आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सध्या भारतासोबतच जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतात एकाच दिवसात २२,७०० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत ४८५ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. भारताने कोरोना बाधितांच्या संख्येत रशियाला मागे टाकले आहे. सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आणि ब्राझील यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा नंबर लागतो.
भारतात एकूण ७ लाख ४२ हजार लोक कोरोना बाधित आहेत. यापैकी ४ लाख ६८ हजार लोक बरे झाले आहेत, तर २० हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारताची सध्या कोरोनामुळे एकीकडे दैना उडालेली असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूवर लस तयार करण्याचे काम प्रगती पथावर सुरु आहे. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (ICMR) आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त संशोधनातून कोरोना विषाणूवर दोन लसी तयार करण्यात आल्या आहेत.
कोवॅक्सीन आणि zyCov-D असे या दोन लसींचे नावे असून आता या लसींचे मानवी परीक्षण केले जाणार आहे.
या लसींच्या मानवी परीक्षणासाठी ड्रग कंन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि सेंट्रल ड्रग कन्ट्रोल ऑर्गनायजेशन यांनी परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या लसींच्या मानवी परीक्षणासाठी भारत बायोटेककडून एका सुदृढ व्यक्तीचा शोध घेतला जात होता. पण, आता त्यांचा हा शोध संपला आहे. कारण, एका युवकाने मानवी परीक्षणासाठी आपला देहदान करण्याची तयारी दर्शवली आहे.
चिरंजित धीबर असे या ३० वर्षीय युवकाचे नाव असून तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे.
चिरंजित धीबर हे पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्याचे रहिवासी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून रा. स्व. संघात कार्यरत आहेत. मानवी परीक्षणासाठी एप्रिल महिन्यातच चिरंजित धीबर यांनी अर्ज दाखल केला होता, ज्यानुसार ICMRच्या अपेक्स कमिटीकडून त्यांचाशी संपर्क करण्यात आलेला आहे.
अपेक्स कमिटीच्या मागणीनुसार चिरंजित यांनी सर्व अत्यावश्यक आरोग्यसंबंधी कागदपत्रे कमिटीला पाठवली आहेत. भारत बायोटेकप्रमाणेच १२ अजून कंपन्या आपल्या लसीचे मानवी परीक्षण करणार आहेत. यांपैकी भारत बायोटेकचा लसीकरणासाठी चिरंजित यांची निवड करण्यात आली आहे.
चिरंजित यांच्यावर ६ वेळा लसीचा प्रयोग केल्यानंतरच लसीची यशस्विता स्पष्ट होणार आहे.
चिरंजित या लसीची चाचणी करवून घेण्यासाठी खूप उत्स्फूर्तपणे तयार झाले आहेत. याची प्रेरणा संघ संस्कारातूनच मिळाली असल्याची भावना चिरंजितने व्यक्त केली आहे.
चिरंजित एका शाळेत शिक्षक आहेत. शिक्षकी पेशामुळे देखील या प्रयोगासाठी तो मानसिकदृष्ट्या परिपक्व होऊ शकला असे ते म्हणतात. शाळेत एकाच वेळी जवळपास १०० विद्यार्थ्यांना ते शिकवतात. हे विद्यार्थी आपले अनुसरण करत असतात त्यामुळे त्यांना एक चांगली परोपकाराची शिकवण देण्याचा व आपल्या कृतीतून आदर्श घालून देण्याचा प्रयत्न ते करतायत.
सीमेवर जाऊन देशासाठी प्राण अर्पण करता आले नाहीत पण या माध्यमातून का होईना देशासाठी आपल्याला देशासाठी काहीतरी करायला मिळतं आहे, याचा चिरंजितना प्रचंड आनंद आहे.
सुरुवातीच्या काळात चिरंजितच्या आई वडिलांचा ते स्वतःचे प्राण संकटात घालतायत म्हणून त्यांच्या मानवी परीक्षणासाठीच्या निर्णयाला विरोध दर्शवला. परंतु कालांतराने तो विरोध मावळला. आता त्यांचे आईवडील देखील त्यांच्या या साहसाचे समर्थन व कौतुक करत आहेत.
चिरंजितने लसीचा प्रयोगासाठी आपले शरीर दान करत असल्याची बातमी जेव्हा फेसबुकच्या माध्यमातून जाहीर केली आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. ते ज्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे, त्या शाळेच्या संचालकांनी देखील त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले असून ते निश्चितपणे निरोगी परत येतील अशी खात्री व्यक्त केली आहे.
चिरंजित हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. देशभरात राष्ट्रहितार्थ संघाकडून केल्या जाणाऱ्या अनेक सेवाकार्यांत त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. संघाचा स्वयंसेवक असल्याने “राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम” हे संस्कार त्यांच्यात सुरुवातीपासूनच रुजले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरातील स्वयंसेवकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे सहाय्य्क म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मास स्क्रीनिंग ऑपरेशन्समध्ये रा. स्व. संघाचे अनेक स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना दिसतायत.
याआधी देखील प्लाज्मा दान करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील संघाचे अनेक स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने पुढे आले होते. स्थलांतरित मजुरांसाठी संघाकडून मोठे सेवाकार्य हाती घेण्यात आले होते. आता चिरंजितच्या या निस्पृह कृत्याने संघाच्या निरपेक्ष सेवाकार्याचे समाज माध्यमांवर विशेष कौतुक होत आहे.
आज भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावाने आणि परिणामी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांचे आयुष्य अवघड बनले आहे. अशावेळी चिरंजितसारख्या लोकांच्या कार्यामुळे सर्वत्र थोडे आशादायी चित्र निर्माण होत आहे. येणाऱ्या काळातही चिरंजितसारख्या असंख्य निस्वार्थ कोरोना योध्यांचं कार्य अनेकांना प्रेरणा देत राहणारं आहे. त्यांच्यामुळेच लवकरच भारत आणि संपूर्ण जग कोरोनाच्या भस्मासुराचा अंत करून पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल यात शंकाच नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.