तान्हाजी चित्रपट येऊन गेला. नेहमीप्रमाणे एखाद्या पात्राला ‘larger than life’ दाखवण्याचा सिनेमावाल्यांचा प्रयत्न हा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसून आला होता. तानाजीरावांनी सिंहगड कसा जिंकून घेतला ही माहिती या निमित्ताने घेणे महत्त्वाचे ठरेल. त्यासाठीच या लेखाचा प्रपंच.
सिंहगडाच्या लढाईमध्ये दोन महत्त्वाची पात्रे आहेत. एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे आणि दुसरे म्हणजे मुघलांचा सरदार उदयभान राठोड. अर्थातच तानाजीरावांच्या सोबतच शेलार मामा आणि भाऊ सुर्याजी मालुसरे हे होतेच.
लढाईची पार्श्वभूमी काय होती?
पुरंदरचा जो तह झाला त्यात शिवाजी महाराजांना जवळपास २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यात सिंहगड हा किल्ला प्रमुख होता. पुढे राजांची सुटका झाल्यावर झाल्यानंतर महाराजांनी मुघलांकडे दिलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला.
सिंहगड हे लष्करी दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण होते. महाराजांच्या दृष्टीने सिंहगड मुघलांकडे असणे म्हणजे धोक्याचे लक्षण होते कारण इथून राजधानी राजगड अगदीच जवळ होता. मुघलांनी किल्ल्याचा उत्तम प्रकारे बंदोबस्त केला होता व किल्याचे नेतृत्व उदयभान राठोड या राजपूत सरदाराकडे दिले होते.
सिंहगड
लढाईची समकालीन वर्णने पाहण्याआधी सिंहगडाची थोडक्यात माहिती घेऊ. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून साधारण २० किमी अंतरावर आहे. किल्ल्याचे मूळ नाव कोंढाणा. या गडाचा सर्वांत प्राचीन उल्लेख हा शाह-नामा-ए-हिंद नावाच्या फारसी महाकाव्यात आला आहे. या काव्याचा काळ हा साधारण इसवीसन १३५० हा आहे.
महम्मद तुघलकाने हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यातून जिंकून घेतला असा उल्लेख आढळतो.
अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९च्या आसपासचे आहेत. पुढे आदिलशाही काळात दादोजी कोंडदेव हे गडाचे सुभेदार होते असा उल्लेख आढळतो आणि नंतरचा इतिहास मग शिवकाळातला आहे.
(सिंहगडचा इतिहास वाचायचा असेल तर इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी लिहिलेले सिंहगड हे पुस्तक जरूर वाचावे.)
तानाजींनी गड कसा जिंकला?
समकालीन कागदपत्रे किंवा समकालीन नोंदी पहिल्या तर जेधे शकावली आणि शिवापूरकर देशपांडे अशा दोन साधनांमध्ये या लढाईचा उल्लेख आला आहे. ‘तानाजी मालुसरे यांच्याबरोबर जेध्यांकडील मावळे लोक निवड करून दिले होते. तानाजी सुभेदार होता. तो व कोंढाण्याचा किल्लेदार उदेभान दोघेही मारले गेले आणि ४ फेब्रुवारी १६७० रोजी गड ताब्यात आला’ इतकाच उल्लेख आढळतो.
पुढे सभासद बखरीमध्ये या लढाईचे जास्त वर्णन आढळते. सभासद हा महाराजांच्या समकालीन असला तरी बखर ही महाराजांनंतर लिहिली आहे.
सभासद बखरीमध्ये येणारे वर्णन हे खालीलप्रमाणे –
“पुढे २७ गड मोगलांना दिले ते मागती घ्यावे ही तजवीज केली. मोरोपंत पेशवे, निळोपंत मुजुमदार व अनाजीपंत सुरनीस यांसी सांगितले की ‘तुम्ही राजकारण करून यत्न करून किले घ्यावेत’. आपण राजीयानी मावळे लोकांस सांगितले की ‘गड घेणे’. त्यावरून तानाजी मालुसरा म्हणून हजारी मावळीयांचा होता त्याने कबुल केले की, ‘कोंडाणा गड आपण घेतो’ असे काबुल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावर चढविले.
जैसे वानर चालून जातात त्याप्रमाणे कड्यावर चालून गेले आणि कडा चढून गडावर जाऊन तेथून माळ लावून वरकड लोकंदेखील तानाजी मालुसरा चढून गडावरी तीनशे माणूस गेले. गडावरी उदेभान राजपूत. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल राजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तलवार घेऊन, हिलाल चंद्रज्योती लावून बाराशे माणूस, तोफजी, व तिरंदाज, बरचीवाले, पटाईत, आडह*त्यारी ढाला चढवून आले.
तेव्हा मावळे लोकांनी श्रीमहादेव! असे स्मरण करून नीट फौजेवर राजपुतांचे चालोन गेले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे राजपूत ठार झाले. चाळीस-पन्नास मावळे ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे यो*द्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली.
दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा, याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले.
किल्ला काबीज केला आणि गडावर पागेचे खण होते त्यास आग लावली. त्याचा उजेड राजांनी राजगडावरून पाहिला आणि बोलले की ‘गड घेतला फत्ते झाली’! दुसरे दिवशी जासूद वर्तमाना घेऊन आला की “तानाजी मालुसरा यांनी मोठे यु*द्ध केले. उदेभान किल्लेदार यास ठार मारिले आणि तानाजी मालुसरा ही पडला”. असे म्हणताच राजे म्हणू लागले की “एक गड आला, परंतु एक गड गेला!”
याच प्रकारची माहिती ही चिटणीस बखर, शेडगावकर बखर व चित्रगुप्त बखरीत आली आहे. ती विस्तार भयास्तव येथे देत नाही.
आता जनमानसांत जी रुळलेली कथा आहे ज्यात घोरपडीचे वर्णन आहे तसेच ‘आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ ही घटना जी आहे ती तुळशीदासने लिहिलेल्या पोवाड्यात आहे. या पोवाड्यात ‘गेट’ हा इंग्रजी शब्द आला आहे. एकंदर भाषेवरूनसुद्धा तो शिवकालीन पोवाडा वाटत नाही. त्यामुळे उत्तर पेशवाईमध्ये कधीतरी हा पोवाडा रचला असावा असे वाटते. याच पोवाड्यात असलेले उल्लेख हे खाली दिले आहेत.
तर सिंहगडच्या लढाईबद्दल हे असे वर्णन कागदपत्रात आढळते. यशवंती घोरपडीची वगैरे वर्णने अगदी रंजक वाटत असली तरी इतिहास अभ्यासताना तो कागदपत्रे वाचूनच केला पाहिजे अन्यथा इथल्या इतिहासाबद्दल गैरसमाज पसरत राहतील आणि त्यातून मूळ पराक्रमाचा इतिहास हा मागे पडेल.
सिंहगडची लढाई ही स्वराज्यातील महत्त्वाची लढाई मानली जाते याचे कारण म्हणजे मोक्याच्या जागी असलेला सिंहगड महाराजांना परत मिळाला परंतु तानाजीसारखा जीवाभावाचा मित्र राजानी गमावला.
समकालीन कागदपत्रात असलेले उल्लेख आपण वरती पाहिले परंतु या किल्ल्याच्या बाबतीत काही उत्तरकालीन लिखाणामुळे गैरसमज पसरले आहेत. त्यातील काही हे खालीप्रमाणे –
तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यास गेले असताना. शिवाजी महाराजांनी सिंहगड ताब्यात घेण्याचा विचार सांगितला. परंतु तानाजीच्या घरी लग्न असल्याने शिवाजी महाराज बेत बदलणार होते.
तानाजीने स्वतःहून प्रेरित होऊन शिवाजींना या लढाईचे नेतृत्व त्याला देण्यास सांगितले. तानाजी जिवंत असेपर्यंत शिवाजींना या मोहिमेवर जाण्याची गरज नाही. तानाजीने पहिले कोंढाण्याची मोहिम फत्ते करायची मगच मुलाचे लग्न करायचे. आधी लगीन कोंढाण्याचे, मगच रायबाचे असे तानाजीचे उद्गार प्रसिद्ध आहे.
तानाजीने कडा चढण्यासाठी एका यशवंती नावाच्या घोरपडीला दोर लावला व तिला कडावर चढून जाण्यास सांगितले व या दोराचा वापर करून मावळे कडा चढून गेले.
गड मराठ्यांच्या हातात पडल्यानंतर मावळ्यांनी किल्यावर मोठा जाळ करून राजगडावर शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याचा संकेत पाठवला. शिवाजी महाराजांना जेव्हा कळले की तानाजी मालुसरे या यु*द्धात कामी आले तेव्हा महाराजांना याचे अतिव दु:ख झाले. व त्यांच्या तोंडातून वाक्य बाहेर पडले “गड आला पण सिंह गेला”. व त्यानंतर या गडाचे नाव कोंढाणा बदलून ‘सिंहगड’ असे ठेवले गेले.
तानाजीरावांनी सिंहगड घेतल्यानंतर अगदी संभाजी राजांची ह*त्या होईपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. उत्तरकालीन पोवाडे जरी सोडले तरी तानाजीरावांनी शौर्य आणि निष्ठा यांचे दर्शन घडवीत स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले ही गोष्ट नाकारता येत नाही.
बाकी चित्रपट काय किंवा मालिका काय, ही केवळ मनोरंजनाची साधने आहेत. यातून खरा इतिहास सांगितला जात नाही. त्यातून किती घ्यायचं आणि किती सोडायचे हे आपण ठरवले पाहिजे. बाकी आपण सुद्न्य आहातच.
लेखासाठी वापरलेले संदर्भ –
१. सिंहगड- श्री. ग. ह. खरे
२. सभासद बखर
३. चिटणीस बखर
४. तुळशीदास पोवाडा
५. A Local History of Poona And Its Battlefields:- Col. L.W. Shakespear, Macmillan and Co. Limited, 1916.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.