आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
DTDC हे नाव माहित नाही असा माणूस भारतात सापडणे अशक्य आहे. छोट्या मोठ्या शहरात कितीतरी ठिकाणी तुम्ही हा बोर्ड बघितला असेल. भारतातील एका ब्रँड कुरिअर कंपनीच्या नावाचा हा शॉर्टफॉर्म आहे. ‘डेस्क टू डेस्क कुरिअर अँड कार्गो’. आज संपूर्ण भारतात या कंपनीचा विस्तार झाला आहे. अशी एखादी कंपनी लोक अभ्यासाचा विषय (केस स्टडी) म्हणून निवडतात तेव्हा त्या कंपनीने अल्पावधीत अतिशय उत्तम प्रगती केलेली असते. DTDC ही अशीच एक कंपनी.
या कंपनीचे संस्थापक शुभाशिष चक्रवर्ती यांनी एका वर्षात देशभर कुरिअर सर्व्हिसचे मजबूत जाळे विणून आपली सेवा संपूर्ण भारतात १० हजार गावांत पोहोचवली आणि २४० परदेशी ठिकाणेपण काबीज केली. या २४० ठिकाणांमध्ये होती अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, चीन या देशातील ठिकाणे. स्थापनेपासून वीस वर्षात ही साधी वाटणारी कुरिअर कंपनी ४५० कोटींच्या घरात पोहोचली. या साऱ्या गोष्टी एका रात्रीत नाही घडल्या. त्यासाठी हजारो हात राबत होते.
५९०० कर्मचाऱ्यांची एक मजबूत टीम तयार झाली होती, देशभरात ५७५० फ्रँचायजी काम करत होत्या आणि या सर्वांना पुढे नेणारा माणूस होता शुभाशिष चक्रवर्ती.
कोलकाता येथे एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात शुभाशिष यांचा जन्म झाला. त्यांची घरची परिस्थिती इतकी बेताची होती की, कॉलेजचे शिक्षण पूर्ण करायला पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. पिअर्लेस या कंपनीमध्ये त्यांनी एजंट म्हणून कामाला सुरुवात केली.
रसायनशास्त्र हा त्यांचा अतिशय आवडता विषय होता. पण पैसे मिळवण्याच्या नादात शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले. ते करू नको असा सल्ला त्यांना त्यांच्या हितचिंतकाने दिला. तो ऐकून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्याच बरोबर पिअर्लेसचे कामही सुरूच ठेवले. अतिशय महत्वाकांक्षी स्वभावाचे शुभाशिष यांनी या कामासोबतच रसायनशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमालाही प्रवेश घेतला.
पिअर्लेसमधील त्यांचे काम फारच उत्तम पद्धतीने सुरु होते. त्यांचा कामाचा झपाटा अतिशय उत्तम होता. दरम्यान पिअर्लेसचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. के. रॉय यांनी त्यांना सांगितले, “पिअर्लेसचे काम भारतात उत्तर, पूर्व आणि पश्चिम भागात उत्तम रीतीने सुरु आहे परंतु दक्षिणेत त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा त्या कामासाठी शुभाशिषनी बंगलोर येथे जाऊन काम सुरु करावे.” महत्वाकांक्षी स्वभावाला वरिष्ठांनी अशी विश्वासाची जोड दिल्यावर कोणत्याही माणसाला काम करायला हुरूप येतोच. त्यांच्या सूचनेनुसार शुभाशिष बंगलोरला गेले. सहा वर्षे त्यांनी तेथे पिअर्लेससाठी काम केले आणि मग त्यांना जाणीव झाली आता आपण स्वत:चा व्यवसाय सुरु करायला हरकत नाही.
रसायनशास्त्र विषयातील पदवी हातात असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी संबंधित उत्पादने तयार करायचा विचार केला. परंतु, निव्वळ उत्पादन करून चालणार नसते त्याचे विपणन अर्थात डिस्ट्रीब्यूशन हे पण तितकेच महत्वाचे असते. मग त्यांनी १९८७ मध्ये एक डिस्ट्रीब्यूशन एजन्सी सुरु केली. तिच्या शाखा बँगलोर, चेन्नई आणि हैद्राबाद येथे सुरु केल्या. का? तर हा व्यवसाय नीट समजून घेता यावा म्हणून. त्यात ते पोस्टाची सेवा वापरत. परंतु त्या सेवेचा अनुभव फारसा चांगला नव्हता. म्हणून त्यांनी कुरिअर सेवेला जास्त प्राधान्य दिले.
या कुरिअर कंपनीसोबत व्यवहार करत असताना त्यांच्या लक्षात आले ग्राहकांना जे हवे आहे आणि पोस्ट जे देते आहे त्यात खूप तफावत आहे. दोन महिने त्यांनी कुरिअर कंपनीचा अभ्यास केला आणि त्यांना जाणवले हा व्यवसाय अगदी चांगला आहे, वेगळा आहे. मग आपणच कुरिअर कंपनी का सुरु करू नये? आणि मग १९९० मध्ये जन्म झाला DTDC कुरिअर आणि कार्गो सेवेचा!
त्यांची स्वत:ची डिस्ट्रीब्यूटर एजन्सी असल्यामुळे बँगलोर, चेन्नई आणि हैद्राबाद याठिकाणी शाखा होत्याच, मग त्यांनी ठरवले संपूर्ण दक्षिणेत आधी आपली कुरिअर सेवा पोहोचवावी आणि मग देशातील बाकी भागांचा विचार करू. केमिकल उत्पादनापेक्षा कुरिअर कंपनीमध्ये जास्त संधी आहे हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी डिस्ट्रीब्यूटर एजन्सीचे काम थांबवले आणि संपूर्ण लक्ष केवळ DTDCच्या व्यवसायावर केंद्रित केले.
मोजक्याच भांडवलावर सुरु केलेला व्यवसाय ग्राहकांच्या मागणीमुळे हळूहळू वाढू लागला. मैसूर, हुबळी, मंगळूर इकडेही डिलिव्हरी देण्याची निकड भासू लागली. आता कोची, केरळ, तामिळनाडू, आन्ध्रप्रदेश इकडेही विस्तार करायची गरज भासू लागली. या साऱ्यासाठी आवश्यक होते ते मनुष्यबळ. एक मजबूत नेटवर्क.
शुभाशिष आपल्या यशाची व्याख्या थोडक्यात सांगतात.. लोकांशी असलेले संबंध हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. स्वप्नांची देवाणघेवाणझाली की सोबत काम करणे अतिशय सोपे जाते. त्यांच्यासोबत आपली स्वप्ने पण मोठी होतात. दोघे सोबत मोठे होतो.
इतर कुरिअर कंपन्या टुमदार ऑफिसेस, मस्त इंटेरिअर, हे करण्यात गुंग होत्या. तो मुद्दा तसा खर्चिक होता. बँकेत कर्जासाठी गेल्यावर त्यांना कर्ज नाकारलं गेलं. तुमच्याकडे तारण म्हणून मोठी प्रॉपर्टी तरी हवी किंवा एखादा मजबूत आधार देणारा पैसेवाला माणूस तुमचा पाठीराखा हवा. त्यांच्याकडे हे दोन्हीही नव्हतं. मग त्यांनी घरातले दागिने विकले काही निधी उभा केला. पण तो लवकरच संपून गेला. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्यासारखे यशस्वी होण्यासाठी धडपड करणारे लोक एकत्र केले तरच हे शक्य होईल. आणि मग जन्म झाला फ्रँचायजी मॉडेलचा.
DTDC ही पहिली फ्रँचायजी देणारी कुरिअर कंपनी ठरली. याचा फायदा असा, कामाचा दर्जा राखला जातो शिवाय गुंतवणुकीचा ताण पडत नाही. फ्रँचायजी देताना शुभाशिष यांनी आपले कामाचे निकष, एक विशिष्ट पद्धत ठरवली आणि फ्रँचायजी घेणाऱ्या लोकांनी त्यानुसारच काम केले पाहिजे हा नियम ठेवला. त्यावेळी कंपनी चार भागात विभागलेली होती. त्यात अजून प्रादेशिक विभाग आणि त्यामध्ये अजून शाखा असत. एक शाखा जवळपास २० ते ३० फ्रँचायजी कंट्रोल करत.
पहिली पाच वर्षे सोपी नव्हती. त्यावेळी नेटवर्क वाढवलं. पण २००० साली मात्र त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवलं. ते ऑनलाईन ट्रॅकिंगसाठी खूप उपयुक्त होतं. सर्व ऑफिसेसना कॉम्प्यूटर, प्रिंटर, स्कॅनर दिले आणि देशाच्या सीमा ओलांडल्या. अमेरिका, इग्लंड, अखाती देश, सिंगापूर, अशा बाहेरील देशांमध्येही DTDC पोहोचलं.
आता ५००० पेक्षा जास्त लोक DTDC मध्ये काम करतात. ५००० फ्रँचायजी DTDC सोबत आहेत. अजूनही बरेच टप्पे पार करायचे आहेत. पण एका सामान्य घरातील तरुणाने घेतलेला एक निर्णय आज कितीतरी लोकांच्या रोजगाराचा मुद्दा बनला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.