आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना देश करत असतानाच काही दिवसांपूर्वी आलेल्या एका बातमीने सगळीकडे चर्चेला उधाण आणले. दिल्लीतील निजामुद्दीन मरकज या ठिकाणी झालेल्या तब्लिघी जमातीच्या कार्यक्रमात देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून आलेले २००० मुस्लिम सामील झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे सुरू झालेले असताना, सर्व धार्मिक स्थळांवर गर्दी न करण्याचे आदेश दिले असताना दिल्लीत, तेही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या नाकाखाली एवढे लोक एकत्र येऊन धार्मिक संमेलन भरवतात आणि याची पोलिसांना खबर लागत नाही, हे कसं शक्य आहे?
दिल्लीत झालेल्या त्या कार्यक्रमाबद्दल असे अनेक प्रश्न निरुत्तरीत आहेत.
नंतर काही दिवसांनी तब्लिघी मौलाना आणि या कार्यक्रमाचा प्रमुख धर्मगुरू मौलाना साद याने, सरकारने केलेल्या लॉकडाउनच्या आदेशाला न जुमानता ‘मशिदीत येणे थांबवू नका, मरण्यासाठी मशिदीइतकी योग्य जागा दुसरी नाही’ असे वक्तव्य केले.
मुस्लिमांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी कोरोनाचं कुभांड रचण्यात आलंय असेही बोलले गेले. मुळात जगभरात कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘सोशल डिस्टंसिंग’ चे सूत्र कटाक्षाने पाळले जात असताना तब्लिघी मौलाना लोकांना मशिदीत गर्दी करण्यास का सांगतो? जगभरातून २००० लोकांना दिल्लीत अशा आणीबाणीच्या प्रसंगीही एकत्र करण्याची ताकद बाळगून असणारी ‘तब्लिघी जमात’ ही नेमकी कोणती संघटना आहे, ती कशी सुरू झाली आणि तिचे उद्देश काय? हे जाणून घेणे आवश्यक ठरते.
देवबंदची स्थापना आणि उद्देश –
तब्लिघी जमातीच्या स्थापनेची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी, १८५७ चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर भारतातील मुस्लिम धर्मगुरूंनी एकत्र येत १८६७ साली उत्तर प्रदेशातील देवबंद येथे स्थापन केलेल्या देवबंद विद्यापीठाची आणि देवबंद संघटनेची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल.
सत्तावनचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर त्या उठावात भाग घेतलेल्या मुस्लिम मौलवी, संघटना इत्यादींना इंग्रज सरकारने सामाजिक जीवनातुनच संपवून टाकले होते. पण भारतात एकेकाळी बादशहाचे राज्य होते, दिल्लीच्या तख्तावर मुघलांचा चांदतारा फडकत होता… तीच बादशहाची सत्ता भारतावर पुन्हा प्रस्थापित करण्याचे स्वप्न घेऊन अनेक मूलतत्त्ववादी मुस्लिम प्रवाह त्या काळात अस्तित्वात होते.
लाठीच्या बळावर इंग्रजांनी चिरडून टाकलेला उठाव त्या कामी निरुपयोगी ठरला. सशस्त्र उठावाचा मार्ग अवशस्वी ठरल्यानंतर या संघटनांनी भारतात इस्लाम जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक इस्लामी तरुणाला धर्माची तालीम मिळावी यासाठी एक विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरवले. त्यासाठी उत्तर प्रदेशात देवबंद ही जागा निवडण्यात आली.
कासीम गंगोही, मौलाना मुहम्मद नानोतवी अशा इस्लाममधील मूलतत्त्ववादी परंपरेला मानणार्या लोकांनी ‘दार उल उलूम देवबंद’ नावाने हे विद्यापीठ सुरू केले. या विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या तरुणांना इस्लामचे संपूर्ण शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली .
त्यांनी सुरू केलेले हे विद्यापीठ पुढे भारतीय उपखंडातील अनेक दहशतवादी संघटनांना वैचारिक खाद्य पुरवणार आहे आणि या विद्यापीठातून भारताला पुन्हा इस्लाममय बनवण्यासाठी काम करणारी कट्टर धार्मिक मुस्लिमांची फौज तयार होईल याची त्यांना पूर्ण कल्पना होती.
https://twitter.com/ThePostmanNews/status/1246794858091532288
तब्लिघीच्या संस्थापक देवबंदमध्ये –
मुहम्मद इलियास, तेव्हाच्या मुजफ्फरनगर आणि सध्याच्या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात जन्मलेला तरुण. त्याचा जन्म साधारण १८८५-८६ सालचा. शिकण्याच्या वयात त्याने मुजफ्फरनगर येथे इस्लामी तालीम घ्यायला सुरुवात केली होती. दिल्लीच्या निजामुद्दीन भागात (सध्या चर्चेत असलेले मरकज संमेलन येथेच झाले आहे.) त्याचे वडील एका मशिदीत मौलाना होते. त्यांच्याकडून त्याने शिक्षण घेतले.
देवबंदचा एक संस्थापक रशीद अहमद गंगोही याच्याशी त्याची तेथेच भेट झाली. १९०५ साली त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याच वर्षी त्याने देवबंद विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढचे पंधरा ते वीस वर्षे त्याने देवबंद मध्ये कट्टर मूलतत्त्ववादी इस्लामी शिकवण घेतली. वहाबी इस्लामची कार्यपद्धती समजून घेतली. इस्लामी विस्तारवाद आणि कुराणाचा अभ्यास केला. भारतावर मुस्लिमांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने त्याने काम सुरू केले.
तब्लिघची स्थापना –
१९२६ साली त्याने देवबंदमध्ये मदरसा चालवण्याचे शिक्षण घेतलेल्या मुस्लिम तरुणांना एकत्र केले. त्यांना सोबत घेऊन त्याने सध्याच्या हरियाणातील मेवात या ठिकाणी तब्लिघी जमातीची स्थापना केली.
दीर्घकाळ मुघल अधिपत्याखाली राहिलेल्या भारतात धर्मांतरित केल्या गेलेल्या आणि इस्लाम स्वीकारकेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठीची चळवळ विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जोर धरू लागली होती. ही गोष्ट मुहम्मद इलियास याने गांभीर्याने घेत अशी शुद्धी चळवळ झाल्यास भारतातील मुस्लिम लोकसंख्या भविष्यात कमी होईल हा अंदाज बांधला. आणि याच पायावर त्याने तब्लिघी जमातीचे ध्येय उद्दिष्ट्ये रचण्यास सुरुवात केली.
भारतातील मुस्लिमांना मूळ इस्लामकडे जास्तीत जास्त घेऊन जाण्याचा त्याचा उद्देश होता. पुस्तकी धर्माकडे मुस्लिमांना आकर्षित करण्याची, त्याचे शिक्षण देण्याची जबाबदारी तब्लिघने उचलली. मूलतत्त्ववादी इस्लामी मूल्यांची भारतीय उपखंडात पुनर्स्थापना करण्यासाठी सुरू झालेली ही चळवळ थोड्याच काळात भारताबाहेरही प्रसिद्ध झाली. इस्लामी श्रद्धेला मानणारा कट्टर धार्मिक वर्ग या चळवळीला पाठिंबा देऊ लागला.
तब्लिघ विचारधारा –
जगभरात इस्लामचा प्रसार करणे हे मुस्लिमांचे कर्तव्य असल्याचे मुहम्मद पैगंबराने सांगितले आहे आणि त्यासाठी आम्ही काम करू ही तब्लिघची मूळ सैद्धांतिक भूमिका होती. मूळ इस्लामचा आग्रह धरणाऱ्या देवबंदी चळवळीचा तब्लिघवर मोठा प्रभाव होता.
भारतात राहताना मूळ इस्लामी परंपरा विसरलेल्या आणि धर्मापासून दूर चाललेल्या मुस्लिमांना पुन्हा इस्लामप्रमाणे वागण्याचा संदेश देणे हा तब्लिघचा मूळ उद्देश होता.
भारतीय मुस्लिमांवर रोजच्या जगण्यातील सवयीमध्येही भारतीय परंपरांचा प्रभाव होता. हा प्रभाव नाकारून कुराण आणि हदीस च्या शिकवणीप्रमाणे मुस्लिमाने रोजच्या जगण्यात वागले पाहिजे यासाठी तब्लिघ आग्रही होती.
विशेष म्हणजे इस्लामचा प्रचार राजकीय गोष्टींपासून अलिप्त राहून करण्यावर या जमातीने विशेष भर दिला. धार्मिक अधिष्ठान आणि मूळ धर्माकडे परत जाण्याची प्रेरणा या चळवळीला भारतातीलच नव्हे आजूबाजूच्या देशांतील मुस्लिमांचा पाठिंबा मिळण्याचे प्रमुख कारण ठरले.
तब्लिघी कार्यपद्धती :
स्थापना झाल्यानंतर इस्लामच्या प्रचाराचे काम करण्यासाठी या संघटनेने स्वतःची कार्यपद्धती ठरवून घेतली. देवबंदमध्ये कट्टर इस्लामचे शिक्षण घेतलेल्या मौलवींचे अनेक गट पाडले गेले आणि त्या गटाला ‘जमात’ असे म्हटले गेले.
या प्रत्येक जमातीने इस्लामचा संदेश घरोघरी पोहचवण्यासाठी, आणि लोकांना मूळ इस्लामकडे येण्यासाठी आग्रह करण्यासाठी जगभर फिरणे अपेक्षित होते. या भ्रमंतीत स्थानिक मशिदीत राहून तिथले मुस्लिम जे देतील त्यावर गुजराण करून दिवस काढण्याचे आदेश होते. त्यानुसार तब्लिघी जमाती काम करू लागल्या.
काळ गेला तशी तब्लिघींची कार्यपद्धतीही हळूहळू बदलत गेली. अनेक ठिकाणी राजकीय सत्तांशी मिळतेजुळते घेत आपले काम साधून घेण्याचे धोरण पुढच्या काळात त्यांनी अवलंबले. या लवचिक धोरणामुळे तब्लिघींच्या कामाचा परीघ प्रचंड वाढला. त्यांना पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम समुदायाची संख्या लक्षणीय झाली.
अगदी अलीकडे म्हणजे २०१० च्या दरम्यान ब्रिटनसारख्या देशात भव्य मशीद उभारण्यासाठी तब्लिघने जागा खरेदी केली. ब्रिटनमध्ये असणाऱ्या धार्मिक स्थळांपैकी ती मशीद म्हणजे सर्वात मोठी धार्मिक इमारत असणार होती. २०१२ साली होऊ घातलेल्या ऑलिम्पिक खेळाच्या स्थळाला लागूनच असलेली ही जागा ब्रिटनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. या मशिदीचे बांधकाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी ब्रिटनने ही बाब गांभीर्याने घेत बांधकामास परवानगी नाकारली हा भाग अलाहिदा.
परंतु यावरून हे सहज लक्षात येते की शतकभरापूर्वी भारतात सुरू झालेल्या या संघटनेने आपले जाळे जगभरात किती पक्के विणले आहे. आज अनेक मुस्लिम आणि बिगरमुस्लिम देशातही तब्लिघचे हजारो अनुयायी आहेत. दिल्लीत झालेला निजामुद्दीन मरकजचा तो वादग्रस्त कार्यक्रम म्हणजे धर्मप्रसार करण्यासाठी जगभर फिरणाऱ्या तब्लिघींचे वार्षिक संमेलन होते.
कोरोनासारख्या भयानक जागतिक महामारीने जगाला ग्रासले असतानाही धर्मप्रसाराची कट्टर इस्लामी प्रेरणा वरचढ ठरली आणि आज भारतात एकूण हजारभर कोरोनाग्रस्त रुग्ण हे तब्लिघी आहेत. त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता जास्त आहे. येत्या काळात तब्लिघी जमातीच्या या कृत्यामुळे भारतात आणखी काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाजही न बांधलेला बरा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.