आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मिशन मार्स नावाचा अक्षय कुमारचा पिक्चर आला आणि लाखो लोकांना खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान काय असते याची छोटीशी झलक पाहायला मिळाली. लोकांना नवीन विषयांची माहिती देणे अथवा आपल्या देशाची विविध विषयात होत असलेली दैदिप्यमान कामगिरी सांगणे या विषयावर बॉलीवूडवाल्यांसारखे प्रबोधन दुसरे कोणी करू शकत नाही.
दृकश्राव्य माध्यम हे अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते आणि या माध्यमातून कुठलाही विषय मग तो कितीही किचकट का असेना, जर चांगल्या पद्धतीने मांडला तर एकाच वेळी लाखो करोडो लोकांपर्यंत जाऊन पोहोचतो. नाहीतर किती लोकांना आपली इस्त्रो काय करते हे माहिती आहे? किती लोकांना खगोलशास्त्र म्हणजे काय हे माहिती आहे?
खगोलशास्त्र हा आपल्यापैकी अनेकांचा शाळेत अथवा कॉलेजमध्ये असताना आवडीचा विषय होता पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या विषयात करिअरला फार स्कोप नाही म्हणून अनेक जण शाळा सोडल्यानंतर खगोलशास्त्र शिकणे सोडून देतात.
अनेकांना फक्त पृथ्वीचा भूगोल अभ्यासणे, निरनिराळ्या देशांची, तिथल्या हवामानाची, तिथल्या संस्कृतीची माहिती घेणे फार फार तर अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण यांचा अभ्यास करणे इतकाच या विषयाचा अवाका माहित असतो.
परंतु त्याही पलीकडे जाऊन खगोलशास्त्र, खगोलभौतिकिशास्त्र, खगोलतांत्रिकीशास्त्र, अंतराळ विज्ञान अशा अनेक नवनवीन शाखा आता उदयास आलेल्या आहेत आणि देश विदेशामध्ये या विषयात विविध संशोधने होत आहेत.
आपल्याकडे डॉ. जयंत नारळीकर नावाचा अवलिया खगोलशास्त्रज्ञ आहे ज्याच्यामुळे देशात या शास्त्राला महत्व आणि सन्मान प्राप्त झाला आहे. ज्यांना खगोलशास्त्र काय आहे हेही माहिती नसतं त्यांना डॉ. जयंत नारळीकर हे नाव तर नक्की माहिती असतं. उशीरा का होईना या विषयाचे महत्व आपल्याला पटल्यामुळे भारतात खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान आणि शोध या संदर्भात शिक्षण देणाऱ्या आणि कार्य करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या आहेत.
इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स, इंडियन इंस्टीट्युट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी,
टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च अशा अनेक नामांकित संस्था देशात कार्यरत आहेत. याशिवाय अनेक विद्यापीठातून या संदर्भातील शिक्षण आणि संधी उपलब्ध असतात.
आता शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना या विषयाची गोडी लागावी म्हणून प्रयत्न केले जातात त्यासाठी राज्य आणि देशपातळीवर खगोलशास्त्रात काम करणाऱ्या संस्था अनेक उपक्रम राबवत असतात.
भारतात अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या स्पेस इंडिया या संस्थेने २५ जुलै २०२० ला एक ट्विट केले.
वैदेही संजयभाई वेकरिया आणि राधिका प्रफुलभाई लखानी या सुरत येथे राहणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी “स्पेस इंडिया” आणि अमेरिकेच्या “नासा” या अंतराळ संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या एका प्रोजेक्टमध्ये भाग घेऊन मंगळ ग्रहाकडून पृथ्वीच्या कक्षेकडे प्रवास करणारा एक लघुग्रह शोधला.
नासाबरोबर एकत्र राबवण्यात येणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये देशोदेशीची मुले सहभागी झालेली होती. साधारणपणे खगोलशास्त्रामध्ये तुम्हाला दुर्बीण घेऊन आकाशाचे सतत निरीक्षण करायचे असते आणि अवकाशात काय हालचाली होत आहेत याचे निरीक्षण ठेवायचे असते.
खगोलशास्त्रज्ञ तासनतास दुर्बीण घेऊन आकाश न्याहाळत बसलेले असतात आणि अवकाशात होणाऱ्या बदलांचे पृथ्वीवर होणारे सूक्ष्म परिणाम टिपत बसलेले असतात. त्यांच्या निरीक्षणाचा फायदा आपल्याला पृथ्वीवरील अनेक संशोधनांमध्ये होतो.
सदर प्रोजेक्टमध्ये वैदेही आणि राधिका यांनी अवकाशातील उपग्रहांनी टिपलेल्या या फोटोंचा अभ्यास केला त्यासाठी खास प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांनी वापरले. त्यातून मंगळ या ग्रहाभोवती फिरणारा एक लघुग्रह त्याची कक्षा सोडून हळूहळू पृथ्वीच्या कक्षेत येत आहे हा महत्वपूर्ण शोध त्यांनी लावला.
आपले निष्कर्ष त्यांनी नासाकडे देखील पाठवले. आनंदाची गोष्ट म्हणजे नासाने स्वत: निष्कर्ष तपासून आणि स्वत:च्या उपकरणाद्वारे माहिती घेऊन वैदेही आणि राधिका या दोघींनी लावलेल्या शोधला पुष्टी दिली.
सध्या तरी या लघुग्रहाला HLV2514 हे नाव देण्यात आलेले आहे. मंगळ ग्रहाची कक्षा सोडून हा लघुग्रह पृथ्वीकडे यायला निघाला आहे परंतु अवकाशाचा जर विचार केला तर या लघुग्रहाला पृथ्वीपर्यंत पोहोचायला अजून लाखो वर्षांचा कालावधी लागू शकतो हे नासाने स्पष्ट केले आहे.
लघुग्रह ज्या ग्रहाभोवती फिरत असतात त्या ग्रहाच्या कक्षा सोडून जेंव्हा दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेमध्ये यायला बघतात तेंव्हा त्यांच्यातील अंतर हे मैल किंवा किलोमीटरने मोजले जात नाही.
काळ ही संकल्पना सापेक्ष आहे आणि अंतराळामध्ये सूर्याचे प्रकाश किरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला जितका वेळ घेतात त्या प्रमाणात प्रकाशवर्षे या एककामध्ये हे अंतर मोजले जाते. त्यामुळे अवकाशात ग्रहांच्या ज्या काही हालचाली होत राहतात त्यांचे स्थित्यंतरण घडून येण्यासाठी पृथ्वीवरचा हजारो आणि लाखो वर्षांचा कालावधी निघून जातो.
सध्या वैदेही आणि राधिका वर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. नासाकडून औपचारिकता पूर्ण झाल्यावर या दोघींनी मिळून शोधलेल्या लघुग्रहाला नाव देण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे.
वैदेहीला मोठी झाल्यानंतर अंतराळवीर व्हायचे आहे आणि त्यासाठी ती मेहनत करत आहे. राधिका देखील पुढे खगोलशास्त्र या विषयातच काम करणार आहे. फक्त डॉक्टर आणि इंजिनिअरची भरमसाठ पैदास करणाऱ्या देशातील हा बदल नक्कीच सुखवाह आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.