आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
विमान जेव्हा आकाशात उडत असते तेव्हा ते जमिनीपासून किती तरी उंचावर असते. आकाशात उडणारे हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर त्याचे आणि त्यातील प्रवाशांचे काय होईल? १९७१ साली ख्रिसमसच्या आदल्या रात्री पेरुवियनच्या जंगलात एक विमान कोसळले. त्या विमानातील सगळेच्या सगळे प्रवासी मृत्युमुखी पडले, फक्त १७ वर्षांची ज्युलियन कॉक अकरा दिवसांनी त्या जंगलातून वाट काढत काढत आपल्या घरी पोहोचली. इतक्या भीषण अपघातातून जिवंत राहिलेली ज्युलियन आणि राखेतून उठलेला फिनिक्स यांच्यात काहीच फरक नाही.
ज्युलियनचा जन्म १९५४ साली जर्मनीतील पेरू येथे झाला. जगप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ हान्स-विल्हेल्म आणि पक्षितज्ञ मारिया यांची ही एकुलती एक मुलगी. ज्युलियन कॉक थोडी मोठी झाल्यावर पेरुवियन हायस्कूलमधे शाळेत जाऊ लागली. तिचे आईवडील अमेझॉनच्या जंगलात त्यांच्या संशोधनात मग्न होते.
ज्युलियनला अमेझॉनमधील वातावरण, पर्यावरण याची तिला जी काही जुजबी माहिती तिच्या आई-वडिलांनी तिला दिली होती ज्याचा तिला नंतर खूप फायदा झाला.
१९७१ सालच्या ख्रिसमसच्या आदल्या रात्री तिच्या शाळेतील समारोह संपल्यानंतर १७ वर्षाची ज्युलियन आपल्या आईसोबत घरी जायला निघाली. सगळेच विद्यार्थी आपापल्या पालकांसोबत घरी जायच्या तयारीत होते. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना ख्रिसमस साजरा करण्याची उत्सुकता होती. ज्युलियनदेखील खूप दिवसांनी आपल्या घरी परतत होती. तिलाही आपल्या आई-वडिलांसोबत ख्रिसमस साजरा करता येणार होता. ज्युलियन आपल्या आईसोबत पेरुवियन जंगलावरून मार्गक्रमण करणाऱ्या विमानात बसली. तिला कधी एकदा आपल्या वडिलांना भेटते असे झाले होते. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
त्या दोघी विमानात बसल्या. विमानाने आकाशात झेप घेतली. थोडाच वेळ झाला आणि विमानाच्या खिडकीतून बाहेर थोडासा अंधार दिसू लागला, विजाही कडाडत होत्या. ढगाळ वातावारणामुळे असे होऊ शकतं म्हणून दोघी शांत बसल्या. पण, विमान पुढे जाईल तसे आजूबाजूचा अंधार आणि विजांचा कडकडाट वाढू लागला. ज्युलियनला खिडकी कडेला बसायला आवडत होते म्हणून ती खिडकीकडेला बसली होती आणि तिची आई मारिया तिच्या शेजारच्या सीटवर बसली होती.
थोड्याच वेळात ज्युलियनने जे पहिले ते फारच भयानक होते. विमानातील सगळेच प्रवासी आता ओरडत होते. एक वीज त्यांच्या विमानावर आदळली होती आणि विमान खाली कोसळणारच होते. ज्युलियनच्या कानावर सर्वांच्या आरडओरडा पडत होता. पण तिला काहीच समजत नव्हते.
त्यानंतर ज्युलियनचे जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिने पहिले की ती जमिनीवर आहे. तिचा सीटबेल्ट अजूनही बांधलेलेच होते आणि ती सीटसहित जमिनीवर ओणवी पडली होती.
तिच्या डोळ्यांत रक्त साकळले होते. पायाला जखम झाली होती. ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होती मात्र वारंवार बेशुध्द होत होती. तिने एकदा डोळे उघडून आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला पण तिला तिची आई कुठेच दिसली नाही.
एव्हाना तिच्या लक्षात आले होते की ज्या विमानात आपण बसलो होतो ते कोसळले आहे आणि बहुतेक आपणच एकटे जिवंत राहिलो आहोत. विज पडल्याने विमान कोसळले होते आणि यातील ९२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता.
त्यावेळी तिच्या मनावर कसा आणि किती परिणाम झाला असेल? तिला काय वाटले असेल याची कल्पनाच केलेली बरी.
रात्री दीडच्या सुमारास अपघात झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास तिला जाग आली. जाग आल्यावर तिला परिस्थितीचा अंदाज आला होता. पण, उठून आजूबाजूला पाहण्याइतकेही बळ तिच्यात राहिले नव्हते. आणि तिची आई आई? तिचं काय? तिचा विचार येताच पुन्हा तिच्या मनाचा थरकाप उडाला. आपण उठून आजूबाजूला पाहिलं पाहिजे असं तिला वाटत होतं पण ती उठू शकत नव्हती. काही वेळाने मनाचा हिय्या करून शरीरातील सगळं बळ एकवटून ती उभी राहिली. आजूबाजूला घनदाट जंगल सोडल्यास कुणीही नव्हतं. दिवसभर तिने त्या जंगलातून आईचा शोध घेतला. तिला हाका मारल्या पण तिचा आवाज ऐकणारं दूरदूर पर्यंतही कुणी नव्हतं.
थोड्या वेळाने तिला आठवलं की जंगलात हरवल्यानंतर तिथून बाहेर पाडण्यासाठी आधी कुठे झरा सापडतो का ते पाहावं आणि त्या झऱ्यासोबत चालत राहावं. कारण पाण्याचा कुठलाही स्त्रोत पुढे जाईल तसा मोठा होत जातो आणि कुठे तरी तुम्हाला मानवी वस्ती दिसण्याची शक्यता असते.
वडिलांनी सांगितलेली ही युक्ती आठवून ती कुठे पाण्याचा शोध लागतो का ते पाहू लागली. तिला जवळच एक झरा दिसला आणि ती त्या झऱ्यातून चालण्याचा प्रयत्न करू लागली. संपूर्ण शरीर वेदनांनी ठणकत होतं पण चालण्याशिवाय तिच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता.
सलग चार दिवस ती चालत होती. वाटेत तिला कुठे कुठे विमान अपघातातील मृतदेह दिसत होते. ते संपूर्ण चित्रच किळसवाणे होते. खरे तर आकाशात मोठमोठी गिधाडे घिरट्या घालत होती यावरूनच तिने अंदाज लावला होता की या वाटेवरून तिला प्रेत दिसण्याची शक्यता आहे. आईवडिलांच्या सहवासात राहिल्याने ती जंगलातील प्राणी पक्ष्यांविषयी किमान इतके तरी जाणून होती.
कित्येकदा ती खचून गेली होती. तशातही ती पाण्यातून पोहत राहिली. वर आकाशात बचाव पथकातील विमाने घिरट्या घालत होती पण त्यांना खालच्या नदी पत्रात पोहणारी ज्युलियन दिसू शकली नाही.
दहाव्या दिवशी तिला एका ठिकाणी एक मोटार बोट, एक प्लास्टिक बॅरेल दिसले. पाण्यातून निघून ती त्या ठिकाणी गेली. त्या मोटार बोटच्या शेजारीच एक डिझेलचा कॅन होता. त्या कॅनमधील थोडे डीझेल तिने आपल्या हाताला झालेल्या जखमेवर ओतले. त्या जखमेत अळ्या झाल्या होत्या.
आता तिच्या शरीरातील त्राण संपले होते. त्या नदीकाठीच झोपी जाण्याचा विचार करू लागली. त्या बोटीशेजारीच तिला एक छोटी पायवाट दिसली तिने त्या पायवाटेने जाण्याचे ठरवले. थोडे अंतर पुढे गेल्यावर तिला एक झोपडी दिसली. ती त्या झोपडीत जाऊन बसली. संपूर्ण शरीर थकले होते, वेदना वाढल्या होत्या. तिला भूकही लागली होती पण आजूबाजूला खाण्यासाठी काहीही नव्हते.
अजूनही तिचे डोळे सुजलेले आणि लाल भडक दिसत होते. थोडा वेळ तशीच बसून राहिली इतक्यात तिला काही आवाज ऐकू येऊ लागले. इतक्यात तिघं जणं जंगलातून तिच्या जवळ आले पण ती माणूस आहे यावर त्या तिघांचा विश्वासच बसत नव्हता.
तिने घडलेली सगळी हकीकत सांगितली. विमान अपघाताची बातमी त्यांच्याही कानावर आली होतीच. त्यामुळे त्यांनी कसाबसा तिच्यावर विश्वास ठेवला. नंतर त्या तिघांनी तिला जवळच्या हॉस्पिटलला नेण्याची सोय केली. तिथे तिच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली. त्या छोट्याशा गावात एक महिला वैमानिक राहत होती तिने ज्युलियनसाठी एका छोट्याशा विमानाची व्यवस्था केली आणि तिला विमानातून पुकाल्पा येथे नेण्यात आले. तिथल्या मिशनरी लोकांनी ती पूर्ण बरी होईपर्यंत तिची काळजी घेतली.
तिच्या वडिलांना बोलावण्यात आले. तब्बल अकरा दिवसानंतर त्यांना त्यांची मुलगी सुखरूप असल्याचे कळाले होते. वडिलांशी भेट झाली तेव्हा तिला आई त्या अपघातात गेल्याचे कळले. दोघांनाही एकमेकांशी नेमकं काय बोलावं हे अजिबात सुचत नव्हतं कित्येक वेळ दोघेही फक्त अश्रू ढाळत होते.
ज्युलियन ही एकमेव व्यक्ती होती जी या भयानक अपघातातून बचावली होती. इतक्या उंचीवरून खाली जमिनीवर पडूनही तिला फक्त खांद्यात एकाच ठिकाणी फॅक्चर झाले होते, डोळ्यांना थोडी सूज आली होती, पोटरीत जखम झाली होती. बाकी तिला जास्त काही दुखापत झाली नव्हती.
इतक्या मोठ्या अपघातातून ही सही सलामत बचावली हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते. पण तिला मानसिकरीत्या जबरदस्त धक्का बसला होता.
नंतर ही तिचा अकरा दिवसांचा प्रवास जाणून घ्यायला अनेक व्यक्तींनी तिची भेट घेतली. तिच्या या अनुभवावर डॉक्युमेंटरीज बनवण्यात आल्या. तिला लोकं माहिती विचारत ,पण बऱ्याचदा ज्युलियन सगळे काही सांगू शकत नव्हती. कधी कधी तिला अधले मधले संदर्भच लागत नव्हते. शिवाय सारख्या सारख्या त्याच त्या आठवणी तिला आणखीन त्रासदायक ठरत होत्या. या काळात तिच्या वडिलांनी तिला आधार दिला. तिची मानसिक तयारी करवून घेतली. हा सगळा अनुभव तिने लोकांना सांगणे किती महत्वाचे आहे हे तिला पटवून दिले.
त्यानंतरही कित्येक वर्षं या अपघाताच्या आठवणी तिच्या मनात रेंगाळत राहिल्या. त्यांचा परिणाम तिला जाणवत राहिला. आजही तिला एकच प्रश्न छळतो की, एवढ्या मोठ्या अपघातातून मीच एकटी का आणि कशी बचावली असेन?
पण, म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी? या म्हणीची सत्यता आपल्याला ज्युलीयानाच्या या अनुभवावरून पटते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.