आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
हवामान बदलासंबंधी जगामध्ये अनेक परिषदा आणि संमेलने होत असतात. हवामान बदलाचा सबंध जगावर किती वाईट परिणाम काहीच दिवसांमध्ये दिसून येईल याची प्रचिती पूर्व आफ्रिकेतील केनिया या देशामध्ये पडलेल्या भयंकर सुक्या दुष्काळावरून येऊ शकते. गुरांचे शव रस्त्याच्या दुतर्फा रांगेत आहेत. हा रस्ता उत्तर केनियाच्या वजीर काउंटीमधील बियामाडो या निद्रिस्त गावाकडे जातो.
तळपत्या उन्हात कुजलेल्या आणि विखुरलेल्या प्राण्यांचे हे भयानक दृश्य प्रदीर्घ दुष्काळाचा परिणाम आहे. हे प्राणी येथील ग्रामीण लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाचे महत्वाचे साधन होते. “७२ वर्षांच्या आयुष्यात मी असं कधीच पाहिलं नाही”, असं बियामाडो येथील रहिवासी इब्राहिम अडो यांनी सांगितलं.
सप्टेंबरपासून, केनियाच्या उत्तरेकडील बहुतांश भागात सामन्यतः पडणाऱ्या एकूण पावसाच्या ३० टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. ‘फॅमिन अर्ली वॉर्निंग सिस्टम नेटवर्क’नुसार, पावसाचा हा हंगाम अनेक दशकांतील सर्वांत वाईट हंगाम आहे. पावसाच्या कमतरतेमुळे जनावरांना आवश्यक असणारी कुरणे नष्ट झाली आहेत आणि अन्न, पाण्याची टंचाई वाढली आहे.
स्थानिक रहिवासी अडोने स्वतःची अर्ध्याहून अधिक गुरे गमावली आहेत. जे उरलेले आहेत ते दूध देण्यासाठी खूप कमकुवत आहेत, अंगावर पुरेसे मांस नसल्याने ते विकलेही जाऊ शकत नाहीत. पुढे अडो म्हणतो, गेल्या चार महिन्यांत एका गायीची किंमत सुमारे ४० हजार केनियन शिलिंगवरून ५ हजार केनियन शिलिंगपर्यंत घसरली आहे.
आतापर्यंत कधीच असे होत नव्हते. अडो सारख्या रहिवाशांना दुष्काळाच्या परिणामाचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकट येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यांना पाणी शोधणे अत्यंत अवघड जात आहे. मका हे आता त्यांचे एकमेव अन्न बनले असून प्राण्यांची अवस्थासुद्धा अत्यंत बिकट झाली आहे. प्राण्यांची हाडे पार कातडीमधूनही बाहेर येतात इतके प्राणी दिवसेंदिवस कमकुवत होत आहेत. येथील स्थानिकांना चांगल्या पावसाची, हिरव्यागार कुरणांची, निरोगी प्राणी आणि कमी आर्थिक त्रास यांची सवय आहे.
तज्ञांच्या अंदाजानुसार, जर या वर्षाअखेरपर्यंत पाऊस न पडल्यास डिसेंबर २०२० पासून हा सलग तिसरा दुष्काळ असेल. डिसेंबर २०२० मध्येच सध्याचा दुष्काळ सुरू झाला. वारंवार आणि दीर्घकाळ पडणारा दुष्काळ हा दिवसाचा क्रम बनत चालला आहे, असं केनियाच्या राष्ट्रीय दुष्काळ नियोजन समितीचे अध्यक्ष जेम्स ओडोर यांनी म्हटले आहे. वजीरसह केनियाच्या शुष्क आणि अर्ध-शुष्क काऊंटींमध्ये सुमारे २.४ दशलक्ष लोकांना नोव्हेंबरपासून अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, शिवाय यामध्ये फेब्रुवारीत १.४ दशलक्षाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे गेल्या महिन्यात युनायटेड नेशन्सने सांगितले.
अशाच लोकांमध्ये एक २५ वर्षीय सहा महिन्यांची गर्भवती तरुणी आहे. ती तिच्या एक-दोन वर्षांच्या लहान लहान मुलांना फक्त मका खाऊ घालत आहे आणि स्वतःचा उदरनिर्वाहसुद्धा फक्त मक्यानेच करीत आहे. दोन्ही चिमुकल्यांना डायरियाचा त्रास होत आहे. डायरिया हे पाच वर्षांखालील मुलांमध्ये कुपोषणाचे सर्वात जास्त आढळणारे लक्षण आहे. ते अगदी सहजपणे आजारी पडतात. तिचा लहान मुलगा फ्लूपासून बरा होऊ शकत नाही अशीही भीती कुलेला वाटते. डिहायड्रेशनमुळे असामान्य थकवा आणि वेगवान हृदयाचे ठोके यामुळे तिचे दैनंदिन जीवन संघर्षमय झाले आहे. ती म्हणते, “माझ्याकडे फक्त पाऊस येण्याची आशा उरली आहे.”
४ लाख ६५ हजारपेक्षाही जास्त मुले आणि ९३ हजार गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया हे दुष्काळाच्या काळात सर्वात असुरक्षित गट असतात. उत्तर केनियामध्ये हे गट आधीच तीव्र कुपोषित आहेत. घरासाठी पाणी आणण्याची जबाबदारी पारंपारिकपणे महिलांची असते, परंतु पावसाच्या अनुपस्थितीत या दैनंदिन कामासाठी तासाभराचा प्रवास होऊ शकतो.
केनियाच्या राष्ट्रीय दुष्काळ नियोजन समितीच्या मते, नॉर्दर्न काउंटीमध्ये ऑक्टोबर महिन्यात मानवी वस्तीपासून पाणवठ्याचे सरासरी अंतर सुमारे १४ किलोमीटर होते. स्तनपान करणाऱ्या माता दीर्घकाळ घराबाहेर राहिल्याने कमी दूध पिणाऱ्या लहान मुलांवर गंभीर परिणाम होतो. तसेच, फक्त मक्याच्या आहारामुळे आईच्या शरीरात दुधाचे उत्पादन कमी होते आणि हा आहार दुधाला कमी पौष्टिक बनवतो.
जागतिक हवामान संघटनेच्या मते, २०२० हे आफ्रिकेतील आतापर्यंतचे तिसरे-उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे. अंदाजानुसार, २०५० पर्यंत तापमान २.५ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढू शकते. ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढीमुळे हवामानातील बदल मोठ्या प्रमाणात होतात. उबदार वातावरणात जास्त आर्द्र हवा येऊन अतिवृष्टी होऊ शकते. परंतु यामुळे अधिक बाष्पीभवन देखील होऊ शकते आणि अधिक तीव्र दुष्काळ पडू शकतो.
केनियाच्या राष्ट्रीय दुष्काळ नियोजन समितीनुसार उत्तर केनियामध्ये, हवामानातील बदल ही समस्या आहेच, परंतु लोकसंख्या वाढ, कृषी सिंचन आणि वसाहतींच्या विस्तारामुळे लँडस्केपमध्ये बदल आणि इतर घटकांमुळे दुष्काळाचा परिणाम आणखीनच तीव्र झाला आहे. संसाधनांच्या कमतरतेचा स्थानिक समुदायांवर प्रभाव पडतो.
यामुळे सुपीक जमिनीच्या नियंत्रणाबाबत वाढता तणाव, तसेच जमिनीच्या उच्च किमती आणि पाण्याच्या शोधात दुर्गम भागात त्यांच्या गुरांचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण सोडणे अशा समस्या उद्भवतात. दुष्काळाच्या अशा भयानक परिणामांना सामोरे जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाहीत, परंतु केवळ दीर्घकालीन शाश्वत विकास प्रकल्प हे त्यावरील उत्तर आहे. शाश्वत विकास हा महाग तर आहेच शिवाय शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी बराच वेळ लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.