आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारत एकमेव असा देश आहे जिथे देशाला ‘माता’ म्हणून संबोधले जाते. असा देश ज्याला हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाचा वारसा लाभला आहे. जिथे ‘स्त्रीत्वाची‘ कधी लक्ष्मी, कधी सरस्वती तर कधी हातात खड्ग घेऊन रणांगणात शत्रूसं*हार करणारी काली माता, अशी विविध रूपे बघायला मिळतात.
अनेक शूर लढवय्यांनी या मातीत आपला पराक्राम गाजवला. याला स्त्रिया देखील अपवाद नाहीत. तान्ह्या बाळाला पाठीवर बांधून, ‘मेरी झांसी नाही दूंगी’ म्हणणारी राणी लक्ष्मीबाई, मुलगा आग्र्यात अडकून पडलेला असूनही स्वराज्य अखंड ठेवण्यासाठी स्वतः घोड्यावर स्वार होऊन, मोहिमेचं नेतृत्व करून खेळणा उर्फ विशाळगड ताब्यात घेणाऱ्या जिजाऊ, आपल्या विरुद्ध बंड करणाऱ्या आपल्याच सरदारांविरुद्ध उभी ठाकणारी रझिया सुलतान, दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाचं जिणं मुश्किल करणारी महाराणी ताराबाई, पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारी महाराणी आबाक्का किंवा ‘स्त्रीत्वाचाच‘ त्याग करून, पुरुषाप्रमाणे राज्य करणारी ‘राणी रुद्रमादेवी‘ ही अशी नावे आहेत जी काळसुद्धा पुसून काढू शकत नाही. त्यांपैकीच एक राणी रुद्रम्मादेवीचं चरित्र आपण थोडक्यात पाहूया..
रुद्रमादेवीचा जन्म काकतीय साम्राज्यात, राजा गणपतीदेव यांच्या पोटी झाला. राजा गणपतीदेव हे आपली राजधानी वारंगळ (सध्याच्या तेलंगणा प्रांतातील) येथून राज्य करीत. रूद्रमा त्यांची एकुलती एक कन्या होती.
काकतीय साम्राज्य हे तेलंगाणात पसरले होते, तत्कालीन ‘ओरुगलु’ (सध्याचे वारंगळ) ही त्याची राजधानी होती.
काकतीय राजांनी तेलुगू राष्ट्रावर इसवीसन ११५० ते १३२३ राज्य केले. तेलंगणाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनशैली घडवण्यात काकतीय साम्राज्याचा मोठा वाटा आहे. काकतीय साम्राज्याला वारस नसल्या कारणाने, हितशत्रुपासून बचाव करण्याच्या हेतूने, राजा गणपतीदेव यांनी रुद्रमादेवीला ‘राजा रूद्रदेव‘ म्हणून जगासमोर आणले व तिची मुलगी असल्याची ओळख गुप्त ठेवली.
एखाद्या राजपुत्राप्रमाणेच रूद्रमादेवी अस्त शस्त्र, तत्वज्ञान, वेदशास्त्र यात अतिशय पारंगत होती. किशोर वयातच रूद्रमाला, रुद्रदेव म्हणून सिंहस्थ व्हावे लागले. दिलेली जबाबदारी अतिशय परखड पणे पार पाडत, न्याय करतना निष्पक्ष, दंड देतांना कठोर, व रयतेसाठी अतिशय मायाळू राणी म्हणून रुद्रमा झळाळली.
पुढे, निदाडवोलुचे राजपुत्र, ‘वीरभद्र’ यांच्याशी तिचा विवाह होऊन, त्यांना दोन मुली झाल्या.
पंड्याच्या आक्र*मणादरम्यान रूद्रमा वडिलांबरोबर राजकारभार सांभाळत होती. याच वेळी तिने काकतीय साम्राज्य दुर्बल होऊन, त्याची दुरावस्था झालेली पाहिली. जटावर्मन सुंदर पंड्या यांच्या विरुद्ध लढत असतांना मुटुक्कुर जवळील नेल्लोर येथे, राजा गणपतीदेव यांचा पराभव झाला. या लढाईत राज्याचे प्रचंड नुकसान झाले व राजा गणपतीदेव यांचा मान प्रजेत कमी होऊ लागला.
यु*द्धानंतर गणपतीदेवांनी समस्त कारभार रुद्रमादेवीच्या हाती देत, ते निवृत्त झाले. १२६१ सालापासून रुद्र्मादेवी राज्यकारभार सांभाळू लागली. तिने ‘रेणाडु, ईरूवा मुलिकिणडु आणि सत्ती‘ नावाचे किल्ले काबीज करून, राज्याला सशक्त बनवले. सामान्य प्रजेतील लोकांना, लष्करात महत्वाचा हुद्दा देत, तिने प्रजेचा विश्वास व प्रेम संपादित केले.
एक स्त्री असल्यामुळे रुद्रम्माला सतत मंत्र्याकडून होणाऱ्या तिरस्काराला व द्वेषाला सामोरे जावे लगले. ‘कुठली ही स्त्री आम्हाला राज्यकर्ती म्हणून नको’ असं म्हणून हरिहर देव आणि मुरारी देव, या तिच्या चुलत्यांनीच तिच्या विरुध्द बंड पुकारलं, पण डळमळीत न होता, रुद्रमांनी तो बंड मोडीत काढत, पुन्हा आपली पात्रता सिद्ध केली. देवगिरीच्या यादवांना हरवून, त्यांच्याशी तह करून, तिने शांतिप्रस्ताव मंजूर करून घेतला, व राज्याची सुख, शांति अबाधित ठेवली.
या सुमारास वडील गणपतीदेव व पती वीरभद्र यांना लागोपाठ देवाज्ञा झाली व रुद्रमांनी आपली अत्यंत जवळची व महत्त्वाची माणसे कायमची गमावली. पण कर्तव्यपूर्तीसाठी तिने स्वतःला सावरले व १२६९ साली तिचा यथासांग राज्याभिषेक करण्यात आला आणि रूद्रमादेवीची ‘राणी रूद्रमादेवी‘ झाली.
एक थोर वीरांगना म्हणून रुद्रमादेवींचे नाव इतिहासात अजरामर झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.