आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ब्रिटिश काळात एखाद्या विशिष्ट समाजावर होणारे हिं*सक ह*ल्ले तसे काही आश्चर्यकारक बाब नाही. जनरल डायरच्या नेतृत्वाखाली झालेला जालियनवाला बाग ह*त्याकांड आजही अंगावर शहारे आणतो. असाच एक ह*ल्ला १९१३ मध्ये, म्हणजेच जालीयनवाला बाग हत्याकांड होण्याच्या आधीच ६ वर्षे भिल्ल समाजाच्या लोकांवर करण्यात आला.
सन १९१३. नोव्हेंबर महिन्याची वेळ. एकदम कडाक्याची थंडी असतानाही गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर असणाऱ्या बासवडा आणि सत्यरामपुर यांच्यामध्ये असणाऱ्या मानगढला भिल्ल जमातीचे अनेक लोक जमा झाले होते.
कार्तिक महिन्यात होणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. कार्यक्रमाची अंतिम तयारी झाली होती. त्याच वेळी बेधुंद गोळीबार सुरु झाला. या गोळीबारात १००० पेक्षाही जास्त भिल्लांचा मृत्यू झाला. याच ह*त्याकांडास राजस्थानचे जालीयनवाला बाग ह*त्याकांड असे म्हटले जाते.
भिल्ल समाज भारतामध्ये अतिशय प्राचीन काळापासून वास्तव्य करतो. भारताचे मुळ रहिवाशी असंही त्यांना संबोधलं जातं. भिल्ल समाजाचं वर्णन रामायणामध्येही करण्यात आलं आहे. वनवासात असताना रामाला बोरं खाऊ घालणारी शबरी भिल्ल समाजाची होती असं म्हटलं जातं. मोकळेपणाने वावरणाऱ्या या भिल्ल जमातीस इंग्रजांची गुलामगिरी मंजूर नव्हती. परंतु भोळे असलेले भिल्ल इंग्रजांच्या कपटास बळी पडले आणि जमीनदारांकडे बांधील कामगार म्हणुन काम करु लागले.
या शोषणाचा विरोध भिल्ल समाजाने केला नाही. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात आलेल्या दुष्काळाने सगळं चित्र पालटलं. या दुष्काळाची सुरुवात झाली १८९६ मध्ये. त्यावर्षी राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मान्सूनचा पाऊस खूप कमी झाला. त्यानंतर जरी १८९७, १८९८ मध्ये योग्य प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर येते वर्ष १८९९. त्यावर्षी पावसात ६० ते ६५ टक्के कमी झाली आणि दुष्काळ पसरला.
या दुष्काळाने ३ लाख वर्गमैलावर पसरलेल्या लोकांना वाईटरित्या प्रभावित केले, ज्यात भिल्ल समाजाचाही समावेश होता. या क्षेत्रात इंग्रज मांडलीक संस्थानिकांचं शासन होतं, जे दुष्काळाने प्रभावित झालेल्या भिल्ल समाजाला कोणतीही मदत करु शकले नाहीत. जरी इंग्रजांच्या क्षेत्रात वेगवेगळे शिबिर राबवण्यात आले असले तरी त्याचा फायदा फक्त २५ टक्के लोकांनाच दिला गेला. दुष्काळाचे भीषण रुप बघितलेल्या भिल्ल समुदायासाठी ही घटना एका मोठ्या बदलाची नांदी ठरली.
इंग्रजांविरुद्ध झालेल्या भिल्लांच्या लढ्याचे नेतृत्व केले ते गोविंद गुरु यांनी. गोविंद गुरु यांचा जन्म २० डिसेंबर १८५८ रोजी डुंगरपुर जिल्ह्यात झाला. तेसुद्धा एक बांधील कामगार होते, परंतु ते बाकीच्या भिल्लांपेक्षा वेगळे होते. त्यांचे शिक्षण बाकी भिल्लांपेक्षा जास्त होते. दुष्काळाने पैसा-संपत्ती यांचं नुकसान तर केलेच परंतु त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले ते म्हणजे भिल्ल समाजाच्या नैतिक मुल्यांचे.
नैतिक मुल्ये खालावलेली असताना भिल्ल समाजात चोरी-लबाडी, दारुचे व्यसन अशा अनेक वाईट सवयी वाढू लागल्या. त्याच वेळी भिल्ल समाजाला एका मोठ्या सामाजिक आंदोलनाची गरज आहे असे गोविंद गुरुंना वाटू लागले. त्यांनी भिल्लांच्या समाजात जनजागृती अभियानास सुरुवात केली.
बघता बघता गोविंद गुरुंना लाखो भिल्लांचा पाठिंबा भेटत गेला. एका मोठ्या सामाजिक आंदोलनाची सुरुवात येथुन झाली. १९०८ मध्ये या आंदोलनाला परिपूर्ण रुप मिळाले. या आंदोलनाला ‘भगत आंदोलन’ असेही संबोधले गेले. व्यभिचाराच्या आहारी गेलेल्या भिल्लांना त्यांनी धार्मिक कार्यात मग्न होण्यास सांगितले. भिल्लांमध्ये आता जागरुकता वाढत होती. याच जागरुकतेतून ते आता स्वत:चे आयुष्य अजून चांगल्या प्रकारे जगत होते.
त्यांना स्वत:च्या गुलामिची जाणीव होण्यात या आंदोलनाचा खुप मोठा वाटा होता. त्यांनी या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. राजाकडे आणि इंग्रजांकडे आपल्या मजदुरीसाठी जास्त पैश्यांची मागणी करु लागले.
हे सगळं राजे आणि इंग्रजांच्या डोळ्यात खटकत होते. भिल्लांना आपल्या विरोधात भडकवले जात आहे असे त्यांना वाटू लागले. भिल्लांवर कारवाई करण्यासाठी संधीचा शोध चालू झाला. ही संधी त्यांना मिळाली भिल्लांच्या एका धार्मिक कार्यक्रमावेळी.
गोविंद गुरुच्या प्रयत्नांमुळे भिल्लांमध्ये जागरुकता वाढीस लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या हक्कासाठी लढायला सुरुवात केली. त्याच बरोबर धार्मिक कार्यातसुध्दा सहभागी होण्यास त्यांनी सुरुवात केली. याच वेळी १९१३ मध्ये कार्तिक महिन्यात एका धार्मिक अनुष्ठानासाठी मानगढच्या टेकडीवर एकत्र येण्याची योजना बनवण्यात आली.
गोविंद गुरु आपल्या अनुयायांना घेऊन ऑक्टोबरमध्येच तिथे पोहचले आणि १३ नोव्हेंबरला बाकीच्या भिल्लांना त्यांनी त्या टेकडीवर येण्यास सांगितले. टेकडीवर एक मोठे यज्ञकुंड बनवण्यात आले. ज्यामध्ये हवन बनवण्यात येणार होते.
ठरवल्याप्रमाणे १३ नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात भिल्ल समाज या टेकडीवर जमा झाला. हे बघुन आपल्या विरोधात ह*ल्ला करण्यासाठी भिल्ल समाज एकत्र आला आहे असा समज राजाचा झाला. भिल्लांकडे बघण्याची असलेली संशयीवृत्ती अजुनच बळकट झाली. त्याने लगेच इंग्रजांना बातमी कळवली आणि मदत मागितली.
ब्रिटिश सैन्य आणि राजांच्या फौजा ह*त्यारे घेऊन टेकडीवर पोहचली. त्यांनी टेकडीला चारही बाजूंनी वेढा घातला. ह*ल्ला करण्या अगोदर ब्रिटिशांनी भिल्लांना निघुन जाण्याचा इशारा दिला. अशा वेळी एकजुटीचं प्रदर्शन करताना भिल्लांनी जाण्यास नकार दिला. भिल्लांच्या नकाराने इंग्रज आणि राजाला ते वाट बघत असलेली संधी दिली.
१७ नोव्हेंबरला सैन्याने भिल्लांवर बॉ*म्ब टाकण्यास सुरुवात केली. निःशस्त्र असलेले भिल्ल काहीच न करता तिथून पळत सुटले. या ह*ल्ल्यात १००० ते १५०० भिल्लांचे प्राण गेले. यामध्ये वृद्ध, महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.
आईच्या मृत शरीराजवळ रडत बसलेल्या एका लहान मुलाला बघुन गोळीबार थांबवण्यात आला. संधी मिळताच गोविंद गुरु यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. ११ फेब्रुवारी १९१४ रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली
परंतु भिल्ल समाजात त्यांच्याप्रती असलेल्या प्रेम आणि लोकप्रियतेमुळे त्यांना काही अटींच्या बदल्यात सोडण्यात आले. या अटींमुळे त्यांच्या हालचाली जवळ जवळ संपुष्टात आल्या.
१९३१ साली त्यांचे निधन झाले. मानगढ ह*त्याकांडात वाचलेल्या लोकांमध्ये भीती एवढी होती की भारत स्वतंत्र झाल्यानंतरही लोक त्या टेकडीवर जाण्यास ते घाबरत असत.
इतिहासाच्या पानांत हरवलेले हे ह*त्याकांड जालीयनवाला बाग ह*त्याकांडापेक्षाही मोठे होते. इतिहासात काही बलिदानांची किंमत इतर बलिदानांपेक्षा जास्त असते हे यावरुन लक्षात येते. धैर्य आणि एकजूटीचे दर्शन घडवणाऱ्या या मानगढ ह*त्याकांडाची दखल इतिहासाने एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून घ्यायला हवी.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.