आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
काही महिन्यांपूर्वी उद्योगपती रतन टाटा यांनी, आजारी असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यासाठी त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी मुंबई ते पुणे हा दोन तासांचा प्रवास केला. देशभरात त्यांच्या या कृतीचं कौतुक झालं होतं. आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यात टाटा उद्योगसमूह कायमच पुढे असतो. ‘टाटा’ हे नाव माहित नसेल अशी व्यक्ती सापडणं कठीणच आहे. भारताच्या औद्योगिक जडण-घडणीत टाटा उद्योग समूहाचा मोलाचा वाटा आहे. याशिवाय तंत्रशिक्षण, शिष्यवृत्ती, क्रीडा, आरोग्य, लोककल्याणाच्या क्षेत्रातही टाटांनी भरीव कामगिरी केली आहे.
उद्योगपती सर जमशेटजी टाटा यांचे पुत्र सर रतन टाटांच्या मदतीमुळं एका साम्राज्याच्या राजधानीला पुन्हा जीवदान मिळालेलं आहे.
सर रतन टाटा यांचे वडील आणि उद्योगपती जमशेटजी टाटा हे कलेचे प्रशंसक होते. त्यांनी आपल्या हयातीत कलेच्या संवर्धनासाठी मदत आणि प्रयत्न केले. सर रतन टाटा यांनी देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं.
भारतातील पुरातत्त्व उत्खननात योगदान देण्याची इच्छा त्यांनी केंद्र सरकारकडे बोलून दाखवली. त्यांनी पाटलीपुत्र येथील साईटसाठी निधी द्यावा, असं त्यांना सुचवण्यात आलं आणि त्यानंतर सुरू झालं मौर्य साम्राज्याच्या राजधानीचं पुनरुज्जीवन.
हरीश भट यांनी लिहिलेल्या ‘#टाटा स्टोरीज : ४० टाईमलेस टेल्स टू इन्स्पायर यू’ या पुस्तकात सर रतन टाटा आणि पाटलीपुत्रचं कनेक्शन उलगडण्यात आलं आहे.
पटना हे भारतातील अतिप्राचीन शहरांपैकी एक आहे. अनेक राजे-महाराजे, कवींनी तेथील कला तसेच वैभवाचे गोडवे गायले आहेत. १७८० च्या दशकाच्या सुरुवातीला इतिहासकारांनी आधुनिक पटना आणि प्राचीन पाटलीपुत्र यांच्यात संबंध असल्याचा निष्कर्ष काढला. पटना आणि पाटलीपुत्र ही दोन्ही शहरे वेगळी नसून एकच आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. पाटलीपुत्र शहर नेमकं कुठं होतं यासाठी इंडोलॉजिस्ट्सनी काही जागा सुचवल्या होत्या. त्याचाच भाग म्हणून पटनाच्या आसपासच्या काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. इतिहासकारांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे समोर आले.
पाटलीपुत्र शहराचे उत्खनन हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. कारण पाटलीपुत्र ही वैभवशाली मौर्य साम्राज्य आणि महान सम्राट अशोकाची राजधानी होती. सम्राट अशोकाला आपल्या देशाच्या इतिहासात मानाचं स्थान आहे. अशोकानं तयार केलेल्या स्तंभावरील चार सिंह आज आपलं अधिकृत राष्ट्रीय चिन्ह आहे. त्यामुळे या उत्खननात अशोकाच्या काळातील आणखी काही वैभव सापडेल का? याची उत्सुकता सर्वांना होती.
दुर्दैवाने, उत्खननाची जागा बरीच मोठी आणि गुंतागुंतीची होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं (एएसआय) स्वतःहून हे काम हाती घेतलं होतं. मात्र, त्यांचा निधी लवकरच संपुष्टात आला.
१९०३ मध्ये तत्कालीन ब्रिटीश सरकार उत्खननाचा पुढील खर्च मंजूर करण्याच्या मनःस्थितीत नव्हते आणि नेमक्या त्याच वेळी सर रतन टाटा मदतीला धावून आले. भारतातील सर्वांत मोठ्या उत्खनन प्रकल्पासाठी त्यांनी सर्व मदत करण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या असहकार चळवळीला मुक्त हस्ते मदत केली होती. १९१२ पासून सर रतन टाटा यांनी दरवर्षी पाटलीपुत्र प्रोजेक्टला २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मदत थांबणार नाही असे आश्वासन त्यांनी एएसआयला दिले. त्याकाळी २० हजार ही रक्कम प्रचंड मोठी होती.
सर रतन टाटा आणि सरकार यांच्यात विविध अटींवर सहमती झाल्यानंतर काम सुरू झाले. उत्खननाचे नेतृत्व पुरातत्वशास्त्रज्ञ डी. बी. स्पूनर यांनी केलं होतं. विशेष म्हणजे स्पूनर हे ब्रिटिशकालीन भारताच्या पुरातत्त्व विभागात काम करणारे पहिले अमेरिकन होते. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले होते. काही काळ जपानमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्यांनी वाराणसी (बनारस) येथील संस्कृत महाविद्यालयातही शिक्षण घेतले.
पटनातील कुमरहारपासून निवडलेल्या कामगारांसह उत्खननाच्या कामाला सुरुवात झाली. एएसआयच्या १९१३ सालच्या अहवालानुसार उत्खननाच्या ठिकाणी एकाच वेळी १३ कामगार काम करत होते. सर रतन टाटा यांच्या मदतीशिवाय इतक्या मोठ्या स्वरूपात काम करणं अशक्यच होतं.
स्पूनर आणि त्यांच्या टीमला काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. उत्खननाच्या जागी उच्च भूमिगत पाण्याची पातळी असल्याने त्याचेही नियोजन करावे लागले. जमिनीपासून दहा फूट खाली जुन्या विटांच्या भिंती आढळल्या मात्र, त्या पाटलीपुत्र इतक्या प्राचीन नव्हत्या. म्हणून खोदकाम सुरूच ठेवण्यात आले. ७ फेब्रुवारी १९१३ च्या सकाळी स्पूनर आणि त्यांच्या टीमला यश आलं. शेकडो पुरातन खांब त्यांच्या हाती लागले. ते खांब मौर्यकालीन इमारतींचेच होते.
ही तर फक्त एका रोमांचकारी शोधाची सुरुवात होती.
पुढील चार वर्षांत, उत्खननात मोठ्या प्रमाणात नाणी, फलक आणि ग्रीक शैलीतील टेराकोटा स्टॅच्यू हाती आले. सर्वांत महत्वाचे म्हणजे सम्राट अशोकाचा १०० खांबांचा सिंहासन कक्ष संशोधकांच्या हाती आला.
सर रतन टाटा यांनी पाटलीपुत्र येथील उत्खननाला आपला पाठिंबा आणि मदत कायम ठेवली. या प्रकल्पात त्यांनी एकूण ७५ हजार रुपयांचे योगदान दिले. याशिवाय त्यांनी स्पूनर यांच्याशी देखील संपर्क कायम ठेवला. दुर्दैवानं, १९१८ मध्ये वयाच्या ४७ व्या वर्षी सर रतन टाटा यांचं निधन झालं. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांनी प्राचीन भारताचा वैभवशाली इतिहास जगासमोर आणण्यास मदत केली. पाटलीपुत्र येथील उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आता ‘सर रतन टाटा संग्रह’ या नावानं पटणा संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
सर रतन टाटा यांच्याकडे जेड (हिरवे मौल्यवान खडे) आणि युरोपियन कलाकृतींचा देखील संग्रह होता. त्यांनी तो मुंबई शहरासाठी दान केला. आता हा सुंदर संग्रह छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयात (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) ठेवलेला आहे.
भारतातील कला व परंपरांचे जतन करण्याचं टाटा ट्रस्टचं काम आजही अविरतपणे सुरू आहे. विशेष म्हणजे पाटलीपुत्रच्या उत्खननानंतर बरोबर १०० वर्षांनी २०१३ मध्ये, टाटा ट्रस्ट्सने दिल्लीतील हुमायू मकबराच्या जीर्णोद्धारासाठी आगा खान फाउंडेशन आणि भारतीय पुरातत्त्व संस्थेशी हातमिळवणी केली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.