आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतात आता सर्वत्र इलेक्ट्रिक तराजू वापरले जातात, पण काही वर्षांपूर्वी मात्र साधारण तराजूवर वस्तूंचे मोजमाप केले जात होते. जेव्हा तुम्ही एखाद्या साधारण तराजूत मोजल्या जाणाऱ्या वस्तुकडे बघता तेव्हा तुमच्या लक्षात येते की भारतात तराजूत नेहमी दुकानदार एखादी वस्तू जरा जास्तच टाकून देत असतो. मूळ वजनाच्या तुलनेने अधिक सामान पारड्यात टाकल्यावर बऱ्याचदा आपण चक्रावून जायचो, पण सर्वत्र दुकानदारांनी कित्येक वर्षे याच पद्धतीने सामान मोजले आहे.
ही मोजमाप पद्धती सदोष असली तरी ती प्रचलित असण्यामागे एक ऐतिहासिक किस्सा आहे जो भारतावर एकेकाळी राज्य करणाऱ्या एका शासकाशी जोडला गेलेला आहे. त्या शासकाचे नाव होते अलाउद्दीन खिलजी!
अलाउद्दीन खिलजी याचे नाव तुम्हाला माहिती असेलच आणि ज्यांना नाही माहिती त्यांना पद्मावती चित्रपटाच्या वेळी उफाळून आलेल्या वादात कळले असेल. दिल्लीच्या गादीवर आपला वंश प्रस्थापित करणारा अलाउद्दीन खिलजी हा एक प्रचंड क्रू*र शासक म्हणून ओळखला जातो. पण, हा खिलजी जितका क्रू*र व हिं*सक यो*द्धा होता, तितका चांगला प्रशासक व अर्थतज्ज्ञ होता. त्याने त्याकाळच्या बाजारव्यवस्थेत मोठे बदल करत अर्थव्यवस्था मजबूत केली होती.
खिलजीने त्याच्या समकालीन राजांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कार्यकाळात गुजरात व राजस्थाननंतर दक्षिण भारतातील अनेक राज्ये दिल्ली दरबाराला जोडली गेली. त्याच्या विजयी घोडदौडीला मलिक काफूर या त्याच्या सेनापतीच मोलाची साथ लाभली होती. त्याकाळी खिलजीच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात लूटमार केली होती त्यामुळे खिलजीच्या कोषात भरमसाठ वाढ झाली होती. खिलजी लुटमारीत मिळवलेल्या धनाचा एक टक्का सैनिकांना देत असे व बाकी स्वतः जवळ ठेवून घेत असे.
काही काळाने खिलजीच्या राज्यात धनसाठा वाढल्याने वस्तू महाग व्हायला लागल्या. त्यावेळी बाजारातील वस्तूंच्या या किंमतीवर नियंत्रण प्रस्थापित करून काळाबाजारी रोखण्याचे एक मोठे आव्हान खिलजीसमोर होते.
खिलजीने यानंतर चार स्तरांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करत अर्थव्यवस्थेवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पहिला स्तर होता शहना-ए-मंडी, ज्याच्याकडे व्यापाऱ्यांच्या नोंदणीची व मालाचे दाम ठरवण्याची जबाबदारी होती. दुसरा होता दिवाण-ए-रियासत, ज्याच्यावर वस्तूंची किंमत आणि मोजमापपद्धती याची जबाबदारी होती. तिसरा होता बरीद-ए-मंडी या स्तरावरील लोक प्रामुख्याने गुप्तचर होते जे बाजारात घडणाऱ्या काळा बाजाराची माहिती राजापर्यंबत पोहचवत. सराया अदल हा चौथा स्तर होता, या पदावरील अधिकारी नेमणूक करण्यात आलेल्या इतर तीन स्तरातील अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम करत.
यावेळी जर एखादा व्यापारी गफला अथवा काळाबाजारी करायचा त्यावेळी या चारही स्तरावरील लोकांना त्या व्यापाऱ्याला शिक्षा देण्याचा अधिकार होता. जितका जास्त मोठ्या वजनाचा घोटाळा तितकं मांस व्यापाऱ्याच्या अंगावरून काढून घेण्याची शिक्षा दिली जात होती.
या शिक्षेची भीती व्यापाऱ्यांच्या मनात इतकी जास्त बसली की ते नेहमी १० ग्रॅम पण धान्य कमी नको भरायला म्हणून थोडं जास्तच धान्य भरून देऊ लागले. यामुळे मूळ वजनाच्या १०-१५ ग्रॅम जास्त वस्तू व्यापारी ग्राहकाच्या पिशवीत टाकू लागले.
खिलजीचे अधिकारी जेव्हा तपासणी करतील तेव्हा आपल्या बाजूने कुठली खोट नको रहायला याची काळजी हे व्यापारी घेऊ लागले. जर चुकून मापात पाप झाले तर चामडं सोललं जाण्याची भीती या व्यापाऱ्यांच्या मनात कायमची बसली.
खिलजी गेला, त्याचे राज्य गेले, मुघल-इंग्रज येऊन गेले पण, आज ७५० वर्ष झाले तरी भारतीय बाजारपेठेत हीच जुनी १०-२० ग्राम जास्त सामान ग्राहकाच्या पिशवीत ओतण्याची प्रथा सुरू आहे. आता नव्याने आलेल्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांमुळे ही जुनी व्यवस्था अखेरीस मोडकळीस निघायला सुरुवात झाली असली तरी अजूनही स्थानिक व्यापारी पेठा, आठवडी बाजारात या खिलजीच्या काळातील प्रथेचे व्यापारी पालन करताना आढळून येतातच!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.