आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१८५२ सालची गोष्ट. नेहमीप्रमाणे सर्व्हे जनरल ऑफ इंडियाचे डायरेक्टर ‘अँड्र्यू स्कॉट वॉ‘ आपल्या दालनात बसून काम करण्यात व्यस्त होते. तेव्हा अचानक एकजण धावपळ करत त्यांच्या दालनात आला आणि किंचाळत म्हणाला की, “मी जगातील सर्वोच्च शिखर शोधून काढलं आहे”
त्याचं हे वाक्य ऐकून अँड्र्यू स्कॉटला धक्काच बसला होता. त्या व्यक्तीने जगातील सर्वोच्च शिखराचा शोध लावला होता, त्याची उंची २९,००२ फूट इतकी मोजली होती. पुढे त्या शिखराचे नामकरण ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या माजी डायरेक्टर जॉर्ज एव्हरेस्ट याच्या नावावरून ‘माउंट एव्हरेस्ट’ करण्यात आले.
त्याकाळात त्या पर्वताची उंची मोजण्यासाठी अधिक संसाधनं उपलब्ध नव्हती, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील या महाकाय पर्वताची उंची मोजण्याचे कार्य साध्य करणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव होते ‘राधानाथ सिकदर’.
राधानाथ यांचा जन्म ऑक्टोबर १८१३ मध्ये कोलकाता शहरातील जोडासंको या भागात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तितुराम सिकदर होते. राधानाथ यांना बालपणीपासूनच शिक्षणाची प्रचंड गोडी होती. त्यांचा लहान भाऊ श्रीनाथ हा देखील त्यांच्याप्रमाणेच अभ्यासू व कुशाग्र बुद्धीचा होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. खाण्यापिण्याची वणवण असल्याने दोन्ही भावांच्या शिक्षणाचा भार कसा उचलणार हा पेच त्यांच्या वडिलांसमोर होता. परंतु दोन्ही भावंडांनी हार न मानता आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवली. त्यातूनच त्यांनी आपल्या शिक्षणाचा आणि पोटापाण्याचा खर्च भागवला.
१८२४ साली राधानाथ यांनी कलकत्याच्या हिंदू स्कुलला ॲडमिशन घेतली. त्यांना गणित विषयात विशेष रूची होती. त्यांनी त्या विषयात आपले करिअर करण्याचा निर्णय घेऊन त्यादृष्टीने तयारी सुरू केली. हिंदू स्कुलमध्ये त्यांना गणिताला जॉन टायटलर नावाचे विख्यात प्राध्यापक होते. राधानाथ यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने ते प्रभावित झाले होते. पुढे दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली.
राधानाथ प्रचंड बुद्धिमान होते. हिंदू स्कुलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी कॉमन टॅंजेंट आखण्याचे विविध मार्ग शोधून काढले, याचा तिथल्या स्थानिक शिक्षकांवर मोठा प्रभाव पडला. परंतु, ही केवळ त्यांच्या अद्वितीय कारकिर्दीची सुरुवात होती.
इंग्रज सुरुवातीला जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश हा फक्त भारतासोबत व्यापारी संबंध प्रस्थापित करणे हा होता. परंतु कालांतराने इंग्रजांची साम्राज्यवादी मनशा जागृत झाली व आपण या भूप्रदेशावर सहजरित्या राज्य करू शकतो, असे त्यांचा लक्षात आले.
१७४६ साली इंग्रज कमांडर रॉबर्ट क्लाइव्ह भारतात आला. १७६७ साली त्याने ‘मेजर जेम्स रीनेल’ या अधिकाऱ्यावर भारताचा नकाशा तयार करण्याची जबाबदारी सोपवली. त्याच्या नियुक्तीनंतर ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे कार्यालय डेहराडून येथे होते. ५ वर्षे सर्वेक्षण करून १७७३ मध्ये भारतासंबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्र तयार करण्यात आली आणि सन १७८३ मध्ये मोठे मानचित्र तयार करून इंग्लंडला रवाना करण्यात आले.
१७६७ साली वेगवेगळ्या प्रांतासाठी वेगवेगळ्या सर्व्हेअर जनरल्सची नियुक्ती करण्यात आली होती. पुढे सर्व प्रांतांच्या सर्व्हेअर जनरल्सचा प्रमुख म्हणून ‘सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया’ या पदाची निर्मिती करण्यात आली. कॉलिन मॅकेंजी हे भारताचे पहिले सर्व्हेअर जनरल होते. सर्व्हे ऑफ इंडियाच्या कार्यालयात हे पद भूषविणाऱ्या व्यक्तीला ४० रुपये प्रतिमहा इतका पगार दिला जात होता. कॉलिन मॅकेंजीनंतर अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सर्व्हेअर जनरल हे पद भूषविले.
१८३० साली या पदावर ‘जॉर्ज एव्हरेस्ट’ या ब्रिटिश अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.
जॉर्ज एव्हरेस्ट हा गणित व भूमितीचा मोठा जाणकार होता. डेहराडूनमध्ये आपल्या कार्यालयात त्याला एका अशा व्यक्तीची गरज होती ज्याला स्फेरीकल ट्रीग्नोमेट्री विषयात प्राविण्य असेल. या व्यक्तीच्या शोधात त्यांनी कलकत्त्याच्या हिंदू स्कुलचे प्राध्यापक जॉन टाईटलर यांच्याशी संपर्क केला.
जॉन टाईटलर यांनी क्षणाचाही विलंब न करता राधानाथ सिकदर यांचे नाव सुचवले आणि राधानाथ सिकदर यांना वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी १९ डिसेंबर १८३१ साली ‘सर्व्हे ऑफ इंडिया’मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली.
त्यांची ‘कॉम्प्युटर’ या पदावर नियुक्ती करण्यात आली. होय! आज जे कामएक मशीन करते ते काम एकेकाळी मनुष्याला करावे लागत होते.
‘सर्व्हे ऑफ इंडिया’मध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले. दरम्यान काळात जॉर्ज एव्हरेस्ट निवृत्त झाल्यावर त्याजागी ‘अँड्र्यू स्कॉट वो’ची नियुक्ती करण्यात आली.
अँड्र्यू स्कॉटची देखील राधानाथ यांच्यासोबत चांगलीच गट्टी जमली. सन १८४९ साली त्यांनी राधानाथ यांना पदोन्नती देऊन ‘चीफ कॉम्प्युटर’ पदावर नियुक्त केले.
राधानाथ सिकदर यांच्या कर्तृत्वावर अँड्र्यू स्कॉटचा फार विश्वास होता. त्यानी त्यांच्यावर ‘पीक xv’ या उंच पर्वताची मोजणी करण्याची जबाबदारी सोपवली. या ‘पीक xv’बद्दल इंग्रजांच्या अनेक धारणा होत्या. त्यांच्यामते कांचनगंगापेक्षा ‘पीक xv’ खूप उंच आहे, त्याचे मोजमाप करण्याचे दायित्व अँड्र्यू स्कॉट यांनी राधानाथ सिकदर यांच्यावर सोपवले.
त्याकाळी थियोडोलाईटच्या मदतीने सहजपणे पर्वताची उंची मोजली जात होती. ‘पीक xv’ची उंची मोजण्यासाठी याचाच वापर करण्याचा निश्चय राधानाथ सिकदर यांनी केला. थियोडोलाईटची मशीन तब्बल ४५० किलो वजनाची होती. या मशीनला उचलण्यासाठीच डझनभर लोकांचे मनुष्यबळ लागत होते.
वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी राधानाथ सिकदर यांनी पीक x पासून ८०० किमी अंतरावरून त्याची मोजणी केली. यासाठी वेगवेगळ्या परिमाणांचा आसरा घेतला. बऱ्याच दिवसांच्या मेहनतीनंतर आणि सन १८५२ मध्ये ते या निष्कर्षावर येऊन पोहचले की या शिखराची उंची २९,००२ फूट इतकी आहे. आत्तापर्यंतचं सर्वोच्च शिखर आहे.
राधानाथ सिकदर यांनी आपल्या संशोधनाची माहिती अँड्र्यू स्कॉटला दिली. परंतु, स्कॉटने त्यांचे संशोधन लगेच प्रसिध्द करण्याऐवजी दोन-तीन वेळा पुन्हा चाचणी करून बघितली. प्रत्येक वेळी राधानाथ सिकदर यांचा निष्कर्ष योग्य सिद्ध झाला. अखेरीस १८५६ साली त्या पीक xv ला सर्वोच्च शिखर म्हणून मान्यता मिळाली.
परंतु ही गोष्ट इथेच संपत नाही.
‘पीक xv’ची उंची मोजण्यात आली पण तिचे नामकरण काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तेव्हा स्कॉटनी त्याचे गुरू जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला देण्याचे निश्चित केले.
अशाप्रकारे हे ‘पीक xv’ जगातील सर्वोच्च शिखर भविष्यात ‘माउंट एव्हरेस्ट’ म्हणून प्रसिध्द झाले. पण त्याची उंची मोजणाऱ्या राधानाथ सिकदर यांचे कर्तुत्व समोर आलेच नाही.
पुढे १८६२ साली राधानाथ सिकदर ब्रिटिश सेवेतून निवृत्त झाले व डेहराडून सोडून बंगालला आपल्या मूळ प्रांतात परतले. याच ठिकाणी त्यांचा १७ मे १८७० रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
आज बहुतांश भारतीय लोकांना माउंट एव्हरेस्ट व त्याची उंची ही माहिती आहे, पण ते मोजणाऱ्या या भारतीय विद्वान राधानाथ सिकदर यांची माहिती नाही, हेच आपले दुर्दैव म्हणावे लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









