आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एक कल्पना करा-तुम्ही एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात राहत असुन कसंतरी दोन वेळच्या जेवणाची सोय करत आहात. दिवसभर काम करुन गरजेपुरते पैसे कमवत असतानाच तुम्ही एक जाहिरात बघता. एका शीतपेयाच्या बाटलीच्या खरेदीवर तुम्हाला ४०,००० अमेरिकन डॉलर्स मिळू शकतात. ४०,००० अमेरिकन डॉलर्स एवढी मोठी रक्कम तुमचे भविष्य पालटण्यास पुरेशी असेल.
एके दिवशी विजेत्यांची घोषणा होते आणि तुम्ही जिंकलेले असता. ४०, ००० अमेरिकन डॉलर्सचे स्वप्न रंगवत असताना एवढ्या पैशात काय काय विकत घ्यायचं याचा आराखडा बांधत असतानाच तुम्हाला कळते की तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत. सगळं बरोबर असुनही तुम्हाला ते पैसे भेटणार नाहीत याचं कारण शीतपेय बनवणारया कंपनीचा हलगर्जीपणा असं दिलं जातं. या घटनेने तुम्हाला धक्का बसला नाही तर नवलच. रंकाचा राजा होताना झालेला आनंद क्षणात राजाचा पुन्हा रंक झाल्याच्या भावनेने गुडूप होईल. तुम्हाला त्या कंपनीचा रागही येइल.
आता तुम्ही म्हणाल की ही अशी कल्पना कशासाठी? तर ही काल्पनिक वाटणारी गोष्ट ९० च्या दशकात खरंच घडली होती. पेप्सी जी आता घरोघरी आनंदाने पिली जाते, या घटनेस जबाबदार असणारी शीतपेय कंपनी होती. आज आपण याच घटनेचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पेप्सी फिलीपाईन बाजारात आपले पाय घट्ट रोवायचा प्रयत्न करत होती. या ठिकाणी आधीच कोका-कोलाने आपले वर्चस्व निर्माण केले होते. फिलीपाईन ही जगातील १२ वी सगळ्यात मोठी शीतपेयांची बाजारपेठ होती. अर्थव्यवस्था हलाखीची होती. बरेचसे लोक बेरोजगार होते. लाखो लोक भाताच्या शेतात रोजगार म्हणुन अगदी कमी पगारावर काम करत होते.
पेप्सीच्या अधिकाऱ्यांनी प्रमोशनसाठी एक युक्ती शोधुन काढली. प्रत्येक पेप्सीच्या बाटलीच्या झाकणावर एक क्रमांक असेल जो एका विशिष्ट रकमेच्या बक्षिसाशी निगडीत असेल. असे बरेचसे छोटेछोटे विजेते राहणार होते आणि फक्त २ मोठे म्हणजेच ४०,००० अमेरीकन डॉलर्स मिळवणारे विजेते राहणार होते.
या युक्तीने पेप्सीला मोठ्या फायद्याची अपेक्षा होती. कमी उत्पन्न गटातील ग्राहक मिळवण्यासाठी ही युक्ती त्यांच्या कामी येणार होती. एकूण बक्षिसाची रक्कम २० लाख अमेरीकन डॉलर्स एवढी ठेवण्यात आली होती.
परंतू, पेप्सीच्या या योजनेला एका छोट्याशा संगणकाच्या चुकीमुळे मोठा सुरुंग लागणार होता.
पेप्सीच्या बाटल्यांची झाकणे तयार करणाऱ्या कंपनीने ‘३४९’ हा क्रमांक असलेल्या एकूण ८,००,००० बाटल्या तयार केल्या. पेप्सीचे दुर्दैव असे की हा ३४९ क्रमांक निगडित होता तो ४०,००० अमेरीकन डॉलर्स या बक्षिसाच्या रकमेशी. म्हणजेच जिथे पेप्सीला फक्त २ विजेते निवडायचे होते तिथे आता चक्क ८,००,००० एवढे विजेते त्यांना निवडावे लागणार होते.
एक रंजक बाब म्हणजे ३४९ हा क्रमांक असलेल्या बाटल्या न बनवण्याचा आदेश पेप्सीने त्यांच्या सगळ्या छोट्या कंपन्यांना आधीच दिला होता. तरीही निव्वळ एका छोट्या चुकीमुळे पेप्सीला आता ३२०० करोड डॉलर्सची रक्कम निव्वळ बक्षिस म्हणून द्यायची वेळ आली होती.
पेप्सीला या युक्तीचा लाभ झाला. पेप्सीची मार्केटमधील भागीदारी ४% वरुन थेट २४.९% एवढी झाली. बक्षिस जिंकण्याच्या आशेने लोक पेप्सी विकत घेत सुटले होते.
परंतु पेप्सीला आपल्या या चुकीचा अंदाज लगेच आला नाही.
ज्या दिवशी विजेते घोषित होणार होते, त्या दिवशी पेप्सीने ३४९ हा क्रमांक ४०,००० डॉलर्सच्या रकमेशी निगडीत असल्याची घोषणा केली आणि फिलीपाईन्समध्ये ८,००,००० लोकांना आपण ही रक्कम जिंकल्याचे कळाले. सगळीकडे जल्लोष सुरु झाला.
पेप्सीला आपली चूक कळाली आणि पेप्सीचे अधिकारी थबकलेच. यावेळी पेप्सीला मोठी मानहानी सहन करावी लागणार होती. ८,००,००० लोकांचा विश्वास तोडण्यामागे फक्त एक यंत्रणेची चुक हे कारण लोकांना पटणारे नव्हते. पेप्सीने लोकांची माफी मागितली पण अपेक्षाभंगाने रागावलेले ग्राहक ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हतेच. पेप्सीने मग प्रत्येकाला १८ अमेरिकन डॉलर्स द्यायचे घोषित केले. प्रत्येकी १८ डॉलर्स ही कंपनीला ८७ लाख डॉलर्स एवढे नुकसान घडवून आणणार होते. लोकांना ही ऑफरही स्वीकारार्ह नव्हती.
विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झालेल्या ग्राहकांनी संघ स्थापन केले. पेप्सीविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली. सरकारी इमारती आणि पेप्सीची विविध केंद्रे लोकांच्या गर्दीने अडवली जात होती. प्रकरण चांगलंच चिघळलं. दं*गली सुरु झाल्या.
याच दं*गलीत पेप्सीच्या ३०पेक्षा जास्त ट्रक उलथून लावत जाळून टाकण्यात आल्या. परिस्थिती अजून हाताबाहेर जाऊ लागली. पोलीस बोलवण्यात आले. लोकांनी पोलिसांवरही दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मग अश्रुधुराचा वापर सुरु केला. एका आंदोलकाने एक हातबॉ*म्ब एका पेप्सीच्या ट्रकवर फेकला असता त्यात एका महिलेचा आणि छोट्या मुलीचा मृत्यू झाला.
हा लढा बरेच दिवस सुरु होता. या सगळ्यात ५ लोकांचा मृत्यू झाला, कित्येक जखमी झाले. हे सगळं फक्त एका छोट्या चुकीमुळे.
हे सगळं घडल्यानंतर पेप्सीला कोर्टात जाऊन स्वत:ची चूक सिद्ध करावी लागली. अनेक पुरावे आणि खटल्यानंतर पेप्सीने ही चूक मुद्दाम केली नसल्याचे सिद्ध झाले. या सगळ्यात पेप्सीचे २ करोड डॉलर्स एवढे नुकसान झाले. त्यांची बाजारातील भागिदारी जमीनदोस्त झाली.
पेप्सीने तरीही हिंमत न हारता स्वत:च्या अंतर्गत कामाचं स्वरुप पुन्हा एकदा तपासून बघितले आणि पुन्हा सुरुवात केली. तळापासून सुरुवात करुन पुन्हा पेप्सी एक मोठा शीतपेय व्यवसाय उभारण्यात यशस्वी झाली हे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे एवढं मात्र नक्की!