आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या देशात भगवत गीता, कुराण, बायबल, गुरू ग्रंथसाहिब या धार्मिक ग्रंथांना अतिशय पवित्र आणि मानाचं स्थान आहे. अगदी न्यायालयात साक्षीपूर्वी आणि सैन्यात सुद्धा या ग्रंथांची शपथ दिली जाते. ही बाब आपल्याला सवयीची झालेली आहे त्यामुळं तिचं काही कौतुक वाटत नाही. मात्र, भारताबाहेर जर एखाद्या देशाच्या पंतप्रधानानं भगवतगीतेची शपथ घेऊन पदभार स्वीकारला तर? नक्कीच आश्चर्य वाटेल ना!
मात्र, कॅरेबियन बेटांवरील एक लहानसा देश असलेल्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सहाव्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसार यांनी भगवतगीतेची शपथ घेतली होती.
कॅरेबियन बेटांवर भारतीय संस्कृतीची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, हे याप्रसंगावरून सिद्ध होतं. तेथील पंतप्रधानांनी असं का केलं? यामागची कारणे शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाचा दरवाजा ठोठावा लागेल.
जेव्हा वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघात शिवनरेन चंदरपॉल, दिनेश रामदीन, रामनरेश सरवान ही नाव मी बघायचे तेव्हा खूप गंमत वाटायची. मला इतकं तर नक्की माहित होतं की, ही नावं भारतीय आहेत. मात्र, हे खेळाडू खरंच भारतीय आहेत, हे तेव्हा मला माहित नव्हतं. जेव्हा शाळेत जगाचा इतिहास आणि भूगोल व्यापकपणे अभ्यासला तेव्हा लक्षात आलं, कॅरेबियन बेटांवर मोठ्या प्रमाणात भारतीय लोकसंख्या वास्तव्याला आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगो हे देखील कॅरेबियन बेटांवरील एक राष्ट्र आहे. हिंदू हा त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. २०११च्या जनगणनेनुसार त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये २ लाख ४० हजार १०० हिंदू धर्मीय नागरिक राहत होते. हिंदूंसाठी याठिकाणी विविध मंदिरं देखील आहेत.
साधारण १८४५ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोत हिंदू संस्कृतीचा प्रवेश झाला. वसाहतींमध्ये कष्टाची कामे करण्यासाठी भारतातून मजुरी आणण्याची परवानगी ब्रिटिशांनी वसाहतीवाल्यांना दिली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतातून मजूर कॅरेबियन बेटांवर नेण्यात आले. खनिज तेलासाठी प्रसिद्ध असलेल्या त्रिनिदादमध्ये देखील भारतीय मजूर पाठवण्यात आले.
१८७१मध्ये तेथील भारतीय लोकांची संख्या २७ हजार ४२५ पर्यंत गेली होती. हा आकडा त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या एकूण लोकसंख्येच्या २२ टक्के इतका होता. पुढील चाळीस वर्षांमध्ये ही आकडेवारी सव्वा लाखांपर्यंत जाऊन पोहचली.
सुरुवातीच्या दशकात, भारतीय लोकांना आणि प्रामुख्यानं हिंदूंना तेथील बहुसंख्य लोकांचा तिरस्कार सहन करावा लागला. हिंदूंनी त्रिनिदाद आणि टोबॅगोचा इतिहास, संस्कृती आणि विकासात मोठं योगदान दिलेलं आहे. तरीदेखील हिंदूंना त्याठिकाणी दुय्यम नागरिक म्हणून वागणूक मिळे. प्रौढ मताधिकार, हिंदू विवाह कायदा, घटस्फोटाचा कायदा, स्मशानभूमी अध्यादेश यासाठी त्रिनिदादमधील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात संघर्ष केला आहे.
१९५३ मध्ये हिंदूंना अंत्यसंस्कार करण्यास परवानगी मिळाली आहे. १९८६ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान शपथविधीसाठी भगवद्गीता आणि कुराण ठेवण्यात आलं नव्हतं.
हा हिंदू आणि मुस्लिमांचा घोर अपमान असल्याचं नागरिकांनी म्हटलं होतं. कारण दोन्ही धर्मिय लोकांचे पुरेसे प्रतिनिधी निवडून आलेले होते. तरी देखील त्यांना कमी लेखण्यात आलं होतं.
राष्ट्रीय शिक्षणप्रणाली आणि अभ्यासक्रमांमध्ये देखील अशा प्रकारचा भेदभाव केला जाई. सरकारी शाळांमध्ये फक्त ख्रिश्चन प्रार्थनांचा वापर, मान्यताप्राप्त शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू धर्माच्या माहितीचा समावेश न करणं, यामुळे हिंदू समुदायामध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या असंतोषाचं रुपांतर मोठ्या आंदोलनात झालं होतं. त्यानंतर हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारणा झाली.
या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या पायावर २०१०मध्ये भारतीय वंशाच्या कमला प्रसाद बिस्सेसार या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान झाल्या. त्यांनी हिंदूचा धर्मग्रंथ भगवतगीता हातात धरून आपल्या पदाची शपथ घेतली. याची त्यावेळी जगभरात चर्चा झाली होती.
२२ एप्रिल १९५२ रोजी एका हिंदू ब्राम्हण कुटुंबामध्ये कमला यांचा जन्म झाला होता. १८८० च्या दरम्यान त्यांचे पूर्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोला स्थलांतरित झाले होते. कमला यांचे वडील बिहारी होते तर आई दक्षिण भारतीय कुटुंबातील होती. कमला यांनी आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्थानिक शाळा व महाविद्यालयांतून पूर्ण केलं. उच्च शिक्षणासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्याचा हट्ट धरला. यासाठी वडील आणि काकांचा विरोध होता.
मात्र, अतिशय हुशार असलेल्या कमलाला त्यांच्या आईनं पाठिंबा दिला आणि पुढील शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तिथे पदवी घेतल्यानंतर त्या त्रिनिदादला परत आल्या. त्यानंतर त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आणि पुढील शिक्षणही सुरू ठेवले.
सुरुवातीपासून कायदा आणि सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या कमलांनी १९८७मध्ये राजकारणात प्रवेश केला. सेंट पॅट्रीक काऊंटी कौन्सिलमध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर १९९४ ते १९९५ याकाळात त्या विरोधी पक्षातील सिनेटवर होत्या. १९९५ मध्ये त्या सिपरिया मतदारसंघाच्या खासदार झाल्या. १९९५ मध्ये त्यांनी ऍटर्नी जनरल म्हणून काम केलं.
२२ डिसेंबर २००० रोजी जेव्हा युएनसी पक्षानं सरकार स्थापन केले तेव्हा त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून शपथ घेतली. २५ एप्रिल २००६रोजी त्यांना बहुसंख्य विरोधी खासदारांचा पाठिंबा मिळाला आणि त्या विरोधी पक्षनेत्याच्या पदावर विराजमान झाल्या.
२०१०मध्ये तत्कालीन पीपल्स नॅशनल मुव्हमेंट पक्षाच्या सरकारनं लवकर निवडणुका जाहीर केल्या. त्या निवडणुकांमध्ये कमला प्रसाद यांच्या पक्षाला यश मिळालं.
२४ मे २०१० रोजी त्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. भारतीय उपखंडाबाहेरील देशाच्या पंतप्रधान होणाऱ्या भारतीय वंशाच्या त्या पहिल्या महिला होत्या.
त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये हिंदूंना आणि इतर भारतीयांना मिळत असलेली वागणूक पाहता, त्यांनी त्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भगवतगीतेची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. त्यांच्या नंतर आजपर्यंत त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये निवडणून आलेला प्रत्येक हिंदू व्यक्ती भगवतगीतेची शपथ घेताना दिसतो.
ज्या प्रकारे मला माझ्या धर्मातील रितीरिवाजांचे पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याच प्रमाणं देशातील प्रत्येक नागरिकाला आहे, हेच जणू त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं होतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.