आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असतं, अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. बऱ्याच वेळा अशा काही घटना घडतात, की या म्हणीचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जर आम्ही सांगितलं, की भुताच्या भीतीने एका व्यक्तीने कोणाची तरी हत्या केली, आणि चक्क उच्च न्यायालयानेही त्याला सोडून दिलं; तर तुमचा विश्वास बसेल? नाही ना? मात्र, असं झालंय. ओडिशामध्ये राम बहादुर थापा या व्यक्तीची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, कारण त्यानं भुताचं कारण पुढे केलं.
काय होतं हे प्रकरण?
आजपासून सुमारे साठ वर्षांपूर्वी हे प्रकरण घडलं होतं. ओडिशाच्या बालासोरमध्ये रसगोविंदपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. या गावाच्या शेजारीच वायुदलाचा एक मोठा हवाई अड्डा होता. स्वातंत्र्यानंतर हा हवाई अड्डा तसा कामी येत नव्हता. त्यामुळं केवळ ‘एरोस्क्रॅप’, म्हणजेच विमानाचा कचरा, वापरात नसलेले वा निकामी झालेले पार्ट्स साठवून ठेवण्यासाठी या हवाई अड्ड्याचा वापर करण्यात येत होता. या ठिकाणी वायुदलाने दोन चौकीदारांची नेमणूक केली होती, जेणेकरुन कोणीही हे पार्ट्स घेऊन जाऊ नये.
१९५८मध्ये याठिकाणी एक बंगाली व्यापारी आला, ज्याचं नाव जगत बंधु चॅटर्जी होतं. ‘चॅटर्जी फर्म’ म्हणून त्यांची कलकत्त्याला एक कंपनी होती. या कंपनीसाठी विमानाचे स्क्रॅप पार्ट्स विकत घेण्याच्या उद्देशाने जगत बंधु याठिकाणी आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा नेपाळी नोकर आणि सुरक्षारक्षक राम बहादुर थापा हादेखील होता. जगत बंधु आणि राम बहादुर हे कृष्णा चंद्रा पात्रो यांच्या घरी रहायला होते. पात्रो यांची रसगोविंदपूरमध्ये चहाची टपरी होती.
या हवाई अड्ड्याच्या आजूबाजूला छोटी-छोटी गावं आणि आदिवासी पाडे होते. हवाई अड्डा मोठ्या प्रमाणात पसरला असल्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी कित्येक वेळा लोक या अड्ड्यामधूनच जात. या अड्ड्याच्या परिसरातून बरेच शॉर्टकट तयार झाले होते. या आदिवासी लोकांकडून एरोस्क्रॅपला काही धोका नसल्यामुळे येथील चौकीदारही त्यांना अडवत नसत.
मात्र, चौकीदारांच्या निर्धास्त असण्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे अंधश्रद्धा! इथल्या लोकांचा भूत-प्रेत या गोष्टींवर प्रचंड विश्वास होता. कशामुळे ते माहिती नाही, पण या हवाई अड्ड्यामध्ये भुतं असल्याची अफवा आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये पसरली होती.
लोकही भोळे असल्यामुळे सर्वांचा यावर विश्वास बसला होता. त्यामुळं दिवसा जरी ते या अड्ड्याच्या परिसरातून जात असले, तरी रात्री मात्र ते तिथून जाणं टाळत. एवढंच नाही; तर अड्ड्याजवळ येता येता रात्र झाली, तर ती व्यक्ती दुसऱ्या टोकाला असलेल्या गावात राहून सकाळ झाल्यावरच पुढे आपल्या गावी परत येत असे.
असंच २० मे १९५८ला अड्ड्याच्या पलीकडे असणाऱ्या तेलकुंडी गावातील चंद्रा माझी हे रसगोविंदपूरमधून आपल्या गावी जात होते. मात्र, रात्र झाल्यामुळे अड्डा ओलांडण्याचा विचार त्यांनी टाळला. रात्री नऊ वाजताच्या सुमारास ते अड्ड्याशेजारी असणाऱ्या कृष्णा पात्रो यांच्या टपरीवर आले. भुतांच्या भीतीमुळे एवढी रात्र आपल्याला त्याठिकाणी राहू देण्याची विनंती त्यांनी केली.
पात्रो यांना भुताबाबत माहिती असल्यामुळे त्यांनीही माझींना रात्री तिथे राहण्याची परवानगी दिली. मात्र, भुताबाबत ऐकल्यानंतर जगत बंधु आणि राम बहादुर यांच्या डोक्यात वेगळीच शक्कल आली. या दोघांनाही भूत पहायचं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी कृष्णा पात्रो यांना उठवून आपली योजना सांगितली. सुरुवातीला पात्रो यांनी नकार दिला, मात्र या दोघांनी कसंतरी करुन कृष्णा यांना आपल्यासोबत येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर त्यांनी चंद्रा माझी यांना उठवून सांगितलं, की आम्ही तुम्हाला तुमच्या गावात सोडून येतो. अशा प्रकारे हे सगळे निघाले. थोड्याच वेळात तेलकुंडीच्या वेशीवर माझी यांना सोडून हे सगळे परत येऊ लागले. हवाई अड्ड्याच्या शेजारी असणाऱ्या फुटपाथवरुन ते येत होते. यावेळी कॅम्प नंबर ४ जवळ त्यांना थोड्या अंतरावर पुढे काहीसा प्रकाश दिसला.
रात्रीची वेळ होती, वारं वाहत होतं आणि पुढे घट्ट अंधारात चमकणारा प्रकाश. अशा वातावरणामुळं त्यांना विश्वास बसला, की आपण जे पाहतोय ते भूतच आहे. या प्रकाशाजवळच त्यांना काही आकृत्यांची हालचालही दिसली. मग तर त्यांचा विश्वासच बसला, की ही भुतंच आहेत जी शेकोटीभोवती नाचत आहेत.
भुतांच्या मेजवान्या, शेकोटीभोवतीचा नाच या सगळ्या गोष्टी आपण अजूनही गोष्टींमधून ऐकतोच. त्यामुळे त्यांचा समोर दिसतंय त्यावर विश्वास बसला; आणि भुतांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. बहादुर थापा हा जगत बंधुंचा सुरक्षारक्षक असल्यामुळे तो पुढे धावला. नेपाळी लोकांकडे सहसा असणारं सुऱ्यासारखं शस्त्र ‘कुकरी’ त्याच्याकडे होतीच. या कुकरीने त्याने तिथं असलेल्या ‘भुतांवर’ हल्ला केला. तिथं असणाऱ्या या ‘भुतांना’ कसलीच कल्पना नसल्यामुळं त्यांना काहीच करता आलं नव्हतं.
थापानं एकापाठोपाठ एक सर्वांवर सपसप वार केले. त्वेषामध्ये येऊन त्यानं चक्क सोबत आलेल्या कृष्णा पात्रो यांच्यावरही हल्ला केला. या सर्वांचा ओरडण्याचा-रडण्याचा आवाज ऐकून अखेर थापा थांबला. मग पाहिल्यावर त्यांना समजलं, की थापाने भूत समजून खरंतर बाजूच्या आदिवासी पाड्यातील महिलांवर वार केले आहेत. या महिला रात्री ‘महुआ’ची फुलं गोळा करण्यासाठी येत असत. त्यांनाच लोक भूत समजत होते. मात्र, व्हायचं ते झालं होतं. थापाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर आणखी दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. एवढंच काय, तर कृष्णा पात्रो यांनाही जखमा झाल्या होत्या.
यानंतर बहादुर थापावर कलम ३०२ अंतर्गत हत्येचा, तसेच कलम ३२४ आणि ३२६ अंतर्गत इतर गुन्हे दाखल करण्यात आले. बहादुरनेही आपल्या हातून ही हत्या झाल्याचं कबूल केलं होतं. मात्र, आपण या महिलांवर ‘भूत’ समजून हल्ला केला. त्यामुळं हा गुन्हा अनावधानाने घडला असल्याचं त्याचं म्हणणं होतं. यामुळंच घटनेतील ‘कलम ७९’ मधील तरतुदीनुसार सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्याची निर्दोष मुक्तता केली.
कलम ७९ असं म्हणतं, की एखाद्या व्यक्तीकडून अनावधानाने, वा एखाद्या चांगल्या हेतूने, किंवा आपण एखादी चांगली गोष्ट करत आहोत अशा विचारातून गुन्हा घडला असेल, तर त्याची शिक्षा कमी केली जाऊ शकते. यात मग आत्मसंरक्षण हा मुद्दाही येतोच.
त्यामुळं मग बहादुर थापाने या महिलांवर हल्ला केला, तेव्हा त्याने त्यांना ‘भूत’ समजलं होतं. आपल्या आणि आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी त्याने हा हल्ला केला, असं म्हणत न्यायालयाने त्याची मुक्तता केली होती.
ओडिशा सरकारने मात्र, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारने अशी बाजू मांडली, की चांगल्या हेतूने जरी हा गुन्हा घडला असला, तरी थापाने केलेलं कृत्य हे निष्काळजीपणाने केलं होतं. त्यामुळे किमान ‘अपघाती मृत्यू’चा वा ‘निष्काळजीपणाने झालेला मृत्यू’ याबाबतचा गुन्हा तरी त्याच्यावर नोंदवायला हवा. थापाने त्यावेळी सारासार विचार न करता, केवळ आतातायीपणा करुन थेट हल्ला केला. त्यामुळे एका महिलेचा जीव गेला. यावेळी थापाच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितलं, की बहादुर थापाला भुताखेतांमध्ये पूर्ण विश्वास होता. तसेच, ती जागाही भुताटकीची म्हणून कुप्रसिद्ध होती.
थापा बाहेरुन आलेला असला, तरी गावकऱ्यांच्या सांगण्यामुळे कोणीही यावर विश्वास ठेवला असता की त्याठिकाणी भूत आहे. त्यामुळे थापाने केलेलं कृत्य अगदीच निष्काळजीपणाचं नव्हतं. शिवाय, सारासार विचार करण्याची प्रत्येक व्यक्तीची वेगळी मर्यादा आणि कुवत असते. आपण एखाद्या गोष्टीचा ज्या दृष्टीने विचार करतो, त्याच दृष्टीने दुसरा व्यक्ती विचार करेल असं नाही होत. उच्च न्यायलायने हा मुद्दा मान्य करत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला, आणि ओडिशा सरकारची याचिका रद्द केली. त्यामुळं बहादुर थापाची यावेळीही निर्दोष मुक्तता झाली.
इथं हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की हे प्रकरण १९५९मध्ये घडलं होतं. यावेळी देशात साक्षरता अगदीच कमी प्रमाणात होती. त्यामुळे लोकांचा भुताखेतांमध्ये विश्वास आहे हे सर्वमान्य होतं. त्यामुळं आता जर कोणी अशा प्रकारे कलम ७९ची मदत घेण्याचा विचार केला; तर त्याला शिक्षा तर होईलच, मात्र वेड्यांच्या इस्पितळातही भरती करतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.