The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वामी विवेकानंदांनी असा घेतला जगाचा निरोप

by श्रीपाद कोठे
3 July 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


इ.स. १९०० च्या नोव्हेंबर महिन्यात स्वामी विवेकानंद इजिप्तची राजधानी कैरो येथे होते. त्यांच्यासोबत त्यांची विदेशी शिष्या जोसेफाइन मॅक्लिऑड तसेच प्रसिद्ध गायिका मॅडम काल्व्हे या होत्या. एक दिवस स्वामीजी उदास असल्याचे जोसेफाइनच्या लक्षात आले. मॅडम काल्व्हे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या आल्यावर जोसेफाइन यांनी त्यांना आपले निरीक्षण सांगितले. त्या दोघींनी स्वामीजींना विचारले तेव्हा ते म्हणाले, `मला भारतात गुरुबंधुंच्या सहवासात जावयाचे आहे. भारतात जाऊन मला या जगाचा निरोप घ्यावयाचा आहे. त्यासाठी गुरुबंधुंकडे जावयाचे आहे.’ त्यावर मॅडम काल्व्हे म्हणाल्या, `स्वामीजी तुम्ही असे करू नये. आम्हाला तुम्ही हवे आहात.’

त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले, `चार जुलै या दिवशी माझं जीवन समाप्त होईल.’

इजिप्तची राजधानी कैरो येथून स्वामीजी सरळ कोलकात्याच्या बेलूर मठात परतले. त्यानंतरचा बहुतांश काळ ते तेथेच होते. अखेरच्या दिवसांत देखील त्यांचा निवास बेलूर मठातच होता. शेवटच्या चार-पाच महिन्यांत वेळ घालवण्यासाठी त्यांनी आपल्या खोलीत एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे २० खंड आणून ठेवले होते.

एक दिवस त्यांचे शिष्य शरच्चंद्र चक्रवर्ती त्यांना म्हणाले, हे सगळे खंड वाचण्यासाठी एक आयुष्यदेखील पुरणार नाही. त्यावर स्वामीजी म्हणाले, अरे काय म्हणतोस तू हे? माझे तर १० खंड वाचूनसुद्धा झालेत अन् त्यांनी शिष्याला त्यावर प्रश्न विचारावयास लावले आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.

२८ जून १९०२ रोजी स्वामीजींनी स्वामी शुद्धानंद यांना पंचांग घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतरचे काही दिवस ते रोज पंचांग पाहत असल्याचे दिसत असे. बुधवार २ जुलै १९०२ रोजी एकादशी होती. स्वामीजींनी त्या दिवशी शास्त्रशुद्ध उपवास केला. भगिनी निवेदिता त्याच दिवशी त्यांना भेटायला मठात आल्या. दोघांमध्ये विविध विषयांवर बोलणं झालं. मग विवेकानंदांनी त्यांना खाऊपिऊ घातले. सगळे पदार्थ स्वहस्ते त्यांना दिले. निवेदितांचे खाणे आटोपल्यावर स्वामीजींनी स्वत: त्यांच्या हातावर पाणी घातले आणि त्यांचे हात पुसून दिले.



निवेदितांना अवघडल्यासारखे झाले. त्या म्हणाल्या, “स्वामीजी खरे तर हे सारे मी आपणासाठी करायला हवे.” त्यावर स्वामीजी उद्गारले, ‘का? जिझसने तर आपल्या शिष्यांच्या पायावर पाणी घातलं होतं.’ निवेदितांच्या मनात आलं- “पण ती त्यांच्या आयुष्यातील अखेरची वेळ होती.” मनातील ही भावना रुद्ध कंठामुळे मुखातून मात्र बाहेर पडली नाही.

या घटनेच्या तीन दिवस आधी स्वामीजींशी कामाच्या संबंधात प्रदीर्घ चर्चा करून परतताना निवेदिता म्हणाल्या होत्या- ‘माझं एखादं म्हणणं मान्य नसेल तर तसं सांगा, पण आपलं मन माझ्यापासून दूर जाऊ देऊ नका.’ अन् २ जुलै रोजीच्या भेटीत त्यांनी निवेदितांच्या मनावरील मळभ दूर करून टाकले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

शुक्रवार ४ जुलै १९०२. स्वामी विवेकानंदांचा पृथ्वीतलावरील अखेरचा दिवस. स्वामीजी त्या दिवशी नेहमीपेक्षा थोडे लवकर उठले. चहा घेऊन ते पूजाघरात ध्यानासाठी गेले. कधी नव्हे ते खिडक्या, दारे बंद करून त्यांनी जवळपास तीन तास ध्यान केले. तीन तासांनंतर कालीमातेवरील एक भजन आपल्या मधुर आवाजात गुणगुणत ते बाहेर आले.

सगळ्यांसह भरपूर नाश्ता केला. त्यानंतर मठापुढील मोकळ्या जागेत ते फेऱ्या घालू लागले. त्यावेळी स्वगत बोलल्यासारखे ते म्हणाले- ‘आज दुसरा विवेकानंद असता तर तोच समजू शकला असता की या विवेकानंदाने या जगासाठी काय केले.’ काही क्षण गेल्यावर ते पुढे म्हणाले, ‘अशी वेळ येईल जेव्हा असे कैक विवेकानंद जन्माला येतील.’ त्यांच्यासोबत फिरत असलेले स्वामी प्रेमानंद यांनी त्यांचे हे स्वगत नोंदवून ठेवले. आपल्या असामान्य कर्तृत्वाचं भान आणि नम्रतेची भावना असे दोन्ही त्यांच्या या उद्गारात प्रकट झाले आहेत.

काही वेळाने त्यांनी शुद्धानंदांना शुक्ल यजुर्वेदाची पोथी आणायला सांगितले. पोथी आणल्यावर त्यातील सुषुम्नेचा उल्लेख असलेला मंत्र आणि त्यावरील टीका त्यांनी वाचून घेतली आणि शुद्धानंदांना म्हणाले, ‘टीकाकारांचे मत काहीही असो. तंत्रमार्गात सुषुम्ना नाडीचा जो अर्थ आणि तिचे जे महत्त्व सांगितले आहे, त्याचं बीज या वैदिक मंत्रात आहे असं माझं मत आहे. तुम्ही याचा शोध घ्या आणि काही नवीन प्रकाश टाकता आला तर पाहा.’

त्यानंतर दुपारचे जेवण झाल्यावर त्यांनी मठातील ब्रम्हचाऱ्यांचा व्याकरणावरील वर्ग घेतला. सुमारे तीन तास त्यांनी ब्रम्हचाऱ्यांना लघुकौमुदी शिकवली. संध्याकाळ टळल्यावर स्वामी प्रेमानंदांना सोबत घेऊन ते बेलूर बाजारापर्यंत फिरून आले. परतल्यावर मठातील सगळ्यांशी बोलून ते आपल्या खोलीत गेले.

खोलीत गेल्यावर त्यांनी एक जपमाळ मागवली. शिष्याला दाराशी थांबायला सांगून तासभर ते जपमाळ ओढत ध्यानस्थ बसून होते. नंतर बिछान्यावर आडवे झाले. उकडत असल्याने शिष्याला खिडक्या उघडायला सांगितल्या आणि आपले तळपाय चोळायला सांगितले. शिष्य तळपाय चोळत होता. विवेकानंदांच्या हातात जपमाळ तशीच होती. एक-दोनदा त्यांनी कूस बदलली. थोडा वेळ तसाच गेला.

स्वामीजींनी एक दीर्घ श्वास घेतला. सुमारे मिनिटभराने पुन्हा तसाच एक दीर्घ श्वास घेतला. त्यानंतर काहीच हालचाल नाही.

शिष्य घाबरतच खाली आला. विवेकानंदांना काहीतरी झाले असे त्याने सांगितले. प्रेमानंद आणि निश्चयानंद लगेच वर गेले. त्यांनी श्रीरामकृष्णांचे नाव घेण्यास प्रारंभ केला. समाधी लागली असल्यास उतरेल असा त्यांचा अंदाज. थोड्या वेळाने नाडी पाहिली तर ती लागत नव्हती. तेव्हा स्वामी अद्वैतानंदांनी निर्भयानंदांना डॉ. महेंद्रनाथ मुजुमदार यांच्याकडे पाठवले.

डॉ. महेंद्रनाथ मुजुमदार रात्री साडेदहाच्या सुमारास बेलूर मठात पोहोचले. त्यांनी तपासणी केली आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी, स्वामीजींनी देहत्याग केल्याचे जाहीर केले.

डॉ. महेंद्रनाथ मुजुमदार यांच्या म्हणण्याप्रमाणे हृदयक्रिया बंद पडून स्वामीजींचे निर्वाण झाले. डॉ. बिपीनबिहारी घोष यांचे निदान मात्र थोडे वेगळे होते. विवेकानंदांच्या डोळ्यात रक्त साकळले होते आणि नाकातून व तोंडातून किंचित रक्तस्राव झाला होता. त्यावरून डॉ. घोष यांचे निदान असे की, मेंदूतील एखादी शीर तुटून प्राण गेला असावा. गुरुबंधुंच्या मते मात्र, डोळे, नाक आणि तोंडाशी रक्त होते म्हणजे प्राण समाधी अवस्थेत ब्रम्हरंध्राच्या द्वारे गेला.

पाच जुलैची सकाळ उजाडली. सगळीकडे वार्ता पसरली. हजारो लोक अंत्यदर्शनासाठी लोटले. भगिनी निवेदितादेखील आल्या. पार्थिवाजवळ बसून त्या वारा घालू लागल्या. विवेकानंदांची आई भुवनेश्वरीदेवी यादेखील आल्या. जगद्वंद्य पुत्राचे अंतिम दर्शन घेताना त्यांनाही गलबलून आले.

दुपारी दोन वाजता स्वामीजींचे पार्थिव खाली आणले गेले. त्यांच्या पूर्ण शरीरावर भगवे वस्त्र पांघरण्यात आले. निवेदितांच्या मनात आले, त्यांच्या अंगावरील हे वस्त्र आपल्याला आठवण म्हणून मिळाले तर जपून ठेवता येईल. त्यांनी एका संन्याशाला विचारले, `हे वस्त्र अग्नीला अर्पण करणार का?’ संन्यासी हो म्हणाले. निवेदिता खट्टू झाल्या.

सगळ्यांनी अंतिम नमस्कार केला. निरांजने लावण्यात आली, आरती झाली आणि शिष्यांनी विवेकानंदांचा तो निष्प्राण देह खांद्यावरून नियोजित जागेपर्यंत नेला. ही जागाही स्वामीजींनी स्वत:च सांगून ठेवली होती. पार्थिव चितेवर ठेवण्यात आले.

मंत्र म्हटले गेले आणि पाहता पाहता एका योग्याचा, एका “cyclonic hindu monkचा”, एका युगपुरुषाचा, एका श्रेष्ठ आध्यात्मिक पुरुषाचा, हिंदू धर्माची-हिंदू समाजाची अन हिंदुस्थानची विजयध्वजा उत्तुंग उचलून धरणाऱ्या एका कर्मवीराचा पावन देह पंचतत्त्वात विलीन झाला.

गंगेच्या ज्या काठावर विवेकानंदांना अग्नी देण्यात आला, त्याच्या अगदी विरुद्ध टोकाला गंगेच्या दुसऱ्या तीरावर १६ वर्षे आधी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना अग्नी देण्यात आला होता. हळूहळू ज्वाला भडकत होत्या. सर्वत्र नि:शब्द शांतता होती.

निवेदितादेखील निश्चलपणे त्या ज्वाळांकडे पाहत बसल्या होत्या. तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली आणि विवेकानंदांच्या शरीरावरील भगव्या वस्त्राचा एक जळालेला छोटासा तुकडा निवेदितांजवळ येउन पडला. त्या वातावरणातही त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. आठवण म्हणून वस्त्र मिळावे ही त्यांच्या मनीची हाक गुरूने ऐकली होती. त्यांनी चटकन तो तुकडा उचलून घेतला आणि अखेरपर्यंत जपून ठेवला.

आजही बेलूर मठात स्वामीजींची खोली आणि त्यांना अग्नी देण्यात आला त्याजागी त्यांचे मंदिर पाहता येते. बाजूनी वाहणारा, गंगासागराकडे निघालेला भागीरथीचा अथांग प्रवाह या विश्वप्रतापी पुत्राचा महिमा आल्यागेल्यांना अभिमानाने सांगत असतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

राजकीय करियर ऐन भरात असताना नानाजींनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारलं होतं

Next Post

आसामच्या भूमीवर सहा शतकं राज्य करणारे अहोम राजे कोण होते..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आसामच्या भूमीवर सहा शतकं राज्य करणारे अहोम राजे कोण होते..?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "मन की बात"मध्ये कौतुक केलेले कामेगौडा कोण आहेत..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.