आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
इंग्रजांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली व भारतात अ*त्याचाराचे एक नवीन युग अवतरले होते. इंग्रजांच्या या गुलामगिरीने लोकांच्या मनात इंग्रजांच्या विरोधात असंतोष खदखदत होता.
१८५७ साली इंग्रजांविरुद्ध पहिले स्वातंत्र्ययु*द्ध छेडले होते. या १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात अनेक असे क्रांतिकारक होऊन गेले ज्यांनी इंग्रजांच्या सत्तेला आव्हान देत, भारताचा स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान दिले होते. पण असे अनेक क्रांतिकारी होते, जे या लढ्यात सहभागी होऊन देखील त्यांचे नाव दुर्दैवाने कोणालाही त्यांचे नाव माहिती नाही. यापैकी एक आहेत, अल्लमा फैजले हक खैराबादी. हे कोण होते त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ…
मौलाना फैजले हक खैराबादी हे एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ, कवी आणि धार्मिक विद्वान होते. १७९७ साली उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात जन्माला आलेल्या फैजले हक खैराबादी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे दिल्लीच्या दिवाणी कचेरीत कारकून होते. त्यांच्याकडूनच मौलाना फैजले हक खैराबादी सुरुवातीच्या काळात इस्लामचे शिक्षण घेतले. पुढे शहा अब्दुल अजीज आणि त्याच्या भावाकडून त्यांनी इस्लाम समजून घेतला. पुढे ते त्यांच्याच गावात अध्यापनाचे कार्य करू लागले.
पुढे १८१६ साली त्यांनी ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांची दिल्ली कोर्टाच्या दिवाणी न्यायालयात अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. पण इंग्रजांच्या चाकरीला कंटाळून त्यांनी १८३१ साली सरकारची नोकरी सोडली.
यानंतर ते आपला बहुतांश वेळ विद्वानांसोबत घालवू लागले. याच काळात प्रसिद्ध शायर मिर्जा गालिब आणि मुफ्ती सदाउद्दीन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत फैजले हक मुघल बादशहा बहादुरशाह जफरच्या दरबारात जायचे.
यानंतर बादशहा आणि फैजले हक यांच्यातील मैत्री आकार घेऊ लागली. पुढे त्यांची बादशहाच्या दरबारात नियक्ती करण्यात आली. त्यांनी नायाधीश म्हणून तिथे सेवा देण्यास सुरुवात केली. पण काही काळाने त्यांनी बादशहाच्या दरबारातील नोकरी सोडून नवाब झुक्करच्या दरबारात सेवा देण्यास सुरुवात केली. थोड्याच दिवसात नवाबाचा मृत्यू झाला आणि त्यांनी सहाराणपूरच्या नवाबाची चाकरी करण्यास सुरुवात केली.
१८५६ साली ते ब्रिटिशांनी अवैधपणे बळकावलेल्या अलवरच्या राजाच्या सेवेस गेले. तिथला राजा विनय कुमारने त्यांना खास आमंत्रित केले होते.
या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जुलूम वाढतच चालले होते. लूटमार करून ब्रिटिशांनी लोकांचे मोठ्या प्रमाणात शोषण करण्यास सुरवात केली. भारतीय लोक विरोध करतात हे बघून त्यांनी हिंदू आणि मुस्लिमात फूट पाडण्यास सुरुवात केली. यामुळे असंतोष भडकला व त्याने १८५७ च्या क्रांतीचे रूप धारण केले. यानंतर क्रांतिकारकांनी दिल्लीच्या बहादूरशहा जफरशी संपर्क साधला.
भारताच्या स्वातंत्र्याच्या आवाहनाला पाठिंबा देत बहादुरशाहाने समर्थन देऊ केले. त्याने फैजले हक यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. फैजले हक यांनी राजा विनय कुमार यांची परवानगी घेऊन दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण केले.
१८५७ च्या क्रांतीच्या ठिणगीने आगीचे रूप धारण केले होते. बहादुरशाह जफर आणि मौलाना फैजले हक खैराबादी यांची भेट झाली. या भेटीच्या वेळी अन्य क्रांतिकारी देखील उपस्थित होते. जनरल बख्त हा त्यापैकी एक होता. त्याने एक रणनीती आखून ब्रिटिशांविरोधात जिहादचा फतवा काढण्याची मागणी केली.
मौलाना फैजले हक खैराबादी यांनी हा फतवा तयार केला आणि अनेक धर्मगुरूंच्या यावर स्वाक्षऱ्या मिळवल्या. सगळ्यांच्या सहमतीनंतर जुम्म्याच्या नमाजाच्या वेळी जामा मशिदीतून फैजले हक यांनी मुस्लिमांना इंग्रजांविरोधात लढण्याचे आवाहन केले.
त्यांच्या या फतव्याने मोठी मोठा उद्रेक उसळला. त्यांच्या या फतव्याला वर्तमानपत्रात छापण्यात आले. यामुळे अनेक मुसलमान भारताच्या स्वातंत्र्यता संग्रामात सहभागी झाले.
१८५७ च्या उठावात सर्व धर्मातील क्रांतिकारक सहभागी झाले होते. असं म्हणतात की स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य बघून इंग्रजांच्या पायाखालची जमीन घसरली होती. पण तरीही १८५७चा उठाव यशस्वी होऊ शकला नाही. ब्रिटिशांनी दिल्लीवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. यावेळी फैजले हक यांचा परिवार दिल्लीत होता. त्यांच्या परिवाराला लपतछपत दिल्लीहून अवध आणि तेथून त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. मौलाना फैजले हक यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना लखनऊला नेण्यात आले आणि इथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला.
१८५७-१८५८ च्या काळात क्रांतीला फूस लावण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. अवध आणि दिल्लीत बंड पुकारल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याचा न्यायालयात खटला भरला, असं म्हणतात की मौलाना फैजले हक यांनी स्वतः आपला खटला लढवला. त्यांनी वकील देखील नियुक्त केला नाही. असं म्हणतात की या खटल्याचा न्यायधीश देखील मौलाना फैजले हक यांचा चाहता होता. खटल्याच्या वेळी अनेक साक्षीदारांनी खोटी साक्ष देऊन मौलाना फैजले हक यांची बाजू घेतली. फैजले हक यांच्याकडे आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी होती.
पण, त्यांनी असे न करता त्यांनी स्वतःच तो फतवा काढला होता, असे न्यायालयाला सांगितले.
यानंतर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि १८५७च्या वेळी त्यांनी केलेले कार्य त्यांच्यासह अंदमानच्या काळ्या कोठडीत विलुप्त झाले. त्यांच्यावर कारागृहात मोठे जुलूम करण्यात आले. त्यांना ज्या पीडेचा सामना करावा लागला त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ‘अस्सौरतुल हिंदिया’ या पुस्तकात केला. एका साथीदाराची मदत घेऊन त्यांनी त्यांचा मुलगा मौलाना अब्दुल हक याच्यापर्यंत त्या पुस्तकाचे हस्तलिखित पोहचवले. या पुस्तकाचा बागी हिंदुस्थान असा हिंदी अनुवाद करण्यात आला आहे.
१८६१ साली ब्रिटिशांनी त्यांना मुक्त केले पण ज्यावेळी त्यांचा मुलगा अंदमानला त्यांना घ्यायला पोहचला त्यावेळी त्याच्यासमोर एक अंतयात्रा चालली होती, ती अंतयात्रा फैजले हक यांचीच होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.