आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बाळू पालवणकर, हे नाव बहुतांश लोकांना माहिती नसेल पण गेल्या शतकातला सर्वोत्तम गोलंदाज असण्याचा बहुमान या नावावर नोंदवण्यात आला आहे. अस्पृश्यतेशी लढा देऊन इंग्रजांच्या खेळात आपल्या डावखुऱ्या गोलंदाजीची छाप सोडणारा हा एक मोठा खेळाडू होता.
दलित लोकांसाठी बाळू हा एक स्टार होता. ज्यावेळी आंबेडकर नावाचं चक्रीवादळ भारताच्या शोषणमुक्तीच्या वर्तुळात घोंघावत होतं, त्यावेळी बाळू पालवणकर हासुद्धा जातिभेदाच्या भिंतीला सुरुंग लावत समतेसाठी संघर्ष करून आपले अस्तित्व निर्माण करत होता.
अनेक इतिहासकारांनी त्याला दलितांचा नायक म्हणून देखील संबोधले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाळू पालवणकरला आपला आदर्श मानत होते. त्यांना वाटायचं की बाळू पालवणकरने एका अशा समाजाचा पाया रचला आहे ज्याचे तत्व समानता आणि समाजोन्नती असणार आहे. परंतु बाळू पालवणकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कालांतराने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते.
१८७५ साली धारवाडमध्ये एका चांभाराच्या घरात बाळू पालवणकरांचा जन्म झाला. बाळूचे वडील ब्रिटिश सैन्यदलात नोकरीला होते. चार भावंडांमध्ये हे सर्वांत मोठे होते.
लहानपणापासून त्यांना क्रिकेट खेळण्याची आवड होती. ते त्यांचे लहान बंधू शिवरामसोबत नेहमी क्रिकेट खेळायचे. त्यासाठी पुण्याच्या सरकारी निवासस्थानाच्या मागील भंगार बाजारातील वस्तूंचा वापर करायचे.
तो काळ असा होता, ज्यावेळी भारतीय समाज मनावर क्रिकेटचा मोठा पगडा असला तरी तो खेळ जातिभेदापासून अलिप्त नव्हता.
मुंबई प्रांतात ब्रिटिश, पारसी आणि हिंदूंमध्ये तिरंगी सामने खेळले जायचे.
१९१२ साली मुस्लिमांच्या संघाला देखील खेळण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. यामुळे हा तिरंगी सामना चौरंगी झाला.
इतिहासकार बोरिया मुजुमदार लिहितात की, धारवाडच्या एका चांभार कुटुंबात जन्माला आलेली पोरं, ज्यांना उच्चवर्णीय डेक्कन जिमखान्याच्या खेळाडूंनी सोबत खेळण्यास मज्जाव केला होता, त्यांनी कालांतराने त्याच डेक्कन जिमखाना क्लबच्या विरोधात पुना जिमखाना क्लबकडून क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत त्यांना धूळ चारली होती.
इतकंच नाही तर चारही भावांनी म्हणजे बाळू, शिवराम, विठ्ठल आणि गणपत पालवणकर यांना मुंबई प्रांताच्या हिंदू संघात घेण्यात आले. या चारही भावंडांंनी मोठा पराक्रम गाजवला होता.
ज्या उच्च वर्णीय हिंदूंनी त्यांना खेळण्यास एकेकाळी मज्जाव केला होता, त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे भावंड खेळले, इतकेच नाही तर हिंदू संघाला चौरंगी मालिकेत विजय मिळवून दिला. यात विठ्ठल हा हिंदू संघाचा कर्णधार होता.
बाळू पालवणकर सुरुवातीला क्रिकेट ग्राऊंडच्या खेळपट्टीच्या संयोजनाचे काम बघत. ही खेळपट्टी पारसी लोकांची होती. यासाठी त्यांना महिन्याला तीन रुपये इतका पगार मिळत होता.
१८९२ साली, त्याच पारसी क्लबने बाळू यांना कायम नोकरीवर ठेवलं आणि चार रुपये पगार देण्यास सुरुवात केली. बाळू नेट लावणे, खेळपट्टी आरेखन करणे, गवत कापणे यांसारखी कामे करतात.
अनेक ब्रिटिश याठिकाणी खेळायला एकत्र येत होते. यातच बाळू यांच्या अद्भुत गोलंदाजीची झलक बघायला म्हणून ते त्याला बॉलिंग करायला लावत. गोलंदाजी ही बाळूंंना लाभलेली दैवी देण होती.
जेजी ग्रेग नावाचा एक ब्रिटिश फलंदाज होता, तो बाळू यांना त्याला जितक्या वेळेस आउट केलं तितक्या वेळेस आठ अणे द्यायचा. त्या पैशासाठी का होईना बाळू गोलंदाजीचा सराव करू लागले.
परंतु बाळू यांना फक्त गोलंदाजी करायची संधी मिळत होती, ब्रिटिश त्यांना फलंदाजी करायला कधीच आमंत्रित करत नव्हते. अर्थात याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. बाळू यांच्या भन्नाट गोलंदाजीच्या चर्चा सर्वदूर पसरल्या. हिंदूंमध्ये मोठा वाद निर्माण झाला की एका अस्पृश्य खेळाडूला आपल्या संघात स्थान द्यायचे की नाही.
हिंदूंमध्ये मोठा वर्ग त्यांना संघात घेण्याच्या बाजूने होता पण अनेकांच्या मनावर जातीची जोखड घट्ट बसल्यामुळे त्यांनी बाळूंंना विरोध चालूच ठेवला. हा लढा फक्त बाळू यांना संघात स्थान देण्याचा नव्हता तर एका अस्पृश्याला समान भागीदार म्हणून संघात स्थान देण्याचा होता. शेकडो वर्षांच्या अन्यायकारक जातीव्यवस्थेला सुरुंग लावण्याचा होता.
अखेरीस बाळू यांना खेळण्याची संधी प्रदान करण्यात आली. बाळू यांनी संधीचे सोने करत कमकुवत हिंदूंचा संघाला बलाढ्य ब्रिटिश संघाला पराभूत करण्यास मोठी मदत केली.
पुण्यातील त्यांंच्या कामगिरीची चर्चा मुंबईपर्यंत येऊन पोहोचली. मुंबईत त्यांना १८९६ साली परमानंददास जीवनदास हिंदू जिमखान्यात खेळण्याची संधी प्रदान करण्यात आली. मुंबईच्या तिरंगी मालिकेत खेळणाऱ्या या मोठ्या संघात स्थान मिळणे बाळू यांच्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट होती.
पुण्यात त्यावेळी प्लेगचा प्रादूर्भाव निर्माण झाल्यामुळे बाळू आपल्या परिवाराला घेऊन मुंबईला स्थलांतरित झाले. त्यांना ब्रिटिश सैन्यात एक नोकरी मिळाली. त्यांना मध्य रेल्वेने नोकरी प्रदान करत जिमखान्यात खेळण्याची परवानगी दिली.
असं असलं तरीही बाळू यांना जातीभेदाचा सामना करावा लागतच होता. त्यांना वेगळ्या कपात चहा दिला जात असे, इतर संघासारखी समान वागणूक दिली जात नसे. त्यांना जेवणसुद्धा वेगळ्या ठिकाणी बसून करावं लागत होतं.
१९०६ साली झालेली तिरंगी मालिका बाळू यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी सिद्ध झाली. हिंदू संघाने आधी फलंदाजी करत २४२ धावा केल्या, ब्रिटिश संघ १९१ वर गारद झाला. पुढच्याच खेळात हिंदूंनी १६० धावा करत ब्रिटिशांसमोर २१२ धावांचे लक्ष ठेवले.
बाळूंनी या सामन्यात चमत्कार करत १०२ धावांवर ब्रिटिश संघाला रोखले. पाच विकेट्स मिळवल्या आणि हिंदू संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यांच्या स्विंग गोलंदाजीने ब्रिटीशांचा पराभव केला. त्यांच्या ह्या कामगिरीचे सर्वदूर कौतुक करण्यात आले.
बाळू यांच्या कामगिरीमुळे पुढे बॉम्बे जिमखान्याचा संघात त्यांचे बंधू शिवराम यांचा समावेश करण्यात आला. एका हिंदू संघात चांभार भावांंना स्थान प्राप्त होणे ही फार क्रांतिकारक घटना होती.
१९११ साली इंग्लंड आणि भारताच्या जिमखाना संघात १२ सामन्यांची मालिका झाली. ज्यातील १० सामने भारत अत्यंत अपमानास्पदपणे हरला. परंतु अशा परिस्थितीत देखील बाळू यांनी अप्रतिम कामगिरी करत ८७ विकेट्स मिळवल्या आणि ३७६ धावा देखील केल्या.
बाळू हे दलितांचेच नाहीतर स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिनिधी बनले होते. एकदा एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रण पाठवले. मोठ्या थाटामाटात बाळू यांचा सत्कार करण्यात आला. बाळू यांचा सत्कार ज्या माणसाने केला त्याचे नाव होते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.
डॉ. आंबेडकरांनी त्यावेळी नुकतंच भारतीय राजकारणात पाऊल टाकलं होतं. बाळू यांचा सत्कार खरंतर त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम होता.
आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी ह्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हटले आहे की आंबेडकर त्यावेळी सिडनहॅम कॉलेजात प्राध्यापक होते. त्यावेळी बाळू मुंबई महानगरपालिकेत नोकरी करायचे.
बाबासाहेब बाळू यांना आपला आदर्श मानायचे. परंतु कालांतराने ह्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आणि ते एकमेकांपासून दुरावले.
बाळू हे कितीही यशस्वी खेळाडू असले तरी त्यांची कधीच कर्णधारपदी नेमणूक केली जात नव्हती. १९१० ते १९२० मधल्या चौरंगी सामन्यात त्यांना कर्णधार बनवण्यात यावे यासाठी अनेक लोक मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत होते. १९१३ झाली हिंदू संघाचे कर्णधार एम डी पै स्वतः म्हणाले होते की, “माझ्यापेक्षा बाळू कधीही उत्तम कर्णधार होऊ शकतो.”
१९२० नंतर अचानक बाळू यांना संघातून काढण्यात आले. त्यांचा लहान भाऊ विठ्ठल एक अफलातून फलंदाज होता. तो कर्णधारपदाचा उमेदवार असून देखील त्याला डावलून डी. बी. देवधर नावाच्या एका उच्चवर्णीय व्यक्तीची कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली.
यामुळे बाळू, विठ्ठल आणि शिवराम ह्या बंधूंनी बंड करून संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सामजिक आणि शैक्षणिक स्थान ह्याला खेळात स्थान नसावे, अशी ह्या बंधूंची मागणी होती. याचा उल्लेख त्यांच्या एका पत्रात आढळून येतो.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाळू यांना उपकर्णधारपद बहाल करण्यात आले. देवधर यांना कर्णधारपदावरून हटवून पुन्हा पै यांची नेमणूक करण्यात आली. सामन्यादरम्यान पै यांनी मुद्दाम जखमी होण्याचं ढोंग करत बाळू यांना कर्णधारपदाचा वापर करू दिला.
परंतु तिन्ही भावातील असंतोष शांत झाला नव्हता. अखेरीस एकेदिवशी विठ्ठल याची हिंदू संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर झालेल्या एका सामन्यात विठ्ठल ह्या दलित तरुणाच्या नेतृत्वात हिंदू संघाने ब्रिटिश संघाला धूळ चारली. हा एक ऐतिहासिक क्षण होता.
बाळू महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. ते गांधीजींचे समर्थक होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा गांधींसोबत कायम वितुष्ट होते. गांधीजी हे दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणी विरोधात होते. आंबेडकर त्यासाठी मोठे प्रयत्न करत होते.
गांधीजींना हिंदू धर्म भंगण्याची भीती होती तर आंबेडकरांना समानतेची अपेक्षा होती. गांधीजी हट्टाला पेटले आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केली.
गांधीजी त्यावेळी पुण्याच्या येरवडा तुरुंगात होते. बाळू आणि तमिळ नेते एम. सी. राजा यांनी आंबेडकराना विनवण्या केल्या की त्यांंनी हट्ट सोडून गांधींशी चर्चा करावी. त्यांच्या या मागणीला मान देत आंबेडकर गांधींना भेटले आणि गांधी-आंबेडकर यांच्यामध्ये ऐतिहासिक पुणे करार झाला.
१९३७ साली बाळू आणि डॉ. आंबेडकर दोघेही मुंबई मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होतेे. बाळू हे आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेने नाराज होते.
इतिहासकार रामचंद्र गुहा लिहितात की, बाळू यांची महात्मा गांधींवर श्रद्धा होती आणि त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी निवडणूक लढवली. त्यांना माहिती देखील नव्हते की कोणत्या मतदारसंघात त्यांना निवडणुक लढवायची आहे. दुर्दैवाने ते त्याच मतदारसंघात आले ज्यात त्यांच्या विरोधात आंबेडकर होते.
बाळू यांना आंबेडकरांच्या विरोधात निवडणूक लढवण्यात रस नव्हता पण त्यांनी ती निवडणूक लढवली. २००० मतांचा अत्यल्प फरकाने बाळू पालवनकर पराभूत झाले.
क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या बाळू यांचे १९५५ ला स्वतंत्र भारतात मुंबईत निधन झाले. सांताक्रूझला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अनेक दिग्गजांनी त्यांना मानवंदना दिली. एका नव्या भारतासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.