आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताचा इतिहास अनेक अर्थांनी अद्भुत आहे. भारतातील अनेक मंदिरे आजही रहस्यमय वाटतात. यातील अनेक मंदिरांचे बांधकाम आजच्या आधुनिक वास्तुशिल्पकारांनाही चकित करणारे आहे. भारतातील असेच एक रहस्यमयी मंदिर म्हणजे लेपाक्षी मंदिर.
आंध्रप्रदेशात लेपाक्षी हे एक असे गाव ज्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीनेही फार महत्त्व आहे. या गावातील पुराणकालीन लेपाक्षी मंदिर भक्तांसाठी आणि श्रद्धाळूंसाठी तर आकर्षणाचे केंद्र आहेच पण इथल्या झुलत्या खांबांनी आधुनिक वस्तूशिल्पकारांना देखील अचंबित करून सोडले आहे. जाणून घेऊया या अद्भुत आणि अविश्वसनीय मंदिराबद्दलची अधिक माहिती या लेखातून.
या गावात भगवान शिव, विष्णू आणि वीरभद्र देवाची मंदिरे आहेत. ही सगळी मंदिरे विजयनगर साम्राज्याचा काळात (१३३६-१६४६) बांधण्यात आली.
आंध्रप्रदेशच्या अनंतपुर जिल्ह्यातील हे लेपाक्षी मंदिर ७० खांबावर उभारलेले आहे. या मंदिरातील मुख्य खांब मात्र हवेत तरंगतो. हा खांब इतर खांबाप्रमाणे जमिनीवर नाही. या खांबात आणि जमिनीत अगदी तुरळक अंतर आहे, एखादा पातळ कागदाचा किंवा कापडाचा तुकडा सहज सरकू शकेल एवढं.
या गावाशी अनेक पुराणकथा जोडलेल्या आहेत. असे म्हटले जाते की प्रभू रामचंद्र आपल्या वनवासाच्या काळात याच परिसरात वास्तव्य करीत होते. रावणाने इथूनच माता सीतेचे अपहरण केले तेव्हा जटायूने रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला. पण, वृद्ध जटायूचा रावणासमोर टिकाव धरू शकला नाही. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा माता सीतेच्या शोधात निघाले तेव्हा त्यांनी जखमी झालेल्या जटायूला पाहिले. जटायूने रावणानेच माता सीतेचे अपहरण केल्याची बातमी प्रभू रामाला दिली आणि त्याने प्राण सोडला. पण, तत्पूर्वी प्रभू रामांनी त्याला वाचवण्यासाठी औषधोपचार केले. त्याला उभारी देण्यासाठी उपदेश केला. पण, काही उपयोग झाला नाही. शेवटी याच ठिकाणी त्यांनी जटायूवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रभू रामचंद्रांनी एका जखमी पक्षाला ‘ले पक्षी’ म्हणजे भरारी घेण्याचा आदेश दिला ते हे ठिकाण आणि याच ठिकाणी जटायूचे अंत्यसंस्कार करण्यात आले म्हणून याला लेपाक्षी याच नावाने ओळखले जाते. जटायूचे अंत्यसंस्कार केल्यानंतर याच ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी रुद्र शिवलिंगाची स्थापना केली होती, अशीही मान्यता आहे.
विजयनगर राजाच्या दरबारी काम करणाऱ्या विराण्णा आणि विरूपाण्णा या भावांनी इसवी सन १५८३ साली हे मंदिर बांधले. तोपर्यंत इथले शिवलिंग मोकळ्या मैदानावर आणि उघड्या आभाळाखालीच होते. भारतीय वास्तुशिल्पाचा आदर्श नमुना म्हणून या मंदिराकडे पहिले जाते.
दुर्ग पद्म, दगडी साखळी, वस्तू पुरुषाची मूर्ती, विरूपाक्षाण्णा देवाचे डोळे, पद्मिनीची कोरलेली मूर्ती, झुलता खांब आणि लेपाक्षी साडीवरील नक्षी अशी असंख्य आश्चर्यकारक आणि मनोहारी दृश्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. यातील सगळ्यात मोठे आकर्षण आहे ते झुलत्या खांबाचे.
मंदिराच्या समोरच २० फुट उंच आणि ३० फुट रुंदी असलेला नंदी आहे आणि त्यासमोर सात फडी असलेल्या फणाधारी नागाने शिरावर छत्र धरलेले एक शिवलिंग आहे.
विशेष म्हणजे हा पूर्ण नंदी एकाच दगडात कोरलेला आहे. काळ्या ग्रेनाईटच्या दगडात कोरलेला हा नंदी भारतातील सर्वांत मोठा नंदी असल्याचे मानले जाते.
मंदिराबाहेरच्या आवारात एक नृत्य सभागृह आहे. याच सभागृहात तो झुलता खांब पाहायला मिळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश इंजिनियरने या मंदिराच्या झुलत्या खांबाचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी हा झुलता खांब हलवण्याचाही प्रयत्न केला, पण हा खांब हलवला की त्यासोबत अपोआपच मंदिराचे इतर १० खांबही हलतात असे त्यांना आढळले. खूप प्रयत्न करूनही त्यांना हा खांब काढता आला नाही. कारण हा खांब अशा पद्धतीने कायमचा बसवला गेला आहे की त्याला कधीच कोणी काढू शकत नाही.
खांब हलवणे किंवा काढणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तो नाद सोडून दिला. मंदिराचा सारा भार याच एका झुलत्या खांबावर तोलला गेला आहे. या झुलत्या खांबाखालून जर भक्तांनी एखादे कापड आरपार काढले तर त्याची सर्व दु:खे नष्ट होतात आणि त्याची भरभराट होते असेही म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम हे भूकंपरोधी आहे.
मंदिराच्या बाजूलाच एक झरा आहे. या झऱ्याच्या शेजारी असणाऱ्या मोठ्या दगडावर पायाचे ठसे उमटलेले दिसतात. इथल्या लोकांच्या मते हे रामाच्या पावलांचे ठसे आहेत, तर काही जणांच्या मते सीतेच्या पावलाचे ठसे आहेत. असे म्हटले जाते की, जटायू जखमी अवस्थेत असताना, सीता मातेने याठिकाणी आपले ठसे सोडले आणि जटायूकडून वचन घेतले की, जोपर्यंत त्याला भगवान राम भेटणार नाहीत तोपर्यंत तो प्राण त्याग करणार नाही.
या गावाशी निगडीत आणखी एक आख्यायिका आहे. आपल्या संस्कृतीतील वैश्य विरुद्ध शैव हा वाद तर खूपच जुना आहे. असेच एकदा भगवान विष्णू आणि भगवान शिवाच्या भक्तांत भांडण जुंपले की दोघांपैकी कोण श्रेष्ठ? मग अगस्त मुनींनी या ठिकाणी घोर तपस्या करून हा वाद कायमचा मिटवला. भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघेही एकमेकांचे पूरक असल्याचे त्यांनी भक्तांना पटवून दिले आणि याठिकाणी त्यांनी दोन्ही देवतांचे मंदिर उभारले अशीही एक आख्यायिका आहे.
भारताच्या अनेक भागात पुराणकाळाशी निगडीत अशा अनेक आख्यायिका आणि त्याच्याशी संबधित अशी मंदिरे आणि लेणी पाहायला मिळतात. भारताच्या या प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाबद्दल वाचल्यानंतर अशा ठिकाणी आवर्जून भेट देण्याची इच्छा अधिकाधिक तीव्र होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.