आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आजूबाजूला पसरलेला अथांग समुद्र. नजरेच्या टप्प्यातही माणूस नाही. सोबतीला केवळ समुद्रातले अजस्त्र मासे आणि सतत मृत्यूचं सावट अशा परिस्थितीत जिवंत राहणं, तेही थोडे थोडके दिवस नाही तर चारशे अडतीस दिवस, हे फ़ारच धाडसाचं आहे. मेक्सिकोच्या ‘जो साल्वॅडॉर’ला या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. त्याच्या अचाट बचावाची ही कथा.
मासेमारी करणार्याला ना समुद्राचं कौतुक ना भिती. मात्र मासे पकडून जमिनीवर परत येईपर्यंत सगळं ठीक असतं. समजा एखाद्या दिवशी मासेमारीला म्हणून निघालं आणि पुन्हा परत येताच आलं नाही तर? दुर्दैवी परिस्थितीला तोंड देत महाकाय सागरात बोट भरकटली तर? कित्येक महिने खायला अन्न नाही की प्यायला पाणी नाही अशा स्थितीत जगावं लागलं तर? भूकेचा आगडोंब उसळला असताना खायला काहीच नाही म्हणून मृत सहकार्याला खावं लागलं तर? वाचूनही अंगावर काटा येणारी ही गोष्ट. एखाद्या थरारपटात शोभावी अशी कथा मात्र हे आयुष्य वास्तवात जगलं आहे मेक्सिकोच्या ‘जो साल्वॅडॉर’ यानं.
प्रशांत महासागर हा पुथ्वीवरचा सर्वात महाकाय आणि खोल असा समुद्र आहे. हा इतका महाकाय आहे की पृथ्वीवरची सगळी जमिन एकत्र केली तरीही तिला पुरून उरेल इतकं. धरतीचा जवळपास तीस टक्के इतका भाग यानं व्यापला आहे. अशा या महाकाय सागरात कोणी भरकटलं तर त्याचा ठाव लागणं कठीणच आहे.
‘जो साल्वॅडॉर’नं अजाणपतेपणीच असा विश्वविक्रम नोंदविला आहे की भविष्यात जाणुन बुजून तो मोडायचं धाडस कोणी करणार नाही. या महाकाय सागरात चारशे अडतीस दिवस एकट्यानं रहाण्याचं धाडस त्यानं नाईलाजानं दाखवलं आहे.
ही गोष्ट सुरू होते २०१२ साली मेक्सिको येथे. १७ नोव्हेंबर २०१२ ला जो आणि त्याचा एक मित्र मासेमारीसाठी छोटीशी मोटार बोट घेऊन निघाले. जो हा अत्यंत अनुभवी आणि कुशल सेलर होता. त्यांनी विचार केला की तीस तासांची छोटी शिफ़्ट करून किनार्यावर परतायचं. याचं कारण त्यांनी जी बोट निवडली होती ती क्षमतेनं लहान होती जी दीर्घकाळ समुद्रात तग धरू शकणार नव्हती. केवळ सात मिटर (२३ फ़ूट) लांब अशी ती नाव होती.
नावेत खाण्यापिण्याचं विशेष सामान नव्हतं. एक मोटार आणि पकडलेले मासे ठेवायला पोर्टेबल रेफ़्रिजरेटर इतकंच त्या नावेत होतं. किनार्यावरून निघतानाच त्यांना कल्पना होती की समुद्री वादळ येऊ घातलं आहे. मात्र तरीही त्यांनी चान्स घेण्याचं ठरविलं. आपल्या कौशल्यावर त्यांना पूर्ण विश्वास होता. वादळ बाहेरच्या दिशेनं प्रवास सुरू करण्यापूर्वीच आपण परतलो तर आठवड्याभराचा खर्च निघेल या हेतूनं ते सपासप पाणी कापत समुद्रात घुसले.
किनार्यापासून साधारण १२० किमी दूर आत समुद्रात आल्यावर मात्र त्यांनी ज्याची कल्पनाही केली नव्हती ते घडलं. किनार्यावर बसून त्यांनी लावलेला अंदाज साफ़ चुकला होता. अचानक जोराचं वारं वाहू लागलं. रात्रीचा एक वाजला होता आणि वादळानं त्यांच्याकडे झेपावायला सुरवात केली होती. बघता बघता वादळानं बोटीला घेरून टाकलं. विचार करण्याइतका वेळ उरला नाही. या दोघांनी बोटीला बांधलेलं मासेमारीचं जाळं तोडून टाकलं आणि अतिरिक्त सामान समुद्रात टाकून द्यायला सुरवात केली, जेणेकरून वादळात हेलकावे खाताना वजनामुळे बोटीला अडचण येउ नये.
वादळानं बोटीला तडाखा दिला तेंव्हा ते किनारपट्टीपासून सहा तासांच्या अंतरावर होते. पूर्ण ताकदीनिशी त्यांनी किनार्याकडे नाव न्यायला सुरवात केली. बोटीला किनार्याच्या दिशेने नेईपर्यंत सकाळचे सात वाजून गेले. किनार्यापासूनचं अंतर केवळ २४ किमी उरलं होतं. सूर्यप्रकाशात किनारपट्टी दिसायला सुरवात झाली होती.
याच क्षणाला नियतीनं असा एक तडाखा दिला की दोघांचं आयुष्य पलटलं. वादळावर त्यांनी मात केली पण नियतीवर मात करु शकले नाहीत. किनार्याची जमीन नजरेत आल्यावर सुटकेचा श्वास सोडत असतानाच त्यांच्या बोटीतून अचानक धूर निघू लागला. बोटीला असणारी एकुलती एक मोटार जळाली होती आणि दुर्दैवानं ही एकमेव मोटार बोटीत होती.
पर्यायी मोटार नसल्यानं पुढे जाणंच अशक्य होऊन बसलं. याचवेळेस पुन्हा एकदा जोराचं वारं सुटलं आणि बोट समुद्रात ओढली जाऊ लागली.
त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी घडली की बोटीतला रेडिओ चालू होता आणि त्यावरून त्यांनी किनार्यावर त्यांच्या मालकाला त्याचं लोकेशन पाठविण्याचं ठरविलं. मात्र जसं काही आदल्या रात्रीपासून थरार चित्रपटाची कथा लिहिणार्यानं नियतीच्या हातात लेखणी देऊन या दोघांची गोष्ट लिहायला सुरवात केली होती. कारण जो संदेश पाठवत असतानाच रेडिओची बॅटरी संपली आणि संदेश पाठवणंही अशक्य होऊन बसलं.
विचार करा, किनारा नजरेसमोर आहे मात्र तिथपर्यंत जाता येत नाही, समुद्रात पुन्हा जायचं नाही मात्र बोटीला जाण्यावाचून थांबवता येत नाही. मदतीसाठीची यंत्रणा तर आहे पण ती वापरता येत नाही. निसर्ग आणि दुर्दैव यांच्यापुढे हार मानत जे होईल ते बघण्यावाचून पर्याय न उरलेले हे दोघे त्या क्षणाला काय मनस्थितीत असतील? त्यांची समुद्र बोट आत आत खेचत राहिला आणि ते फ़क्त पहात राहिले.
इकडे किनार्यावर त्यांच्या मालकाला सगळ्या प्रकाराची कल्पना आली. दोघेजण बोट घेऊन गेले मात्र परतले नाहीत आणि समुद्री वादळ आलं त्यामुळे काय घडलं असावं याचा अंदाज आल्यानं त्यानं शोधमोहिम चालू केली. तिथून पुढे अनेक महिने समुद्रातील विविध मासेमारी टापूत ही शोधमोहिम राबविण्यात आली मात्र ना बोटीचा ठावठिकाणा लागला ना जो आणि त्याच्या मित्राचा.
पाच दिवसांनंतर जोराच्या वार्यानं त्यांना चारशे किमीहून जास्त आत समुद्रात नेलं होतं. इथून सुरू झाला या दोघांचा अंतहीन प्रवास. त्यांच्या बोटीचा जीव इतका लहान होता की महाकाय समुद्रात ती ठिपक्याइतकीही दिसत नव्हती. वरून विमान गेलं असतं तरीही त्याला ही बोट दिसली नसती.
आलेली परिस्थिती त्यांनी स्विकारली. जे होईल ते बघू म्हणत दिवस काढायला सुरवात केली. पक्षी आणि मासे हातानंच पकडून मारून खायला सुरवात केली. समुद्राचं पाणी प्यायलं तर आपण जिवंत राहू शकणार नाही याची त्यांना कल्पना होती. तहानेनं घसा कोरडा पडू लागल्यावर मात्र त्यांनी घोट घोट समुद्राचं पाणी प्यायला सुरवात केली. इतक्यात त्यांना एक प्लॅस्टिकची बाटली पाण्यावर तरंगताना दिसली. ती घेऊन त्यांनी त्यात पावसाचं पाणी भरून ठेवायला सुरवात केली आणि हे पाणी ते पिऊ लागले.
मात्र पाऊस पडला नाही तर? तर मग चक्कं त्यांनी मासे किंवा कासवाचं रक्त प्यायला सुरवात केली. मात्र मासे किंवा कासव नेहमीच मिळे असंही नाही. अशावेळेस ते चक्क स्वत:चीच लघवी पित असत.
अथांग समुद्र आणि हे दोघेच बंद बोटीत लाटा नेतील तिकडे जाऊ लागले. एकमेकांशी गप्पा मारत एकमेकांना धीर देत, उसनं अवसान आणून चेष्टा-विनोद करत कसेबसे त्यांचे दिवस चालले होते. बघता बघता चार महिने उलटले. अजूनही ना जमीन नजरेच्या टप्प्यात येत होती ना कोणतं जहाज. वाचण्याच्या आशा मावळत चालल्या होत्या.
आता त्याच्या मित्रानं हाय खाल्ली. त्याला भास होऊ लागले. आधीच तणावात असलेला जो आपल्या मित्राचे हाल बघून आणखीनच निराश झाला. काय करावं सुचत नव्हतं. अखेर आजारी पडून एक दिवस हा मित्र मरण पावला. जो आता एकटा उरला होता आणि निराश झाला होता. ना मरण येत होतं ना जगण्यासाठी आशा दिसत होती.
किनारा सोडून आठ महिने झाले होते आणि साधारण आठ हजार किमी अंतर त्यानं पार केलं होतं. अंतरांचा हिशोब व्यर्थच होता कारण जमीन दिसायची चिन्ह नव्हती. मात्र एक दिवस नियतीला अखेर त्याची दया आली. ३० जानेवारी २०१४ या दिवशी त्याला पाण्यावर अचानकच नारळ तरंगताना पाहिले. त्याला अंदाज आला नक्कीच आजूबाजूला जमिन असावी. त्याला नव्यानं हुरूप आला. त्यानं लक्षपूर्वक पाहिलं तर दूरवर त्याला जमिनीचा तुकडा तरंगताना दिसला. त्यानं आधी तो भास नाही याची खात्री करून घेतली आणि मग खात्री झाल्यावर ताबडतोब पाण्यात हात मारायला सुरवात केली. जवळपास अर्धा दिवस पोहून जात त्यानं जगातल्या सर्वात लहान बेटावर, इबॉन ॲटोलवर तब्बल ४३८ दिवसांनी आणि अकरा हजार किलोमिटर्सच्या प्रवासानंतर पाय टेकले. अशा रीतीने जगातल्या सर्वात मोठ्या समुद्रात हरवलेल्या जो चा दुर्दैवी प्रवास जगातल्या सर्वात लहान बेटावर येऊन संपला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.