आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
उन्हाळा सुरु झाल्यावर वाढत्या उकाड्याचा त्रास वाचवण्यासाठी सगळेच काही ना काही पर्याय शोधतात. फॅन, कुलर, एसी, फ्रीज, माठ, सरबत, कोल्ड्रिंक असे सगळे पर्याय वापरूनही जेव्हा उकाडा हैराण करू लागतो तेव्हा हिल स्टेशन किंवा थंड हवेच्या ठिकाणाचा शोध सुरु होतो. अनायासे या काळात शाळा-कॉलेजेसनाही सुट्ट्या असतात मग एक छानशी ट्रीप तर बनतेच ना.
भारतातील हवामान उष्ण असले तरी इथली काही ठिकाणं ही खास थंड हवेसाठी प्रसिद्ध आहेत. जसे महाबळेश्वर, माथेरान, कश्मीर, हिमालयीन पर्वत रांगा, अशी कितीतरी ठिकाणं आहेत. थंड हवेसोबतच या प्रत्येक ठिकाणचं काही वेगळेपण आणि खास वैशिष्ट्यही आहेच. हिमालयातील हिल स्टेशन म्हटले की अनेकांना कुलू-मनालीचीच आठवण होते. पण याच हिमालयीन डोंगर रांगातील आणखी एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणजे कसोल आणि खिरगंगा.
दिल्लीपासून १४ तासांच्या अंतरावर असणाऱ्या कुल्लू जिल्ह्यातून तुम्ही मनिकरण मंदिराचा रस्ता धरलात तर या मंदिरापूर्वीच कसोल हे गाव लागते. या गावापासून मनिकरण मंदिर फक्त चार किमी अंतरावर आहे.
या छोट्याश्या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या सेवासुविधांचा लाभ घेता येईल. याठिकाणी इस्राईली कॅफे आहेत. रिव्हर कॅम्पिंगसारखे ॲडव्हेंचरस खेळ आहेत आणि हिरव्यागार लुसलुशीत गवताचा प्रदेश आहे.
कसोलपासून फक्त अर्धा तासाच्या अंतरावर छलाल नावाचे एक गाव आहे जिथे तुम्हाला सदाहरित बागा दिसतील.
शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशीही अनेक हौशी पर्यटक याठिकाणी आवर्जून भेट देतात. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काहीशी गजबज पाहायला मिळेल. याहूनही अधिक शांत अशा रमणीय ठिकाणी तुम्हाला जायचे असेल तर कसोलपासून एक तास पुढे असणाऱ्या तोश गावात जाऊ शकता. इथे राहण्यासाठी एखाद्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहू शकता. अगदी शांत वातावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला इथे वेळ घालवायला मिळेल. अशा वातावरणात रात्र घालवल्यानंतर तुमचा वर्षभराचा शीण निघून जाईल.
ट्रेकची इच्छा असेल तर इथून पुढे तुम्ही खीरगंगाला जाऊ शकता. तोशपासून खाली चार किमी अंतरावर ही नदी आहे. इथे जाण्यासाठी वाहने मिळत नाहीत. म्हणूनच हा डोंगर उतरण्यासाठी ट्रेकिंग हा एक उत्तम पर्याय आहे.
याठिकाणी दोन नद्यांचा संगम झालेला आहे. आधीच्याच थंड वातावरणात या दोन नद्यांचा संगम आणखीनच थंडाव्याची भर घालतो. खाली उतरून गेल्यावर या नदीकाठी मस्त निवांत वेळ घालवता येतो. इथे फोटोसेशनसुद्धा खूप चांगले होऊ शकते. बर्फासारखे थंड पाणी आणि त्यावरून वाहणारा वारा उन्हाळ्यात हा अनुभव घेणे म्हणजे परमसुख..!
नदीच्या एका बाजूला हिरवी झाडी आहेत आणि दुसऱ्या बाजूला शुष्क डोंगर आहे. झाडे, पक्षी, प्राणी आणि त्यांचे आवाज यांची आवड असेल तर तुम्ही इथल्या गर्द झाडीतून फिरून तोही आनंद घेऊ शकाल.
इथे सुंदर स्वच्छ झरे आहेत. नद्यांचे तुकडे आहेत, धबधबे, मोठमोठी झाडे असे सगळे चित्र असल्यावर दुसऱ्या कशाचीही आठवण होणार नाही.
हा ट्रेक पूर्ण करण्यास किमान पाच तासांचा तरी अवधी लागतोच. पण हा रस्ता इतका सुंदर आहे की प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून जाईल.
याठिकाणी तुमच्या जेवणाची आणि राहण्याची सोयही होऊ शकते. शिवपार्वतीची भेट याच खिरगंगाच्या ठिकाणी झाली असे म्हटले जाते. म्हणूनच इथे एक शिवाचे मंदिरही आहे. याच ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. हे गरम पाणी पर्यटक अंघोळीसाठीही वापरू शकतात.
शिवाने आशीर्वाद दिल्यावर या नदीतून पाण्याऐवजी खीर वाहू लागली, असे म्हटले जाते. म्हणून या नदीला खीरगंगा हे नाव पडले.
आजही या नदीतून वाहणारे पाणी पांढऱ्या रंगाचेच दिसते. जणू काही नदीतून पाण्याऐवजी दुधच वाहत आहे. या नदीतील पाण्यात सल्फरचे प्रमाण अतिरिक्त असल्याने याला पांढरा रंग आला आहे. काळाच्या ओघात या नदीतील पाण्याचा शुभ्रपणा कमी झाला असल्याचे इथले गावकरी सांगतात. खीरगंगेवरील प्रसन्न वातावरण आणि शुद्ध हवा यामुळे तुमचे मनही प्रसन्न होते. या ठिकाणी राहण्यासाठी छोट्या छोट्या राहुट्या उभारल्या जातात. शिवाय, जेवणासाठी कॅफे आहेत.
याठिकाणी राहण्याचा फायदा म्हणजे गर्दी, धावपळ, रोजच्या जीवनातील तणाव, तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनाभोवती पडलेला विळखा, अशा कित्येक गोष्टींपासून सुटका होते. निसर्गाच्या कुशीत राहिल्याने मनावरील मरगळ झटकली जाते. मोबाईलला रेंजच नसते त्यामुळे त्यातील ॲप्स आपले लक्ष वेधून घेऊ शकत नाहीत. खऱ्या अर्थाने तणावपूर्ण दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीपासून इथे थोडीफार का होईना मुक्ती मिळते.
अशा वातावरणात उगवता सूर्य पाहण्याची संधी म्हणजे एक दुर्मिळ योगच. इथला सूर्योदय पाहिल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास करून पुढच्या ठिकाणी जाऊ शकता.
मनिकरण मंदिरात लंगर असते तिथे जाऊन तुम्ही जेवणाचा स्वाद घेऊ शकता. अशा वातावरणातील अन्नाला एक वेगळी चव असते. त्यानंतर तुम्ही दिल्लीला परतण्याचा विचार करू शकता.
परतीच्या प्रवासात पुन्हा तुम्हाला गर्दी, ट्राफिक जॅम, अशा सगळ्या दैनंदिन प्रश्नांना तोंड देतच परतायचे असते पण, यावेळी तुमचे मन थोडेसे शांत झालेले असते एका वेगळ्या दुनियेचा अद्भुत अनुभव घेऊन तुम्ही नुकतेच या सगळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी परतत असता. मानसिक शक्ती वाढल्याचे तुम्हाला नक्की जाणवेल. निसर्गाने त्याच्या जवळील उर्जा तुमच्याकडे हस्तांतरित केल्याचाही तुम्हाला अनुभव येईल.
म्हणून वर्षातून एकदा तरी अशा निसर्गसंपन्न वातावरणात एक दोन दिवस घालवलेच पाहिजेत, ज्यामुळे मन पुन्हा ताजेतवाने होते आणि मग दैनंदिन जीवनातील कुरुबुरी म्हणजे समस्या न वाटता क्षुल्लक तक्रारी असल्याचे जाणवू लागते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.