आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांविषयी तर बरीच चर्चा केली जाते, पण क्रिकेटमधील एक दुर्लक्षित घटक म्हणजे क्षेत्ररक्षक. तुमचा आवडता फलंदाज कोण किंवा गोलंदाज कोण? असे विचारल्यावर सगळे पटापट उत्तरं देतील, पण तुमचा आवडता क्षेत्ररक्षक कोण? असे विचारल्यास बहुतेकांना उत्तर देणे जडच जाईल.
पण अगदी हार्डकोर क्रिकेटप्रेमींना क्षेत्ररक्षक म्हटल्यावर पहिली आठवण होईल ती जॉंटी ऱ्होड्सची. जॉंटीच्या खेळाने अनेकांना क्रिकेटमध्ये येण्याची प्रेरणा दिली. अनेकांनी त्याची नकल करण्याचाही प्रयत्न केला, पण जे जॉंटीला जमले ते क्वचितच कुणाला जमेल. काही मोजक्याच खेळाडूंना निसर्गत: एक वरदान मिळालेले असते आणि जॉंटी त्यापैकीच एक.
१९९२ साली त्याने पाकिस्तानच्या इंजमाम-उल-हकला ज्याप्रकारे बाद केले ते पाहून जॉंटी हा क्रिकेट रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. त्याच्या पुढच्या सामन्यात तर त्याला पहिल्या अकरा खेळाडूतही स्थान दिले नव्हते तरीही तो ‘मॅन ऑफ दि मॅच’ ठरला.
या सामन्यात जॉंटीने अपघाताने मिळालेल्या संधीचे सोने केले. म्हणूनच हा सामना, जॉंटी आणि त्याचा खेळ यांना क्रिकेट जगतात एक वेगळे स्थान आहे. जाणून घेऊया जॉंटीच्या या अद्भुत कामगिरीबद्दल!
८ मार्च १९९२ रोजी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान बिर्स्बेनच्या मैदानावर आमनेसामने होते. या सामन्यात त्याने ज्याप्रकारे पाकिस्तानच्या इंजमाम-उल-हकला बाद केले ते पाहून कुणालाही आश्चर्य वाटणे साहजिक होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातील मथळे काही असे होते, “तो पक्षी होता? विमान होते? नाही, तो जॉंटी होता!” जॉंटी ऱ्होड्सने अक्षरश: सर्वांना वेड लावले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता हे त्यानं केलं तरी कसं? बॉलवर जॉंटीने अशी काही झडप घातली होती की बास्स! यानंतरही जॉंटीने अनेकदा अशी सुपरमॅन स्टाईलची कामगिरी करून दाखवलेली आहे. याचवेळी जॉंटी फक्त क्षेत्ररक्षणासाठीच जन्माला आहे, असा शिक्काच त्याच्यावर बसला. खेळताना भान हरपून जाणे हीच त्याची खासियत होती.
१९९३-९४ साली वेस्ट इंडीज आणि आफ्रिका हे दोन्ही संघ हिरो कप मालिका खेळण्यासाठी भारतात आले होते. मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर या दोन्ही संघांची लढत होती. स्टेडियम खचाखच भरला होता. आपल्या आगळ्यावेगळ्या खेळाने जॉंटी हा पदार्पणातच एक दंतकथा बनला होता. मैदानातील त्याचा वावर पाहून प्रेक्षकांची नजर त्याच्यावरून हटत नसे.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करून वेस्ट इंडीजसमोर १८० धावांचे लक्ष्य उभे केले. वेस्ट इंडीजने सुरुवात तर एकदम दमदार केली होती. दक्षिण आफ्रिकेचा पराभव निश्चित होता. वेस्ट इंडीजला रोखण्यासाठी आफ्रिकन संघाचे हरेक प्रयत्न सुरु होते. इतक्यात दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेरेल कुलीनन जखमी झाला आणि त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. त्याच्याऐवजी संघासोबत राखीव खेळाडू म्हणून आलेल्या जॉंटीला मैदानात उतरण्याची संधी मिळाली.
भारतीयांनी जॉंटीचा खेळ याची देही पाहण्याची ही पहिली वेळ होती. या सामन्यात त्याने पाच झेल घेतले आणि एक नवा विक्रम रचला.
आपल्या कौशल्यपूर्ण फिल्डिंगने जॉंटीने एकमागून एक ब्रायन लारा, फील सिमंस, डेसमंड हेंस, एंडरसन कमिन्स आणि जिमी एडम्स अशा मोठमोठ्या खेळाडूंना धडाधड त्याने तंबूत परतण्यास भाग पाडले. वेस्ट इंडीजची अर्धी एक फळी तंबूत परतल्यानंतर त्यांचा आत्मविश्वासच हरवला.
शेवटी हा सामना त्यांच्या हातून निसटलाच. ४१ धावांनी त्यांनी हार पत्करली होती. सामान्यानंतर ‘मॅन ऑफ दि मॅच’साठी त्याच्याच नावाची घोषणा करण्यात आली. एखाद्या खेळाडूला क्षेत्ररक्षणासाठी हा किताब दिला जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
या सामन्यात त्याने ४० धावाही काढल्या होत्या. त्याचा संघ ४१ धावांनी जिंकला होता. जॉंटीच्या प्रत्येक कॅचमागून अख्ख्या स्टेडियमभर फक्त “जॉंटी जॉंटी”चाच जयघोष ऐकू येत होता. त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातून जे वाचलं किंवा टीव्हीवर जे पाहिलं-ऐकलं ते भारतीय क्रिकेट रसिक आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते.
त्याच्या खेळाचे कौतुक करत वेस्ट इंडीजचा कर्णधार रिची रिचर्डसननेही पत्रकार परिषदेत मजेशीर वक्तव्य केले, “आमच्या संघाला जॉंटीइसीसने आम्हाला पछाडून सोडले होते.”
जॉंटीचा वेग आणि त्याची लवचिकता यांच्या जोरावर मैदानावर त्याने अनेकदा सुपरहिरोसारखी कामगिरी करून दाखवली. कित्येकदा तो उंच उडी मारता मारता पडलाही असेल, पण दुसऱ्याच क्षणी तो तितक्याच उत्साहाने उभा राहायचा. पळताना, उडी मारताना पडला म्हणून कधीही त्याच्यावर जायबंदी होण्याची वेळ आली नाही.
जॉंटीला क्रिकेट व्यतिरिक्त हॉकी आणि फुटबॉलमध्येही चांगली गती होती. १९९२ साली बार्सिलोना येथील ऑलिम्पिक सामन्यासाठी त्याची आफ्रिकेच्या हॉकी संघात निवड झाली होती आणि तो या सामन्यात सहभागीही झाला होता. त्याच वर्षी त्याला क्रिकेट संघातही सामील होण्याची संधी मिळाली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने क्रिकेट रसिकांवर अशी काही छाप सोडली की, क्रिकेटच त्याची कर्मभूमी बनून गेली.
१३ नोव्हेंबर १९९२ रोजी त्याने भारत विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला आणि या सामन्यात त्याने ८४ चेंडूत ४१ धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केल्याने त्याला पुन्हा संघात स्थान देण्यात आले.
१९९३ साली श्रीलंकन दौऱ्यात त्याने पहिले शतक ठोकले. फलंदाजीतही तो इतरांपेक्षा कमी नाही, हे त्याने दाखवून दिले. अनेकदा त्याने आपल्या फलंदाजीने विजयश्री खेचून आणली आहे.
२००० साली त्याने कसोटी सामन्यातून निवृत्ती घोषित केली आणि यानंतर फक्त एकदिवसीय सामन्यावरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. खेळ खेळताना तो समर्पित भावनेने स्वतःला झोकून देतो. खेळताना त्याचे लक्ष पूर्णतः फक्त खेळाकडे असते बाकी सगळे विचार त्याच्या मनातून हद्दपार झालेले असतात.
प्रत्यक्ष मैदानावर त्याला खेळताना पाहणे ही क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असे. लवकरच एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याला स्वीप शॉट्स खेळण्यासाठी ओळखले जाऊ लागले.
क्षेत्ररक्षण करणे ही देखील क्रिकेटमधील एक महत्त्वाची बाजू आहेच, पण संघाची गरज म्हणून त्याने फलंदाजीचाही कसून सराव केला आणि लवकरच तो एक चांगला फलंदाज म्हणूनही ओळखला जाऊ लागला. २००३ मध्ये वर्ल्ड कपदरम्यान त्याचे बोट फॅक्चर झाले. यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण तो क्रिकेटपासून दूर झाला नाही. दक्षिण आफ्रिका आणि आयपीएल संघासाठी तो फिल्डिंग कोच म्हणून काम करतो.
भारतावरही त्याचे विशेष प्रेम आहे, इतके की त्याने आपल्या मुलाचे नावच इंडिया ठेवले आहे. भारताचा इतिहास, इथली संस्कृती आणि परंपरा जगण्यातील समतोल राखण्यास मदत करते, असे तो म्हणतो.
जॉंटी सारखे खेळाडू वारंवार घडत नाहीत. अगदी लाखात एखादा खेळाडू जॉंटी होऊ शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.