आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
पुस्तकांच्या जगात हरवलेला माणुस या बाह्य जगात स्वत:ला कधीच शोधून मोकळा झालेला असतो. अर्थात, सगळ्यांना वाचायला आवडेलच असंही नाही. पुस्तकं म्हटलं की काहींच्या मनात धडकीच भरते. पण ज्यांना आवडते त्यांनी पुस्तकांच्या मार्फत अनेक आयुष्यांशी ओळख करुन घेतलेली असते.
आजकाल डिजिटल झालेल्या युगामुळे पुस्तकेही आता डिजिटल स्वरुपात उपलब्ध होऊ लागली आहेत. परंतु तरीही नवीन छापील पुस्तके उघडल्यानंतर येणाऱ्या त्या सुगंधाची मजा काही औरच.
आज आम्ही तुम्हाला आपल्याला हे परमसुख अनुभवण्याची संधी देणाऱ्या एका अवलियाची ओळख करून देणार आहोत. या व्यक्तीचे नाव आहे मुंशी नवल किशोर.
छपाईच्या इतिहासाची सुरुवात भारतात झाली ती १५५६मध्ये. पोर्तुगालच्या जेझुइट धर्मगुरुंनी जेव्हा गोव्यामध्ये पहिला छपाई कारखाना सुरु केला. १५७७मध्ये पोर्तुगीज लेखाचे तामिळ भाषांतर, डॉक्टरिना ख्रिस्तम हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर मात्र भारतात पुढील दोन शतकं छपाई क्षेत्रात उल्लेखनीय असे काही झालं नाही.
तज्ज्ञांच्या मते मुघल काळात सुंदर कैलीग्राफ आणि छायांकित केलेले हस्तलिखीत लोकांना जास्त आवडत असत.
१८व्या शतकाच्या शेवटी छपाई यंत्रणा वेग धरु लागली, धर्मगुरुंनी आपले विचार आणि सुचना मांडण्यासाठी छापील लेखांचा आधार घेण्यास सुरुवात केली आणि तेव्हाच भारतीयांनाही छापील लिखाणाची किंमत कळण्यास सुरुवात झाली. पुढे जाऊन १९व्या शतकाच्या मध्यकाळात भारतातही बऱ्याच प्रमाणात छपाई कारखाने सुरु करण्यात आले.
छपाईच्या या व्यावसायिकीकरणाने वाचन क्षेत्रात क्रांती घडून आणली. छापील साहित्य सहजतेने उपलब्ध झाले आणि त्यातुन वैचारिक क्रांतीची सुरुवात झाली. पुढे जाऊन हीच वैचारिक क्रांती स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचणार होती.
मुंशी नवल किशोर (१८३६-१८९५) हे छपाई माध्यमातील कोणी दिग्गज नव्हते, किंवा मोठे लेखकही नाही. परंतु तरीही त्यांना श्रेय देणं गरजेचं आहे ते त्यांनी लेखकांना, वाचकांना छपाईचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल.
पुस्तकांचं प्रकाशन करुन त्यांचे व्यावसायिकीकरण करण्यात त्यांचा मोठा हात होता. लोकांना ही पुस्तके कमी आणि परवडणाऱ्या दरात विकत घेता येतील याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्ञान, साहित्य आणि विज्ञान यांचा प्रवाह सामान्य माणसाच्या दारात पोहचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. हिंदी आणि उर्दू भाषेतील बऱ्याच पुस्तकांची छपाई त्यांनी केली.
नवल किशोर यांचा छपाई कारखाना म्हणजे त्याकाळातील एका यशस्वी व्यवसायाची कहाणी आहे. उत्तर भारतात ब्रिटिशांचा असलेला प्रभाव, त्यामुळे तेथील सामाजिक आणि राजकीय जीवनात त्याचे उमटणारे पडसाद त्यांच्या या यशस्वीतेच्या कहाणीत ठळकपणे दिसून येतात.
त्यांचे पूर्वज मुघलांच्या दरबारी कारकून होते. त्यांच्या कामावर खुश होऊन मुघलांनी त्यांना जहागिरी दिल्या. त्यातल्याच एका संस्थानात, अलीगढ जवळ असलेल्या सासनी येथे नवल किशोर यांचा जन्म १८३६ साली झाला.
संस्कृत विद्वानांनी भरलेल्या घरात नवल किशोरजींनी बालपणातच आपल्या विद्वत्तेची चुणूक दाखवली. मुघली वातावरणात वाढल्याने पर्शियन भाषेवर सुध्दा त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं. १८५२मध्ये त्यांनी आग्रा विद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांना पर्शियनबरोबर इंग्रजी भाषाही शिकवली गेली.
काही कारणास्तव त्यांनी पदवी शिक्षण अर्धवट सोडून लाहोरला कोह-ए-नूर येथील छपाई कारखान्यात जाऊन नोकरी पत्करली. जिथे त्यांनी पहिले पंजाबी उर्दू वृत्तपत्र सुरु केलं.
१८५६च्या सुरुवातीला ते आग्राला आले आणि स्वत:चे वृत्तपत्र चालवण्यास सुरुवात केली. त्याचे नाव होते सफीर-ए-आग्रा. त्याच वर्षी ते लाहोरला परतले आणि १८५७पर्यंत तिथेच थांबले.
त्यावेळी व्यावसायिक फायद्यासाठी का असेना पण त्यांनी ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले हे मान्य करायलाच हवे. बाकीच्या उद्योगपतीसारखेच त्यांनाही ब्रिटिशांच्या जाण्याने निर्माण होणाऱ्या आर्थिक अस्थिरतेचा अंदाज होताच. बऱ्याच छपाई कारखान्यांचे काम बंद पडले होते आणि नवलजी आता ब्रिटिशांच्या जवळचे व्यक्ती म्हणुन ओळखले जात होते. याचाच फायदा त्यांनी घेतला.
पुढे १८५८मध्ये ते लखनऊला गेले. तिथे ब्रिटिशांचे राज्य नुकतेच निर्माण झाले होते. आर्थिकदृष्ट्या शहराची दुर्दशा झालेली असली तरी सांस्कृतीकरित्या शहर जसेच्या तसे उभे होते. याचाच फायदा घेऊन नवलजींनी नोव्हेंबर १८५८मध्ये ब्रिटिशांच्या परवानगीने छपाई कारखाना सुरु केला.
‘अवध अकबर’ नावाचं उत्तर भारतातील पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरु केलं. ब्रिटिश प्रशासनानेही आपली छपाईची कामे या कारखान्यात पाठवण्यास सुरुवात केली. १८६०मध्ये त्यांना भारतीय दंडसंहिता उर्दूमध्ये छापण्याचं काम मिळालं.
नंतर त्यांना काही अभ्यासक्रमातील पुस्तकं छापण्याचंही काम मिळाले. पुढे त्यांना वजन आणि मापनाची माहिती असलेलं ‘जमी-अल-फवैद’ हे पुस्तक छापण्याची आणि विकण्याची परवानगी १८६१मध्ये मिळाली.
ब्रिटिश प्रशासनात काम करणाऱ्या अनेक मुस्लिम मित्रांमुळे छपाई आणि प्रकाशनाबाबत सल्ले घेण्यासाठी अनेक पर्याय नवलजींकडे उपलब्ध होते. कुराणमधील बरेच प्रसिध्द धार्मिक संवाद आणि मुद्दे एकत्र करून छापण्यपासुन नवलजींनी त्यांच्या प्रकाशन व्यवसायास सुरुवात केली.
याच वेळेस त्यांनी मिर्झा गालिब यांच्याशी संपर्क साधला. त्यांची गजल प्रकाशीत करण्याबद्दल विचारले. होकार आल्यावर सुरुवातीला प्रकाशनात काही अडचणी आल्या. पण नंतर मात्र ते नियमित गालिबच्या गजली प्रकाशित करु लागले. १८६९मध्ये त्यांनी नाजीर अहमद यांची मिरत-अल-उरुस नावाची पहिली उर्दू कादंबरीसुध्दा प्रकाशित केली.
नवलजींचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वपुर्ण निर्णय म्हणजे कमी किमतीत कुराण सामान्य लोकांसाठी प्रकाशित करणे हाच होता. दीड रुपयात विकल्या जात असलेल्या त्या कुराणमुळे त्यांचं प्रकाशन घराघरात पोहचलं.
उर्दू प्रकाशनात प्रसिध्द असलेल्या नवलजींनी हिंदी भाषेतल्याही अनेक पुस्तकांचं प्रकाशन केलं. हिंदी भाषा त्यावेळी प्राथमिक भाषा नसली तरी आपली मुळे घट्ट करण्याचा प्रयत्न त्यावेळी हिंदी साहित्य करत होतं. हिंदी-उर्दू, हिंदी-ब्रज या भाषावादामुळे हिंदीचं वर्चस्व त्यावेळी कमी होतं.
नवलजींनी प्रकाशित केलेल्या काही हिंदी पुस्तकांमध्ये तुलसीदासांचं रामचरीतमानस, सुरदासांचे सुरसागर, लल्लुजी लाल यांचं प्रेमसागर या पुस्तकांचा समावेश होतो.
१८८०मध्ये इंग्रजीत तुलसीदासांचे पहिले साहित्य प्रकाशित करण्यात आले.
१८७०पर्यंत त्यांनी ३०००पेक्षाही जास्त पुस्तकांचं प्रकाशन केलं होतं. त्यात उर्दू, हिंदी, पर्शियन आणि संस्कृत याबरोबरच अरेबिक, पाश्तो, मराठी आणि बंगाली या भाषेतील पुस्तकांचाही समावेश होता. त्यातील बरीचशी पुस्तकं ही जागतिक दर्जाच्या इंग्रजी पुस्तकांची भाषांतरं होती.
१८७७मध्ये ‘अवध अकबर’ हे दैनिक वृत्तपत्र म्हणुन सुरु झालं. नवल किशोरच्या छपाई कारखान्याच्या शाखा कानपूर, गोरखपुर, पटीयाला आणि कपूरथला इथे स्थापन झाल्या. लंडनमध्येसुध्दा त्यांनी त्यांचे एक कार्यालय उघडलं. प्रकाशन आणि विक्रीबरोबरच जाहिरात क्षेत्रातही त्यांच्या नावाचा दबदबा होता.
उत्तर भारत ते कलकत्त्यापर्यंत नवल किशोरजींनी अनेक पुस्तकांची दुकानं चालवली. या दुकानांची जाहिरात ते आपल्या पुस्तकांमध्ये आणि वृत्तपत्रात देत असत.
त्याबरोबरच मुंशी नवल किशोर यांनी आग्रा विद्यालयाच्या (जिथे त्यांनी स्वत: शिक्षण घेतले) नगर समितीमध्ये सदस्य म्हणून काम बघितलं.
१८९५मध्ये नवलजींचा मृत्यू झाला. तोपर्यंत त्यांनी सुरु केलेला छपाई कारखाना एक यशस्वी उद्योग बनला जाता. सामान्य माणसाला परवडतील अशा दरात पुस्तकं विकण्याचं त्यांचं स्वप्न पुर्ण झालं होतं. त्यांच्या याच स्वप्नाने पुढे जाऊन काही प्रमाणात का असेना पण ब्रिटिशविरोधी वैचारिक क्रांतीची सुरुवात केली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.