आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जसजसा काळ पुढे जातो तसतसे मानवी जीवनात वैज्ञानिक प्रगती होत राहते. यामध्ये मानवी जीवनाच्या सर्व पैलूंचा समावेश असतो. आपल्या इतिहासातील आजवरचा सर्वश्रेष्ठ शोध म्हणजे चाकाचा. चाकाचा शोध लागल्याने मानवासाठी दळणवळणाचे मार्ग खुले झाले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यात चालण्याच्या तुलनेने कमी वेळ लागू लागला. हीच उत्क्रांतीची परंपरा पुढे विस्तारत गेली आणि रेल्वे, मोटारगाड्या अशा आधुनिक दळणवळणाच्या साधनांचा शोध लागला.
मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीची “गाडी” एवढ्यावरच थांबली नाही तर त्याने पुढे जाऊन ट्राम, मॅगलेव्ह ट्रेन, बुलेट ट्रेन, मोनो रेल, हायपरलूप अशा अगणित साधनांचा शोध लावला. दिवसेंदिवस या तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत असून यापैकी अनेक आधुनिक साधनांचा वापर भारतासारख्या खंडप्राय देशातही होत आहे.
खरं तर २००२ सालीच भारतामध्ये “स्कायबस” नावाची संकल्पना आणली गेली. काही दिवसांत त्या प्रोजेक्टवर कामही सुरु झाले आणि तो काही प्रमाणात अंमलातही आणला गेला, पण एका अपघातामुळे तो प्रोजेक्ट कायमचाच बंद पडतो की काय याची भीती जाणवू लागली. पण अलीकडेच, काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्कायबसचा प्रोजेक्ट पुन्हा सुरु करणार असल्याचे सांगितले आहे, हा प्रोजेक्ट नेमका काय आहे, या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
पुण्यातील एनडीए (चांदणी) चौकात काही महिन्यांपूर्वीच रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या विस्तारत्या स्वरूपासाठी, तसेच वाढत्या लोकसंख्येसाठी स्कायबसचा विचार करण्याचा सल्ला दिला. पुणेकरांनी या प्रस्तावाला अनुकूलता दाखवली आहे असे अनेक माध्यमांचे मत आहे.
स्कायबसचा प्रोजेक्ट सुमारे दोन दशकांपूर्वी समुद्र किनाऱ्याशी लागून असलेल्या भारतातील सर्वांत लहान राज्यात अर्थात गोव्यात सुरु करण्याचा प्रयत्न गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी केला होता. आयआयटी ग्रॅज्यूएट असलेल्या पर्रीकरांनी २००२ साली या अत्याधुनिक प्रकल्पाला मान्यता दिली आणि काम सुरु झाले. या कामाची जबाबदारी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडे होती.
२००४ पर्यंत कोकण रेल्वेचे तत्कालीन संचालक आणि स्कायबसचे जनक म्हणून संबोधले जाणारे बी. राजाराम यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १.६ किलोमीटर अर्थात एका मैलाचा ट्रॅक तयारही झाला. हा ट्रॅक मडगावमध्ये ४० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने चाचणी दरम्यान एका अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकल्पाला थांबवण्यात आले. २०१६ साली येथील खांब आणि ट्रॅक काढून टाकण्यात आले.
विद्यमान केंद्र सरकारने केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा प्रोजेक्ट हाती घेतला असून फक्त गोव्यातच नाही तर हैद्राबाद, पुणे, आणि दिल्लीजवळील गुरुग्राम येथेही अशा प्रकारचे स्कायबसचे प्रोजेक्ट्स हाती घेतले जातील. पण स्कायबसच का, असा प्रश्न निश्चितच तुम्हाला पडला असेल. याचीही अनेक कारणे आहेत.
स्कायबसची वैशिष्ट्ये
स्कायबस ताशी १०० किलोमीटर वेगाने धावू शकते, फक्त वेगच नाही तर स्कायबसची लोकांना वाहून नेण्याची क्षमता देखील जास्त आहे. यामध्ये एका वेळी ३०० लोक बसू शकतात. स्कायबसची चाकं वर असतात, ही या स्कायबसची खासियत. याशिवाय स्कायबसला अप मार्गावरून डाऊन मार्गावर आणायचे असल्यास त्यासाठी जास्तीचे प्रयत्न घ्यावे लागत नाहीत, त्यासाठी ट्रॅक्सचीही आवश्यकता नसते.
ज्या स्टेशनवरून स्कायबस अप मार्गावरून डाऊन मार्गावर आणायची असते त्या स्टेशनवर तो संपूर्ण ट्रॅकच दुसऱ्या दिशेला वळवला जातो. यालाच ट्रॅव्हर्स म्हणतात. मोठमोठ्या कारखान्यांमधील वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी ज्या प्रकारे ट्रान्सवर्सचा वापर केला जातो अगदी त्याच प्रमाणे ट्रॅव्हर्स काम करते. या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे स्कायबस सर्वसामान्यांना परवडणारी म्हणजेच मेट्रोच्या तुलनेत ५० टक्के स्वस्त आहे.
प्रस्तावित स्कायबसची चाचणी या वर्षाअखेर घेण्याची रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाची तयारी असून या अत्याधुनिक साधनामुळे देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एका नव्या उंचीवर जाण्याची शक्यता नक्कीच निर्माण झाली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.