आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
बनारस हिंदू विद्यापीठाचा उल्लेख ज्यावेळी करण्यात येतो, त्यावेळी मदन मोहन मालवीय यांचे नाव आपोआप डोळ्यांसमोर येते. मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. मालवीय एक स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, वकील आणि समाजसुधारक होते.
मदन मोहन मालवीय यांचा जन्म २५ डिसेंबर १८६१ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयाग येथे झाला. सुरुवातीला त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि एका वृत्तपत्राचे संपादक म्हणून रुजू झाले. १९१५ साली त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. ते हिंदू महासभेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
महात्मा गांधींनी मदन मोहन मालवीय यांना महामना ही उपाधी दिली होती. गांधी मालवीय यांना मोठा भाऊच मानायचे.
मदन मोहन मालवीय यांनी “सत्यमेव जयते!” या शब्दाचा प्रयोग केला होता. पुढे हे वाक्य भारत सरकारचे राष्ट्रीय घोषवाक्य म्हणून स्वीकारले गेले. उपनिषदात उल्लेखलेल्या या वाक्याचा उपयोग मालवीय यांनी १९१८ सालच्या काँग्रेस अधिवेशनात केला. त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद मालवीय भूषवित होते.
मदन मोहन मालवीय यांनी १९०९, १९१३, १९१९ आणि १९३२ साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते. मदन मोहन मालवीय यांनी सविनय कायदेभंग आणि असहकार चळवळीत मोलाची भूमिका बजावली होती. या सर्व आंदोलनांचे नेतृत्व महात्मा गांधींनी केले होते.
भारताच्या स्वातंत्र्याबाबत मालवीय प्रचंड आशावादी होते. ते एकदा म्हणाले होते की, गेल्या ५० वर्षांपासून मी काँग्रेससोबत आहे, मला माहिती नाही की मी जिवंत असेपर्यंत आपला देश स्वतंत्र होईल की नाही. पण मी याबद्दल प्रचंड आशावादी नक्कीच आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळण्याअगोदरच पंडित मदन मोहन मालवीय यांचे निधन झाले.
मदन मोहन मालवीय यांच्या आयुष्यात अनेक रंजक किस्से घडले होते. त्यापैकी एक किस्सा फार प्रसिद्ध आहे.
एकदा मदन मोहन मालवीय देशभरात बनारस हिंदू विद्यापीठासाठी वर्गणी गोळा करायला निघाले होते. याचसाठी ते हैद्राबादच्या निजामाकडे वर्गणी मागायला गेले. त्यांनी निजामाकडे विद्यापीठासाठी वर्गणी देण्याची मागणी केली.
परंतु, निजामाने वर्गणी देण्यास साफ शब्दात नकार दिला. इतक्यावरच तो थांबला नाही, तो म्हणाला की त्याच्याकडे वर्गणीच्या रुपात देण्यासाठी फक्त त्याचे जोडे आहेत. मदन मोहन मालवीय स्वभावाने फार विनम्र होते, त्यांनी लगेचच निजामाला धडा शिकवण्याची तयारी केली. त्यासाठी त्यांनी निजामाचे जोडे पळवले.
निजामाचे जोडे घेऊन मालवीय बाजारात गेले आणि त्याठिकाणी भरचौकात जोड्यांचा लिलाव सुरू केला. निजामाला याची कल्पना नव्हती. काही वेळाने त्याचे सैनिक धावत आले आणि त्यांनी राजाला परिस्थितीची कल्पना दिली. निजामाच्या जोड्यांचा अशाप्रकारे लिलाव करणे हे त्याच्यासाठी अपमानास्पद होते, यामुळे त्याने लगेचच पंडित मालवीय यांना दरबारात बोलावून घेतले आणि त्यांना विद्यापीठासाठी मोठी रक्कम देऊन रवाना केले.
इंग्रजांच्या शासनकाळात पंडित मालवीय यांनी पहिल्या स्वदेशी विद्यापीठाची स्थापना केली होती. ही त्याकाळात मोठी उपलब्धी होती. मालवीय यांनी हे विद्यापीठ उभं करण्यासाठी पेशावर ते कन्याकुमारी प्रवास करून १ कोटी ६४ लाख रुपये निधी जमवला होता.
बनारस हिंदू विद्यापीठ बनवायला मदन मोहन मालवीय यांना १३६० कोटी रुपयांची जमीन मिळाली होती. यात ११ गाव, ७० हजार झाडं, १०० पक्क्या विहिरी, २० कच्च्या विहिरी, ४० पक्क्या इमारती, ८६० कच्च्या इमारती, एक मंदिर आणि एका धर्मशाळेचा समावेश होता.
बनारस हिंदू विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम दरभंगा नरेश कामेश्वर सिंह यांच्या डोक्यातून निघाली होती. ॲनी बेझंट यांनी १८९६ साली सेंट्रल हिंदू स्कुलची स्थापना केली. या दोन व्यक्तींनी पंडित मालवीय यांना बनारस हिंदू विद्यापीठ बनवायला मोठे अर्थसहाय्य केले होते. १९०५ साली या विद्यापीठाच्या निर्मितीचा प्रस्ताव महाकुंभ मेळाव्यात पारित करण्यात आला होता.
१९१५ साली हे विद्यापीठ उभारण्यासाठी निधी एकत्रित झाला. गायत्री मंत्राच्या उच्चारात विद्यापीठाचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर विद्यापीठाचे कामकाज सुरू झाले, जे आजही सुरू आहे. वाराणसीप्रमाणे शिमल्यातदेखील मदन मोहन मालवीय यांना विद्यापीठ उभारायचे होते. परंतु हे स्वप्न अर्धवटच राहिले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.