू झाला होता.
कर्नल मुअम्मर गद्दाफीच्या नेतृत्वात १९७० आणि ८०च्या दशकात लिबियानं आफ्रिकेतील बंडखोर आणि डी’अॅट्स कट्टरपंथी सरकारांना आधार देण्यासाठी आपली आर्थिक संसाधनं वापरली. कर्नल गद्दाफीनं उत्तर चाडमधील बंडखोर गटांना पाठिंबा दर्शवला. हे गट दक्षिण चाडमधील लोकांकडून चालविल्या जाणाऱ्या सरकारला विरोध करत होते. चाडमधील सरकार दडपशाही करत असल्याचं मत या गटांच होतं. लिबियाच्या पाठिंब्यानं या बंडखोर गटांनी ‘नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ चाड’ची स्थापना केली.
१९७०च्या उत्तरार्धात आणि १९८३ पासून ते ८७ पर्यंत लिबियाच्या चाडमधील हस्तक्षेपाचं प्रमाण वाढलं. गद्दाफीच्या कारकिर्दीत चाडमधील विविध सशस्त्र गटांना आर्थिक आणि लष्करी पाठबळ मिळाल्यापासून चाडमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली. याच दरम्यान लिबियानं औझू प्रदेशावर आपला हक्क घोषित केला.
दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात औझू हा प्रदेश आहे. त्याचा जास्त विस्तार हा चाडच्या बाजूनं झालेला आहे. या वाळवंटी भागात युरेनियमचे साठे असल्याची अफवा त्यावेळी होती. त्यामुळे उभय देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली.
टोयोटा हिलक्स आणि लँड क्रूझरचा वापर हा चाडच्या रणनीतीतील एक महत्त्वाचा भाग होता. चाडियन-लिबियन संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचा वापर करण्यात आला, त्यामुळं युद्धाला एक प्रमुख वळण मिळालं होतं. चाडकडे कँव्हेन्च्युअल फोर्स नव्हती. परंतु, त्यांना ४०० टोयोटा हिलक्स आणि लँड क्रूझर देण्यात आले, जे अँटी-टँक क्षेपणास्त्र आणि जड मशीनगनसह सुसज्ज करता येऊ शकत होते. लिबियन सैन्यांकडं सोव्हिएतनं बनवलेली परंपरागत उपकरणे होती. शस्त्रांच्या वाहतुकीसाठी त्यांच्याकडे जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर्स होते.
कागदावर जरी लिबियन लष्कर भक्कम आणि सामर्थ्यशाली दिसत असलं तरी त्यात अनेक त्रुटी होत्या. सीमाभागातील लिबियन सैन्य हे फक्त बंडखोर चाडियन्सला आधार देण्यासाठी उभं करण्यात आलेलं होतं. त्यांच्यामध्ये शिस्तीचा अभाव होता. १९८७ला मोक्याच्या क्षणी त्यांनी या बंडखोरांचं समर्थन गमावलं, जे त्या भागाच्या ज्ञानासाठी आणि प्रत्यक्ष मैदानावरील युद्धनिती आखण्यासाठी मौल्यवान होते. या बंडखोरांची लिबियाला मोठ्या प्रमाणात मदत झाली असती. याउलट चाडच्या सैन्यामध्ये शिस्त आणि मनोबल दोन्ही जास्त होतं.
टोयोटाचा पहिला संघटित वापर जानेवारी १९८७ला ‘फदा’च्या लढाईत झाला.
चाडनं एक लिबियन आर्मर्ड ब्रिगेड नष्ट केली. त्यात सुमारे ८०० लिबियन मारले गेले तर मोठ्या संख्येनं सोव्हिएत बनावटीचे रणगाडे नष्ट झाले. १८ चाड सैनिक मारले गेले आणि चार पिकअप ट्रक्स नष्ट झाले. हे चाडच्या सैन्यासाठी मोठं यश होतं. फ्रेंच हवाईदलाच्या मदतीनं लिबियन विमानांना चकवण्यात आलं. त्यानंतर चाडच्या सैन्यानं टोयोटाला लावलेली क्षेपणास्त्रे आणि मशीन गनचा वापर करून लिबियन सैन्यांचा नाश केला. चाड सैन्याच्या या युक्तीमुळं लिबियनांचा गोंधळ उडाला.
त्यानंतर मार्च १९८७ मध्ये, चाडियन सैन्यानं ‘औदी डोम’ येथील लिबियन एअरबेसवर हल्ला केला. याठिकाणी ५ हजार सैनिक आणि सोव्हिएत माइनिंगफील्ड्स तैनात होत्या.
चाड सैन्यानं टोयोटाला लावलेल्या क्षेपणास्त्रांचा आणि मशीन गनचा वापर केला. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच चाडियन सैन्याला मोठं यश मिळालं. ३ हजारपेक्षा जास्त लिबियन सैनिक मारले आणि पकडले गेले. शेकडो रणगाडे, वाहनं, विमानं आणि हेलिकॉप्टर्स नष्ट झाले. काही ठिकाणी तर लिबियानं विमानं पाठवून चाड सैन्याच्या ताब्यात असलेले लिबियन रणगाडे नष्ट केले.
याचा सूड म्हणून, चाडियन्सने ‘लिबिया’ एअरबेसवर हल्ला केला. याला ‘मॅटिन अल-सार्रा’ची लढाई म्हणून ओळखलं जातं. या एअरबेसवरून लिबियन सैन्याला हवाई सहकार्य मिळत होते. चाड सैन्याच्या हल्ल्यात ३२ लिबियन विमानं नष्ट झाली आणि १ हजार सैनिक मारले गेले व ३०० जणांना युद्ध कैदी बनवण्यात आलं. वाढत्या देशांतर्गत विरोधामुळे आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे युद्ध बंद करण्याची इच्छा गद्दफीनं व्यक्त केली. तर, दुसरीकडे चाडचे राष्ट्राध्यक्ष हबरे यांनी देखील या निर्णयाला समर्थन दिलं. १९८७ला युद्धबंदी करारावर सह्या करून दोन्ही देशांनी ‘टोयोटा वॉर’ संपुष्टात आणलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.