आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२८ मे हा जागतिक पाळी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पूर्वी लोक चंद्राच्या कलावरून दिवस ठरवायचे. १२ राशींपैकी चंद्र एका राशीत अडीच दिवस वगैरे राहतो त्यामुळे संपूर्ण १२ राशी फिरून चंद्र पुन्हा पहिल्या राशीत यायला २८ दिवस लागतात त्याचाच चंद्रवर्षामध्ये महिना मानला जायचा.
२८ दिवसांनी एकदा येणारी पाळी आणि ५ दिवस राहणारी पाळी म्हणून २८ मे हा जागतिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो हे संयुक्तिक वाटते.
या २८ दिवसाचे बरेच घोळ आहेत. २८ दिवसांनी येणारी पाळी आदर्श मानली जाते पण प्रत्येकाला ती २८ दिवसांनी येत नाही. बऱ्याच जणींना ती अगदी २१, २२, २३, २४ दिवसांनी येते, येत राहते. ही बाब डॉक्टरांसाठी गंभीर नसते.
डॉक्टरांसाठी २१ व्या दिवसापासून ३५ व्या दिवसापर्यंत कधीही येणारी पाळी नॉर्मल असते.
पण तरीही बघायला गेलं तर लवकर लवकर पाळी का येत राहते हा संशोधनाचा विषय ठरावा. एकाच महिन्यात १ तारखेला आलेली पाळी आणि पुन्हा त्याचं महिन्यात २५ तारखेला आलेली पाळी बाईचे प्रोडक्टीव्ह १० दिवस खाऊन टाकते.
२५ दिवसांनी ही सायकल येणं वैद्यकीय भाषेत अगदी नॉर्मल असतं. बाईसाठी प्रचंड चिडचिड आणणारं असतं. कारण पाळी एकटी येत नाही बरोबर असह्य पोटदुखी, कंबरदुखी, अंगदुखी, थकवा आणि मूड स्विंग घेवून येते. कामे बिघडवते, समारंभ असतील तर त्यातून भाग न घेता मुकाट घरात झोपून राहावं लागत, उलट्या आणि अपचन होऊन बाई मलूल पडून जाते.
मला समाजाच्या एककल्ली धोरणाचे आश्चर्य वाटते. समाजात असे काही घटक आहेत त्यांना ही पाळी एनकॅश करून घ्यायची असते. पाळी आलेली बाई सगळीकडे फिरू शकते, सगळीकडे जाऊ शकते, एव्हरेस्ट चढू शकते तिला सगळीकडे जाऊ द्यावा म्हणून जोरजोरात अजेंडे राबवणारे लोक दिसतील तुम्हाला.
पण पाळीमध्ये बायकांना असह्य त्रास होतो तो कमी कसा करता येईल, पाळीचे पहिले २ दिवस हे हक्काची वैद्यकीय रजा या संज्ञेसाठी पात्र ठरवावेत.
सरकारी तसेच खाजगी ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या बायकांना, मजूर बायकांना, क्लास वन बरोबर क्लास टू आणि क्लास थ्री महिला कर्मचाऱ्यांना, महिला सफाई कामगारांना महिन्यातील २ दिवस पाळीच्या रजा हक्क म्हणून मिळाल्या पाहिजेत यावर कधीही कुठलं कॅम्पेन का होत नाही?
पाळीचे हानिकारक प्लास्टिक पॅड्स बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना मॉडेल म्हणून अभिनेत्री लागतात, स्पोर्ट्सस्टार लागतात यांना लोकल मधून धक्के खात रोज ३ तास उभ्याने जाणाऱ्या बायकांचा विचार कधी येत नाही, यांना उसतोडणीसाठी रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या मजूर बायका दिसत नाहीत. यांना रोज दिवसभर उन्हातान्हात शहरातील रस्ते झाडणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्या बायका दिसत नाहीत, यांना शेतावर काम करणाऱ्या बायका लक्षात येत नाहीत.
तुम्ही म्हणाला यात प्रॉब्लेम काय आहे? पॅड्सची जाहिरात करायची असेल तर प्रसिद्ध चेहरा हवाच की. मला प्रॉब्लेम आहे. ज्या बायकांच्या दिमतीला २४ तास एक ट्रेनर, एक डायेटीशियन, फक्त सिलेक्टिव्ह पदार्थ बनवणारा कुक, प्लास्टिक सर्जरी करणारा डॉक्टर, चेहरा कायम फ्रेश दिसावा म्हणून रंग घासणारा मेकअपमन इतका मोठा ताफा असतो.
ज्या बायका खाऊन पिऊन सुखी आणि दिमतीला चार नोकर घेऊन वावरत असतात, ज्यांना त्यांच्या पाळीच्या दिवसात ७० रुपये मजुरी बुडवून काम न करणं परवडतं अशा बायकांनी पॅड वापरून मी एव्हरेस्ट सर करू शकते असा भोंगळ आशावाद दाखवू नये. प्लास्टिक पॅड घेऊन काय हालत खराब होते हे माझ्यासकट अनेक बायकांना ठावूक आहे.
बरं ही पाळी वेळेत आलीच नाही आणि खूप लवकर येत राहिली तरी प्रॉब्लेम असतात! PCOD/PCOS ची समस्या अगदी जागतिक स्तरावर सुरु आहे. त्यामुळे असह्य पोटदुखी असलेल्या, अनियमित पाळी येत असलेल्या बाईला, रक्ताची कमतरता होऊन अशक्त झालेल्या बाईला कुठल्या पर्वतावर चढवणार आणि कुठल्या मंदिराच्या शिखरावर उभं करणार?
माझ्या आयुष्यात वयाच्या १३ व्या वर्षापासून जशी ही पाळी आली तशी भयानक त्रासच घेवून आली आहे. पण होमिओपॅथी आणि आयुर्वेद बऱ्याच समस्यांमधून या दोन पॅथींनी माझी सोडवणूक केली आहे.
पाळीतील पोटदुखी आणि २८ दिवसांची सायकल याबाबत माझे काही अनुभव आणि निरीक्षणे आहेत.
मध्यंतरी मी पाळीची पोटदुखी कमी करण्यासाठी B1 व्हिटामिन उपयोगी पडते असा डॉ. लीला गोखले यांचा लेख वाचला. डॉ. लीला गोखले यांचा ABP माझाने मुलाखत घेतल्याचा २०१९ चा व्हिडीओ नेटवर उपलब्ध आहे. त्यांचं वय मागच्या वर्षी १०१ वर्षे होत असं व्हिडीओ मधून कळालं आत्ता या घडीला त्या पुण्यात असतील नंतर कुठली त्यांची बातमी नाही. मुंबईच्या ग्रांट मेडिकल कॉलेज मधून त्यांनी प्रसुतीशास्त्राची पदवी घेतलेली आहे.
डॉ. गोखले यांनी अगदी ५० वर्षापूर्वी पाळीतील वेदना या विषयावर संशोधन केलेले होते. त्यात त्यांना व्हिटामिन बी1, बी6चे काही गुणधर्म सापडले ज्या मासिक पाळीच्या वेदना कमी करू शकतात.
तो लेख वाचल्या नंतर मी स्वत: व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स आणि बी1, बी6 च्या स्वतंत्र कंटेंट असलेल्या गोळ्या आणल्या आणि साधारणपणे ३ महिने त्याचा कोर्स करून पाहिला. अगदी पूर्णपणे पोटदुखी गेली असं झालं नाही पण पहिल्यापेक्षा बरीच सुधारणा त्यात होती म्हणजे उठून बाहेर जाणे, कोर्टात जाणे, गाडी चालवणे या गोष्टी मी केल्या.
पूर्वी शाळेमध्ये गुळ घातलेला गव्हाचा कोंडा मिळायचा. सुकडी म्हणायचे त्याला. अहाहा! काय स्वर्गीय चव असायची त्याची. ही सुकडी म्हणजे व्हिटामिन ब जीवनसत्वाचे भांडार होते! पण आपला मेंदू लई पुढे पळतो. जीवनसत्व असलेला कोंडा कचऱ्यात आणि चवहीन मैदा रोजच्या खाण्यात अशी आपली उलटी कोलांटी उडी चालू आहे.
दुसरा माझा अनुभव आहे.
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंकच्या गोळ्यांचा. मागच्या वर्षी ६८ किलो ते ५८ किलो हे १० किलो वजन कमी करण्याची माझी मोठी रेस चालू होती तेव्हा अर्थातच नर्व्ह सिस्टीम बुस्टर तसेच इम्यून सिस्टीम बुस्टर म्हणून कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंकचे कंटेंट असलेले सप्लीमेंट मी घेत होते. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे जितके दिवस हे सप्लीमेंट घेतले तितके महिने पाळी व्यवस्थित २८ दिवसांनी आली. मॅग्नेशियम आणि झिंकबद्दल मग बरीच माहिती मी गोळा केली.
मॅग्नेशियम हे आपल्या नर्व्हस सिस्टीम वर काम करणारे सप्लीमेंट आता त्याचा रोलचं नर्व्हस सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी असतो त्यामुळे पाळीमध्ये ज्या शिरा सुजून ओटीपोट दुखते त्यात मॅग्नेशियमचा डोस आराम देतो असे बऱ्याच डॉक्टरांचे मत आहे. होमिओपॅथीमध्ये मॅगफॉस नावाचे एक औषध मिळते.
मॅग्नेशियम आणि फॉस्फरस या सप्लीमेंटचा कंटेंट असणारे ते डॉक्टर पाळीतील दुखणे थांबावे म्हणून दर १५-२० मिनिटांनी एक डोस घ्यायला सांगतात.
अनुभवाअंती जीवनसत्व बी, बी1, बी6, मॅग्नेशियम आणि झिंकचा महिमा पाळीवरच्या दुखण्यासाठी अफाट आहे. यावर अनेक तज्ञ डॉक्टरांचे लेख गुगलवर इंग्लिश भाषेत उपलब्ध आहेत.
तर तात्पर्य असे की या जागतिक पाळी दिवसाच्या निमित्ताने ज्या बाईला पाळी येते आणि वेदना होतात त्या वेदना कमी कशा करता येतील यासाठी प्रयत्न करूयात. तळागाळातील कष्टकरी स्त्रियांची आयर्न डेफीशिएन्सी, रक्ताची कमतरता, मॅग्नेशियम डेफीशिएन्सी कशी कमी करता येईल यासाठी उपाययोजना पाहूयात.
त्यासाठी सरकारी दवाखान्यातून रक्त वाढीसाठी हिमोग्लोबिनच्या गोळ्या दिल्या जातात या बायकांना आयर्न, पोटॅशियम, झिंक, जीवनसत्व ब, बी1, बी6, मॅग्नेशियम अशा मल्टी व्हिटामिनच्या गोळ्या स्वस्त दरात उपलब्ध करून देता येईल का यासाठी सरकारला सूचना करूयात. जरा पाळी बाबतचा टॅबू कमी करून रूट लेवलच्या समस्यांना वाचा फोडूयात.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.