आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सम्राट हर्षवर्धनचा काळ म्हणजे ५९० ते ६४७. इस्लामी आक्रमणापुर्वीचे मोठे साम्राज्य म्हणुन वर्धन साम्राज्याचा उल्लेख करावा लागेल. उत्तरेला हिमालय दक्षिणेला दख्खन पुर्वेला आसाम ते पार कंदाहार पर्यंत राज्य करणारे थोडे राजे भारताला लाभले. त्यात मौर्य साम्राज्याएवढा नाही परंतु विशाल प्रदेशावर राज्य करणारे घराणे म्हणुन वर्धन घराण्याचा उल्लेख करावा लागेल.
सहाव्या शतकात हर्षवर्धनच्या काळात चार दशकं कनौज येथुन राज्यशकट हाकणारे हे राज्य सुवर्ण काळ म्हणुन गणले गेले आहे.
वर्धन घराण्याचा इतिहास प्रभाकर वर्धनपासुन सुरू होतो. ठाणेश्वर म्हणजे आताचे हरयाणा येथे या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रभाकर वर्धनची पत्नी यशोमतीला तीन अपत्य झाली “राज्यवर्धन, हर्षवर्धन आणि कन्या राजश्री”. राजश्रीचे लग्न कान्यकुब्ज म्हणजे आत्ताचे कनौजचा राजा ग्रहवर्मन याच्यासोबत झाले.
त्या काळात भारतीय राज्यांवर हुणांची सतत आक्रमण होत. तत्कालीन गुप्त साम्राज्याचा सम्राट स्कंदगुप्ताने या आक्रमणा विरोधात मोठी मोहीम उघडली. त्या सगळ्या आर्थिक आणि मानवी हानीचा परिणाम गुप्त साम्राज्य कोसळण्यात झाला.
सिंधु नदी पलीकडील भाग हुणांच्या ताब्यात गेला आणि हुणांची ठाणेश्वरच्या वर्धन घराण्याबरोबर चकमक झडु लागली. त्यादरम्यान प्रभाकर वर्धनचा मृत्यु होऊन राज्यकारभार राज्यवर्धनच्या हातात आला.
इकडे शशक म्हणजे गौड साम्राज्याच्या (बंगाल) राजाने कनौजचा राजा ग्रहवर्मनची हत्या करून राजश्रीचे अपहरण केले. राजश्रीचे अपहरण झाल्याची बातमी कळाल्यावर राज्यवर्धनने शशकावर आक्रमण करायचे ठरवले.
शशकाने राज्यवर्धनला बैठकीसाठी बोलवुन कपट करुन त्याची हत्या केली व कनौजवर कब्जा केला.
त्यावेळी हर्षवर्धनचे वय होते १६. हर्षवर्धनने डगमगून न जाता राज्यकारभार हातात घेऊन दिग्विजय मोहिम उघडली आणि सुरुवात शशकापासुन केली. हर्षवर्धनने जाहीर दवंडी पिटुन “एकतर माझ्या बरोबर या किंवा शशकाची साथ देऊन परिणाम भोगा” अशी चेतावणी इतर राजांना दिली. शशकाविरुध्द असणाऱ्या राजांनी हर्षवर्धनचा पक्ष धरला.
हर्षवर्धनने कनौजवर आक्रमण करून बहिणीची सुटका केली आणि शशकाला पुन्हा बंगालमधे हुसकावुन लावले. शशकाचा मृत्यु होईपर्यंत हा लढा सुरू राहिला आणि अशाप्रकारे मगध बंगाल आणि कलिंगाचा प्रदेश हर्षवर्धनच्या साम्राज्यात जोडला गेला.
हर्षवर्धन इथेच थांबला नाही तर वलाभी राजांचा पराभव करुन गुजरात आपल्या साम्राज्याला जोडून घेतला. हे करताना दख्खनवर राज्य करणाऱ्या चालुक्य घराण्याशी त्याचा सामना नर्मदेच्या तिरावर झाला. चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याने हर्षवर्धनला तोडीस तोड उत्तर दिले आणि नर्मदेचा तीर ही दोन्ही साम्राज्याची सीमारेषा असेल या समझोत्यावर दोघांचा तह पार पाडला.
६०००० हत्ती आणि १००००० सैन्यदल असणाऱ्या हर्षवर्धनने तत्कालीन पाच मोठ्या साम्राज्यांशी टक्कर घेऊन आपला राज्यविस्तार केला.
तीस वर्षे शस्त्र न उचलता शांतपणे राज्यकारभार करत “सकल उत्तर पथ नाथ” ही पदवी प्राप्त केली असे ह्यु एन त्संग या चिनी प्रवाशाने लिहुन ठेवले आहे.
हर्षवर्धनचे साम्राज्य म्हणजे गुजरात, कलिंगा, बंगाल, राजपुताना, जालंदर, काश्मीर, नेपाळ, सिंध, कामरूप (आसाम) असे विस्तृत पसरलेले होते.
हर्षवर्धनचा काळ कला आणि शैक्षणिक दृष्टीने सुवर्ण काळ होता. हर्षवर्धन स्वतः लेखक होता आणि त्याने संस्कृत मध्ये “नागनंदा, रत्नावली, प्रियदर्शिका” ही नाटकं लिहिली. राज्याच्या उत्पन्नातील एक चौथाई हिस्सा हा विद्वानांवर खर्च होत असे. हर्षवर्धनच्या काळात नालंदा विद्यापिठ कसे भरभराटीला आले होते याविषयी ह्यु एन त्संग लिहिले आहे.
हर्षवर्धनच्या काळात नालंदा विद्यापिठात जगभरातील १०००० विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि २००० शिक्षक त्यांना विद्यादानाचे कार्य करत होते. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा अत्यंत कठीण असे आणि इच्छुक विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा दरवाजा वर असणारे रक्षक देखील घेत आणि मगच आत प्रवेश देत.
नालंदा विद्यापिठात वेद, बौद्ध धर्म विषयक ज्ञान, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, शहर नियोजन, औषधोपचार, कायदा, अवकाश शास्त्र इत्यादी विषय शिकवले जात.
शिवभक्त असणाऱ्या हर्षवर्धनने नंतर महायान बौद्ध मार्ग स्विकारला. हर्षवर्धननी ह्यु एन त्संगच्या अध्यक्षतेखाली कनौज येथे विद्वानांची महासभा भरवली. ह्यु एन त्संगने अनेक हस्तलिखिते आपल्या बरोबर चीनला नेली त्यातील ६०० संस्कृत हस्तलिखिते त्याने भाषांतरीत केली.
दुसरी महासभा प्रयाग म्हणजे अलाहबादेत भरवली तिथे बुद्ध, सुर्य आणि महादेवाचे पुजन केले गेले, दानं वाटली गेली हा सोहळा ७५ दिवस चालला. दर पाच वर्षांनी हा सोहळा भरवला जात असे आणि वस्त्रालंकार दान केले जात आणि हे तीन-तीन महिने चालत असे. शेवटच्या काळात स्वतः जवळील भरपुर संपत्ती वाटुन झाल्यावर हर्षवर्धनने अंगावरील कपडे आणि अलंकार देखील दान केले.
हर्षवर्धनच्या काळात गावांना जमिनी कसायला दिल्या गेल्या ज्याचा परिणाम म्हणुन स्थानिक जमिनदार गब्बर झाले. त्यामुळे साम्राज्य हळूहळू खिळखीळे झाले. हर्षवर्धनचा मृत्यु ६४७ मध्ये झाला. याच्या मृत्यु विषयी मतमतांतर आहेत. एका दाव्यानुसार हर्षवर्धनच्या हयातीतच त्याचे पुत्र वाग्यवर्धन आणि कल्याणवर्धनची हत्या मंत्र्याकडुन झाली.
हर्षवर्धनच्या मृत्यु नंतर राज्यकारभार अर्जुन नावाच्या मंत्र्याने हाती घेतला आणि तिबेटींनी त्याच्यावर हल्ला करून कारावासात टाकले व ६४८ मध्ये वर्धन साम्राज्याचा अंत झाला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.