आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात हे खरं असलं तरी पैसे असुनही सामान्य राहण्याचं सोंग नक्कीच आणता येतं. भारतात आज १२१ अब्जाधीश व्यक्ती आहेत आणि या संख्येत अजुन वाढच होणार असा दावा फोर्ब्ज या मासिकाने केलाय. धनाढ्य व्यक्ती आपलं आयुष्य नेहमीच झगमगाटात जगतात. प्रसिद्धी, पैसा पायाशी लोटांगण घालायला लागले की मग स्वत:ला या झगमगाटातुन बाहेर काढायचं म्हणजे महाकठीण काम.
पण काही व्यक्ती या सगळ्यापासुन दुर आपलं आयुष्य जगत असतात. प्रसिध्दीची हाव नसलेल्या अशा मोजक्या व्यक्तींमध्ये नाव येते ते पालनजी मिस्त्री यांचं आणि त्यांच्याबद्दलच आज आपण जाणुन घेऊयात.
पालनजी मिस्त्री यांच्या नावाची चर्चा सुरु झाली ती त्यांचा मुलगा सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन काढण्यात आले तेव्हा. त्यावेळी शापूरजी पालनजी समुहाबद्दल जाणुन घेण्यास लोक उत्सुक होते. माध्यमांमध्ये पालनजींच्या नावाची चर्चा जास्त केली जात नाही. असं एकाकी जीवन जगणाऱ्या आणि अरबोंचं साम्राज्य उभारणाऱ्या पालनजींची जीवनकथा अतिशय रंजक आहे.
१ जून, १९२९ ला एका पारसी परिवारात जन्म झालेल्या पालनजी मिस्त्री यांना जगातील सर्वात श्रीमंत आयरिश व्यक्ती म्हणुन ओळखलं जातं. आज वय ९१ वर्ष. १५५ वर्ष जुने असणारे अरबोंचं साम्राज्य हीच त्यांची ओळख आहे. भारतातील अरबपतींच्या यादीत ५ व्या क्रमांकावर त्यांचं नाव घेतलं जातं. तर जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचं नाव ६६ व्या क्रमांकांवर आहे.
पालनजींचे वंशज वेसा, गुजरात येथुन स्थलांतर करुन मुंबईत येऊन स्थायिक झाले. त्यांच्या वडीलांनी दहावीचं शिक्षणही घेतलं नसताना, आपल्या मुलाच्या शिक्षणाची पुर्ण तयारी त्यांनी केली होती. पालनजींना उच्च शिक्षण मिळावं याची तयारीही त्यांनी केली होती. शिक्षणाच्या सुरुवातीला त्यांनी कथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल मधे शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी इम्पेरीयल कॉलेज, लंडन येथे जाण्याचा निर्णय घेतला.
२००३ मध्ये पालनजींनी आयर्लंडच्या नागरिकतेसाठी भारतीय नागरिकता सोडली. असं असलं तरी आजही ते स्वत:च्या मलबार हिलमधील आलिशान घरात राहत आहेत. आपली घोड्यांची आवड जोपासण्यासाठीच त्यांनी पुण्यात २०० एकरचा घोड्यांचा पागा उभा केला आहे.
२६ जून, २०१८ ला केलेल्या गणनेनुसार १९.२ अरब डॉलर एवढ्या संपत्तीचे मालक असलेले पालनजी आज ‘शापूरजी पालनजी समुह’ चे अध्यक्ष आहेत. शापूरजी पालनजी समुह कापड उद्योगापासुन स्थावर मालमत्ता, दवाखाने, व्यवसाय उत्पादकता या उद्योगांमध्ये अग्रेसर आहे.
एसपीजी समुहाच्या अंतर्गत शापूरजी पालनजी इंजीनियरिंग, एफकौन्स इन्फ्रास्ट्रक्चर, फोर्ब्स टेक्सटाइल, गोकक टेक्सटाइल, युरेका फोर्ब्स, फोर्ब्स अॅण्ड कंपनी, शापूरजी पालनजी कंस्ट्रक्शन मटेरियल्स ग्रुप, शापूरजी पालनजी रियल एस्टेट आणि नेक्स्ट जेन यांसारख्या समूहांचा समावेश आहे.
मिस्त्री परिवार टाटा सन्सच्या संपत्ती मध्ये १८.४ टक्के भागीदारीचा मालक आहे. टाटा सन्सबरोबर व्यापारीक नात्याची सुरुवात ८५ वर्षांपुर्वी १९३५ मध्ये झाली.
त्यावेळी एसपीजी समूहाने १२.५ टक्के हिस्सा असणारी एक कंपनी विकत घेतली होती. विक्रीच्या वेळीच या कंपनीचे भाग एसपीजी या समुहाकडे देण्यात आले होते. आताचे १८.४ टक्के भाग हे स्टरलाईन इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि सायरस इन्वेस्टमेंट या दोन्ही मध्ये ९.२ असे विभागले गेले आहेत. तर शापूरजी पालनजी मिस्त्री स्वत: टाटा सन्स मध्ये ०.०३ टक्के भागधारक आहेत.
टाटा समूहाच्या बांधकामाचं काम करणाऱ्या पालनजींच्या वडिलांना द्यायला पैसे नसल्यामुळे हे भाग देण्यात आले अशी ही कहाणी प्रख्यात आहे. म्हणुनच पालनजी मिस्त्री यांना ‘फँटम ऑफ द बॉम्बे हाउस’ असं म्हटलं जातं.
२००६ मध्ये टाटा सन्सच्या बोर्डावर सायरस मिस्त्री यांची नेमणूक व्हावी म्हणुन पालनजींनी आपली जागा सोडली होती. परंतु ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन त्यांना अचानक काढले गेले तेव्हा सायरस मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यात वाद निर्माण झाला होता.
आज बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असणारी एसपीजी समुहाची सुरुवात १८६५ मध्ये लिटलवुड पालनजी म्हणुन झाली. त्यांचा पहिला प्रकल्प मुंबईच्या गिरगाव चौपाटी इथे फूटपाथ बनवायचा होता. नंतर टाटा समुहासाठी या कंपनीने ऑटोमोबाइल कारखाना आणि स्टील कारखाना बनवला.
१९७६ मध्ये मिस्त्री समूहाला पहिला विदेशी प्रकल्प म्हणुन ओमानच्या सुलतानचा महाल बनवण्याचं काम मिळालं. त्यांनतर या समूहाने घानाच्या राष्ट्रपतीचा महाल बनवला.
एसपीजी समुहानेच मलबार हिल येथील प्रसिध्द जलाशयाची निर्मिती केली आहे. तोच जलाशय ज्याने १०० पेक्षाही जास्त वर्षापासुन मुंबईच्या पाण्याची गरज भागवली आहे.
शापूरजी पालनजी समूहाने निर्माण केलेल्या काही बांधकामांमध्ये हॉटेल ताज इंटरकौंटीनेन्टल, भारतीय रिझर्व बँकेची इमारत, एचएसबीसी इमारत तसेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू मैदानाची निर्मीती यांचा समावेश होतो.
१९६० मध्ये आलेला ऐतिहासिक चित्रपट मुघल-ए-आजमला पालनजी मिस्त्री यानी आर्थिक मदत करुन निर्माता म्हणुन काम केल होतं. या चित्रपटाला लागलेल्या १२ वर्षाच्या प्रदीर्घ वेळेमुळे पालनजींनी परत चित्रपट क्षेत्रात पाय टाकला नसावा असा अंदाज आहे.
आज शापूरजी पालनजी समुह युरोप, दक्षिण आफ्रिका, दक्षिण आशिया, दक्षिण अमेरिका या खंडांमध्ये पसरला आहे. हा समुह आज ६०,००० लोकांना रोजगार पुरवत आहे.
एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कर्ता-धर्ता असणाऱ्या व्यक्तीमत्त्वाची ही एकलेपणाची जीवन पद्धत विचित्र वाटत असली तरी आजच्या काळात ती योग्य आणि गरजेची वाटते. नसुनही दाखवणारया या जगात असुनही न दाखवणारया व्यक्तींची उणीव पालनजींसारखे लोक आज भरुन काढत आहेत एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.