आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
युद्धाच्या अनेक गोष्टी तुम्ही अगदी बालपणापासून ऐकल्या असतील. चक्रव्युहात फसलेल्या अभिमन्यूची गोष्ट, दहा तोंडाच्या रावणाला मारणाऱ्या रामाची गोष्ट, अशा कितीतरी गोष्टी. अशा युद्धाच्या कथांनीच आपल्याला नीती-अनीतीचे पाठ शिकवलेत. शूर, पराक्रमी योद्ध्यांनी आपल्याला निडरता शिकवलेय.
युद्धाच्या अनेक गोष्टी वाचल्या असतील, पण आपल्या सगळ्या सैन्यासह हजार किलोमीटरचे अंतर पार करून युद्ध जिंकणाऱ्या योद्ध्याची कथा ऐकली आहे का कधी?
हो, असेही एक युद्ध झाले होते. जिथे एका योद्ध्याने आपल्या सैन्यासह हजारो किमीचा प्रवास केला होता. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला कित्येक वर्षांचा कालावधी जावा लागला.
प्रवासात उंच उंच आणि बर्फाने आच्छादलेली शिखरे ओलांडावी लागली. तरीही आपल्या सैन्याचे मनोबल वाढवत या योद्ध्याने आपला प्रवास सुरूच ठेवला. शेवटी रोम साम्राज्यात प्रवेश करून त्याने रोमन सैन्याला मात दिली.
हन्निबल इतिहासातील एक महान योद्धा म्हणून ओळखला जातो. जाणून घेऊया या महान योद्ध्याच्या जीवनातील काही प्रमुख घडामोडी ज्यावरून त्याच्या साहसाचा आणि पराक्रमाचा परिचय होतो.
हन्निबल हा आफ्रिकेतील कार्थोज राज्याचा राजा होता. इसपू. २४७ मध्ये उत्तर आफ्रिकेतील कार्थोज राज्यात त्याचा जन्म झाला होता. हन्निबलचे वडील हॅम्लीकर बरका हे कार्थोज राज्याचे एक महान जनरल होते. हन्निबलला दोन भाऊ आणि तीन बहिणी होत्या. त्याच्या वडिलांना पहिल्या प्युनिक युद्धात पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाची सल त्यांना कायम बोचत राहिली.
त्यांना रोमन साम्राज्याला धडा शिकवून आपल्या अपमानाचा सूड उगवायचा होता. यासाठी आपली ताकद वाढवणे महत्वाचे होते, म्हणून त्यांनी आजूबाजूच्या क्षेत्रांवर हल्ले करून आपल्या साम्राज्याचा सीमा विस्तार करण्यास सुरुवात केली होती.
साम्राज्य विस्ताराच्या या मोहिमेत त्याने प्रथम स्पेनवर स्वारी करण्याचे ठरवले. हन्नीबलने त्यांच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला. युद्धावर जाण्यापूर्वी हन्नीबलच्या वडिलांनी त्याला उकळत्या पाण्यात हात घालून त्याला शपथ घ्यायला लावली की, काही झालं तरी कधीच रोमला मदत करणार नाही. तो रोमचा कट्टर विरोधक बनेल. हन्निबलनेही आपल्या वडिलांना तसे वचन दिले की, रोमशी शेवटपर्यंत त्याचे शत्रुत्व कायम राहील.
स्पेनवर विजय मिळवण्यात दोघेही यशस्वी झाले. हन्निबल अठरा वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याच्या वडिलांना त्याच्यावर खूप विश्वास होता. त्याच्या नेतृत्वात कार्थोज राज्याची आणखी प्रगती होईल आणि कार्थोज हे एक शक्तिशाली साम्राज्य म्हणून उदयास येईल असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. हॅम्लिकर यांच्या मृत्यूनंतर कार्थोजची गादी चालवण्यासाठी त्यांचा जावई हसडुबल याची निवड करण्यात आली. पुढे त्याचीही हत्या करण्यात आली. त्यावेळी कार्थोज आणि इबेरीयसच्या सैनिकांनी आपसात विचार करून हन्निबललाच आपला नेता म्हणून निवडला.
हन्निबलने सत्ता हाती येताच आपल्या वडिलांप्रमाणेच सम्राज्य विस्ताराची धोरणे आखली. हे करत असताना त्याने आपल्या वडिलांच्याच रणनीतीचा वापर केला.
२६ व्या वर्षी त्याने स्पॅनिश राजकुमारीशी विवाह केला. स्पॅनिश राज्याशी चांगले संबंध तयार व्हावेत याच उद्देशाने त्याने हा विवाह केला होता. हळूहळू स्पॅनिश आधिपत्याखालील एकेक राज्ये त्याने आपल्या अखत्यारीत आणली. यासाठी उत्तर स्पॅनिश भागात त्याला बऱ्याचदा युद्धालाही तोंड द्यावे लागले. पण या युद्धात त्याने विजय मिळवला.
कार्थोज हे आता एक शक्तिशाली आणि मजबूत राज्य बनले होते. रोमन आणि युनान साम्राज्याशी कार्थोजची तुलना होऊ लागली होती. हन्निबल नेहमीच आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवत त्यांना युद्ध जिंकण्यासाठी प्रेरणा देत असे.
इसपू. २१९ मध्ये हन्निबलने एब्रो नदी काठावरील सगूंटम शहरावर हल्ला केला. यामुळे पहिल्या प्युनिक युद्धातील कराराचे हन्निबलकडून उल्लंघन झाले होते. संगुटमसोबतचे हे युद्ध जिंकण्यास त्याला आठ महिने लागले पण, त्याला यात यश मिळाले होते. रोमला मात्र यामुळे हन्निबल विरोधात युद्ध करण्यास एक कारण मिळाले होते.
रोम साम्राज्यात प्रवेश करण्यासाठी हन्निबलने अल्प पर्वत रांगा पार करण्याचा निर्णय घेतला. ३००० फुट उंचावरून सैन्यासह पर्वत पार करणे म्हणजे खूपच अवघड काम होते. हन्निबलने आपल्या सैन्याचे धैर्य वाढवत हा रस्ता पार केलाच. पण, हे अंतर पार करण्यासाठी त्याला अनेक वर्षे लागली.
या प्रवासात त्याच्यासोबत ३८,००० पायदळ, ८००० घोडेस्वार आणि ३७ हत्ती होते. एवढे सगळे सैन्य अल्प पर्वतातुन रोम साम्राज्यात उतरण्यात यशस्वी झाले.
वाटेत त्याची आणि हिस्पॅनिक सैनिकांची भेट झाली. या सैनिकांना हन्निबलविषयी विशेष आदर होता. या सैनिकांनाही त्याने आपल्या बाजूने युद्धात सामील करून घेतले. प्रवासाच्या वेळी थंडीचे दिवस होते. या वातावरणाचा आणि बर्फाळ डोंगरातून प्रवास करण्याचा त्याच्या सैन्याला अतोनात त्रास झाला होता. हजारो सैनिक तर प्रवासातच मृत्युमुखी पडले होते.
हन्निबल या मार्गाने प्रवास करून रोम साम्राज्यात प्रवेश करेल याची रोमन सम्राटाला अजिबात खबर नव्हती.
रोमच्या इतालवी शहरात पोचला. इथले स्थानिक लोकही हन्निबलचे समर्थक होते. त्यांनी हन्निबलचे स्वागत केले. या नागरिकांच्या विद्रोहाची बातमी रोमन सम्राटापर्यंत देखील पोचली होती.
हन्निबलने रोमन साम्राज्यात प्रवेश केल्याची बातमी काळातच राजाने त्याला रोखण्यासाठी सैन्य पाठवले. पण या सैन्याला तोडीस तोड उत्तर मिळाले. रोम विरोधातील इतर छोट्या छोट्या राजांना त्यांनी आपल्यासोबत सामील होण्यासाठी आमंत्रणे, आमिषे सगळे काही केले. रोमन साम्राज्याने युद्धाची तयारी सुरु केलीच होती. त्यांनी इतालवी नदीच्या परिसरातच हन्निबलवर हल्ला बोल केला.
हन्निबलने या युद्धात अनेक रणनीतीचा वापर केला. या युद्धात त्याने गोरिला युद्धनीतीही अवलंबली.
हन्निबलच्या या आक्रमणाने रोम साम्राज्याला तडे जाऊ लागले. या युद्धात हन्निबलने रोमच्या ७०,००० सैनिकांना यमसदनी धाडले. कित्येक सैनिकांना त्याने बंदी बनवून ठेवले होते.
रोमनला या युद्धात ७०००० सैन्य गमवावे लगले होते. त्यांच्या राज्यात घुसून हन्निबलने त्यांना मत दिली होती. हन्निबलने काही काळ इथल्या प्रदेशावर सत्ता गाजवली पण काही दिवसांनी तो आपल्या नगरीत प्रत गेला.
पुढे हन्निबल आणि रोमन साम्राज्य यांच्यात तिसरी लढाई झाली. या लढाइवेळी रोमन सैनिकांनी कार्थेज शहर जाळून खाक केले. हन्निबलने पहिल्यांदा यश मिळवले असले ती दुसऱ्यांदा त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
हन्निबलने शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या वडिलांच्या शपथेचे पालन केले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.