आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजच्या श्रीमंत लोकांकडे बघितले तर आपल्याला विश्वास देखील बसणार नाही की भारतात जमनालाल बजाज यांच्यासारखे श्रीमंत उद्योगपती होऊन गेले, जे एखाद्या साधूचे आयुष्य जगले.. श्रीमंत लोकांबद्दल समाजातील इतर लोकांच्या काही धारणा असतात आणि ते समज खोडून काढणे त्यांना कठीण असते.
प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांची ओळख आज सर्वसामान्य लोकांमध्ये एक यशस्वी उद्योगपती अशीच आहे. पण ते एक प्रखर स्वातंत्र्यसेनानीसुद्धा होते हे फार कमी जणांना ठाऊक आहे. जमनालाल बजाज हे त्याग आणि ट्रस्टीशिप यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या याच देशभक्तीमुळे विनोबा भावे त्यांना कुटुंबाचा भाग मानत असत आणि महात्मा गांधी तर त्यांना त्यांचा पाचवा पुत्रच मानत असत.
जमनालाल बजाज यांचा जन्म ४ नोव्हेम्बर १८८४ साली जयपूरमध्ये एका गरीब मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण जेमतेम चौथ्या वर्गापर्यंत झाले होते. त्यांना तेव्हा इंग्रजी भाषा येत नव्हती.
वर्ध्यातील एका निःसंतान जोडप्याने हुशारीने जमनालाल यांच्या आईकडून वचन घेतले व आणि एका अत्यंत श्रीमंत कुटुंबाने जमनालाल यांना दत्तक घेतले. पण लहानपणापासून जमनालाल यांना संपत्तीचे अजिबात आकर्षण नव्हते.
याउलट त्यांचा वैराग्याकडेच कल होता. एकदा त्यांच्या पूर्ण कुटुंबाला एका ठिकाणी विवाह सोहळ्यास जायचे होते. तेव्हा त्यांचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या संपत्तीचे प्रदर्शन आणि दिखावा करू इच्छित होते. त्यांनी जमनालाल यांना सांगितले की त्यांनीसुद्धा हिऱ्या -मोत्यांचा एक हार घालावा. पण तेव्हा जमनालाल यांनी तो हार घालण्यास स्पष्ट नकार दिला.
तेव्हा त्यांच्या पित्याचा अहंकार दुखावला व त्या दोघांत वाद झाला. तेव्हा जमनालाल त्यांचे घर सोडून निघून गेले. त्यावेळी ते केवळ १७ वर्षांचे होते.
घर सोडल्यावर जमनालाल यांनी एका स्टॅम्प पेपरवर एक मजकूर लिहून त्यांच्या वडिलांना पाठवला. तो मजकूर असा होता की ,”मला तुमच्या संपत्तीमध्ये काहीही रस नाही. मला तुमच्या संपत्तीचा काडीमात्र लोभ नाही. मी धनाची पर्वा करीत नाही. त्यामुळे मी घरातून काहीही नेत नाहीये. केवळ नेसत्या वस्त्रांनिशी मी घर सोडतो आहे. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या जाण्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नये आणि कायम प्रसन्न राहावे. सामाजिक संबंध हे पोकळ असतात. सांसारिक सुख-सुविधा आपल्याला त्यांच्या घातक तावडीत पकडून ठेवतात. मला या जंजाळातून मुक्त केल्याबद्दल मी आपले शतश: आभार मानतो. माझी काळजी करू नये. आपण निश्चिन्त राहावे. मी आयुष्यात कधीही तुमच्याकडून एक पैसा देखील मिळवण्यासाठी कुठल्याही कोर्टात जाणार नाही. म्हणूनच हे कायदेशीर कागदपत्र तुम्हाला पाठवत आहे. तुम्ही तुमच्या संपत्तीचा उपयोग दानधर्म करण्यासाठी करावा. हे दान सुद्धा स्वखुशीने कुठल्याही स्वार्थासाठी किंवा दिखाव्यासाठी न करता काही सेवाकार्यासाठी करावे.अशी मी तुम्हाला विनंती करतो.”
त्यानंतर कसेबसे जमनालाल ह्यांना शोधून काढण्यात आले आणि त्यांना घरी परत येण्यासाठी विनंती केली गेली.
वडिलांच्या मृत्यूनंतरसुद्धा जमनालाल हे विसरले नाही की ज्या संपत्तीचा त्यांनी एकदा परित्याग केला आहे त्या संपत्तीचा मालक म्हणवून घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.
त्यांनी वारसाहक्क म्हणून मिळालेली संपत्ती दान करून टाकली. असे त्यांनी त्यांच्या आयुष्यात असंख्य वेळा केले. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ते स्वतःला एखाद्या ट्रस्टचे मालक न समजता ट्रस्टी समजून त्या पैश्याचा समाजकार्यासाठी सदुपयोग करीत राहिले. त्या काळी प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार जमनालाल यांचा विवाह १३ व्या वर्षी नऊ वर्षांच्या जानकीशी झाला. तारुण्यात असतानाच जमनालाल यांचा अध्यात्माकडे कल तयार झाल्याने ते एखाद्या सच्च्या कर्मयोग्याप्रमाणे आपल्या गुरूच्या शोधात होते.
मग त्यांची आणि मदन मोहन मालवीय यांची भेट झाली. त्यानंतर ते काही काळ रवींद्रनाथ टागोरांच्या सान्निध्यात देखील राहिले. गुरूच्या शोधार्थ ते अनेक साधू आणि धर्मगुरूंना देखील भेटले.
१९०६ साली लोकमान्य टिळकांनी केसरीचे मराठी संस्करण नागपूरला सुरु करण्याची जाहिरात दिली. तेव्हा तरुण असलेल्या जमनालाल यांनी प्रति दिवस एक रुपया अशा मिळणाऱ्या पॉकेटमनी मधून जमवलेले १०० रुपये लोकमान्य टिळकांकडे दिले.
ते म्हणतात की देशसेवेसाठी दिलेल्या त्या १०० रुपयांमुळे त्यांना जितके समाधान लाभले ते समाधान नंतर लाखो रुपयांचे दान करूनसुद्धा मिळाले नाही.
या दरम्यान जमनालाल बजाज महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सुरु केलेल्या सत्याग्रह चळवळीविषयी वाचत असत. ते वाचून जमनालाल प्रभावीत झाले. १९१५ साली महात्मा गांधी भारतात परत आले आणि त्यांनी साबरमतीमध्ये त्यांचा आश्रम स्थापन केला. तेव्हा जमनालाल बजाज अनेकदा तिथे जाऊन तिथे काही दिवस राहून गांधीजींची कार्यप्रणाली, त्यांचे विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न करीत असत.
गांधीजींकडे बघून त्यांना संतांचे वचन आठवत असे की “ज्या व्यक्तीची उक्ती आणि कृती सारखी असेल त्याच व्यक्तीपुढे गुरु म्हणून आपले मस्तक झुकवा.” गांधीजींमध्ये जमनालाल ह्यांना त्यांचा गुरु सापडला.
त्यानंतर त्यांनी गांधीजींना आपला गुरु मानून त्यांना आपले सर्वस्व समर्पित केले. त्यांनी त्यांची पत्नी जानकी व मुलांना देखील आश्रमातच राहण्यास बोलावले.
१९२६ साली जमनालाल बजाज यांनी व्यवसाय सुरु केला, ज्याचे पुढे जाऊन बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नावाच्या वटवृक्षात रूपांतर झाले.
जमनालाल यांनी गांधीजींना वर्ध्यात आश्रम सुरु करण्याची अनेकदा विनंती केली. गांधीजींनी १९२१ साली विनोबांना वर्धेत पाठवून सत्याग्रह आश्रम सुरु करण्याची आज्ञा केली.
तेव्हा विनोबा वर्ध्याला आले व तिथे पूर्ण बजाज कुटुंबाचे कुलगुरू म्हणून त्यांनी वर्ध्याला सत्याग्रह आश्रमाची जबाबदारी सांभाळली.
जमनालाल बजाज व आचार्य विनोबा भावे यांचे एकमेकांशी खूप निकटचे संबंध होते. १९२० साली नागपूर काँग्रेसचे अधिवेशन होते. त्यावेळी जमनालाल बजाज हे रायबहादूर ऑनररी मॅजिस्ट्रेट होते. या अधिवेशनात महात्मा गांधींच्या असहकार चळवळीवर विशेष चर्चा झाली. अधिवेशनात हा प्रस्ताव पास झाला.
त्यानंतर जमनालाल बजाज यांनी रायबहादुरी आणि ऑनररी मॅजिस्ट्रेट पद सोडून देण्याची घोषणा केली आणि त्याच वेळी ते महात्मा गांधींना म्हणाले की, “बापू, तुम्हाला चार पुत्र आहेत. तरीही तुमचा पाचवा पुत्र म्हणून माझा स्वीकार करा.” सुरुवातीला तर गांधीजींना हे कल्पना थोडी आश्चर्यकारक वाटली. पण नंतर त्यांनी हळूहळू स्वीकृती दिली.
१६ मार्च १९२२ रोजी गांधीजींनी बजाज यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी असे लिहिले की , ” तुम्ही माझे पाचवे पुत्र तर झालात पण मी योग्य पिता होण्याचा प्रयत्न करीत आहे. दत्तक घेणाऱ्यांचे दायित्व काही सहज सोपे नाही. ईश्वराने हे दायित्व पूर्ण करण्याची मला शक्ती द्यावी आणि याच जन्मात मी योग्य होऊ शकेन अशाप्रकारे माझी मदत करावी.”
असा गांधीजींनी त्यांचा पाचवा पुत्र म्हणून स्वीकार केला. जमनालाल यांनी ह्यांनी गांधीजींसह संपूर्ण भारताचा दौरा केला व सत्याग्रह आणि दांडी यात्रा यांसारख्या अनेक आंदोलनांत भाग घेतला.
याच मुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला. गरिबांना मदत करण्यात त्यांना आत्मिक समाधान लाभत असे. ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ हा मंत्र ते सदैव आचरणात आणत असत आणि त्यांनी आयुष्यभर त्यांची संपूर्ण संपत्ती समाजकार्यासाठी दान केली.
समाजात असलेल्या अस्पृश्यता व भेदभावासारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. हरिजनांना देवळात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी वर्धेत एक देऊळ देखील बांधले.
त्यांच्या घरातील आंगण, शेत आणि बगिच्यातील विहिरी त्यांनी दलितांसाठी खुल्या केल्या. त्यांनी देशभरात खादीचा आणि हिंदी भाषेचा प्रचार केला. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचे ते संस्थापक होते.
त्यांना कुठल्याही प्रकारच्या सत्तेची ,पदाची कधीच लालसा नव्हती. १९३७-३८ साली जेव्हा हरिपुरा येथे काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव पुढे आले तेव्हा त्यांनी विरोध केला व युरोपमधून परत आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्ष करण्याची विनंती केली. असहकार चळवळी दरम्यान जेव्हा विदेशी वस्त्रांचा बहिष्कार सुरु झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातील सगळी किमती विदेशी वस्त्रे एका बैलगाडीत लादून शहराच्या मध्यावर त्यांची होळी केली.
जानकीदेवी बजाज यांनी देखील त्यांची सोने आणि चांदीच्या तारांनी विणलेल्या त्यांच्या वस्त्रांची होळी करून आजन्म खादी वापरण्याचे व्रत घेतले.
‘जोडोनियां धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेच करी।।’ संत तुकारामाचे हे पद आयुष्यात आचरणात आणणाऱ्या जमनालाल बजाज यांचे ११ फेब्रुवारी १९४२ रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी वर्ध्यातच अकस्मात निधन झाले.
त्यांच्या माघारी त्यांची पत्नी जानकीदेवी व अपत्ये कमलाबाई, कमलनयन, उमा रामकृष्ण व मदालसा ही होती. त्यांच्या मृत्यूनंतर जानकीदेवी यांनी त्यांचे आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले.
इतका मोठा श्रीमंत उद्योगपती एखाद्या साधू संतांप्रमाणे निर्मोही आयुष्य जगला आणि त्याने देशासाठी अमूल्य योगदान दिले. जमनालाल बजाज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.