आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आज प्रत्येक घरी एक किंवा एकापेक्षा जास्तच गाड्या आहेत. पण, ७०-८० च्या दशकात कुणालाच अशी चंगळ परवडत नव्हती. त्याकाळी साधी स्कुटर असणेही श्रीमंतीची खूण समजले जात असे. १९८३ साली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला तेंव्हा सरकारने या टीममधील प्रत्येकाला विजय सुपर स्कुटर बक्षीस दिले होते. म्हणजे एका स्कुटरचे त्याकाळी किती कौतुक असेल विचार करा.
विजय सुपरच्या जाहिरातीत ‘आता चाकावरून होतील सर्वोत्तम कामे’ अशी टॅगलाईन होती. खरे तर त्याकाळी विजय स्कुटर वापरणाऱ्या कुणीही ही गोष्ट नाकारू शकणार नाही.
बजाजने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याआधीचा काळ विजयचाच होता. १९७० आणि ८० च्या दशकातील बालपण अनुभवलेल्या लोकांच्या मनात विजय स्कुटरच्या आठवणी आजही ताज्या होतील.
अनेक मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबातील पहिली स्कूटर होती ती विजयच. भारतातच याची निर्मिती होत असल्याने अनेकांना आपले टू व्हीलर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता आले. भारतीयांना स्कूटरवरून सवारी करण्याचा पहिला आनंद विजयने दिला.
त्याकाळी ज्यांनी ही स्कूटर वापरली त्यांना आजही असेच वाटते की, या गाडीसारखी गाडी होऊच शकत नाही. अनेक वर्षे वापरूनही या स्कूटरला कसलाच प्रॉब्लेम येत नव्हता. अगदी ओबडधोबड रस्त्यातूनही ही स्कूटर चालत असे, नव्हे पळत असे. तरीही ती फारशी नादुरुस्त व्हायची नाही. उलट अनेकांचे तर मत असे आहे, की मजबुतीच्या बाबतीतही विजयची बरोबरी करणारी दुसरी गाडी आजवर झालेली नाही.
या स्कूटरला काहीच म्हणजे काहीच अडचण नव्हती असे सांगणारे याचे अनेक चाहते भेटतील. विजय म्हणजे दणकटपणा, मजबुती आणि खिशाला परवडणारी गाडी असे समीकरणच रूढ झाले होते.
या स्कूटरची निर्मिती भारतातच केली जात असे. भारतातील स्कूटर इंडिया लिमिटेड या कंपनीने ही गाडी बनवली होती. याची आकर्षक डिझाईन आणि स्टाईल पाहून अवघ्या काही दिवसातच या गाडीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय याची हेडलाईट, स्पीडोमीटर आणि मध्यभागी बसवलेले इंजिन या वैशिष्ट्यांमुळे हाताळायलासुद्धा ही गाडी अगदी सोपी होती.
इटलीच्या इंनोसेंटी कंपनीने १९७२ मध्ये भारतात स्कूटर इंडिया लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी लखनऊमध्ये या कंपनीची पायाभरणी केली. इनोसेंट ही इटालियन कंपनी नंतर भारत सरकारने खरेदी केली. ज्यामुळे स्कूटर इंडिया लिमिटेड या नावाने त्याचे उत्पादन इथेच होऊ लागले. त्याकाळी लँबरेटा स्कूटरची निर्मिती करणाऱ्या ऑटोमोबाईल प्रोडक्टस इंडिया (एपीआय) आणि इनोसेंटी या दोघांनी मिळून संयुक्तरित्या या स्कूटरची निर्मिती करण्याचा उद्योग सुरु केला.
तीन वर्षानंतर या कंपनीने विजय सुपर नावाने स्कूटर बनवण्यास सुरुवात केली. १९७१ साली भारताने पाकिस्तानविरुद्ध लढाईत विजय मिळवला. त्यावरूनच प्रेरित होऊन या कंपनीने आपल्या स्कूटरचे नाव विजय ठेवले असे म्हटले जाते.
एसआयएलने दुचाकी गाड्यांना मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून तीनचाकी गाड्यांची निर्मिती करण्याचा विचार केला. या कंपनीने तयार केलेल्या तीनचाकी गाड्यांनाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला. कारण सामान वाहून नेणे किंवा लोकांना सार्वजनिक वाहतुकीसाठीही या गाड्यांचा चांगला उपयोग होऊ लागला. कमीतकमी दारात सामान आणि प्रवाशांची वाहतूक करणे सोयीचे होऊ लागले. एसआयएलच्या तीनचाकी गाड्यांनी अनेकांना रोजगाराची ही एक नवी संधी उपलब्ध करून दिली.
७० ते ८० च्या दशकात तर सर्वत्र विजयचेच वारे होते. १९९० पर्यंतही विजयने भारतीय ग्राहकांना आकर्षित केले. त्यानंतर विजय सुपरसाठी अनेक स्पर्धक निर्माण झाले. यात काही स्वदेशी बनवटीच्या गाड्या होत्या तर काही विदेशी बनावटीच्या. स्पर्धकांच्या वाढत्या संख्येत विजयचा टिकाव लागला नाही. कारण, विजयने आपल्या मॉडेलमध्ये काही बदलच केले नाहीत.
बाईकच्या डिझाईनमध्ये, तंत्रज्ञानामध्ये काहीच नाविन्य नसल्याने ग्राहकांना असणारे याचे आकर्षण थोडे कमी होऊ लागले. त्यातच बजाज चेतक, प्रिया स्कूटर यासारख्या नव्या आलेल्या ब्रँडनी जोरात टक्कर द्यायला सुरुवात केली. बाजारपेठेतील तीव्र आणि वाढत्या स्पर्धेत या स्कूटरचा टिकाव लागला नाही.
विजयच्या स्कूटर दुरुस्त करणारे मेकॅनिकही हळूहळू कमी झाले. याचे स्पेअरपार्टही बाजारात मिळेना झाले तेंव्हा अनेकांना इच्छा नसतानाही या गाड्या विकाव्या लागल्या. परंतु या कंपनीच्या तीनचाकी गाड्यांचे उत्पादन मात्र सुरु राहिले आणि त्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत होती. हळूहळू या उत्पादनासाठीही स्पर्धक वाढले. कंपनीला या उत्पादनातही तोटा सोसावा लागला. कंपनीने आपल्या गाड्यांचे वजन थोडे कमी केले आणि आपल्या प्लांटमधील वीज वापरही कमी केला. पण, यामुळे खर्च कमी झाला तरी फायदा म्हणावा तसा मिळत नव्हता.
सरकारने या कंपनीच्या पुनर्ज्जीवन करण्यासाठी २०११ साली २०२ कोटींची मदत केली तरीही कंपनीची गाडी रुळावर आली नाही. या कंपनीत सरकारची भागीदारी ९३.४७% इतकी होती. शेवटी सरकारलाही तोट्यात चालणाऱ्या या कंपनीला विकण्याचा निर्णय घ्यावा लागला.
२०१६ नीती आयोगाने मोडीत निघालेल्या ज्या सार्वजनिक उद्योगांची यादी जाहीर केली त्यामध्ये स्कूटर इंडिया लिमिटेड या कंपनीचाही समावेश होता. सरकारने या कंपन्या लिलावासाठी काढल्या होत्या. एसआयएलला मात्र लिलावातही चांगली बोली मिळाली नाही. कदाचित या कंपनीच्या नव्या गाड्या बाजारात पुन्हा येतील अशीही चर्चा सुरु आहे.
विजय सुपरला एकेकाळी जी मागणी होती आणि जी भरभराट या कंपनीने अनुभवली ती आज राहिली नाही. याबद्दल खेद वाटतो. कंपनीने योग्य वेळी कालानुरूप बदल करून नवनव्या तंत्रज्ञानासह काही नवी वैशिष्ट्ये दिली असती तर आजही विजय सुपर सुपरफास्ट स्पीडने रस्त्यावरून पळताना दिसली असती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.