आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपली भारतीय संस्कृती ही अतिशय संपन्न आहे. या संस्कृतीमध्ये कला, नाट्य, नृत्य, संगीत, विज्ञान, यांचे योगदान आहे तसेच भारतीय खाद्य संस्कृतीचे देखील भरपूर मोठे योगदान आहे. खाद्य संस्कृतीच्या बाबतीत आपल्या पूर्वजांनी खूप बारीक विचार करून ठेवला आहे. “आहाराचा आणि शरीराचा, आहाराचा आणि मनाचा, आहाराचा आणि चित्त वृत्तीचा संबंध असतो” हे आपल्या पूर्वजांनी सुमारे हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलं आहे. एक परिपूर्ण, वैज्ञानिक, आणि प्राचीन खाद्य संस्कृती असलेला आपला हा देश हा जगाच्या पाठीवर एकमात्र आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे तिन्ही महिने म्हणजे भारतात लग्नाचे दिवस. तुमचं किंवा तुमच्या परिचयामधील कुणाचं लग्न असेल तर मग त्या घरात नुसती लगीनघाई. लग्न म्हटलं की कपडे, दागिने, मंडप, सजावट, हे सर्व आलं. पण याच बरोबर एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे खाणे! जोपर्यंत ते लग्नकार्य संपन्न होत नाही तोपर्यंत त्या लग्नघरात दररोज नुसती मेजवानी असते. आता आपल्या आजी आजोबांच्या काळात, किंवा आपल्या आई वडिलांच्या काळात एक किंवा अधिक गोड पक्वान्न लग्नाच्या जेवणात असणे म्हणजे फार श्रीमंतीचं लक्षण समजलं जायचं.
जसा जसा काळ बदलत गेला तसं या लग्नाच्या मेजवानीत ही बदल होत गेला. आता जर तुम्ही कुणा उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असलेल्या व्यक्तीच्या लग्न समारंभाला गेलात तर सुरुवातीला स्टार्टर, वेलकम ड्रिंक असे बरेच पदार्थ असतात. आपल्या भारतात जेवण झालं की थोडं गोड काही मिळेल का असं विचारणारे तुम्ही पाहिले असतीलच, पण लग्न समारंभात काही हौशी मंडळी जेवण झाल्यावर अहो इथे पान किंवा आईस्क्रीम मिळेल का? असंही विचारणारे तुम्ही पाहिले असतीलच.
आईस्क्रीम हे नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं, काही तब्येतीच्या तक्रारी असणारी मंडळी वगळता बाकी सर्व लोकांसाठी आईस्क्रीम म्हणजे जीव की प्राण. काही उत्साही (खरं सांगायचं तर अति उत्साही) खवय्ये हे ऊन, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता कधीही आईस्क्रीम खातात. त्यामुळे आता आईस्क्रीम हा दाताच्या डॉक्टरकडून आल्यानंतर खाण्याचा खाद्यपदार्थ राहिला नसून आपल्या नियमित असणारा खाद्यपदार्थ झाला आहे.
आपल्या आई-वडील किंवा आजी आजोबांच्या काळात आईस्क्रीम हे फक्त उन्हाळ्यात मिळायचं व ती चैन समजली जायची, आजच्यासारखं कोणत्याही किराणा किंवा औषधांच्या दुकानात ते सहज उपलब्ध होत नसे. पण आज आईस्क्रीम किराणा दुकानातही उपलब्ध असतं. आज जर भारतात तुम्हाला आईस्क्रीम खायचे असेल तर अमूल, दिनशा, मदर डेअरी, नॅचर्लस, या कंपन्यांचे आईस्क्रीम तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही ज्या शहरात राहता तिथला एखाद्या स्थानिक ब्रँडचं आईस्क्रीम मिळेल. पण आईस्क्रीमच्या या सर्व प्रसिद्ध ब्रँड्सची नावं घेताना एक नाव हमखास घेतलं जातं आणि ते म्हणजे.. “वाडीलाल”. “वाडीलाल” हा ब्रँड तुमच्या आजी आजोबांना, आई वडिलांना आणि जे कुणी १९८० आणि १९९० च्या दशकात जन्माला आले असतील अशा सर्व लोकांना “वाडीलाल” हे नाव अगदी परिचयाचं आहे. चला तर आज “वाडीलाल” उद्योग समूहाबद्दल जाणून घेऊ.
असं म्हणतात की उद्योगधंदा करावा तर सिंधी, गुजराती, आणि मारवाडी समुदायाने. इंग्रजीत एक छान वाक्य आहे “Every great journey begins with a small step”.
वाडीलाल या उद्योग समूहाचे संस्थापक होते वाडीलाल गांधी. अहमदाबादचे रहिवासी असलेल्या वाडीलाल गांधी यांनी १९०७ साली सोडा विकण्याचा उद्योग सुरू केला याच बरोबर जोडधंदा म्हणून “पारंपरिक कोठी पद्धतीने” त्यांनी आईस्क्रीम तयार करायला सुरुवात केली.
पारंपरिक कोठी पद्धतीत दूध, बर्फ, आणि मीठ या तिन्ही गोष्टी एका हाताने चालवणाऱ्या यंत्रात घुसळल्या जातात. हळूहळू पारंपरिक कोठी पद्धतीने तयार केलेलं हे आईस्क्रीम संपूर्ण अहमदाबाद शहरात प्रसिद्ध झालं. काही वर्षांत वाडीलाल गांधी यांचा मुलगा रणछोडलाल गांधी देखील वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाला. रणछोडलाल गांधी यांनी त्यांचं सगळं लक्ष हे आता आईस्क्रीम उत्पादनावर केंद्रित केलं.
१९२६ साली वाडीलाल समूहाने त्यांचे पहिले आईस्क्रीम पार्लर सुरू केले आणि याच वर्षी आईस्क्रीम तयार करणारे एक यंत्र देखील वाडीलाल समूहाने जर्मनीमधून आयात केलं. १९४७ साली अहमदाबादमध्ये वाडीलाल समूहाने ४ नवीन आईस्क्रीम पार्लर सुरू केले. १९७० च्या दशकात रणछोडलाल गांधी यांची दोन्ही मुले रामचंद्र गांधी आणि लक्ष्मण गांधी हे ही वाडीलाल समूहात सहभागी झाले.
यानंतर १९८० साली वाडीलाल समूहाने अहमदाबाद शहरात आणखी १० आईस्क्रीम पार्लर्स सुरू केले. वाडीलाल समूहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आपल्या ग्राहकांच्या गरजा आणि इच्छा यांच्यावर बारीक लक्ष असायचं. गुजरातमधला बहुतांश समाज हा शाकाहारी व धार्मिक आहे हे त्यांनी हेरलं.
यानंतर वाडीलाल यांनी आम्ही तयार करीत असलेलं आईस्क्रीम हे शाकाहारी सामग्रीने बनवलं आहे आणि त्याचं सेवन उपवासाच्या दरम्यानही करता येऊ शकतं अशी जाहिरात केली. त्यांची ही अशी जाहिरात करण्याची युक्ती कामी आली आणि यामुळे त्यांच्या उत्पादनात आणि धंद्यात भरभराट झाली.
१९९० साली वाडीलाल यांची चौथी पिढी या उद्योगात सामील झाली. ही चौथी पिढी म्हणजे रामचंद्र गांधी यांची तीन मुलं, वीरेंद्र, राजेश, आणि शैलेश गांधी आणि लक्ष्मण गांधी यांचा मुलगा देवांशु गांधी.१९९० साली वाडीलाल यांची “Vadilal Industries Limited” ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) वर झळकली. वाडीलाल उद्योग समूह हा देशातील हा पहिला आईस्क्रीम ब्रँड असेल ज्यांनी आईस्क्रीम डॉली (Dolly), कोन (Cone) आईस्क्रीम, आणि संडे (Sundae) आईस्क्रीम हे बाजारात आणलं. कसाटा (Cassata) आईस्क्रीम देखील वाडीलाल यांनीच बाजारात आणलं. आपल्या ग्राहकांना आईस्क्रीम घरपोच (Home Delivery) देण्याची सुविधा वाडीलाल उद्योग समूहाने भारतात सुरू केली.
२००१ साली वाडीलाल यांनी सर्वांत मोठे संडे (Sundae) आईस्क्रीम तयार केलं आणि ज्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्ने (Limca Book of Records) घेतली. या सर्वांत मोठे संडे (Sundae) आईस्क्रीम मध्ये 4950 लिटर आईस्क्रीम, 125 किलो सुकामेवा, 390 लिटर वेगवेगळ्या फ्लेवरचा समावेश होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया (Startup India Standup India) ही योजना आणली. या योजनेचा उद्देश तरुणांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा लहान का होईना पण उद्योग सुरू करावा. कुणीतरी असं म्हटलं आहे की एका संस्थेत मोठा नोकर होण्यापेक्षा एका उद्योगाचा लहान मालक होणे कधीही चांगले.
जसं वरती नमूद केलं आहे की “A great journey begins with a small step” या उक्तीतील “a small step” हा शब्द फार महत्त्वाचा आहे. यशस्वी झालात तर तुम्हाला फायदा होईल आणि अपयश आले तर तुम्हाला अनुभव मिळेल आणि त्यातूनच तुमची पुढे भरभराट होईल. वाडीलाल उद्योग समूहाचा प्रवास या नव्या भारतातील तरूणांना उद्योग सुरू करण्यास नक्कीच प्रेरणा देईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.