आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगातील काही प्राचीन संस्कृतींपैकी भारतीय संस्कृती एक आहे. कच्छपासून ते कोहीमापर्यंत आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत विविधतेने नटलेला भारत म्हणजे अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. अनेक प्रकारचे उत्सव येथे साजरे केले जातात. भारतात सुरु झालेले काही उत्सव आशियाच्या अन्य देशांतही साजरे केले जातात. ज्याप्रमाणे रामायणासारखं काव्य आशिया खंडात अनेक ठिकाणी त्या त्या प्रदेशानुसार वर्णित केलं जातं, त्याचप्रमाणे काही परंपरांनाही देशांतील सीमांमुळे अटकाव होऊ शकत नाही.
भारताच्या प्रत्येक राज्याचं अनोखं सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. त्यांपैकी तामिळनाडू अतिशय वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि चालीरितींच राज्य आहे. मंदिरांच्या भल्यामोठ्या यादीपासून ते येथे साजरा होणाऱ्या अनोख्या सणांपर्यंत राज्याचे अनेक पैलू अनुभवण्यासारखे आहेत. थिमिठी हा राज्याच्या दुर्मिळ संस्कृतीचा एक भाग आहे.
अग्नीची पूजा होत असलेले अनेक सण भारतात साजरे होतात. होळी, दीप-अमावस्या, दीपावली हे सगळे सण पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या अग्नीला समर्पित असून अग्निदेवतेला वंदन करण्याचे निमित्त ते घेऊन येतात. अग्नीशी विनाकारण खेळ करू नये हे आपल्याला लहानपणापासूनच या सणांच्या माध्यमातून सांगण्यात येतं. पण अग्नीशी खेळच नव्हे तर अग्नीवर चालायला लागणाऱ्या सणाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? विचित्र अन् भीतीदायक असलेला हा सण भारताच्या तामिळनाडू राज्यात दिवाळीच्या आधी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणामागील भावना आणि हा सण कसा साजरा केला जातो, थोडक्यात जाणून घेण्यासाठी हा प्रपंच.
थिमिठी हा तामिळनाडूचा वार्षिक उत्सव आहे. या सणाची पाळंमुळं महाकाव्य महाभारतापर्यंत असल्याचे दिसून येते. महाभारतात कपटी कौरवांबरोबर झालेल्या जुगाराच्या खेळात पांडव आपलं राज्य, संपत्ती आणि इतकंच काय तर त्यांची पत्नीही गमावतात, यानंतरची द्रौपदी वस्रहरणाच्या वेळी श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावले आणि अपमानित झालेल्या ‘महाराणी’ द्रौपदीने दुःशासनाच्याच रक्ताने वेणी बांधेल अशी शपथ घेतली. महाभारत युद्धानंतर द्रौपदीला अग्निपरीक्षा द्यावी लागली असेही सांगितले जाते, आणि त्याच स्मृतिप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केल्याचे सांगितले जाते.
स्वतः श्रीकृष्णाने बहीण मानलेल्या द्रौपदीला तामिळ लोक ‘द्रौपदी-अम्मान’ म्हणतात. तामिळ समाजाद्वारे या द्रौपदीची पूजा केली जाते आणि द्रौपदीला आईचा दर्जा दिला जातो. येथील अनेक लोक द्रौपदीला आपली ग्रामदेवता मानतात आणि ग्रामदेवतेचे सर्व सण आणि संबंधित विधी काटेकोरपणे पाळतात. तामिळनाडूमधील अशा गावांपैकी एक गाव म्हणजे नागपट्टीनम जिल्ह्यातील कोंडल गाव. या ठिकाणी द्रौपदी ग्रामदेवता आणि कुलदेवता म्हणून पुजली जाते. याच ठिकाणी थिमिठी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
ऑक्टोबर-नोव्हेम्बर मध्ये पार पाडल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष कार्यक्रमाची तयारी काही महिने आधीपासूनच सुरु होते. या कार्यक्रमात सहभागी होणारे लोक शुद्ध शाकाहारी असतात, शिवाय स्वतःच्या शुद्धीकरणासाठी ते अनेक प्रकारचे उपवासही करतात. अंतःकरण शुद्धीसाठी ते भव्य प्रार्थना सभांमध्ये सहभागी होतात. जे भक्त द्रौपदीसारखेच शुद्ध आणि पवित्र आहेत फक्त तेच कोणत्याही दुखापतीशिवाय हे ‘अग्नी’दिव्य पार पाडू शकतात.
कोंडल गावाव्यतिरिक्त द्रौपदीची मंदिरे तामिळनाडू आणि कर्नाटकातही आहेत. विशेषतः द्रौपदीचे अनेक भक्तगण श्रीलंका, सिंगापुर, मलेशिया, मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमध्येही थिमिठी सण साजरा करतात. या देशांमध्ये भारतीय लोकसंख्येपैकी बहुतांश लोकसंख्या तामिळ आहे.
दिवाळीच्या एक आठवडा आधी अर्जुन आणि हनुमंताचे चित्र असलेला ध्वज फडकावून उत्सवाची सुरुवात झाल्याचं दर्शवलं जातं. त्यादिवसापासून महाभारताचे पारायण सुरु होते आणि थिमिठीच्या नंतरच्या दोन दिवसांपर्यंत हे पारायण चालू राहते. महाभारताचा शेवटचा अध्याय शेवटच्या दिवशी वाचला जातो आणि हा सण संपतो. काही ठिकाणी महाभारतातील काही घटनांचं नाट्य-रूपांतर केलं जातं. द्रौपदी स्वयंवर आणि किचक-वध अशा घटनाही यावेळी नाट्यमय रूपात दाखवल्या जातात.
१८ दिवसांच्या लढाईत झालेला पांडवांचा विजय दर्शवण्यासाठी थिमिठीच्या कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस चांदीच्या रथाची भव्य मिरवणूक निघते. थिमिठीच्या एक रात्री आधीच अग्निवर चालण्यासाठीचा खड्डा तयार केला जातो. त्याची लांबी सुमारे अडीच मीटर असते. शेवटी एक छोटा खड्डा देखील तयार केला जातो. त्यात गायीचे दूध असते. थिमिठीच्या दिवशी विधी पहाटे ४ वाजता सुरू होतो आणि ११च्या आधी संपतो. आरंभीच्या पूजेनंतर, थिमिठीमध्ये भाग घेणारे सर्व भक्त मनगटावर पिवळा धागा किंवा कडुलिंबाचा पाला बांधतात. मंदिराचे मुख्य पुजाऱ्यांना अग्नीवर चालण्याचा पहिला मान दिला जातो. डोक्यावर करकम घेऊन ते आगीवर चालतात. करकम म्हणजे दुधाचे पात्र.
पुजाऱ्यानंतर अन्य इच्छुक सहभागी अग्नीवर चालतात आणि अंतिमतः अग्नीच्या खड्ड्याच्या अंतिम टोकावर ठेवलेल्या पात्रातील दुधात पाय थंड करतात. सर्वांचे चालणे झाल्यानंतर या दुधाने आणि पाण्याने ती आग विझवली जाते. हा उत्सव थिमिठीच्या दोन दिवसांनी संपतो ,तेव्हा महाभारताचा अंतिम अध्याय वाचला जातो आणि पहिल्या दिवशी फडकवलेला ध्वज उतरवला जातो.
थिमिठी उत्सव द्रौपदीच्या सन्मानार्थ साजरा होत असणारा भारतातील एकमेव उत्सव असावा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.