आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय इतिहासाची पानं चाळल्यावर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे यु*द्धाच्या मैदानात पराभव होण्याचे कारण म्हणजे ‘फितुरी’. कितीही बलाढ्य आणि पराक्रमी साम्राज्यं असली तरी फितुरीच्या जोरावर परकीयांनी ही साम्राज्ये आपल्या पायाखाली चिरडून टाकली. इतिहासातून ही शिकवण घेऊनच छत्रपतींनी स्वराज्यात एक कठोर नियम केला होता. एखाद्या सैनिकावरील अथवा अधिकाऱ्यावरील फितुरीचा आरोप सिद्ध झाल्यास त्याचा शिर*च्छेद करून गडगडावरून त्याचे छाटलेले मुंडके फिरवायचे. यामुळे स्वराज्यात फितुरी करायला कोणी धजावलाच नाही.
भारतीय इतिहासाच्या सर्वच कालखंडांमध्ये आपल्याला जयचंदासारख्या प्रवृत्ती असल्याचे दिसून येईल. अशा जयचंदांवर संशय येताच कारवाया झाल्या असत्या तर आज भारताचा इतिहास आणि भूगोल वेगळा असता. असो, इतिहासात जर-तरची भाषा चालत नाही. भूतकाळाची मशाल वापरून भविष्यात आशादायी वाटचाल करावी, यासाठी इतिहास आणि पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासाचं महत्व आहे.
आजही स्वतंत्र भारताच्या बाबतीत, कित्येक संघटना आणि व्यक्ती जयचंदाचं काम करताहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे सरकार व्यवस्था अशा व्यक्ती आणि संघटनांना स्वातंत्र्याच्या नावाखाली हे सगळं करू देत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होण्याआधी सर्वांनीच जागरूक होण्याची गरज आहे.
ब्रिटिशांनीही आपल्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीबरोबरच फितुरीचीही मदत घेतली. १७५७ साली प्लासीच्या लढाईतील विजयानंतर इस्ट इंडिया कंपनीने आपले पाय भारतात मजबुतीने रोवले. याचवेळी पश्चिमेला अब्दालीची स्वारी परतवून लावत, अटकेवर भगवा फडकला होता. राघोबादादा पेशवे पेशावर मधून नानासाहेबांना खैबर खिंड ओलांडून काबुल-कंदाहारवर चाल करून जाण्याची परवानगी मागतात, जेणेकरून इराणच्या पातशहाच्या मदतीने अहमदशहा अब्दालीचे पूर्णपणे पारिपत्य करणे शक्य झाले असते. कारण इराणच्या पातशहाने पत्राद्वारे राघोबादादांना साद घातली होती. त्यामुळे आपल्यालासुद्धा ही उत्तम संधी आहे असा विचार करून राघोबादादांनी नानासाहेबांना पत्र लिहून परवानगी आणि पुण्याहून अधिक सैन्याची कुमक मागवली होती. पण नानासाहेबांनी उत्तर पाठवले त्यात त्यांनी पूर्वेला वेगळेच संकट उभे राहिल्याचे सांगितले.
ते संकट म्हणजे प्लासीची लढाई आणि त्यात इंग्रजांना मिळालेला विजय. या लढाईत बंगालचा मोगल नवाब सिराज-उद-दौलाहकडे ५० हजाराची फौज होती, शिवाय मोठा तोफखानाही होता, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे फक्त तीन हजाराची फौज होती. असं असलं तरी ब्रिटिशांनी ही लढाई लढण्याचं स्वीकारलं होतं यात विरोधाभास तर होताच, पण याच प्लासीच्या लढाईमुळे अब्दालीसारख्या बलाढ्य शत्रुवरचं लक्ष हटलं आणि इतिहासाने वेगळी कलाटणी घेतली. म्हणूनच प्लासीच्या लढाईला पानिपतच्या यु*द्धाइतकंच ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे.
पण असं काय झालं जेणेकरून इतकी मोठी फौज आणि दारुगोळा असूनही सिराजच्या फौजेने ईस्ट इंडिया कंपनीच्या तोकड्या फौजेपुढे माना टाकल्या, याचं उत्तरही फितुरी हेच आहे. धूर्त ब्रिटिश यु*द्धाच्या आधी बंगालमधील श्रीमंत आणि नामी लोकांना भेटले होते, त्यांचा हेतू कोणी फितूर सापडतो का हे शोधणं होतं. त्यांना पाहिजे तसा माणूस मिळालाच! त्याचं नाव होतं मीर जाफर. मीर जाफरला बंगालच्या गादीचे मोठे आकर्षण होते आणि त्यासाठी तो कोणाचीही कदमबोसी करण्यास तयार होता. ठरल्याप्रमाणे मीर जाफरने सैन्याची अधिक कुमक ब्रिटिशांकडे वळवण्याचे मान्य केले. पण यु*द्ध सुरु होण्यापूर्वी हेरांकरवी सिराज-उद-दौलाहला मीर जाफर फितूर झाल्याचं समजलं.
सिराजने मीर जाफरला बोलावून आपली पगडी त्याच्या पायाशी ठेवली आणि म्हणाला, हा सन्मान मला आपल्यामुळे प्राप्त झाला आहे, याची लाज राखाल याची मला खात्री आहे. मीर जाफरनेही चांगलंच नाट्य केलं आणि आपल्या महालातून कुराण आणलं.
कुराणावर हात ठेऊन सिराजला धोका न देण्याची मीर जाफरने शपथ घेतली. पण आपला शब्द राखील तो मीर जाफर कुठला, त्याने ठरल्याप्रमाणे यु*द्ध संपताना ब्रिटिशांच्या सैन्याची कुमक वाढवली आणि यु*द्धाचा निर्णय फिरला.
मीर जाफर हा अरबस्तानातून आलेला फक्त एक गुलाम होता. पण तत्कालीन बंगालचा नवाब अलीवर्दी खानचा विश्वास जिंकून त्याने बक्षी पद मिळवले. गुलाम म्हणून जरी तो आला असला तरी त्याने एक “शूर” सैनिक म्हणून नावलौकिक मिळवला, नवाब अलीवर्दी खानने नेतृत्व केलेल्या अनेक लष्करी मोहिमांमध्ये त्याने महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या.
कलकत्ता शहराभोवती भला मोठा खंदक खोदूनही ब्रिटिशांना ज्यांचं पारिपत्य करता आलं नाही, अशा नागपूरच्या रघुजी भोसल्यांच्या मराठा फौजेला त्याने पराभूत केलं असंही म्हटलं जातं. पण रणांगणात माघार घेतील ते मराठी कसले, मराठा सैन्याची दहशत ऐकून त्याने मेदिनीपूरमधून अक्षरशः पळ काढला आणि स्वतःचा भ्याडपणा सिद्ध केला.
त्यानंतर त्याने अताउल्लाहसोबत नवाबला उलथून टाकण्याचा कट रचला पण हा कट वेळीच उघडकीस आला आणि त्याला बक्षी पदावरून काढून टाकण्यात आले. नवाब अलीवर्दीच्या मृत्यूनंतर त्याचा नातू सिराज-उद-दौलाह सिंहासनावर आला, आणि त्याने मीर जाफरला बक्षीपद पुन्हा बहाल करण्याची चूक केली.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसंच काहीसं या बाबतीत घडलं. मीर जाफरने पुन्हा षडयंत्र रचले, यावेळी षडयंत्र होते शौकत जंगबरोबर हातमिळवणी करून बंगालवर थेट आक्रमण करण्याची. पण काही अघटित होण्याआधीच सिराज-उद-दौलाहला याची माहिती मिळाली, आणि त्याने मीर जाफरला पदच्युत करून त्याचा मुलगा मीर मदनला बक्षी नेमले म्हणून नेमले.
१७५६ साली सिराज-उद-दौलाहने ब्रिटिशांकडून कोसिमबाजार कारखाना जिंकला पण लवकरच ब्रिटिशांनी याला प्रत्युत्तर दिले आणि सिराज-उद-दौलाहला मुर्शिदाबादला पळ काढावा लागला. खरंतर, मीर जाफरने त्याला बंगालचा नवाब बनवण्याच्या वचनाच्या बदल्यात सिराजचा पाडाव करण्यासाठी ब्रिटिशांशी गुप्तपणे करार केला होता.
१७५७ साली रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याने मुर्शिदाबादकडे कूच केली आणि प्लासीच्या लढाईत सिराजचा पराभव केला. सिराज-उद-दौलाहचं सैन्यच मीर जाफरने विकत घेतलं होतं, त्यामुळे सुरुवातीला सिराज-उद-दौलाहला आपला विजय होत असल्याचं भासलं, पण वास्तविकतेने भारताचा इतिहासच बदलून टाकला. या लढाईत सिराज-उद-दौलाह मृत्युमुखी पडला.
मीर जाफर ब्रिटिशांचा गुलाम होऊन बिहार, ओरिसा आणि बंगालचा नवाब बनला आणि या लढाईतील विजयामुळे ब्रिटिश या भूमीला जळवासारखे चिकटून राहिले. आजही बंगालच्या काही भागांमध्ये ‘मीर जाफर’ हा अपशब्द आहे.
आजही आपल्या आजूबाजूला अशा अनेक फितुरी मानसिकता दिसतात आणि फितूरही दिसतात. अशा देशद्रोह्यांपासून सावध राहण्यातच भूतकाळाच्या मशालीच्या उजेडात उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासारखे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.