आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपल्या देशात प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रचंड प्रमाणात मानसन्मान दिला जातो. गावातील एखादा मुलगा किंवा मुलगी राज्य लोकसेवा आयोगाची किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा पास झाल्यानंतर तर अक्षरश: दिवाळी साजरी केली जाते. भारतासारख्या खंडप्राय देशाचा कारभार फक्त लोकप्रतिनिधींच्या हातून व्यवस्थित हाताळला जाणं, ही अशक्य गोष्ट आहे. अशावेळी प्रशासकीय अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. शासनाची ध्येयधोरणे व्यवस्थितपणे समाजातील शेवटच्या टोकापर्यंत पोहचवण्याचं काम हे प्रशासकीय अधिकारी करतात.
कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी घडवण्यासाठी देशात केंद्रीय स्तरावर एक आणि राज्यात एक अशा दोन प्रकारच्या परिक्षा घेतल्या जातात. केरळनं मात्र, याही पुढे जात आपल्या राज्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर ‘केरळ ऍ डमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस’ नावाची परिक्षा सुरू केली आहे. या परिक्षेला केएएस असं म्हणतात. नुकतीच ही परिक्षा पास झालेल्या अधिकाऱ्यांची पहिली बॅच प्रशिक्षित होऊन बाहेर पडली. ही परिक्षा नेमकी कशी आहे? ती घेण्यामागचा उद्देश काय आहे? हे आपण जाणून घेऊया..
केरळ प्रशासकीय सेवा म्हणजे केएएस हे केरळ सरकारचं नवीन प्रशासकीय केडर आहे. १ जानेवारी २०१८ रोजी केएएसची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली. राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रात महत्त्वाकांक्षी आणि प्रतिभावान विचारसरणी असलेल्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या परिक्षेची निर्मिती करण्यात आली आहे. हा नवीन उपक्रम राज्यातील विविध प्रशासकीय सेवांमध्ये एक नवीन क्रांती आणेल असा विश्वास केरळ सरकारला आहे.
सरकारी धोरणे आणि लोक कल्याणकारी कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या व्यवस्थापकीय सेवेतील कर्माचाऱ्यांची दुसरी फळी तयार करणे, राज्यातील जास्तीत जास्त कार्यक्षम तरुणांना प्रशासकीय सेवेत आणण्याचा प्रयत्न करणं आणि त्यांना तशी संधी उपलब्ध करून देणं, केरळ केडरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी एक फीडर श्रेणी तयार करणं, अशी काही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून केएएसची सुरुवात करण्यात आली आहे.
केएएसमुळं केरळमधील तरुणांना सरकारी सेवेत येण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तर राज्यालाही तरुण अधिकाऱ्यांच्या रुपात नवखे चेहरे मिळणार आहेत. तरुणांना गुणवत्तेच्या आधारावर प्रशासकीय सेवेत अधिक उच्च पदांवर जाता येईल. सध्या राज्यात असे अनेक तरुण आहेत, जे अभ्यासात चांगले असूनही लिपिक पदांवर काम करतात. तसेच, खालच्या श्रेणीमध्येदेखील असे काही कर्मचारी आहेत, ज्यांनी आपली क्षमता सिद्ध केलेली आहे, अशांना केएएसमुळं उच्च पदावर जाण्याची संधी आहे.
प्रशासनातील २९ निवडक विभागांमधील द्वितीय राजपत्रित पदांपैकी १० टक्के आणि सामान्य श्रेणीतील काही पदं बाजूला ठेवून केएएसची स्थापना करण्यात आली आहे. त्यात प्रशासकीय सचिवालय, प्रवेश परीक्षांचे वित्त सचिवालय आयुक्त आणि कोषागार अशा पदांचा समावेश आहे. केएएसमध्ये अधिकाऱ्यांच्या चार श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. ज्युनियर टाईम स्केल, सिनियर टाईम स्केल, सिलेक्शन ग्रेड स्केल, सुपर टाईम स्केल अशा या श्रेणी आहेत.
केएएसमधील भरती प्रक्रिया केरळ लोकसेवा आयोगाद्वारे (केपीएससी) राबवली जाते. केएएसचं वैशिष्ट्य म्हणजे, यातील भरतीसाठी तीन पद्धतींचा वापर केला जातो. ओपन कॉम्पिटिशनच्या माध्यमातून पदवीधरांची थेट भरती, तिसऱ्या किंवा चतुर्थ श्रेणीतील सरकारी कर्मचाऱ्यांना बढती देणं आणि प्रशासकीय सेवेमध्ये क्लासवनची पोस्ट असलेल्या अधिकाऱ्याला बदली नियुक्ती देणं, अशा पद्धतीनं केएएसमधील पदं भरली जातात.
केरळ प्रशासकीय सेवेत नियुक्त झालेली प्रत्येक व्यक्ती सुरुवातीला ज्युनियर टाईम स्केल अधिकारी असते. नंतर त्यांना 18 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करावं लागते. केरळ सरकारची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इन गव्हर्नमेंट’ (IMG) याठिकाणी हे प्रशिक्षण घेतलं जातं. तिथे नवीन अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय कौशल्यं, संस्थात्मक क्षमता, नेतृत्वगुण आणि निर्णय घेण्याची कौशल्यं विकसित करण्याचं काम केलं जाते. त्यानंतर, त्यांना प्रोबेशनवर पाठवलं जातं. जे अधिकारी प्रोबेशन पिरियड समाधानकारकपणे पूर्ण करतील त्यांना प्रमोशन देण्याची तरतूद केएएसमध्ये करण्यात आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातील नागरी सेवा परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या पहिल्या केएएस परीक्षेसाठी तब्बल ५ लाख ७६ हजार २४३ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांची २२ फेब्रुवारी २०२० रोजी प्राथमिक पात्रता परिक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी मुख्य परीक्षेसाठी एकूण ३ हजार १९० उमेदवार पात्र ठरले होते. त्यातून १०५ पदांसाठी अधिकारी निवडण्यात आले आहेत. पूर्व परिक्षेत ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचे दोन पेपर होते तर, मुख्य परिक्षेसाठी डिस्क्रिप्टीव्ह प्रश्नांचे तीन पेपर होते.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळ प्रशासकीय सेवेतील (केएएस) अधिकाऱ्यांची पहिली तुकडी लोकांच्या सेवेत सादर केली. त्यांनी केएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि नियुक्त झालेल्या नवीन निवडक अधिकाऱ्यांना ओळखपत्रे दिली.
आतापर्यंत पूर, नैसर्गिक आपत्ती आणि साथ रोगांच्या काळात राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निस्वार्थ सेवा दिली आहे. अनेक कुशल अधिकाऱ्यांच्या कार्यकतृत्वामुळं आजवर राज्यांनं मोठमोठ्या संकटांचा सामना केला आहे. नविन सर्व अधिकाऱ्यांनी देखील जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. जनतेला भेडसावणारे बहुतांशी प्रश्न गुंतागुंतीचे असतात. अधिकाऱ्यांनी अशा समस्यांची गुंतागुंत समजून घेऊन त्यांचं निराकरण करायल पाहिजे, अशी अपेक्षा विजयन यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांकडून ठेवली आहे.
आपल्या देशातील सर्वात प्रगत आणि सुशिक्षित राज्यांमध्ये केरळचा समावेश होतो. केरळवर दरवर्षी अनेक नैसर्गिक आपत्ती आणि साथ रोगांचं आक्रमण होतं. मात्र, तेथील प्रशासकीय अधिकारी लोकांना हाताशी धरून प्रत्येक संकटाचा सामना करतात. ही गोष्ट लक्षात आल्यानं केरळ सरकारनं केएएसची निर्मिती केली आहे. भविष्यात ही परिक्षा राज्यासाठी कितीपत फायद्याची ठरते, हे याकडं आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. इतर राज्यांनी देखील केरळकडून प्रेरणा घेतली तर नवल नको वाटायला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.