आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजच्या काळात कोणी कोणाच्या सुखदुःखात सामील होईल, असं फार कमी वेळा घडतं. असं असलं तरी आपल्या आजूबाजूला अनेक असे लोक होऊन गेले आहेत, ज्यांनी आपल्या दृढ इच्छाशक्तीच्या बळावर असं काही करून दाखवलं आहे की लोक आजही त्यांचं नाव घेतात. राजेंद्रसिंह हे असंच एक उदाहरण आहे. त्यांना ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणूनच ओळखले जाते. त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागाला जलसंकटातून बाहेर काढले आहे.
राजेंद्र सिंह यांचा जन्म ६ ऑगस्ट १९५९ रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील मौजूद डौला या गावात झाला. एखाद्या सामान्य मुलाप्रमाणे त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले व भारतीय ऋषिकुल आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. आयुर्वेदातील डिग्री मिळवल्यानंतर ते आपल्या गावी परतले. याच काळात ते समाजवादी नेता जयप्रकाश नारायण यांच्या संपर्कात आले. त्यांना भेटून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातील एका कॉलेजात प्रवेश घेतला आणि ते तिथल्या युवा संघर्ष वाहिनी या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आले. राजकारणात काही करून दाखवतील याअगोदरच त्यांना सरकारी नोकरी मिळाली.
‘नॅशनल सर्व्हिस व्हॉलेंटियर फॉर एज्युकेशन’ म्हणून काम करण्यासाठी ते जयपूरला रवाना झाले. नोकरीमुळे त्यांनी राजकारणाला तिलांजली दिली होती. नोकरी मिळाल्यामुळे घरच्यांनी त्यांचे मीना नावाच्या युवतीशी लग्न लावून दिले.
सगळं व्यवस्थित सुरु असताना १९८१ साली राजेंद्र यांनी आपली नोकरी सोडली, यामुळे त्यांच्या घरच्यांना धक्का बसला. राजस्थानमधील पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ते व्यथित झाले होते, या विवंचनेतूनच त्यांनी नोकरी सोडली.
नोकरी सोडल्यानंतर २३ हजार रुपये घेऊन राजेंद्रसिंह मैदानात उतरले. त्यांनी नरेंद्र, सत्येंद्र, केदार आणि हनुमान या मित्रांना घेऊन एका गैरसरकारी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे नाव तरुण संघ असे होते. ही संस्था जयपूर विद्यापीठात स्थापन करण्यात आली होती, पण तिथे ही संस्था पूर्णपणे बंद पडली. राजेंद्र सिंह यांनी आपल्या मेहनतीने ही संस्था पुन्हा नव्याने उभी केली.
सुरुवातीच्या काळात त्यांना आपल्या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ते त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून पोखर करणार होते. ही एक प्राचीन भारतीय रचना असून यामध्ये पावसाळ्यात पाणी साठत जाते आणि कालांतराने पाण्याचा स्तर वाढत जाऊन जमिनीत भूजल पातळीत वाढ होते. ज्यावेळी राजेंद्रसिंह पोखर बांधायला जायचे, त्यावेळी लोक कोणतंही सहकार्य न करता त्यांची खिल्ली उडवत.
एवढी अडचण असून देखील राजेंद्रसिंह यांना गावकऱ्यांची समजूत काढण्यात यश आले. काही काळात लोक त्यांच्या मोहिमेत सहभागी होऊ लागले. कोरड्या विहरी आणि जोहड यांना पुनरुज्जीवित करण्याची मोहिम त्यांनी हाती घेतली. मनोटा कोयला भागातील जोहड त्यांनी या कामासाठी निवडली. याठिकाणी त्यांनी ग्रामसभेचे आयोजन केले. या ग्रामसभेत त्यांनी लोकांना आपल्या कार्यात मदत करायला सांगितली.
६ मार्च १९८७ रोजी त्यांनी मनोटा कोयला येथे जोहड बांधायचे काम सुरू केले. या जोहडमध्ये जल संचय करण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. देशाच्या अनेक भागांत राजेंद्रसिंह यांच्या नेतृत्वात साडे सहा हजार जोहडांची निर्मिती केली गेली. तब्बल १ हजार गावांना पाण्याच्या दुर्भिक्ष्ययातून मुक्त करण्यात राजेंद्रसिंह यांना यश आले.
राजेंद्रसिंह यांनी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील चित्रच पालटले. अलवरच्या कोरडवाहू दुष्काळग्रस्त जमिनीचे त्यांनी आपल्या जलसंरक्षण प्लॅनच्या मदतीने हिरव्यागार क्षेत्रात परिवर्तन केले. त्यांच्या प्रयत्नांतून अनेक नदी आणि तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. राजेंद्र सिंह यांना स्टॉकहोम वॉटर प्राईजने सन्मानित करण्यात आले. ज्याला या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजले जाते.
२००८ साली ब्रिटिनच्या गार्डियन या वृत्तपत्राने त्यांचा जगातील टॉप-५० लोकांच्या यादीत समावेश केला, जे जगाला वाचवण्याची क्षमता बाळगतात. २००१ साली त्यांना सामुदायिक नेतृत्वासाठी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राजेंद्रसिंह यांना सुरुवातीला जोहड व जलसंरक्षण या विषयात अधिक माहिती नव्हती. पण गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी त्यांचे मिशन यशस्वी करून दाखवले. ते आपल्या यशाचे श्रेय गावकऱ्यांना देतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.