आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
प्रत्येक सणाला, प्रत्येक शुभ-मंगल प्रसंगी, आनंदाच्या प्रसंगी कोणत्याही रूपात हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे ‘साखर’. भारतासारख्या देशात साखर एवढी प्रसिद्ध होती की अनेक आनंदमयप्रसंगी ‘हत्तीवरून साखऱ्या वाटण्याची’ पद्धत होती. आपण रोज साखर खातो, पण ही साखर एकेकाळी युरोपीय लोकांचं ‘पांढरं सोनं’ होतं.
युरोपीय वसाहतवाद्यांसाठी भारतातील कापूस, केशर आणि मसाल्यांसह ‘साखर’सुद्धा अतिशय मौल्यवान होती हे वाचायला थोडं विचित्र वाटत असलं तरी ‘शुगर’ हा इंग्रजी शब्दसुद्धा संस्कृतमधील ‘शर्करा’वरून आला आहे. या विशेष लेखात साखरेच्या इतिहासाबरोबरच ऊस आणि साखरेच्या जागतिक प्रवासाचा दुग्धशर्करायोग तयार होत आहे..
सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये साखर ही एक ऐषारामाची, चैनीची वस्तू होती. ब्रिटिशांच्या मते, साखर म्हणजे फक्त श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांनाच परवडेल असा उत्तम मसाला होता. जे व्यापारी साखरेची विक्री करत होते ते भरपूर संपत्ती कमवत असत आणि म्हणूनच साखरेला ‘व्हाइट गोल्ड’ असे नाव पडले.
साखर ऐषारामाची गोष्ट होती, कारण जगाच्या फक्त काहीच भागात ऊसाचे पीक घेतले जायचे. ऊसाचा उदय भारतीय उपखंडात झाला. यापूर्वी ऊसाचा गोडवा चाखण्यासाठी लोक कच्चाच ऊस चघळत असत. काही स्रोतांनुसार, साखरेचा संदर्भ हजारो वर्षांपूर्वीचा आहे. अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये साखरेचा संदर्भ येतो. सर्वप्रथम इसवी सन पूर्व पहिले शतक आणि इसवी सनाच्या पाचव्या शतकादरम्यान ‘तमिळ संगम साहित्या’त साखरेचा उल्लेख आहे. याशिवाय इसवीसन पूर्व तिसऱ्या आणि चौथ्या अर्थशास्त्रातही साखरेचे वर्णन आलेले आढळते.
‘गुप्त’ साम्राज्याच्या काळात, म्हणजेच इसवी सन ३५१च्या दरम्यान ऊसाच्या रसापासून गुळ कसा तयार होतो याचे तंत्रज्ञान तत्कालीन भारतीयांना उमगले होते. संस्कृतमधील ‘शर्करा’ म्हणजेच गुळ, किंवा कोणतीही प्रक्रिया न केलेली साखर. शर्करेचे इंग्रजी संस्करण म्हणजेच ‘शुगर’. त्याप्रमाणेच इंग्रजीमधील ‘कॅण्डी’ हा शब्दसुद्धा संस्कृतमधील ‘खंड’ म्हणजेच गुळ यावरून आला आहे. अनेक प्राचीन साहित्यसंग्रहांच्या मते, साखरेमध्ये अनेक औषधी गुण होते. आयुर्वेदातील, चरक संहितेनुसार, साखरेपासून बनविलेले मद्य आतड्यांसंबंधी रोग बरे करण्यास आणि पचनास मदत करते.
सुरुवातीच्या काळात साखर तयार करण्यासाठी ऊसाचा रस काढला जात असे. सुरुवातीच्या पद्धतींमध्ये ऊस फोडून, रस काढून घेण्यात येई आणि काढलेला रस उकळवून किंवा उन्हात कोरडा करून ‘शर्करायुक्त’ घन पदार्थ तयार होत असे, यालाच साखर म्हणून ओळखले जाते आणि पश्चिमेला “टेबल शुगर” म्हणून ओळखले जाते.
भारतातून गुळ तयार करण्याचे तंत्रज्ञान चीन आणि पर्शियापर्यंत पोहोचले. प्रवासी बौद्ध भिक्षूंनी चीनमध्ये साखर क्रिस्टलायझेशन पद्धती आणल्या. त्यानंतर अकराव्या शतकात धर्मयु*द्धं झाली आणि विजयी ख्रिश्चन सरदारांनी युरोपमध्ये साखर आणि साखर तयार करण्याचे तंत्रज्ञान नेले. पण साखरेला खऱ्या अर्थाने पंधराव्या शतकात जागतिक स्वरूप मिळाले. कोलंबसने ‘नव्या जगाचा’ शोध लावल्यानंतर, कॅरेबियन बेटे आणि मेक्सिको याठिकाणी उसाच्या लागवडीची कल्पना युरोपीय वसाहतवाद्यांना आली. याठिकाणी शेतमजूर म्हणून आफ्रिकेतून लोक आणले गेले.
ज्यावेळी गुलामगिरीच्या निर्मूलनाची चळवळ संपूर्ण अमेरिका आणि युरोपमध्ये सुरु झाली, तेव्हा युरोपीय वसाहतवाद्यांनी ऊसाच्या लागवडीचे केंद्र भारत आणि इंडोनेशिया याठिकाणी स्थलांतरित केले. भारत आणि इंडोनेशियामध्ये ऊसांच्या लागवडीसाठी ब्रिटिश आणि अन्य युरोपीय वसाहतवाद्यांनी करारबद्ध मजूर नियुक्त केले. गुप्त साम्राज्यानंतर पुन्हा एकदा भारत साखरेच्या उत्पादनात अग्रेसर देश बनला. पण याचा फायदा भारतीय लोकांना न होता परकीयांना होत होता.
अठराव्या शतकात साखर कॉफी, चहा आणि चॉकलेटमध्ये मिसळली आणि जगामध्ये सगळीकडे, सर्वांपर्यंत ‘साखरेचा गोडवा’ पोहोचला. यानंतरच्या काहीच काळामध्ये जगभरातील किचन्समध्ये साखर पोहोचली. अनेक लोकांचे तोंड गोड झाले आणि शरीर आणखी जड! आज जगातील प्रत्येक व्यक्ती सरासरी ७० ग्रॅमपेक्षा जास्त साखरेचे सेवन करतो. पण आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार, माणसाने दिवसभरात फक्त २५ ग्रॅम साखर खावी असे सांगितले गेले आहे.
तर साखरेच्या इतिहासाचे पाच प्रमुख टप्पे आहेत:
१. प्राचीन काळात उसाच्या रोपातून उसाचा रस काढण्यात येत होता. त्यानंतर इसवी सन पूर्व ४००० च्या दरम्यान उष्णकटिबंधीय भारत आणि आग्नेय आशियामध्ये या वनस्पतीची लागवड सुरु झाली.
२. दोन हजार वर्षांपूर्वी भारतात उसाच्या रसापासून साखरेच्या क्रिस्टलच्या निर्मितीचा शोध लागला, त्यानंतर इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकात भारतात क्रिस्टल ग्रॅन्युलच्या शुद्धीकरणात सुधारणा झाल्या.
३. उत्पादन पद्धतींमध्ये काही सुधारणांसह मध्ययुगीन इस्लामिक जगामध्ये उसाच्या साखरेची लागवड आणि उत्पादनाचा प्रसार झाला.
४. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय भागांमध्ये उसाची लागवड आणि उत्पादनाचा प्रसार सोळाव्या शतकापासून सुरू झाला.
५. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात बीटशुगर,हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि इतर गोड पदार्थांचा विकास झाला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.