आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कंबोडिया, मंदिरांचा देश म्हणून प्रसिद्ध असलेला आग्नेय आशियातील एक लहानसा देश. अंगकोरियन शैलीतील अंगकोर मंदिर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगातील सर्वात मोठं असलेलं मंदिर याठिकाणी आहे. जेमतेम दीड कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील ९७ टक्के लोकसंख्या बौद्ध धर्माचं पालन करणारी आहे.
कधी शेजारी-पाऱ्यांचा जाच, कधी वसाहतवादी युरोपियनांचा जाच तर, कधी देशांतर्गत संघर्ष अशा कितीतरी संकटांतून सावरत हा देश उभा आहे. मात्र, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या देशानं प्रचंड नरसंहार पाहिला आहे. अवघ्या चार वर्षांच्या काळात या देशातील लाखो लोकांची कत्तल करण्यात आली होती. त्या चार वर्षांच्या दहशतीमधून आजही येथील जनता पूर्णपणे सावरलेली नाही. हा नरसंहार कुणी आणि का केला अशा प्रश्न आता तुमच्या मनात नक्की उपस्थित झाला असेल ना?
ख्मेर रूज, ही १९७५ ते १९७९ या वर्षांत मार्क्सवादी हुकूमशहा पोल पॉटच्या नेतृत्वाखाली कंबोडियावर राज्य करणारी एक क्रूर राजवट होती. १९७५ ते १९७९ या चार वर्षांच्या काळात राजवटीनं सत्ता उपभोगली. सोशल इंजिनियरींगचा वापर करून पोल पॉटनं कंबोडियाला सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या या अतातायी धोरणामुळं देशात अक्षरश: नरसंहार झाला.
मृतांपैकी अनेकांना देशद्रोही ठरवून ठार करण्यात आलं तर, काहीजण उपासमारी, आजारपण व अतिरिक्त श्रमामुळं मरण पावले. मन सुन्न करणाऱ्या कंबोडियातील स्थितीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा ‘द किलिंग फिल्ड’ नावाचा चित्रपट बघावा. जगाच्या इतिहासात या घटनेला ‘कंबोडियन नरसंहार‘ या नावानं ओळख मिळाली आहे.
पोल पॉट आणि ख्मेर रूज ७० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सत्तेवर आले नसले तरी, त्यांची पाळंमुळं ६० च्या दशकात आपल्याला सापडतात. त्याकाळात कंबोडियामध्ये पहिल्यांदा कम्युनिस्ट बंड सक्रिय झालं होतं. ६० च्या दशकात, ख्मेर रूजमधील लोक कम्युनिस्ट पार्टी ऑफ कम्पुचेयाची सशस्त्र शाखा म्हणून काम करत होते. ते कंबोडियाचा उल्लेख ‘कम्पुचेया’ असा करत.
सुरुवातीच्या काळात ख्मेर रुज देशाच्या ईशान्येकडील दुर्गम जंगल आणि डोंगराळ भागात व्हिएतनामच्या सीमेजवळ वास्तव्याला होते. त्यावेळी व्हिएतनाम गृहयुद्धात अडकलेलं होतं. ख्मेर रूजला कंबोडियामध्ये विशेषतः शहरांमध्ये फारसं समर्थन नव्हते. पुढे, १९७०च्या लष्करी विद्रोहामुळं कंबोडियाचे सत्ताधारी राजकुमार नोरोडोम सिहानोक यांची हकालपट्टी झाली. ख्मेर रूजनं राजकुमाराशी राजकीय युती करण्याचा निर्णय घेतला.
पुढील पाच वर्षे, राइट विंग सैन्यात आणि प्रिन्स नोरोडोम व ख्मेर रूज यांच्या युती दरम्यान गृहयुद्ध झालं. अखेरीस, कंबोडियाच्या ग्रामीण भागात नियंत्रण मिळवल्यानंतर ख्मेर रूज पक्षानं या संघर्षात वर्चस्व मिळवलं. १९७५ मध्ये, ख्मेर रूज सैन्यानं कंबोडियाच्या राजधानीवर आक्रमण केलं आणि शहर ताब्यात घेतलं.
राजधानी त्यांच्या ताब्यात असल्यानं, ख्मेर रूजची देशावर सत्ता प्रस्थापित झाली. ख्मेर रूजनं प्रिन्स नोरोडोमला पुन्हा सत्ता स्थापन करण्यात मदत करण्यास नकार दिली. त्याऐवजी त्यांनी आपला नेता पोल पॉट यांच्या हाती सत्ता सोपवली. परिणामी प्रिन्स नोरोडोमला वनवासात राहणं भाग पाडलं.
सत्ता हाती आल्यानंतर ख्मेर रूजचा नेता म्हणून, पोल पॉट कंबोडियाच्या ईशान्यभागातील जमातींचं कौतुक करण्यासाठी पुढं आला. या जमाती स्वयंपूर्ण होत्या आणि शेतीतून तयार होणाऱ्या मालावर त्या जगत होत्या. या जमाती कम्युन्स सारख्या असल्याची पोल पॉटची धारणा होती. कारण त्या एकत्र काम करत आणि एकमेकांच्या कामांमध्ये मदत करत.
पैसा, संपत्ती आणि धर्मासारख्या भौतीक गोष्टींपासून ते दूर होते. त्यांच्या मदतीनं आणि धोरणांचा अवलंब करून, एका कृषी संपन्न ‘युटोपियन’ कंबोडियाची निर्मिती करण्याचा पॉटचा मानस होता. त्यानं कंबोडियाचं नाव देखील बदलून ‘कम्पुचेया’ केलं. त्यानं १९७५ हे वर्ष ‘इयर झिरो’ म्हणून घोषित केलं आणि देशाला जागतिक समुदायापासून वेगळं केलं. देशातील शेकडो शहरवासीयांना शेती करण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये पुनर्वसित केलं. देशाचं चलन देखील रद्द केलं. आपल्या नवीन राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये त्यानं खासगी मालमत्तेची मालकी आणि धार्मिक प्रथांनाही बेकायदेशीर ठरवलं.
पोल पॉटनं लोकांचे जथ्थे कलेक्टिव्ह फार्मिंग करण्यासाठी खेड्यांमध्ये पाठवले होते. काही काळातचं शेत मुजुरांना जास्त काम आणि अन्नाच्या अभावामुळे त्रास होऊ लागला. हजारो लोक रोगराई आणि उपासमारीमुळं मृत्यूमुखी पडले. मजुरांच्या छावण्यांवर देखरेख करणाऱ्या निर्दयी ख्मेर रूज गार्डदेखील या लोकांना जनावरांप्रमाणं मारहाण करत, अशा शारीरीक छळामध्ये सुद्धा अगणित लोक मरण पावले.
ज्यांनी पोल पॉटच्या राजवटीला विरोध केला त्यांना देशद्रोही घोषित करून हजारो लोकांना फाशी देण्यात आली. बुद्धिजीवी, क्रांतिकारी चळवळीचे संभाव्य नेते असलेल्या नागरिकांना सुद्धा फासावर लटकण्यात आलं. कहर म्हणजे, ज्यांना परदेशी भाषा बोलता येत होत्या त्यांना देखील फाशी देण्यात आल्याचं सांगितलं जातं.
पोल पॉटच्या अतातायी धोरणाचा भाग म्हणून हजारो सुशिक्षित, मध्यमवर्गीय कंबोडियन नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. शहरांमध्ये स्थापन केलेल्या विशेष केंद्रांमध्ये त्यांना फासावर दिलं गेलं. राजधानी नोम पेनमधील तुओल स्लेंग जेलमध्ये सुमारे १७ हजार पुरुष, महिला आणि मुलांवर चार वर्षांच्या काळात अनन्वित अत्याचार झाले.
‘कंबोडियन नरसंहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार वर्षांच्या काळात १ कोटी ७० लाख ते २ कोटी २० लाख कंबोडियन मरण पावल्याचा अंदाज आहे. हिटलरनं ज्यूंची कत्तल केली म्हणून त्याला सर्व जग क्रूरकर्मा म्हणून ओळखतं. पोल पॉट देखील हिटलरपेक्षा तसूभरही कमी नव्हता. त्यानं देखील आपल्या कारकिर्दीत कोट्यवधी लोकांचा जीव घेतला.
जर व्हिएतनामी सैन्यानं १९७९ मध्ये कंबोडियावर आक्रमण केलं नसतं तर हा नरसंहार सुरुचं राहिला असता. मात्र, दोन देशांच्या सीमेवर हिंसक घडामोडींमुळं व्हिएतनामी सैन्य चाल करून आलं. त्यांनी पोल पॉट आणि ख्मेर रूजला सत्तेवरून काढून टाकलं. त्यानंतर पोल पॉट आणि त्याचे ख्मेर रूज सेनानी देशाच्या दुर्गम भागात पळून गेले. त्यांचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी त्याठिकाणी ते पुन्हा बंडखोर म्हणून सक्रिय राहिले. १९८० च्या दशकात अमेरिकेनं घेतलेल्या आक्षेपानंतर व्हिएतनामनं कंबोडियातील लष्कर माघारी बोलवलं.
प्रिन्स नोरोडोम १९९३ मध्ये कंबोडियावर राज्य करण्यासाठी परतला. तो आता घटनात्मक राजेशाही अंतर्गत त्याठिकाणी राज्य करतो. ख्मेर रूजच्या पतनानंतरच्या दशकांमध्ये, कंबोडियानं हळूहळू जागतिक समुदायाशी संबंध पुन्हा स्थापित केले आहेत. मात्र, अजूनही त्यांना गरीबी आणि निरक्षरतेसह इतर समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.