आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फालच्या मध्यभागी जगातील सर्वात जुन्या मैदानांपैकी एक असलेले मपाल कांगजेइबंग मैदान कायम गर्दीनं भरलेलं दिसतं. याठिकाणी होणारे सामने पाहण्यासाठी विलक्षण गर्दी असते. तिकीटे न मिळालेले चेहरे कुंपणातून डोकावताना दिसतात. हे वर्णन वाचून तुम्हाला असं वाटलं असेल या मैदानावर नक्की क्रिकेटचे किंवा फुटबॉलचे सामने रंगत असणार. पण, थांबा. तुमचा हा अंदाज साफ चुकला आहे! मणिपूरमधील या मैदानात ‘पोलो’चे सामने रंगतात!
ब्रिटिशांनी भारतावर शेकडो वर्षे राज्य केलं. याकाळात त्यांनी आपल्या अनेक गोष्टी भारतात रुजवल्या. क्रिकेट हा खेळ त्यापैकीचं एक आहे. मात्र, एक खेळ असा आहे जो ब्रिटिशांनी भारतीयांकडून शिकला आहे! या खेळाचं नाव आहे ‘पोलो’. जगाला पोलोची ओळख जरी ब्रिटिशांनी करून दिली असली तरी मात्र, त्याचं मूळ भारतातील मणिपूरमध्ये आहे.
दुर्दैवानं काहीशा अंधारात जन्माला आलेला आणि आता सुदैवानं जागतिक ओळख मिळालेला पोला हा खेळ नेहमीच मणिपुरी विचारधारेचा एक अविभाज्य भाग राहिलेला आहे. अठराव्या शतकाच्या प्रारंभी सतत विस्तारत जाणारं ब्रिटिश साम्राज्य आणि मंगोलियन वंशाचा प्रभाव असलेलं मणिपूर यांच्यात सांस्कृतिक संबंध जुळताना दिसले.
सुरमा व्हॅली या दोन संस्कृतींच्या मिलनाचं केंद्र बनलं. बर्मीज लोकांशी झालेल्या विनाशकारी युद्धामुळं मणिपुरीचे राजकुमार चौरजित, मरजित, नरसिंह आणि गंभीर सिंह यांना कछरमध्ये (हा प्रदेश आता आसाममध्ये आहे) स्थायिक व्हावं लागलं. कछरचा हिरवागार प्रदेश ब्रिटीशांच्या भारतातील साम्राज्याचा सीमावर्ती भाग होता.
ब्रिटिशांनी मणिपुरी राजकुमारीला घोड्यावरून लढाईचा सराव करताना घोड्यावरून हॉकी सारखा एक विचित्र खेळ खेळताना पाहिलं. मणिपुरी लोकांची एक सवय विचित्र होती. त्यांनी युद्धात किंवा शांततेत कधीही त्यांच्या लहान घोड्यांना रिकामं सोडलं नाही.
यु*द्धाच्या वेळी रणांगणावर आणि शांततेच्या काळात हॉकीसारखा खेळ खेळण्यात ते त्यांचा वापर करायचे. मणिपुरी लोकं नक्कीच ब्रिटिशांसाठी धोकादायक ठरू शकतात, असा अंदाज त्यांना आला. ब्रिटिशांनी तत्काळ गंभीर सिंहाशी मैत्री करून चांगले संबंध प्रस्थापित केले.
ब्रिटिश उत्तम निरीक्षक आणि विद्यार्थी होते. घोड्यावर बसून खेळल्या जाणाऱ्या हॉकीसारख्या विचित्र खेळात ब्रिटिशांना भविष्यातील एकदम सभ्य क्रिडा प्रकार दिसला. त्यांनी मणिपूरच्या लोकांकडून हा खेळ शिकून घेतला आणि १८५९ साली कछरमध्ये जगातील पहिल्या पोलो क्लबचा जन्म झाला.
त्यानंतर ब्रिटनमध्ये अनेक पोलो क्लब्सची स्थापन झाली. जुलै १८७१ मध्ये ग्रेटर लंडनच्या हौनस्लो हीथ येथे लान्सर्स आणि हसर्स या दोन क्लबमध्ये पहिला व्यावसायिक पोलो सामना रंगला. ब्रिटिशांनी भारतातून आपल्या सोबत नेलेला पोलो अल्पावधीत जगभर पोहचवला.
१८७५ साली इंग्लंड आणि यूएसए यांच्यातील सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला. हर्लिंगहॅम पोलो असोसिएशनने हा सामना आयोजित केला होता. या असोसिएशननं पहिल्यांदा पोलोचे इंग्रजीचे नियम तयार केले होते.
पोनी (बुटका घोडा) हा पोलोचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन मणिपुरी साहित्यात, मणिपूरच्या प्राचीन कथांमध्ये पोनींविषयी माहिती मिळते. ‘ओग्री’ या प्राचीन पुस्तकातील लिखाणानुसार, ‘सर्वशक्तिमान देवानं पृथ्वीची निर्मिती पूर्ण केल्यानंतर त्यानं आपल्या भावाला (अपनबा) मानवाची निर्मिती करण्यास सांगितलं. मानव पृथ्वीचा कारभार सांभाळेल असा त्यामागचा हेतू होता. अपनबा यानं आपल्या पत्नीशी सल्लामसलत करून पृथ्वीवर मानवाची आणि शेतीची निर्मिती केली.
या प्रकारानं देवाचा मुलगा अशिबा याच्या मनात द्वेषाची भावना निर्माण झाली. त्यानं शॅमटन अयंगबाची (पहिली पोनी) निर्मिती केली आणि तिला मानव व शेती नष्ट करण्यासाठी नेमलं. अपनबा आणि त्याची पत्नी दोघेही शमॅटन अयंगबाशी लढले. नंतर मानवांनी शॅमटनचा वापर कष्टाची कामे करण्यासाठी आणि प्रवासासाठी केला.(जगाची निर्मिती आणि मानवाच्या जन्माबाबत प्रत्येक संस्कृतीचं स्वत:चं एक व्हर्जन असतं. त्याचप्रमाणं मणिपूरचं देखील आहे.)
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने १९९१ च्या आवृत्तीत पोलोची उत्पत्ती मणिपूरमध्येच झाल्याचं नमूद केलं आहे. इसवी सन पूर्व ३१०० मध्ये हा खेळ सगोल कांगजेई म्हणून खेळला जात होता.
मणिपुरी साहित्यानुसार राजा कंबा यानं पोलोची सुरुवात केली होती. उक्रॉन्ग होंगबा, कांगबा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या उत्सवांच्या वेळी मणिपूरचा राजा कंबा यानं जमिनीवर पोलोचं कौशल्य दाखवलं होतं.त्यानंतर त्यानं आपल्या प्रजेला देखील घोड्यावरून हा खेळ खेळण्याची संमती दिली.
राजाच्या इच्छेनुसार त्याचे अधिकारी आणि सामान्य नागरिक त्यांच्या पोनींसह उत्सवाच्या ठिकाणी जमले. राजानं सांगितल्याप्रमाणं त्यांनी खेळ खेळायला सुरुवात केली. हा खेळ राणी लीमा तनु सनानं सुद्धा प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहिला होता. तेव्हापासून मणिपूरमध्ये नियमित हा खेळ खेळला जातो. हाच खेळ ब्रिटिशांनी पोलो नावानं प्रसिद्ध केलेला आहे.
काळाच्या ओघात भारतात पोलोनं अनेक चढउतार पाहिले. १८९२ साली भारतात ‘इंडियन पोलो असोसिएशन’ (IPA) ची स्थापना झाली होती. त्यांनी थोड्याफार प्रमाणात पोलोला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या महायु*द्धात घोडदळाचे यांत्रिकीकरण झाल्यामुळं पोलोमध्ये रस कमी झाला. मात्र, स्वातंत्र्यानंतर भारतात पुन्हा पोलो स्पर्धा सुरू झाल्या.
जयपूर, दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद येथील पोलो क्लबनं नियमित स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली. आयपीएने अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय पोलो संघाला १९५० साली भारत भेटीसाठी आमंत्रित केलं. पोलोबाबत स्वारस्य निर्माण करण्यासाठी देशभरात अनेक सामने खेळवण्यात आले. अर्जेंटिना संघानं जयपूर, दिल्ली आणि मुंबई येथील स्पर्धांमध्ये भाग घेतला.
१९५५ साली पाकिस्तानी लष्कराच्या पोलो संघानं भारताला भेट दिली. आयपीएनं १९५६ साली भारतीय पोलो चॅम्पियनशिपचं पुनरुज्जीवन केलं. भारतीय राष्ट्रीय पोलो संघाने फ्रान्समध्ये १९५७ साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला आणि स्पर्धा जिंकली. भारतीय लष्करानं अधिकृतपणे पोलोला खेळ म्हणून स्वीकारलं आहे.
गेल्या काही वर्षामध्ये मणिपूरमध्येही पोलोनं पुन्हा उभारी घेतली आहे. मणिपूरमध्ये दरवर्षी राज्य सरकार १० दिवसांचा ‘सांगई’ पर्यटन महोत्सव आयोजित करते. या दरम्यानं पोलो स्पर्धेचे देखील आयोजन केलं जातं. मणिपूर पोलो इंटरनॅशनल आणि सांगई फेस्टिव्हल हे जगभरातून मोठ्या संख्येन पर्यटकांना आणि पोलोप्रेमींना आकर्षित करतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.